डिसेंबर ३१, २००७

आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे. अर्थात किशोर कुमार सोबत इतर लोकांचाही आवाज असल्याने ते लगेच लक्षात येते. (आठवले, तीन देवियां सिनेमातील हे गाणे.)
दहावीत (बहुधा ११ वीत ) असतानाची गोष्ट. मला ताप आला होता. त्यामुळे मी झोपलो होतो. मध्येच जाग आल्यावर पाहिले तर मी खोलीत एकटाच होतो. रात्री ११च्या नंतर बेला के फूल मध्ये हे गाणे सुरू होते. ते गाणे ऐकताना एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे आता कधी ही हे गाणे ऐकले की एकदम फ्रेश्श वाटते ;)
(आताही हे लिहिता लिहिता मागे गाणे ही सुरू ठेवले आहे :) )

घूंघट की आड से..
आमिर खान, जुही चावलाचे हे गाणे ऐकायला मस्तच आहे. त्यातील शब्दही छान आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या लहानपणीचा सार्वजनिक गणपती समारंभ आठवतो. ज्यात कॉलनीतील एका मुलाने व त्याच्या घरी आलेल्या एका मुलीने ह्या गाण्यावर नाच केला होता.

ह्या सोबतच तम्मा तम्मा लोगे (थानेदार) तसेच आशिकी मधील गाणी ऐकली की तेच सर्व गणपतीचे दिवस आठवतात, ज्यात दिवसभर ही गाणी सुरू असायची. तम्मा तम्मा लोगे वर तर मनात येईल तसा नाच केला होता.

फरेब मधील ओ हमसफर हे गाणे ऐकले की महाविद्यालयातील दुसरे वर्ष आठवते. आणि बाहेर पाऊस पडत आहे असेच वाटते. ह्याचे कारण हे की ही गाणी जेव्हा चालत होती तेव्हा पावसाळा होता आणि माझ्या बाजूच्या खोलीतील मुले हीच गाणी लावून ठेवत होती.

यह जो थोडे से है पैसे, मुझसे नाराज हो तो.. पापा कहते हैं मधील ही गाणी ऐकली की परीक्षेच्या आधी दिलेल्या सुट्ट्या आठवतात. अर्थात त्या सुट्ट्या अभ्यासाकरीता होत्या पण त्यात गाणी ऐकणे, सिनेमे पाहणे हे थोडेच थांबते. :)

अश्विनी ये ना..
गंमत जंमत मधील हे गाणे ऐकले की आधी किशोर कुमारची गाण्याची पद्धत, जी दूरदर्शन वर दाखविण्यात आली होती, आठवत होती तसेच त्यातील अशोक सराफ ची जी बायको दाखविली आहे (चारूशिला साबळे) तिचे झाडू घेऊन नाचणे आठवायचे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिले आमचे एक सर प्रत्येक वार्षिक समारंभाला हे गाणे गायचे, आणि त्यांच्या शाखेच्या फ्रेशर पार्टीलाही. त्यामुळे आता कधीही हे गाणे ऐकले की कॉलेजचे ते समारंभ आठवतात.

ॐकार स्वरूपा..

कॉलेज मधील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ह्याच गाण्याने व्हायची (आताही होत असेल). त्यामुळे हे गाणे ऐकले की मग ते समारंभ आठवणे आलेच.

मैं हूं झूम झूम झूमरू..
लहानपणी गणपतीतील अंताक्षरीच्या निवडफेरीत मी हे गाणे फक्त सुरुवातीच्या संगीतावरून ओळखून म्हटले होते. त्यामुळे अंताक्षरीत मी निवडला जाण्यास फायदा झाला होता. :)
तसेच कार्यालयाच्या सेमिनार वजा सहलीत औरंगाबादला असताना अजिंठा लेण्यात जाताना बसमध्ये हे गाणे गायलो होतो.
हे दोन प्रसंग ह्या गाण्याशी निगडीत राहतील असे वाटते.

ताक धिना धिन ताक धिना धिन...

रखवाला सिनेमातील हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे. मी नेहमी गुणगुणत असे. शाळेत मग आमच्या वर्गात एक दोन वेळा मला गायलाही सांगितले होते. एकदा तर काय झाले की, आमच्या वर्गात दुसऱ्या वर्गातील मुलगा येऊन आमच्या टीचरला म्हणाला की मला त्यांच्या वर्गात बोलावले आहे. माझ्या टिचर ने मला पाठवले. तिकडे गेल्यावर कळले की त्यांच्या वर्गात अभ्यास संपला होता. मग मनोरंजन करण्याकरीता मला गाणे गायला सांगितले. तेव्हाही मी हेच गाणे गायलो होतो. आता ती इयत्ता/साल आठवत नाही, पण हे गाणे ऐकले की तो प्रसंग नक्की आठवतो.

अरे हो,
प्यार हमें किस मोड पे ले आया
सत्ते पे सत्ता चे हे गाणे तर राहिलेच. बंगळूरच्या ऑफिसच्या सहलीत सकाळी एका ठिकाणाहून परत येताना हे गाणे गाऊन मी धमाल केली होती. त्याच दिवशी मग संध्याकाळी बंगळूरला परत येताना ३ बस पैकी कोणत्या बसमध्ये बसावे हे विचार चक्र चालू असताना मित्रासोबत बसलो होतो. तेव्हा सकाळी आम्ही फिरायला गेलेल्या गटातील एक मुलगा मला शोधत आला व त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला. तिथे तर मग काय हे गाणे, आणखी भरपूर धमाल गाणी गात, खेळ खेळत आम्ही परतीचा प्रवास केला होता.

छैया छैया
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास सर्व खोल्यांत हेच गाणे वाजविले जात होते. एवढा वैताग आला होता की मी माझ्या २/३ मित्रांना तर सांगितले होते की माझ्यासमोर हे गाणे लावायचे नाही. त्यांनी तर एकदा मग गंमत केली. मी एकाच्या खोलीत गेलो असताना मुद्दाम हे गाणे लावले व दुसऱ्या मित्राला जाऊन सांगितले की मी हे गाणे लावायला सांगितले. काय रागावला होता मग तो माझ्यावर. अर्थात मग नंतर ते आम्ही निकालात काढले होते.

आणखी ही गाणी आहेत, काही सध्या आठवत नाहीत.

तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?

डिसेंबर २९, २००७

ह्या आधीचा लेख इथे वाचावा.

जरी लहान मुलांना जवळपास सर्व वस्तू हव्या असतात तरी आपल्या वस्तू कोणाला द्याव्यात न द्याव्यात हेही त्यांना तितकेच चांगले कळते असे मला वाटते. समजा एखाद्या मुलाकडे एक खेळणे आहे, जर कोणी मोठा माणूस ते घ्यायचा प्रयत्न करेल तर तो त्याला घेऊ देईल. कारण त्याला माहीत आहे की हा काही हे घेऊन टाकणार नाही. पण तेच खेळणे जर त्याच्याच वयाच्या (किंवा थोडाफार लहानमोठ्या) मुलाने घेतले तर तो काही ते घेऊ देणार नाही. लगेच त्यांच्यात स्पर्धा सुरू होईल किंवा मग रडारड. अर्थात दोन्हीतही त्या मुलाला दुसऱ्याबद्दलची वाटणारी ओळख कशी आहे ह्यावर ही ते अवलंबून असेल. एखाद्या नवीन माणसाला ते काही देणार नाहीत किंवा मग सर्व काही उदार मनाने देतील. तेच दुसऱ्या लहान मुलाकरीताही.

खाणे.. ही गोष्ट तर लहान मुलांची आवडीची. समोर मग काहीही असो, ती वस्तू त्यांना खाल्ल्याशिवाय, चाखल्याशिवाय कळतच नाही की ती किती चांगली आहे. :D ही अतिशयोक्ती असेल पण प्रत्यक्षात काहीसे असे आहे. मी दहावीत होतो तेव्हा असेल, शेजारी राहणारा एक मुलगा. नुकताच रांगायला लागला होता. त्याला कसे माहीत पण डोंगळे (मुंगळे) खायची सवय लागली. रांगता रांगता समोर एखादा मुंगळा जाताना दिसला की लगेच तो त्याच्या तोंडात. एके दिवशी मुंगळा त्याला जिभेवर चावला तेव्हा त्याची ती सवय सुटली.

आता थोडया मोठ्या मुलांविषयी. जरी आपल्यापेक्षा लहान मुले,भावंडे ह्यांच्याशी ते खेळत/भांडत असतील तरी त्यांच्याबद्दलची जबाबदारीही कळते. हे जरी भरपूर ठिकाणी पाहिले असेल तरी त्यातील एक पाहिलेला अनुभव सांगावासा वाटतो. बहुधा २००४ मध्ये, आम्ही मित्र पुण्यात फिरत होतो. तेव्हा पाहीले की एका मोटार सायकलवर मागे बसलेली २ मुले (वय ४ आणि ५/६ वर्षे असेल). लहान मुलाला मोठ्याने एकदम नीट पकडून ठेवले होते. जाणवत होते की तो मोठा मुलगा आपल्या लहान भावाची जबाबदारी कशी घेतो आहे ते.

असो, एखादे सर्वेक्षण करून आणखी भरपूर गोष्टी लक्षात येतील. पण वरील सर्व गोष्टी मी अर्थातच अनुभवातूनच लिहिल्या आहेत. आणि अनुभव तर पुढे येत राहतीलच.

डार्विनच्या त्या सिद्धांताप्रमाणे आणि मानवाच्या, जगाच्या प्रगतीवरून ही क्षमता वाढतच राहील हेच खरे.

डिसेंबर २६, २००७

भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी. ती वाचून वाटले की हे लोक स्वत:च्या वृत्तपत्राला वाचक मिळावेत म्हणून एखाद्या गोष्टीला मोठ्ठी करून सांगतात.

बातमी अमिताभ बच्चन ह्यांच्या आई श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराची.
दि. २३ डिसे. २००७ ला मुंबई मिरर ह्या दैनिकाच्या पहिल्या पानावर लिहून होते, Surprize Visitor at Teji's Funeral.
ह्या बातमीत आत काय लिहिले होते?
"विवेक ओबेराय ने अचानक श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचून इतरांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिषेक/ऐश्वर्या त्यांच्याशी अंतर ठेवून होते. अमिताभ, अमर सिंग आणि निखिल नंदा ह्यांचे चेहऱ्यावरील भाव चुकवू नका. वगैरे वगैरे."

त्यांच्या संकेत स्थळावर आणखीही विचित्र प्रकारे छायाचित्रांना वाक्ये जोडलेली आहेत. अभिषेक-ऐश्वर्या एकत्र बसले असताना त्याचा मथळा लिहिला "जोडी कमाल की" आणि पुढे लिहिलेले- आम्ही दोघांना विचारांत गुंग असताना छायाचित्र घेतले.

अरे, काय चाललंय काय? एखाद्याच्या अंत्यसंस्काराला कोणी माणूस पोहोचला तर त्यात तुम्हाला एवढी मोठी बातमी बनवायची गरज काय? मी तर म्हणतो हक्कच काय? आणि त्यांना दु:खाच्या प्रसंगी तरी सोडा. जर त्यांना काही नाही आवडले तर ते बघून घेतील.

पूर्ण बातमी (वाचावीशी वाटल्यास) इथे पहा.

तसेच टाईम्स ऑफ इंडीया मध्येही पहिल्या पानावर अभिषेक-ऐश्वर्याचे छायाचित्र आणि मथळा "कुछ ना कहो". अरे, फिल्मी ढंगात लिहायला ही बातमी पाहिजे का तुम्हाला? इतर ठिकाणी वाट लावताय ते पुरे नाही का?

लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख.

डिसेंबर १७, २००७

नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प.

१५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?"
आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच.

हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो. पण कामावरून उशीरा आल्यावर कसले लवकर उठणे आणि कसला संकल्प. व्यायामाचेही तेच.

गेल्या (ह्याच) वर्षाचेच बघा की, कार्यालयातील कामाचा आढावा, मिटींग, पुढील कामे लिहिण्याकरीता एक प्लॅनर विकत घेतला. पण तो प्लॅनर नीट वापरणे जमलेच नाही. कारण काय तर एका कामातच एवढा गुंतलो की पुढे काय करायचे तेच ठरवता आले नाही. मग प्लॅनर मध्ये काय लिहिणार? @^%&@^@((@#%">%&@^%
बरं मग, दुसऱ्याला त्रास न देणे ठरवावे का? अरे, मी काही एवढा वाईट नाही आणि खरे तर मी कोणाला त्रास देतच नाही. तेच स्वत:च येतात त्रास करून घ्यायला. ;) जसे मागील आठवड्यात ठरवले होते की ह्या आठवड्यात शांत रहायचा प्रयत्न करीन. पण कसले काय, नेमके ह्याच सौजन्य सप्ताहात लोक असे विचित्र वागतात की ... (काय गरज होती त्या कार वाल्याला रस्त्यात गाडी पार्क करून जायची? )
एक आठवडयाचा संकल्प पाळता येत नाही, निघाला नवीन वर्षाचा संकल्प करायला.

पण काय करणार, जगाप्रमाणे वागायला पाहिजेच. मग करूया की नवीन वर्षाचा संकल्प.
काय करूया बरं?

एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प.
मग, तुमचा काय आहे नवीन वर्षाचा संकल्प?

डिसेंबर १५, २००७

आज सकाळी कार्यालयात जाण्याकरीता बसमध्ये बसलो होतो. माझा भ्रमणध्वनी वाजला. पाहिले तर बहिणीचा फोन. उचलला पण काही आवाज नाही आला. थोड्या वेळाने बहिणीने संदेश पाठवला की तिने फोन नाही केला. अनिकेत फोनशी खेळत होता. अनिकेत म्हणजे माझा भाचा. वय फक्त ९ महिने. मी बहिणीला संदेश पाठवला. "बरे आहे. त्याला कळते की फोन कसा लावावा. आता तो फक्त बोलणे जमण्याची वाट बघत असेल." :)
आता ह्यात अनिकेतला खरोखर किती कळते ते माहित नाही, पण नेहमीचाच विचार मनात आला, "आज काल लहान मुलांना जास्त कळते."

बहुतेक जण म्हणत असतात की आज कालची मुले smart असतात. ह्याबाबतीत मला माझ्या बहिणीचे मत पटते. "जे सभोवताली असते, त्यातूनच मुले शिकतात ना? आपल्या पालकांनी आपल्याला फक्त चांगल्या गोष्टीच आपल्या समोर ठेवल्यात. ज्या गोष्टी नकोत त्या समोर नाही आणल्यात. त्यावरून आपण शिकलो की काय वस्तू कशाप्रकारे वापरावी. कुठे कसे वागावे. पुढे मग आपण आपल्या अनुभवातून पुन्हा त्या गोष्टींत नवीन जगाप्रमाणे भर टाकली. आता त्या गोष्टी आपण लहान मुलांसमोर ठेवणार. त्यामुळे मुळात जुन्या जगातील नको असलेल्या गोष्टी चाळून गाळूनच इतर त्यांच्यासमोर येणार."
डार्विनचाच सिद्धांत आहे ना तो? (शाळेतले आठवत नाही हो आता)
आता ह्या उदाहरणात, लहान मुलांसमोर आपण ज्याप्रमाणे भ्रमणध्वनी सारखा वापरतो, त्याप्रमाणे त्यांनाही तो हवासा वाटतो. पुढे मग आपले पाहून मग ते लहानपणीच भ्रमणध्वनी वापरायला शिकतील. चुकलो, शिकायला लागलेत.
पण खरोखरच, लहान मुलांची आकलन शक्ती हा अभ्यासाचा विषय आहे. लोकांनी त्यावर संशोधनही केले आहे आणि सुरूही आहेत. बसमध्ये, रस्त्यावर पहा ना. लहान मुले कशी सर्व गोष्टी निरखून पाहत असतात. अर्थात त्यांच्याकरीता सर्व नवीनच असते. पण प्रत्येकाचे निरिक्षण वेगवेगळ्या प्रकारे होत असेल असे मला वाटते. एखाद्या मुलाला भडक रंग जास्त आवडत असतील (बहुतेक लहान मुलांना त्याचे आकर्षण असतेच.) एखाद्याला हलणाऱ्या गोष्टींचे जास्त आकर्षण असेल.
२/३ वर्षांपुर्वी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता. त्यात लहान मुले चालताना शिकतात तेव्हा बहुतेक गोष्टी त्यांना आधीपासूनच माहित असतात असे सांगितले होते, नीटसे आठवत नाही. एखादा मुलगा चालताना, जिना उतरताना आपल्याला तोल सांभाळता येतो की नाही ते नीट पाहतो मगच चालायचा प्रयत्न करतो.
त्या कार्यक्रमात दाखवल्याप्रमाणे, एका लहान मुलाला एका टेबलावर उभे ठेवले आहे. त्या टेबलजवळच दुसरा टेबल ठेवला आहे. दुसऱ्या टेबलजवळ त्याची आई त्याला बोलावते (की असेच काहीतरी). दोन्ही टेबलांच्या मध्ये, तो मुलगा फक्त एकच पाय ठेवून दुसऱ्या टेबलवर जाऊ शकेल एवढ्या रूंदीची पट्टी /फळी ठेवली आहे. त्या मुलाला आधाराकरीता हाताच्या उंचीवर एक दुसरी लाकडी पट्टी दिली आहे, जेणेकरून तो त्या पट्टीचा आधार घेउन त्या फळीवरून दुसऱ्या टेबलवर जाऊ शकेल. इथे तो मुलगा सहजपणे गेला.
पुढे त्याच प्रयोगात हाताच्या लाकडी पट्टीऐवजी एक रबरी पट्टी लावली आहे. जेव्हा त्या मुलाला पुन्हा दुसऱ्या टेबलवर बोलावले, तेव्हा त्याने त्या रबरी पट्टीला हात लावला. त्याला कळले की ही पट्टी आपल्याला आधार देऊ शकत नाही तर तो पुढे गेलाच नाही, आणि रडायला लागला.
तसेच जिना चढताना उतरतानाही लहान मुले कठड्याचा वापर करूनच उतरतात हेही दाखविण्यात आले होते.
आता तुमच्यापैकी बहुतेकांनी हे आधी पाहिले असेलच.
एका मित्राच्या मुलाचे (वय जवळपास १० महिने) तोल सांभाळणे मी पाहिले तेव्हा ते कौतुकास्पद वाटले. झाले काय की मी सोफ्यावर बसलो होतो. तो मुलगा सोफ्यासमोरील टेबलचा आधार घेऊन उभा राहीला. त्याला सोफ्यावर यायचे होते. त्याने उजव्या हाताने टेबल पकडून डाव्याने सोफ्याला हात लावायचा प्रयत्न केला. तो सोफा लांब असल्याने त्याने उजव्या हाताने माझ्या पायाचा आधार घेतला. पुढे आला. मग डाव्या हाताने माझ्या पायाचा आधार घेऊन उजव्या हाताने सोफा पकडला आणि मग सोफ्याजवळ गेला. तेव्हा मला तो डिस्कव्हरीचाच कार्यक्रम आठवला.
जवळपास १२ वर्षांपुर्वी एक ३/४ वर्षांचा मुलगा एक व्हिडीयो गेम खेळत होता. मी गमतीत त्याचे सेल काढून घेतले आणि त्याला सांगितले की हे चालत नाही. त्याने नीट पाहिले, गेमच्या मागील सेलचा कप्पा उघडला आणि म्हणाला की ’इथे सेल पाहिजेत.’ घ्या. आता त्यांना काय काय माहित आहे.
एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो.
आणि भरपूर गोष्टी असतील. सध्या तरी एवढेच आठवत आहे. बाकी नंतर कधीतरी.

डिसेंबर १०, २००७

ह्या आधीचा लेख इथे पहा.
सिनेमातील मला लक्षात राहिलेली आणखी काही वाक्ये....
मेरे दो दो बाप...गोपी-किशन चित्रपटात दोन्ही सुनील शेट्टी एकत्र पाहिल्यावर सुनील शेट्टीचा (गोपी) मुलगा म्हणतो. त्या मुलाची हे बोलण्याची शैली एकदम वेगळी.
आमच्या संगणक कार्यक्रमात (program) काही ड्यूप्लिकेट दिसले की हे वाक्य आठवते.

क्या करू संजना, ऐसा ही हूं मैं.... मत रहो ऐसे...
पहिले वाक्य अजय देवगण चे दुसरे वाक्य काजोलचे. अजय देवगणच्या त्या वाक्यावर काजोल ज्या तऱ्हेने लगेच त्याला म्हणते "मत रहो ऐसे" ते मनाला लागून जाते. चित्रपट: प्यार तो होना ही था.

तुमने अपने गॉड को देखा है क्या? फिर भी तुम उससे प्यार करती हो ना?.
संजय कपूरला न बघताही प्रिया गिल त्याच्यावर प्रेम करत असते. तिची मैत्रीण तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रिया गिल चे हे वाक्य खूप काही सांगून जाते. चित्रपट: सिर्फ तुम

मुर्गी वालों अपनी मुर्गी संभालो.
तेजाब सिनेमात चंकी पांडे आणि मंडळी इतरांना फसवून आपल्या खाण्याचे पैसे भरायला लावतात.त्या संदर्भातील हे वाक्य त्या सर्वांच्या तोंडी असते. मस्त धमाल करतात ते.

दरवाजा छोटा हो और सर झुकाना पडे तो आदमी छोटा नही हो जाता.
मेकॅनिक असलेल्या ॠषी कपूरकडे नाना पाटेकर जाण्यास नकार देतो, तेव्हा त्याचा मामा (मोहन जोशी) त्याला समजावत असतो की आपले काम असले तर त्याच्याकडे जाण्यात काही गैर नाही. सिनेमा: हम दोनो.

अगर ऍक्टींग कर पाता तो सिनेमा में काम न करता?
हे वाक्य सिनेमातील नाही. परंतु एक धारावाहिक "इंडीया कॉलिंग" मधील आहे. हे इथे लिहिण्याचे कारण त्यात अयुब खान हे वाक्य म्हणतो. त्याला तसे म्हणताना पाहून आम्ही मित्र म्हणालो होतो की, त्याने हृदयावर दगड ठेवून हे वाक्य म्हटले असेल. :)

वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो.
सत्ते पे सत्ता सिनेमात हेमा मालिनी रागविल्यानंतर एक बुटका गुरखा अमिताभला दटावत असतो. तेव्हा हेमा मालिनी गेल्यावर अमिताभ त्याला कॉलरला पकडून वर उचलतो आणि म्हणतो "वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो".
पुणे-मुंबई (जुन्या) महामार्गावर मी एशियाड मधील दरवाजाजवळील खुर्चीवर बसलो होतो. तेव्हा मागून एक दुचाकीवाला नुसता हॉर्न वाजवत पुढे गेला. चालकाने त्याला बसमधील उंचीवरून त्याला ज्या तऱ्हेने पाहिले ते पाहून मला अमिताभचे हे दृष्य/वाक्य आठवले.

ह्या सिनेमातील हेमा मालिनीचा अमिताभच्या घरील संवाद म्हणजे एकदम धमाल येते पाहताना.. राहवत नाही म्हणून लिहित आहे-
"कचरा, तुम खुद एक कचरा हो. बल्की कचरा भी तुमसे अच्छा होता है. गंदे... बदबूदार.... बरसों से नहायें नही. पास से जाओ तो ऐसा लगता हैं की घोडे के अस्तबल से निकल के आया हो.
तुम्हे क्या लगता हैं तुम्हे कोई लडकी चाहेगी, तुमसे कोई प्यार करेगा? अरे.. तुम तो कोई डराने की चीज हो डराने की. किसी को जहर देकर मारने की बजाय तुम्हारी शक्ल दिखायें तो वह खुद ब खुद मर जायेगा."


यार, मैं यहा कार की बात कर रहा हू और तुम बेकार की बात किये जा रहे हो.
शान चित्रपटात शशी कपूर बिंदिया गोस्वामीला बघत असतो आणि अमिताभ तिच्या कारला. त्यानंतर हे वाक्य. ते दृष्यानंतर प्रत्येकाचा गोष्टी बघण्याची तऱ्हा आणि ह्या वाक्यातील शब्द एकदम खास वाटले.

डुकरा बोलले म्हणून काय घर सोडून जायचे का?
भुताचा भाऊ सिनेमात जॉनी लीव्हर एक तांत्रिक दाखवला आहे. त्याला आपल्या प्लॅन मध्ये सामिल करण्यासाठी वर्षा उसगांवकर नाते बनवायचा प्रयत्न करत असते. तो चित्रपट पाहताना अचानक असे वाक्य ऐकून खूप हसू आले होते.

बेइमानी मैं करता नहीं और मेरे साथ बेइमानी करने वाले को मैं बख्शता नहीं.
त्यागी सिनेमात गुलशन ग्रोव्हर आपल्या एका मित्राला सांगत असतो. का माहित नाही पण हे वाक्य अजून ही लक्षात आहे.(तेव्हा त्या चित्रपटातील एकूण एक वाक्य पाठ झाले होते.)

दीदी..मुझे वह छतवाला ज्यादा पसंद है.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये काजोल ची बहिण तिला सांगते. पहिल्यांदा (नीट न )पाहिला तेव्हा त्यातील संवाद एवढे लक्षात नाही राहिले. पण एका मैत्रिणीने हे वाक्य त्यात आहे हे जेव्हा सांगितले त्यानंतर सिनेमात त्या दोघींचा हा संवाद वेगळेच काही सांगून गेला. (काय ते विचारू नका. तसा हा चित्रपटही अजूनही काही वेगळाच वाटतो.)

तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था.
सरकार चित्रपटात अभिषेक बच्चन झाकिर हुसेन (सिनेमात रशीद) ला म्हणतो. तेव्हा चित्रपटातील खिळून राहिल्यानंतर अभिषेक चे हे वाक्य आणि ह्यापुढील काही वाक्ये (स्वामी आणि मुख्यमंत्र्याला म्हटलेली) बोलण्याची शैली मस्त वाटली. त्यामुळे लक्षात आहे.

ह्यातच दुसरे एक वाक्य दिपक शिर्के ला म्हटलेले... "मैं भी यही चाहता हूं."

अशी भरपूर वाक्ये असतील. जमल्यास पुढे कधीतरी लिहेन. हिंदी चित्रपट बनणे आणि आम्ही ते पाहणे तर काय बंद
नाही होणार.

डिसेंबर ०९, २००७

आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात.
उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार करती है तो ये पलट के जरूर देखेगी... पलट... पलट' हे वाक्य. माझ्या मते हे वाक्य नेहमी वापरात यावे, लक्षात रहावे अशाच विचाराने लिहिले असेल. पण त्याच्या सादरीकरणावरही तेवढाच जोर दिला गेला.

आता असेच वाक्य शाहरूख खानच्याच राजू बन गया जंटलमन मध्ये वापरले गेले होते. किंवा खरे तर राजू बन गया.. मधील हे वाक्य "अगर वह पलट के सिस्टर की ऑंखो में आँखें डाल के देखेगा तो फिर वह जा नही पायेगा.... पलट... पलट" पुन्हा दिलवाले दुल्हनिया मध्ये वापरले गेले. हे वाक्य ज्या प्रकारे सिनेमात वापरले गेले आणि एवढे लोकप्रिय झाले, की ते पुन्हा वापरायचा मोह आवरता आला नसेल. पण एक आहे, ते वाक्य खरोखरीच अर्थपूर्ण आहे. :)

आता आणखी थोडी सर्वांना आवडलेली वाक्ये..
तुम्हारा प्लान ही गलत है.. लगता है कच्चा खिलाडी है.पहिले वाक्य आमिर खान परेश रावल ला म्हणतो, दुसरे वाक्य सलमान खानला. सिनेमा: अंदाज अपना अपना.. ह्या सिनेमातील तर एक एक वाक्ये लक्षात राहण्याजोगी आहे,

इसको क्या घडी करके डालू क्या?
अपना प्यारा सर्कीट, ह्याबद्दल जास्त लिहिणे नको. सर्वांनाच माहित आहे.

केक के लिये हम कहीं भी जा सकते है...
सैफ अली खान, डिंपल ला म्हणतो. सिनेमा दिल चाहता है.
अशी इतर प्रसिद्ध वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न नाही. तो तर सगळीकडेच चालू असेल.
इथे आहेत मला लक्षात राहिलेली काही वाक्ये... आता ती तुमच्याही लक्षात नसतील, अर्थपूर्ण नसतील, खास कोणाच्या लक्षात रहावीत म्हणून लिहिली नसतील. पण काही कारणाने माझ्या लक्षात राहिलीत.

शैतान जहाँ जहाँ राम वहाँ वहाँ
राम लखन मधील हे वाक्य. सिनेमात शेवटच्या मारामारीच्या आधी आहे. मी आणि माझ्या बहिणीने ऐकल्याबरोबर प्रतिक्रिया दिली.. क्या डायलॉग है.

खुशकिस्मती सिर्फ़ एक ही बार दरवाजा खटखटाती है, पर बदकिस्मती तब तक दरवाजा खटखटाती है जब तक तुम दरवाजा ना खोल दो.

हमारा दिल आपके पास है. तनाझ कूरीम ऐश्वर्या ला सांगत असते. त्यातील शब्दांमुळे लक्षात राहिलेय अजून.

मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया.
चायना गेट.. मुकेश तिवारीच्या तोंडी हे वाक्य आहे. मी सिनेमा अजून पूर्ण पाहिला नाही पण हे वाक्य जरूर पाहिले आहे. एक वेगळे वाक्य म्हणून लक्षात राहिले.

अंकुश दिखने में भले ही छोटा हो, पर वह हाथी को काबू कर लेता है.
सिनेमा: मि. बेचारा. अनिल कपूर च्या छापखान्यात काम करणारा मुलगा कर्जाचे पैसे मागणाऱ्या लोकांना सांगतो.

धनाजी रामचंद्र वाकडे... ध.रा.वा. आता कोणाला धरावा?
धूमधडाका: अशोक सराफ जेव्हा शरद तळवळकरांच्या घरासमोर येतो तेव्हा हे वाक्य आहे. लहानपणी बहुधा पहिल्यांदा अशा प्रकारचे वाक्य ऐकले (किंवा समजले) असेल म्हणून अजुनही लक्षात आहे.

अरे मारने से पहले यह तो जान लिया होता के जिसे मार रहे वह कोई लुच्चा हैं या अपने मालिक का बच्चा है.
बोल राधा बोल... कादर खान ऋषी कपूरला मारल्याबद्दल गावकऱ्यांना जाब विचारत असतो. नक्की माहित नाही कोणी लिहिले ते. पण मला वाटतं हे वाक्य नक्की कादर खाननेच लिहिले असणार. अशाच प्रकारची बरीच वाक्ये कादर खानने भरपूर सिनेमांत म्हटली आहेत. कादरखानच्या तोंडी तशाच प्रकारचे संवाद असलेला सिनेमा म्हणजे स्वर्ग से सूंदर.
ह्यावरून आठवले. कादर खान हा हिंदीचा प्रोफेसर आहे असे ऐकले होते. त्याच्याच तोंडी हे असले संवाद/वाक्ये मग खटकतात.

घर का दूध खत्म हो गया है.
परिणीता मध्ये विद्या बालन संजय दत्त ला सांगते. पूर्ण सिनेमात एकदम अर्थपूर्ण, मस्त आणि छान वाक्ये असताना हे वाक्य ऐकून मला, माझ्या मित्रांना हसू आले. हे वाक्य नको होते असे वाटते.

मुझे दो दस चाहिये. एक दस.. दो दस.
जान से प्यारा मध्ये मतिमंद(?) गोविंदा आपल्या आईला (की इंस्पेक्टर भावाला) २० रू मागताना म्हणतो. एक वेगळे वाक्य आणि गोविंदाच्या संवाद शैलीने ते वाक्य लक्षात आहे.

याल्लोग को तडीपार नही बोलने का.
तडीपार सिनेमात मिथून बहुतेक वेळा स्वत:ला याल्लोग (की असेच काहीतरी) म्हणत असतो.

अठासी... नवासी... अस्सी
पनाह सिनेमात नसिरुद्दीन शहा ने इतरांना शिक्षा दिलेली असते, तेव्हा तो त्या नेणार असलेल्या मुलाला आकडे मोजावयास सांगतो. त्या मुलाची अठासी.. नवासी नंतर गफलत होऊन तो पुन्हा अस्सी वर सूरू करतो.

be patient be patient.. ok doctor.. ok doctor
ऐसी भी क्या जल्दी है सिनेमात विवेक मुशरान ची वाट पाहत सर्व बसले असताना सचिन म्हणतो की विवेक ला उशीर झालाय. अशोक सराफ त्याला म्हणतो be patient be patient.. तेव्हा सचिन म्हणतो ok doctor..ok doctor... (ह्यात अशोक सराफ डॉक्टर दाखविला आहे.)

समीर.. मुझे अपनी बाहों में भर लो..
मोहोब्बतें मध्ये किम शर्मा जुगल हंसराजला म्हणते. किम शर्माच्या त्या संवाद फेकीवर आम्हाला भरपूर हसू आले होते.

एक टीव्ही है फ्रीज है.. एक भगवान भी हैं देख...
सत्या सिनेमात स्नेहल (असेच काहीतरी त्याचे नाव आहे) जेव्हा चक्रवर्ती (सत्या) ला दिलेल्या खोलीत घेऊन येतो तेव्हा म्हणतो.

चाय से ज्यादा साला केटली गरम है.
पुन्हा स्नेहल.. हेराफेरी सिनेमात बस स्टॉप वर असरानीला दलाल समजून जेव्हा एक मुलगी देण्याकरता सांगतो, त्यात शेवटचे वाक्य. एक वेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणून लक्षात राहिले.
पुढील दोन वाक्ये तेरे मेरे सपने सिनेमातील.

दोस्ती में पुछने का नही.. कर डालने का.

यार पहले तो तू सिर्फ करोडपती था.. अब तो अनमोल हो गया है.अर्शद वारसी म्हणत असतो चंद्रचूड सिंग ला, आपल्या घरी नेण्याआधी.

अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा..
ह्या सिनेमाचे नाव ओळखा पाहू.... नाना पाटेकर, परेश रावल बद्दल अतुल अग्निहोत्रीला सांगत असतो.

अधर्मी... पापी.. दुराचारी.. बोल सॉरी..
एका धमाल चित्रपटात शेवटी असलेल्या धमाल नाटकातील वाक्य. जाने भी दो यारो सिनेमातील शेवटच्या महाभारत नाटकात नसिरुद्दीन शहाचे वाक्य.
ह्या सारखी खूप वाक्ये असतील, जी आपल्याला ह्या ना त्या कारणाने लक्षात राहिली असतील. सारखी सर्व सिनेमात वापरतात म्हणून नाही.

बाकीची वाक्ये पुन्हा कधीतरी.

डिसेंबर ०२, २००७

अर्थव्यवस्था म्हटले की समोर येते शेअर बाजार, सेन्सेक्स,विदेशी गुंतवणूक, चलनाचे दर, कर्ज, भाववाढ वगैरे वगैरे. पण ह्यात मी ह्याबद्दल काही लिहिणार नाही. इथे आहेत ते फक्त मी एक कॉलेज विद्यार्थी म्हणून माझे अनुभव. आता त्यात पैसे कमावण्याचा संबंध फारच कमी लोकांचा येतो. असतो तो फक्त खर्च. आईवडिलांनी दिलेल्या पैशांचा. कधीतरी लिहिल्याप्रमाणे, आज काल जेव्हापासून नोकरी करतोय तेव्हापासून पैसे हातात असतात. स्वत:चा/घराचा खर्च करू शकतो. अर्थात त्यामुळे उगाच उधळणे करत नाही. पण कधीही पैसे खर्च करताना कमी पडले की वसतीगृहातील अनुभव आठवतात. आजकाल ते दिवस आठवले मन भरून येते. ते होते काही वेगळे दिवस...

तेव्हा घरून आई पैसे देत होती. एखादे पुस्तक घेणे किंवा बाहेर खाणे ह्यामध्येही पैसे नीट विचार करून खर्च व्हायचे. इतरांसोबत सिनेमा बघणे, थोडाफार अवांतर खर्च तर व्हायचाच, पण तो काही उधळपट्टीत नाही येत. वसतीगृहात राहताना बहुतेकांना दर महिन्याच्या सुरूवातीला घरून पैसे यायचे. त्यामुळे बहुतेक मुले मनीऑर्डरची वाट पहायचे. त्यात ती मुले कसा, किती, कुठे खर्च करायचे ह्याबद्दल मी जास्त विचार केला नाही. त्यामुळे एखाद्याला पाहून आपण खर्च करणे किंवा त्याला वायफळ खर्चापासून अडविणे आपल्या अखत्यारित नव्हते. पण एक गोष्ट मी निरखून पाहिली आहे. (इतर मुलांनीही सांगितली होती). काही मुले जी सिगारेट प्यायची ती महिन्याच्या सुरुवातीला मस्त सिगारेटची पाकिटे विकत घ्यायचे. हळू हळु महिना सरत गेला, पैसे संपत गेले की मग त्या सिगरेट ची संख्या कमी व्हायची. पुढे मग सिगरेट संपली की उरलेली जमा करून ठेवा. एकदम गरज पडली तर ते उरलेले तुकडे पेटवून वापरणे, एकदम शेवटी तर सिगरेट ऐवजी वीडी पिणे ही होत असे. मी पाहिले नाही पण ऐकल्याप्रमाणे काही मुले तर चौकीदार/मेस वाल्यालाही विडी मागायचे. अर्थात मी त्या सर्वात (सिगरेट पिण्यात) नव्हतो. कारण ती सवय मी लावली नाही.

दुसर्‍या वर्षाच्या दुसया सत्रात मला पैसे कमी पडत होते. तेव्हा मी घरी जेव्हा फोन केला होता तेव्हा आईनेच विचारले होते की ’पैसे आहेत की पाठवू?’. ह्याआधी कधी अतिरिक्त पैसे मागावे लागले नव्हते, पण ह्यावेळी गरज होती त्यामुळे, का कोण जाणे, मला खूप हसायला आले. एवढे, की न आवरून मी फोन मित्राला दिला. तो आईला म्हणाला की "का माहित नाही, पण हा खूप हसत आहे." थोड्या वेळाने मग मी त्याला काय ते सांगितले.

त्यानंतर बहुधा मला कधी पैसे कमी पडले असे नाही झाले (शेवटच्या वर्षापर्यंत, हो.. सांगतो ते), की घरी फोन करावा नाही लागला की पैसे पाठवा. कारण, घरून येताना पैसे घेऊनच यायचो. ते तिकडील बँकेत ठेवायचे. मग १०-१५ दिवसांनी जेवढे लागतील तेवढे काढायचे. जर मित्राने काही वेळा पैसे मागितले तर ते ही मी द्यायचो. आणि काही वेळा आपण असेही करतो ना की आज मी पैसे देतो तू नंतर दे किंवा पुढच्या वेळी तू दे. किंवा कोणी घरून येत असेल तर त्याला सांगायचे हे हे घेऊन ये, मी तुला आल्यावर पैसे देतो. मग कधी कधी ते हिशोबात मोजले जायचे की तुझ्याकडे एवढे आहेत, मी तुला एवढे द्यायचे आहे.

ह्यावरून आठवले. २र्‍या की ३र्‍या वर्षी, नक्की आठवत नाही ३रे असेल, एक मित्र त्याच्या खोलीत बसून हिशोब करत होता. ह्याच्याकडून एवढे येतील, त्याच्याकडून एवढे येतील, फोटोचे ह्यांचे पैसे येणे बाकी आहेत वगैरे वगैरे. त्याचा येणार्‍या पैशांचा हिशोब झाला जवळपास ९०० ते ९५० रू. मी त्याला म्हणालो, "तू मला ८५० द्यायचे आहेस." तो म्हणाला, "साल्या, तू तर सावकारच निघालास. मी एवढे थोडे थोडे करून पैसे जमा करत आहे. आणि तू एका फटक्यात जवळपास सर्वच पैसे काढून नेतोयस." :)

आमचे कॉलेज शिर्डीपासून जवळ होते. त्यामुळे बहुतेक वेळा आम्ही शिर्डीवरूनच घरी यायचो. केव्हाही बस मिळायची. तर, तिसर्‍या वर्षी मी आणि एक मित्र शिर्डीवरून येणार होतो. बस निघण्याच्या आधी जेवण झाल्यावर विचार केला आईसक्रिम खाऊया. म्हणून एका दुकानात दरफलकावर बघत होतो कोणते परवडेल. पण एकदम कोणतेही आईसक्रिम खाण्यासारखे वाटत नव्हते. मग आम्ही विचार केला- हे असे करण्यापेक्षा थेट आइस्क्रिम ठेवतात तिकडेच पाहू कोणते पाहिजे. मग त्यानुसार आम्ही बघितले. 'ब्लॅक करंट’ खाण्यासारखे वाटले म्हणून ते घेतले. शेवटी पैसे देताना लक्षात आले की आम्ही खाल्लेले 'ब्लॅक करंट’ हेच सर्वांत महाग होते. :D

आता आपण केलेला खर्च वेगळा. पण वसतीगृहाच्या खानावळीत प्रत्येक विद्यार्थ्याचे महिन्याचे खाते ज्या माणसाकडून बघितले/सांभाळले जात, त्याने ही वेगळ्या प्रकारे आमच्या खिशाला खड्डा पाडण्याचा प्रयत्न केले होते. झाले काय, की परीक्षेच्या आधी सुट्टी असल्यावर भरपूर मुले घरी जात असत तेव्हा जर कोणी त्यावेळी वसतीगॄहात असेल व त्या खानावळीत खात असेल तर तिथे वहीत लिहावे लागत असे. महिन्याच्या शेवटी मग प्रत्येक मुलाचे किती दिवस खाणे झाले होते त्यावरून मग आधीच भरलेल्या पैशांपेक्षा जास्त झाले असेल तर मग महाविद्यालयात ते पैसे भरावयाचे असत. काही मुलांनी ती खातेवही बघण्यास मागितली तेव्हा पाहिले की काही मुलांच्या नावासमोर त्याने महिन्याचे ३२-३४ दिवस खाल्ले असे दाखविले होते. मग काय तक्रार केली त्याची.

हे सर्व झाले एखाद्या वेळी एखाद्यावर आलेला प्रसंग. पण ४थ्या वर्षी तर जणू अर्ध्या बॅचसमोरच पैशाची अडचण उभी राहीली होती. जवळपास सर्व प्रॅक्टिकल(प्रयोग) परीक्षांचे जर्नल(प्रयोगवही) तपासून तयार. सर्वजण परीक्षेचे अर्ज भरून नंतर घरी जाण्याच्या तयारीत. ह्यात मग ते पैसे वेगळे काढल्यावर बहुतेकांच्या लक्षात आले, आर्थिक आघाडीवर आपण मार खातोय. मग त्या २-३ दिवसांत मुलांचे खर्च बघण्यासारखे (की न बघण्यासारखे?) होते. आमच्या दररोजच्या जेवणावर त्याचा एवढा फरक पडला नाही, कारण डबा लावला होता. त्यामुळेही बहुधा ते आधी जाणवले नाही. पण रविवारी दुपारी फिस्ट असल्याने रात्रीचे जेवण बाहेरच करावे लागे. आता रात्री काय जेवावे? कसे तरी स्वत:च्या सर्व सामानातून धुंढाळून पैसे जमा केले व रात्री मॅगी खाल्ले. तो होता स्वस्त उपाय. तरीही मला एक दिवस आणखी काढायचा होता. पण हॉस्टेल मधील एका मित्राला आणखी काही दिवस (की परीक्षा होई पर्यंत) तिकडेच थांबायचे होते. त्याचा पैशाचा बंदोबस्त होण्यास थोडा वेळ होता. आम्ही मग जुनी पुस्तके शोधून काढली जी विकू शकतो. आता हे असे करण्यात काही गैर नव्हते. आपण पुस्तके टाकू नये म्हणतो. पण शेवटी भरपूर पुस्तके रद्दीतच देतो ना? जुनी पुस्तके ठेवण्याचे कारण असे की पुढे दुसया मुलांना ते विकू शकतो. किंवा आपल्या वापरण्याकरीताही ठेवू शकतो. पण ती विकण्यास आम्ही धजावलो. कारण वेळच तशी होती. तरीही का कोण जाणे आम्ही वेगळा विचार केला. म्हटले, पुस्तके विकून पैसे घेणे नको. इतर मुले नाहीत पण आपले मोठे लोक आहेत ना उधार मागण्यास. मग मी विचार केला, कॉलेजच्या सरांनाच मागवेत पैसे.

दुसर्‍या दिवशी सकाळी परीक्षेची फी भरल्यानंतर असेच सर्व मित्र पायर्‍यांजवळ जमा होतो गप्पा मारत. काही खाण्याचा विचार केला. पण आठवले, खिशात फक्त ३ रूपये आहेत, ज्यात चहाच मिळू शकेल. एक मित्र म्हणाला, "आहेत माझ्याकडे पैसे. मी देतो." सर्व ओरडलो,"चला". कँटीनमध्ये जाऊन मग आम्ही बर्गर खाल्ले (मॅकडोनाल्डचे नाही हो, साधे, गावठी) आणि चहा प्यायलो. आणि अर्थात त्या मित्राच्या नावाने थ्री चिअर्स करणे आलेच. पुढे थोड्या वेळाने मग त्यानेच बँकेत जाऊन थोडे पैसे काढले व आम्हाला दिले. चला, घरी जाण्याची तर व्यवस्था झाली.

हे प्रकरण होत असताना दुसरा एक मित्र म्हणाला की, "तुला मी जे RAM आणायला सांगितले होते ते तू मुंबईहून घेऊन ये. मी पैसे देतो." दुपारी त्याच्या खोलीवर गेल्यावर तो म्हणाला की त्याने पैसे त्याच्या खोलीतील मित्राच्या बॅगेत ठेवलेत आणि तो मित्र घरी गेलाय. संध्याकाळपर्यंत परत येईल. घ्या, इथे मुलांकडे पैसे नाहीत. आणि ह्या मुलाकडे, जो मला १६०० रूपये देणार होता, पैसे असूनही तो त्याला हात लावू शकत नव्हता. तरीही कसे तरी त्याने ते पैसे मिळविले (कसे ते मला आठवत नाही) व मला दिले. सकाळी मिळालेले २०० आणि हे १६०० ह्यात माझे घरी जाणे तर आरामात होणार होते, मला सरांना पैसे मागावे लागले नाहीत आणि सध्याच्या गरजेपेक्षा अतिरिक्त पैसा होता. म्हणून त्या हॉस्टेलवाल्या मित्राला विचारले की "पैसे पाहिजेत का?" तो म्हणाला, "नको.हॉस्टेलच्या मालकाकडून घेतलेत."

रात्री मी शिर्डीला पोहोचल्यानंतर बसचे तिकिट काढून मग खाण्याकरीता पळालो. खिशात भरपूर पैसे असल्याने खाण्यास स्पेशल पाव भाजी सांगताना काही तरी वेगळेच वाटत होते.
२ दिवस अंधारात राहिल्यानंतर जेव्हा आपल्याला लख्ख प्रकाश दिसल्यावर वाटते तसेच काही.

नोव्हेंबर ३०, २००७

अनुदिनी लिहायचे तर सुचले , पण आता नक्की काय लिहावे?
थोड्या दिवसात पुन्हा नवीन शिकणे येईल, कामाचा जोर वाढेल मग तर इतरांचे वाचायलाही वेळ मिळणार नाही, लिहिणे तर दूरच. आणि मग त्यातल्या त्यात सुचले ही पाहिजे. वास्तविक अनुदिनी लिहिणे म्हणजे मनातील जे काही इतर सर्वांना सांगावेसे वाटेल ते लिहावे असे वाटले.
पण सध्या फक्त जुने अनुभवच लिहावेसे वाटताहेत. मग ते वसतीगृहातील असो, रस्त्यावरील काही असो किंवा मग मित्रासोबतचे संवाद किंवा घरातले, कार्यालयातील इतर. ते ही कसे लिहावेत असे वाटते.
मनातील इतर विचार तितके नीटसे लिहिण्यात उमटत नाही आहेत.

अरे हो, सर्किट ने सुचविल्याप्रमाणे दिवाळी अंकांबद्दल लिहावेसे वाटते. पण नक्की काय लिहू? समीक्षण? मी तेवढा चांगला वाचक नाही की समीक्षक नाही
की त्यातील लेख? नको. लेखक/प्रकाशक मला धरून नेतील.

चला, तरी बघतो.... ते किंवा आणखी काही सुचते का?

नोव्हेंबर २५, २००७

६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का?

का? सांगतो.
सिनेमा चालबाज:
शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा."

हा झाला सिनेमातला गंमतीचा भाग. पण खरोखर पत्ता सांगणे आणि त्यातल्या त्यात शोधणे ही मोठी कला आहे असे मला वाटते. एखादा माणूस (मुंबईमध्ये) लोकल मधून उतरला की त्याला पहिली गोष्ट शोधावी लागते ती पूर्व कुठे आणि पश्चिम कुठे? सूर्यदर्शनाला नाही तर त्याच्याकडे पत्ता तोच असतो. मग बाहेर आल्यानंतर पूर्ण पत्ता शोधणे हे कार्य.

आपण पत्रामध्ये जो पत्ता लिहितो त्याचा एक साचा आहे असे मी पाहिले आहे. प्रथम खोली(आजकाल फ्लॅट) क्रमांक, मग मजला, मग इमारत क्रमांक/नाव, मग संकुल (कॉम्प्लेक्स), मग रस्ता , मग विभाग, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, देश. आणि पिन क्रमांक. आता ह्यातील शहर, तालुका,जिल्हा, राज्य नाही लिहिले तरी पिन क्रमांकावरून पुढील पत्ता शोधता येतो. विभाग किंवा इमारत लिहिला नसेल तर पोस्टमनच फक्त तो पत्ता शोधून काढू शकतो अशी आख्यायिका आहे आणि अनेकांचा अनुभव ही असेल. ह्यावरून पत्र तर नक्कीच पोहोचेल त्या पत्त्यावर. पण माणसाचे काय? नवीन पत्ता शोधणाऱ्याला काय माहित तो पिन क्रमांक कुठला आहे ते? ते सांगणारे खात्रीचे एकच ठिकाण म्हणजे पोस्ट ऑफिस. :) पोस्टमनच काय तो आपल्याला पत्ता सांगू शकतो. पण मग आधी पोस्ट ऒफिस शोधावे लागेल ना. रस्त्यावरील वाहतूक पोलीस ही काही वेळा मदतीला असतात.
हे सर्व करू शकतो, ते लोक उपलब्ध असताना. नसल्यास काय करावे?

आता गाडीने जाताना जर रस्ता/पत्ता विचारायचा तर रिक्षावाल्याला विचारणे सुरक्षित समजतो. तरी काही वेळा त्यांनाही ते माहीत नसते. पण पत्ता मिळतो भरपूर वेळा. एकदा असे झाले की मी पत्ता शोधत होतो बॆंकेचा. तिच्या जवळच एक हॉल होता प्रसिद्ध. मी रिक्षावाल्याला एका रस्त्यावर विचारले कुठे आहे? तो म्हणाला, हा हॉल इथे नाहीच तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आलात. तेव्हा मी नीट पत्ता बघितला तर रस्त्याचे नाव वाचण्यात माझीच चूक झाली होती.

दुसरा मार्ग म्हणजे, त्या विभागात पोहोचल्यानंतर तिकडील वाण्याच्या दुकानात विचारणे. ते लोक घरी सामान पोहोचवत असतात त्यामुळे कधी कधी तर घराच्या बेलपर्यंतचा मार्ग समजावून मिळतो ;)

मुंबई मध्ये रेल्वे स्थानकावर विचारा, इकडे कसे जायचे. उदा. तिकिट खिडकीबद्दल .जर एखाद्याला वेळ असेल तर किंवा तो तिकडे जाणारा असेल तर तुम्हाला तेथपर्यंत पोहोचवेल.
इतर काही वेळा तर माणसे बेस्टच्या बस स्थानकापर्यंत सोबत करतात आणि सांगतात, ह्या क्रमांकाची बस पकडा इथून.

पुलंच्या ’असा मी असामी’ मधील पत्ता शोधण्याचा प्रसंग तर बहुतेक सर्वांना माहित असेलच :) त्याप्रमाणे चुकीच्या ठिकाणी जाऊन मागे नाही यावे लागले मला. पण हो, काही वेळा नजरचुकीने गंतव्यस्थान मागे निघून जाते. मग पुन्हा मागे फिरावे लागते.

रस्ता चुकल्याचा काही वेळा फायदा हा होतो की आपल्याला नवीन मार्ग कळतात.
१० वर्षांपुर्वी आम्ही जेव्हा ठाण्याला नवीनच रहायला गेलो. तेव्हा मी जवळपास एक-दीड महीना उशीराने गेलो होतो. बहिणीला विचारले स्टेशनची बस कुठून जाते. तिने सांगितले की, असा इकडून जा. पुढे मस्जिद दिसली की तिकडून उजवीकडे जा. मग पुन्हा डावे, उजवे. मी चूकून मस्जिद कडून डावीकडे गेलो. मग पुढे जाऊन गोंधळलो. पुढे जाऊन लोकांना विचारले तर त्यांनी सांगितले की आता इकडून असा असा जा. त्यामुळे झाले काय की, मी पोहोचलो दुसऱ्या एका बसस्थानकावर, शोधत असलेल्या बसच्या मार्गातच दोन स्थानके पुढे, जाउन पोहोचलो.
पुन्हा रात्री घरी आलो तेव्हाही गोंधळ. मला सांगितले होते की बसमधून उतरल्यावर पोलिस चौकीनंतर डावीकडे, मग उजवीकडे, मग डावीकडे, असे. पुन्हा, मी पोलिस चौकीनंतर उजवीकडे वळलो. मग सुचेना. तरी मग गल्लीतून सरळ सरळ जात पुढे बाहेर पडलो ते घराच्या संकुलासमोर. ह्यात फायदा हा झाला की मला नवीन मार्ग समजला :)

गावी गेलो तर नातेवाईकच घ्यायला आलेत बहुतेकवेळा. त्यामुळे काही अडचण नाही.

तसे, मी पत्ता हातात असल्याने सरळ तिथे पोहोचलो हेही होते भरपूर वेळा. २ वर्षांपुर्वी मित्राच्या लग्नात गेलो होतो चेन्नईला. तिकडे आमचा ग्रूप बाहेर फिरत होता. माझ्या मित्राने फोन करून कामाकरीता बोलावून घेतले. आता चेन्नई म्हणजे तमिळ भाषा. ते लोक हिंदी बोलत नाही आणि इंग्रजी नीट येत नाही असे ऐकून होतो. त्यामुळे मित्रांना आणि दुकानदारांना विचारले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षात बसलो. रिक्षावाल्याला थोडेफार इंग्रजी येत होते. पोहोचलो हॉल वर. मित्र म्हणाला, तू इथे पहिल्यांदा आलास आणि पहिल्याच दिवशी रिक्षाने बरोबर पत्ता मिळविलास? इतर लोक नाही पोहोचत.

अशी आणखी भरपूर उदाहरणे आहेत.असो.

पत्ता सांगणे हे एक वेगळे प्रकरण.
बहुतेक वेळा मलाच पत्ता नीटसा माहित नसतो, म्हणजे सांगण्याकरीता, आणि कोणी पत्ता विचारला तर फार ओशाळल्यासारखे होते. कारण मी स्वत: तिथे जाऊ शकतो. पण इतरांना सांगण्यात अडचण येते. जेव्हा माहित असते तेव्हा तर मग मी सांगतो. तरी एक दोन वेळा असे झाले की मला वाटले पत्ता सांगितलेला माणूस नीट पोहोचेल ना?
झाले काय की बंगळूरला होतो तेव्हा एकाने एका चौकात विचारले की ITPL ला कसे जायचे? आता समोरचा रस्ता सर्व लोक वापरत असत कारण तो थोडा जवळ होता, पण डावीकडे-उजवीकडे असे करत. डावीकडचा रस्ता थोडा लांब होता पण सरळ होता, फक्त एकच उजवे वळण. त्या क्षणी विचार केला की ह्याला डावीकडून पाठवूया. नेमका पोहोचेल तरी. अर्थात त्याला तशी जाणीव करून दिली.
पुण्यात संचेतीच्या थोडे पुढे एकाने मला विचारले, "ला मेरिडीयन ला कसे जायचे?" आता मला एवढे माहित होते की डावीकडे हायवे सुरू होतो. म्हणजे ते उजवीकडेच असेल. मग त्याला सांगितले की उजवीकडे कुठेतरी आहे. मनात शंका आली जर डावीकडे नुकतेच काही नवीन झाले असेल तर हा माणूस मला भरपूर शिव्या देईल. पण मी पूढे बघितले की 'ला मेरिडियन' उजवीकडेच १-२ किमी च्या अंतरावर आहे. बहुतेक वेळा त्या रस्त्याने जाऊनही माझ्या ध्यानात नव्हते. हायसे वाटले. पण ठरविले नीट माहित असेल तरच सांगायचे.

त्यामुळे पत्ता सांगणाऱ्यांचा काही वेळा हेवा वाटतो. वाटते की ह्यांना एवढे सर्व कसे लक्षात राहते?
माझ्या जुन्या कार्यालयात एक माणुस आहे, त्याला मुंबईतील पत्ता विचारला तर तो मस्त नकाशा काढून देतो आणि नीट समजावून सांगतो. त्याने तर हे ही सांगितले होते की ह्या सिनेमाकडून पुढे डावीकडे जाऊ नकोस. तो ’तसला विभाग’ आहे. म्हणजे कोठे वळावे आणि कोठे वळू नये इतपत सखोल माहिती दिली.
तसाच एक जुना शेजारी ही. त्यालाही पत्ता विचारला की तो ही नीट नकाशा काढून द्यायचा.

पुण्यात पाट्या असतात ना? ’जोशी इथे राहतात. उगाच इकडे तिकडे विचारू नका.’ किंवा ’जोशी इथे राहत नाहीत. उगाच बेल दाबू नये.’ ह्याचा फायदा होत असेल ना भरपूर वेळा ;)
आता पुण्याचे पाटीचे वेड ठाण्यातही पोहोचलेय किंवा एखादा पुणेकरच ठाण्यात गेलाय असे वाटते. मागील आठवड्यात ठाण्यात मी एका दुकानात पाटी वाचली. "कृपया इथे पत्ते विचारू नये. पत्ते सांगितले जाणार नाहीत."

तर तात्पर्य काय, ह्या सर्वांमुळे इकडे माझ्या मित्रांनाही माहित आहे की मी कशा प्रकारे पत्ते समजतो. त्यामुळे ते ही मला समजेल अशाच प्रकार समजावून सांगतात. तेव्हा एक विनंती, पत्ता कसा शोधावा/सांगावा हे कोणी शिकवेल का?

नोव्हेंबर २२, २००७

जाहिरात विश्चातील काही बदल/विसंगती

१. ऐश्वर्या राय आणि आमिर खान ह्यांची एकत्र पहिली जाहिरात होती पेप्सी ह्या कंपनीसोबत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी एकत्र काम केले ते कोक च्या जाहिरातीत.

२. रूबी भाटिया ही एकाच वेळी दोन टूथपेस्टच्या जाहिरातीत चमकत होती (वास्तविक दात चमकवत होती). एक होती कोलगेट आणि दुसरी होती क्लोज-अप. दोन्ही जाहिराती एकाच वेळी प्रदर्शित झाल्याने मला वाटले असे कसे होईल? पण नंतर कळले की वास्तविक तिची क्लोज-अप ची जाहिरात काही वर्षांपूर्वी बनली होती पण ती प्रदर्शित झाली नाही. त्यानंतर मग जेव्हा कोलगेट ची जाहिरात बनून प्रदर्शित झाली नेमकी तेव्हाच ती जुनी जाहिरात ही प्रदर्शित करण्य़ात आली होती.

३. पार्थिव पटेल जेव्हा चर्चेत होता तेव्हा त्यालाही जाहिराती मिळाल्या होत्या. कोणत्या तरी वेफर्स/चिप्स ची जाहिरात होती ती.
एकात त्याला सिनेमा बघायला जायचे असते. पण त्याला आत जायची परवानगी मिळत नाही कारण तो सिनेमा वयस्कांसाठी असतो आणि ह्याचे वय १८ पेक्षा कमी आहे. मग तो चौकीदार त्याला पेन्सिलने नकली मिशी काढून देतो व आत पाठवतो. त्याच वेळी आलेली दुसरी जाहिरात नेमकी आठवत नाही पण त्यात पार्थिव क्रिकेटचा सराव करून आलेला असतो. बाहेर रस्त्यावर त्याचे एका माणसाशी काहीतरी संवाद आहेत. मग तो (पार्थिव पटेल) आपल्या कारमधून निघून जातो.
काय गंमत ना? :) एका जाहिरातीत तो १८ च्या खालील दाखवला आहे आणि दुसयात १८ च्या वर. (आता जाहिरातीतील पात्रे असतील वेगळी, पण लगेच ध्यानात येतो तो पार्थिव पटेल म्हणूनच)

नोव्हेंबर २०, २००७

२५ एप्रिल १९९९.
संध्याकाळी ६/७ च्या दरम्यान मी माझ्या संगणकावर DOS मध्ये विषाणूविरोधी संरक्षणाची संहिता चालवत होतो. का माहित नाही पण माझ्या संगणकावर विंडोजवर ते चालत नव्हते. त्यात त्याला C ड्राईव्ह मध्ये काही विषाणू मिळाले. ते मी काढून टाकले. पण D ड्राईव्ह तपासता आली नाही. कारण ती संकुचित होती(compressed). तेव्हा विषाणू मिळणे म्हणजे खास काही वाटत नव्हते.
२६ एप्रिल १९९९.
मी सकाळी झोपलो होतो. ७:३० किंवा ८ च्या दरम्यान स्नेहांशू मला उठवायला आला. "ए, चल ना." "थांब रे जरा.", मी आपला उठायच्या मनस्थितीत नव्हतो.
५/१० मिनिटानी अमीत आला. त्याला स्नेहांशू म्हणाला "संगणक चालू होत नाही." आता संगणक चालू होत नाही म्हटल्यावर माझी झोप उडाली. मी ताडकन उठून बसलो. स्नेहांशू म्हणाला, "संगणक बूट होत नाही आहे". आम्ही तडकाफडकी त्याच्या खोलीवर गेलो (वरच्याच मजल्यावर).
अमीतचा संगणकही स्नेहांशूच्याच खोलीत होता. दोघांचेही संगणक चालू होत नव्हते. संगणकांवर संदेश: Please insert the boot disk. आमच्याकडील bootable फ्लॉपीने संगणक सुरू करून बघितले तर हार्ड डिस्क एकदम साफ. अगदी नवी कोरी असते तशी. मग एका संगणकावर विंडोज टाकले. आवश्यक सॉफ्टवेयर टाकले. काय करणार, त्यांचे प्रोजेक्ट चे काम बाकी होते, परिक्षा होती पुढे. त्यात एक (कुठली/कोणाची ते आठवत नाही) हार्ड डिस्क तपासली तर कळले की एक विषाणू आहे. त्याची माहिती काढली तर कळले, तो होता Win-CIH विषाणू. २६ एप्रिलला कार्यरत होतो. त्यानेच त्या हार्ड डिस्कला पूर्ण चाटून पुसून साफ केले होते.
मग काय... दवंडी पिटविली वसतीगृहात. आजच्या दिवसात संगणक चालू करू नका. (तारीख बदलणे म्हणजे संगणक चालू करावा लागेल.) जो कोणी संगणक असलेला आमच्या ओळखीचा होता त्या प्रत्येकाला सांगितले. संतोष म्हणाला,"मी बाहेर जातो आहे. कोणाला काही संदेश द्यायचा असेल तर सांगा". आमचा काय एकच संदेश, ’संगणक चालू नका करू. हार्ड डिस्क घेऊन आमच्याकडे पाठव.’ कारण ज्या विषाणूविरोधी संरक्षण संहितेने तो विषाणू पकडला होता त्याची सीडी आमच्याकडे होती. इतर कोणाकडे असेल तर त्याची माहिती आम्हाला नव्हती.
थोड्या वेळाने सुमीत आपल्या संगणकाची हार्ड डिस्क घेऊन आला. सुमीत कॉलेजच्या वसतीगृहापासून थोड्या अंतरावरील एका खासगी वसतिगृहात राहत होता. संतोषने संदेश दिल्यावर तो आमच्याकडे आला होता. तो म्हणाला, "रात्री मी संगणक चालू केला. तेव्हापासून गालावर हात ठेवून बसलो होतो". म्हणजे सुमित आमच्यातील सर्वात पहिला बकरा होता तर.
वसतीगृहातील इतर मुलेही आमच्याकडून माहिती घेत होते. आम्ही आपली एक सूचना दारावर लावली.
"येथे संगणक विषाणू काढला जाईल. प्रत्येक फाईलचा १ रू".
तोपर्यंत बहुधा आम्ही २/३ हार्ड डिस्क जमा केल्या होत्या पैसे कमावण्याकरीता ;) (हे गमतीत. कारण सर्व आपलेच मित्र तर त्यांचे काम ही करावे लागेलच ना)
चर्चेतून आम्हाला ह्यामागील कारण कळले. आम्ही सगळे खेळ/छायाचित्रे/सॉफ्ट्वेअर देण्यासाठी सरळ हार्ड डिस्कच इकडे तिकडे फिरवत होतो. त्यातच कुठल्या तरी एकातून तो विषाणू आला असेल. कोण होता तो पापी काय माहित.;) पण आता सर्व झाल्यावर काय करणार, कोणाला काय म्हणणार? चुकी आमचीही होतीच.
ह्या गोंधळात मुफद्दल आला स्नेहांशूच्या खोलीवर. तो म्हणाला की मी ही हार्ड डिस्क घेऊन येतो. आधीच २/३ हार्ड डिस्क होत्या रांगेत. म्हणून आम्ही त्याला ती सीडी दिली आणि सांगितले की हे हे सॉफ़्टवेयर टाकून विषाणू काढून टाकता येईल. तो सीडी घेऊन गेला. बोलता बोलता ध्यानात आले की मुफद्दलने जर का संगणक चालू केला तर?.....
मी आणि एकजण लगेच त्याच्या खोलीवर गेलो धावत, ओरडत. तिकडे गेल्यावर कळले, त्याने ही संगणक चालू केला होता. पण तो चालू नाही झाला. आमच्या संगणकावर काही संदेश तरी येत होते. त्याचा संगणक बिलकूल सुरू नाही झाला. आता काय करावे. पुढे काही दिवसांनी कळले त्या बिचाऱ्याच्या संगणकाचा BIOS उडाला होता. ह्यालाच म्हणतात का स्वत:च्या पायावर कुहाड मारून घेणे?
आता राहिला माझा संगणक. संध्याकाळी मला आठवले की काल मला तो वायरस दिसला होता. मी तो C मधून काढला ही होता. त्यामुळे मला जास्त भीती वाटत नव्हती. पण माझा संगणकही सुरू झाला नाही. मनात शंकेची पाल चुकचुकली. माझ्या संगणकाची हार्डडिस्क अमितच्या संगणकावर लावून बघितली. ती ही मस्त चकचकीत फळ्यासारखी होती. कोरी करकरीत. ह्याचा अर्थ माझा संगणक ही आज दिवसभरात सुरू झाला होता आणि दुसऱ्या ड्राईव्हमध्ये असणाऱ्या विषाणूने माझ्या हार्डडिस्कचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता.
चला, आम्ही ही पुन्हा सुरुवातीपासून सर्व सॉफ्टवेयर टाकण्यास सुरुवात केली.
अजून ही एका फ्लॉपीमध्ये तो विषाणू मी साठवून ठेवला आहे. कोणास पाहिजे असेल तर संपर्क साधावा. :)

नोव्हेंबर १९, २००७

काही वर्षांपुर्वी माझ्या बहिणीने मला एका इंग्रजी चित्रपटाची कथा सांगितली होती.
एका शहरात मंदीचे वातावरण असते. लोक जास्त काही खरेदी करीत नसतात. काय चाललंय कोणाला काही कळत नसते. एक दिवस एक माणुस कार विक्रेत्याकडे जातो आणि म्हणतो की मला ती महागडी कार खरेदी करायची आहे. मी ख्रिसमसच्या दिवशी घेऊन जाईन. हा विक्रेता विचार करतो की कित्येक दिवस आपण घरात काही चांगल्या,वेगळ्या वस्तू विकत घेतल्या नाहीत. आता जर ही कार विकली गेली तर आपल्याला भरपूर पैसे मिळतील. मग का नको आपण ही थोडा खर्च करूया. म्हणुन तो घराचे सामान विकणाऱ्याच्या दुकानात जातो आणि स्वत:च्या घराकरीता चांगले सामान घेतो. आता पुढे हा दुसरा विक्रेता स्वत:करीता काही गोष्टी खरेदी करतो. अशा प्रकारे त्या शहराच्या बाजारात एक प्रकारचे नवचैतन्य येते. प्रत्येक जण सणाकरिता काही ना काही खरेदी करतो. शहरातील मंदीचे वातावरण निवळून निघते.
काही दिवसांनी कळते की जो माणूस ती कार खरेदी करण्याकरीता गेला तो वेडा/मंद असतो. तो काही ती कार घेऊ शकत नाही.
ही गोष्ट लिहिण्याचे प्रयोजन:
मला त्या चित्रपटाचे नाव पाहिजे जेणेकरून तो मी पाहू शकेन.
बाजार कसा चालतो हे थोडेफार ह्या कथेवरून कळते. परंतु पूर्णत: माहिती मिळू शकेल का?
भरपूर ठिकाणी ओरड चालली आहे की आय टी मुळे सगळ्या गोष्टी महागत चालल्या आहेत. हो, हे मी मानतो. सुरुवातीच्या काळात आय़टी ला तुलनेने खूप जास्त पगार मिळत होता. त्यावेळी बहुधा लोकांनी जो भाव मागितला तो दिला असेल. त्यामुळे भाव वाढले. परंतु, एकट्या आयटी ने घोडे नाही मारले. परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळाल्यानंतर भरपूर विदेशी कंपन्यांनी भारतात बस्तान मांडले. लोकांना विविध मार्ग मिळाले आपला पैसा वापरायला. इतर क्षेत्रांतही पगाराचा आलेख चांगला वधारला आहे. मित्रासोबत ह्या गोष्टी बोलत असताना ह्या सर्व गोष्टी पुन्हा विचारात आल्या. सर्व एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजेच, उदा. लोकांचा पगार वाढला. त्यांनी तो आपल्या राहणीमान आणि इतर गोष्टींवर वापरल्या. वेगवेगळे परदेशी कंपन्यांचे कपडे, बूट आणि इतर गोष्टी खरेदीच्या आवाक्यात आल्या (की नंतर त्यांचा भाव वाढला?). त्याने ही इतर उलाढाल बदलली.
मला आठवते आहे. नोकरी लागायच्या आधी मी एक पँट खरेदी करायला गेलो होतो. तेव्हा एका मॉल मध्ये ५०० रू.ची पँट खरेदी करणे मला जमले नाही. तेच आता मी १२००/१५०० ची पँट घेऊ शकतो. हो, पण त्यात फक्त पैशाचा मामला नाही. ते महागडे कपडे/बूट नको एवढे टिकतात. :)
असेही म्हणतात, आपण लोक पैसे घरी जमा करून ठेवतो. तो पैसा बाहेर बाजारात आल्यास इतर वेगवेगळ्य़ा ठिकाणी वापरता येतो. थोडक्यात वर लिहिलेल्या कथेप्रमाणे. म्हणून आपण पैसा बाजारात आणला पाहिजे. म्हणजे फक्त गुंतवणूकीत नव्हे. ह्यावरूनच एक लेख आठवला. तो इथे वाचता येईल. त्यात हेच म्हटले आहे. अमेरीकेतील लोक पैसा साठवत नाहीत किंवा खूप कमी साठवतात. नुसता बाहेर वापरतात. एवढे की उधार घेऊनही वापरतात(क्रेडीट कार्ड). ते आपणही केले पाहिजे. हे मला पूर्णपणे पटत नाही. पैसा थोडाफार(की भरपूर?) जमा असला पाहिजे. मगच इतर गोष्टी कराव्यात. गुंतवणूक सल्लागारही हेच सांगतात की आपल्या ६ महिन्याच्या पगाराएवढी रक्कम आपल्याकडे जमा असावी. मगच इतर पैसा वापरा.
आणखी एक कथा वाचली होती. कुठे ते आठवत नाही. श्रीकृष्णाच्या सहकाऱ्यांनी (कुंभार, सोनार, वाणी वगैरे सगळे) त्याला सांगितले की तू काही नाही करत. आम्हीच सर्व काही करतो. तेव्हा आम्ही ही काही न करू असे कर. कॄष्ण म्हणाला, ठिक आहे. तेव्हा सर्वांनी स्वत:चे काम करणे बंद केले. थोड्याच दिवसात तिथे अराजक मांडले. गोंधळ झाला. तेव्हा कृष्णाने त्यांना पटवून दिले की आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत.

नोव्हेंबर १७, २००७

कार्यालयात दुपारी जेवताना बोलता बोलता विषय निघाला.
माझा एक मित्र म्हणाला, 'अरे, जपान मध्ये डाटा सेव्ह करण्याकरीता काय काय केले आहे. आता ते लोक दातांमधेही माहिती साठवून ठेवू शकतात.'
दुसरा मित्र म्हणाला ' आता पेपरमध्ये बातमी यायची. एका महिलेचा दात पळवून तिची माहिती चोरली.'
प.मि.: ' किंवा महिलेचे सर्व दात पळवून लाखो रुपयांचा गंडा'.
दु.मि. : 'ती महिला म्हणेल, मी कवळी फक्त धुण्यासाठी बाहेर काढून ठेवली होती.'
मीः'किंवा असेही... महिलेला चाकूचा धाक दाखवून तिचे दात पळवून नेले.'

काय नं?.... आजकाल लोक तंत्रज्ञानात काय काय करतील व इतर लोक त्याचा किती फायदा व गैरफायदाही घेतील व चर्चा ही कशा होतील.

असो... ही फक्त गंमत म्हणून आमचे बोलणे चालले होते. पण प्रत्यक्षात भरपूर काही होऊ शकते.

नोव्हेंबर ११, २००७

शेवटी दिवाळी संपली...
नाही. दिवाळीशी माझा काही राग नाही. एक छान सण आहे. पण आजकाल कंटाळा येतो तो मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा. नुसते आपलं ढूम.. ढाम चालू असते. कानाचे बारा वाजतात. आणि ते ही रात्री ११/१२ पर्यंत.

तरी वाटते ह्यावेळी जास्त फटाके वाजविले गेले नाहीत. निदान काल आणि आज तरी.
त्या पत्रकांचा परिणाम का? ;)
लक्ष्मीपूजनाला होता जरा आवाज. पण सहन केला. :)

असे नाही की मी कधी फटाके वाजविले नाहीत. मी ही भरपूर फटाके उडविलेत. नंतर त्यातून बाहेर आलो. झाले आता ... उम्म्म्म्म्म... १२/१३ वर्षे. पण त्याही जरा वेगळ्या आठवणी आहेत.

असू दे... आता थोडं निवांत वाटेल.

नोव्हेंबर ०५, २००७

"अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना", एक लहान मुलगा मला म्हणत होता.
दुपारी बेल वाजल्यावर मी दरवाजा उघडला. समोर दोन ८/१० वर्षांची मुले एका पिशवीतून काही कागद काढत होते. त्यातील एक मुलगा मला म्हणाला "अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना". मला हसू आले. त्या मुलाचे वाक्य मार्मिक होते. मी तो कागद घेण्याकरीता वाट बघत होतो. पत्रक हिंदीत होते. "क्या पटाखे फोडना जरूरी है?" ह्या संबंधी.
मला त्या मुलाच्या वाक्यावरून पत्रके (किंवा जास्त करून जाहिराती) आणि ते वाटणारे आठवले.
रस्त्यावरून जाताना, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, आज काल तर कार्यालयाच्या बाहेर ,बँक ,ए टी एम मशीन च्या बाहेर भरपूर लोक काही ना काही कागद आपल्या हातात देतात. (हमखास ठिकाण: दादर मार्केट मधील रेल्वेचा ब्रिज). अरे हो, वर्तमान पत्रे तर विसरलोच. आपण काही वेळा मूड असेल तर ते वाचतो, थोडेफार चांगले वाटल्यास घडी घालून खिशात ठेवतो, किंवा फाडून फेकून देतो. पण पुढे खरोखरच त्याचा उपयोग होतो का? होत नाही असे नाही परंतु माझ्या मते खूप कमी प्रमाणात.
त्यांचे ही किती प्रकार...
वजन वाढवा/कमी करा, १०% सूट, एखाद्या तांत्रिक बाबाचे उपाय, एखाद्या राजकीय पक्षाचे असतील तर त्यांच्याबद्दल, त्यांच्या किर्तीबद्दल. आजकाल तर प्रत्येक बँक काही ना काही छापत असतेच. दररोज संध्याकाळी घरी आल्यावर एक पत्रक दरवाजावर असतेच. हे इंटरनेट घ्या , ह्याचे क्लास त्याचे क्लास.
मला त्याबद्दल राग येत नाही की वाईट वाटत नाही. त्यांना स्वत:च्या कामाबद्दल/उत्पादन/सेवेबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवायची असते. त्याचे काम ही पत्रके छापूनही केली जातात.
आधी मी ती पत्रके घ्यायचो आणि वाचून बघायचो. हळू हळू मग कंटाळा यायला लागला. वाटायचे नाहीतरी एखादी गोष्ट मी त्यावरून ठरवतच नाही. जरी एखाद्या ठिकाणी काही मेळावा चालू असेल, सूट मिळत असेल तरी ते अशा ठिकाणी, अशा वेळी असते की जायला मिळतच नाही. आज काल तर कोणी काही देत असेल तर मी वरूनच बघतो काय आहे ते आणि मग सांगतो नको. चांगले दिसल्यास घेतो. पण पुन्हा तेच. त्याचा फायदा घेतलेला मला तरी नाही आठवत :(
आठवला, इंटरनेट घेण्याकरीता त्याच पत्रकातील फोन नंबर फिरविला होता.
फक्त एका प्रकारच्या पत्रकांचा राग येतो. एखाद्या देवाच्या नावाने लिहून, ह्याच्या १००/२०० प्रती काढून इतरांना वाटा त्याने तुमची भरभराट होईल अन्यथा काहीतरी वाईट होईल. लहानपणी मी ह्याला घाबरायचो. नंतर मी आणि माझी बहीण तर असली पत्रके नाकारायचोच. का उगाच विषाची परीक्षा घ्या. नंतर मग असली पत्रके कधी चुकून मिळाली तर सरळ फाडून केराच्या टोपलीत टाकायला लागलो. आता त्याबद्दल काही नाही वाटत.
काही वेळा वाटते ते देणाऱ्याच्या मनात काय विचार चालू असतील? त्यांना काय फक्त ती पत्रके संपवायची असतात? त्यांना त्याने किती फायदा होतो? तो फायदा मग त्या मुलाला काय मोबदला मिळाला तो असो किंवा ते पत्रक छापणाऱ्याला त्याचा किती फायदा झाला ते. त्यांचा पत्रके छापण्याचा खर्च निघतो का? जर ते त्याच्याच समोर फेकून दिले तर त्याला काय वाटत असेल?
मागील आठवड्यात एक गंमत झाली. जेवणानंतर बाहेरील दुकानात जाताना माझ्या एका मित्राच्या हातात एका मुलीने एक पत्रक दिले. कोणत्या तरी मोबाईल फोन कंपनीचे होते. त्यातील त्यांच्या स्कीम वाचल्या. एक गोष्ट कळली नव्हती. मी त्याला म्हणालो की देणाऱ्याला विचारून घे. परत येता येता मित्राने ते पत्रक त्या मुलीच्या हातात ठेवले. आम्ही पुढे गेल्यावर त्या मुलीचे वाक्य ऐकायला मिळाले "वापस?"

आतापर्यंत इतर ठिकाणी मी केलेले लेखन/चर्चा इथे चिकटवल्या. थोडक्यात म्हणजे माझ्या मनातील विचार.. ज्यात बहुधा प्रश्नच होते. ;) अनुभवकथन ही.

आता बघुया, पुढे आणखी काय सुचते?

प्रसंग १: वेळ रात्री ८ च्या सुमारास.
स्थळ: मी रिक्शातून रेल्वे स्टेशन वरून घरी येतोय.
मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज.
गृ: नमस्कार. देवदत्त का?
मी: हो.
गॄ: मी xxxx बँकेतून बोलतोय.
(फोन नं चेन्नईचा होता म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले)
आपले जे हे क्रेडिट कार्ड आहे, त्याचे स्टेटमेंट वेळेवर येते का?
मी: मागील स्टेटमेंट आले. ह्यावेळचे माहित नाही.
गॄ: ठिक आहे. बँकेने आता तक्रार निवारणाकरता फोनवर नवीन सुविधा चालू केली आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.
मी: धन्यवाद.
गॄ: तुमचा पत्ता पडताळून पाहायचाय. तुम्ही सांगू शकता का?
मी: नाही. मी अशा गोष्टी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो.......
गॄ: तुम्हाला माझा विश्वास नाही आहे वाटते. मी XXXX च्या मुख्य कार्यालयातून बोलत आहे.
मी: आता नाही आहे. तुम्ही मला रात्री ८ ८:१५ ला फोन करताय. पुन्हा तुम्ही माझी माहिती विचारताय. जी मी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो आणि मी फोन केल्यावरच.
(माझ्याकडून थोडेफार रागाचे आणि मग निर्वाणीचे बोलून संभाषण बंद)

प्रसंग २: वेळ सकाळी ११ च्या सुमारास.
स्थळ: कार्यालयात मी काम करण्याच्या प्रयत्नात ;)
मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज..

गृ: नमस्कार. देवदत्त का?
मी: हो.
गॄ: मी xxxx बॆंकेतून बोलतोय. तुमचे हे XXXX कार्ड आहे. त्याबाबत बोलायचे आहे. (माझ्याकडे ते कार्ड आहे म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले)
मी: मग?
गॄ: बँकेने तुमच्याकरीता नवीन क्रेडिट कार्ड मान्य केले आहे.
मी: मला गरज नाही आहे.
गॄ: अहो, तुम्हाला काही कागदपत्रे द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त स्वत:ची माहिती द्या . जन्मतारीख, पॅन नंबर, पत्ता वगैरे. तुम्हाला २२ दिवसांत क्रेडिट कार्ड मिळून जाईल.
मी: मी ती माहिती देणार नाही. तुम्हाला पाहिजे तर मला ईमेल पाठवा. मी विचार करून त्याला उत्तर देईन.
गॄ: बहुधा तुमचा माझ्यावर विश्वास नाही. तुम्ही माझे नाव व फोन नंबर घेऊन बँकेतून खात्री करू शकता.
मी: ती खात्री करायला मी केव्हाही करू शकतो. तुमचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आलाच आहे. पण मी तुम्हाला माहिती देऊ इच्छित नाही.मी अशा गोष्टी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो. आणि मी फोन केल्यावरच. तुम्हाला पाहिजे तर मला इमेल पाठवू शकता.
(माझ्याकडून निर्वाणीचे बोलून संभाषण बंद)

मी त्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन करून ह्याबाबत माहिती दिली. मला उत्तर मिळाले की तुम्हाला क्रेडिट कार्ड मान्य झाले आहे का ह्याबाबत आमच्यकडे माहिती नाही.
बाकी खाजगी माहिती विचारण्याबद्दल सांगण्यात आले की काही एजंट ही माहिती मागू शकतात.

असेच भरपूर संवाद झाले आहेत. मी कोणालाही स्वत:ची माहिती देत नाही. ग्राहक सेवा केंद्राला फोन लावल्यानंतर ही माहिती काही वेळा द्यावी लागते (फोनमध्ये, कोणाही माणसाला नाही). उदा. कार्ड क्रमांक, PIN क्रमांक.पण पुढेही काही वेळा सारखी सारखी माहिती मागितल्यास त्यांच्यावरही डाफरलो आहे.

माझे असे विचारणे आहे की
मी योग्य केले का?
तुम्हाला जेव्हा असे फोन येतात तेव्हा तुम्ही काय करता?
बँक जर वेळोवेळी सांगते की तुमची माहिती अनोळखी इमेल किंवा फोनवर देऊ नका तर ग्राहक सेवा केंद्रातील त्या मुलीचे म्हणणे, की काही एजंट ही माहिती मागू शकतात, बरोबर मानावे का?

सविस्तर चर्चा/लेख मनोगत येथे वाचता येईल. दि : १३ मे २००५

महाभारत, रामायण आणि इतर धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे आणि आपण पाहिलेल्या ठिकाणांवरुन मी हे म्हणू शकेन की देव-देवतांनी पृथ्वीवर आपला वास केला होता.
गीतेमध्ये लिहिल्याप्रमाणे श्रीकृष्ण परमपुरूष आहे. पूर्ण ब्रम्हांड त्याच्या अधिपत्याखाली आहे. आपल्या सूर्यमालिकेतील बहुतेक सर्व ग्रह हे देव आहेत. आणखीही बरेच काही.....
पण मग फक्त पृथ्वीवरच(आणि बहुधा भारतातच) सर्व काही का घडले? रामायण, महाभारत इत्यादी. काही खास कारणे?
जर पृथ्वीखेरीज इतर ठिकाणी काही घडले असेल तर त्याचे काही लिखाण कोठे मिळू शकेल काय?

तळटिप : ह्या चर्चेला "दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का?" ह्या दिशेने नेऊ नये. :-)

नोव्हेंबर ०४, २००७

सविस्तर चर्चा/लेख: मनोगत येथे वाचता येईल. दि: २४ मे २००५

"सगळीकडे हे असेच चालते. मग आपण काय करणार?"
हे वाक्य मी जवळपास सगळीकडे ऐकतो.
लोकलमध्ये, मित्रांत बोलताना, कार्यालयात, सगळीकडे...


काय होते?
१."अरे यार, बसमधून येताना जर तिकिट मागितले नाही तर ४ ऐवजी ३ रुपयांत काम होते. १ रु. वाचविला की नाही? "
२. रस्त्यावर माझी चूक असल्याने (मी सिग्नल तोडला किंवा नो पार्किंगला गाडी लावली तर) अर्थात मला वाहतूक पोलिस पकडतील. (नाही पकडले तर सुटलो). मग काय .. दंडाचे ४०० रू. देण्यापेक्षा त्यालाच ५० रू देऊन मामला निकालात काढायचा.
३. काहीतरी विकत घेऊन खाल्ले किंवा घरातीलच काही वस्तू खाण्यासाठी नेली. खाल्ल्यानंतर कचरा काय केला? तर रस्त्यावरच टाकला. लोकलमध्ये असेल तर खिडकीतून बाहेर टाकला. महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ना साफ करायला.

परिणाम?
१. जर मी तिकीट मागितले नाही तर माझे १/२ रु. वाचले. पण मी दिलेले ३ रुपये कुठे जातील? अर्थात
वाहकाच्या खिशात. (त्याला मिळाले तर त्याचाच फायदा आहे ना? हे मला मिळालेले उत्तर) ते पैसे सरकार कडे जातात का? नाही.
२. मी ५० रू दिले. तेही गेले. अर्थात पोलिसाच्या खिशात. माझे ३५० रू वाचले.
३. जर नाही कचरा साफ झाला, किंवा पावसाळ्यात पाणी तुंबले, तर आपण त्यांना शिव्या देऊन मोकळे.

लोकांना त्याबद्दल सांगितले तर उत्तर काय? "सगळीकडे हे असेच चालते. मग आपण काय करणार? आपण आपला फायदा बघावा"

मी काय करतो?
१. मी तर स्वतः तिकीट मागून घेतो. जाऊ दे माझा एक रुपया जास्त. शेवटी तोच दर ठरविण्यात आला आहे ना? आणि जर तिकिट तपासनीसाने तिकीट विचारले तर काय? तो वाहक येणार आहे का सांगायला?
२. मी एकदा ४०० रू दिले तर मला एक धडा मिळेल ना? पुढे मी जे ५०/५० रू. त्याला देईन ते तर वाचतील ना?
३. मी काहीही रस्त्यावर फेकत नाही. स्वतःजवळील एका पिशवीत ते जमा करतो. मग कचऱ्याची पेटी दिसली तर त्यात फेकतो किंवा घरी कचऱ्याच्या डब्यात.

अशा भरपूर गोष्टी आहेत जिथे आपण फक्त आपला फायदा बघतो.
का आपण फक्त आपला फायदा बघावा? जर तुम्ही स्वतःच्या फायद्याकरीता समाजाची चाल बिघडवीत नाहीत का?
"आपण एकटे काय करणार ?" असे म्हणणे ही पळवाट नाही का?

मला सध्या दूरदर्शन वर दाखविण्यात येणारी एक जाहीरात खूप आवडली. एका गृहसंकुलात खूप कचरा जमा झालेला असतो. शेवटी तेथील लहान मुले पुढाकार घेऊन तो कचरा साफ करतात. तिथेही एका मुलापासून सुरुवात दाखविली आहे.

हे आपण प्रत्यक्षात नाही का करू शकत?

सविस्तर लेख/चर्चा: मनोगत येथे. दि: ७ जून २००५.

चित्रपट आणि आपण
१ जूनला वर्तमानपत्रात बातमी वाचली. १ ऑगस्ट पासून चित्रपट, धारावाहिकांमध्ये धुम्रपानास बंदी.
जरा बरे वाटले, की सरकार धुम्रपानाविरुद्ध जागरुकता वाढवित आहे. पण वाटले की ह्याचा किती फायदा होईल? थोडा विचार केल्यानंतर जाणवले की चित्रपटांचा समाजावर परिणाम होतोच. तेव्हाच वाचण्यात आले मटा.
१. हर फिक्र को धुएं में...
२. धुम्रपान दृष्यबंदी निर्णयामुळे चित्रपटसृष्टी संतप्त .

बरोबरच आहे म्हणा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सिगरेट ओढण्याचे चित्रपटांमधून फारसे समर्थन कधी झाले नाही. पण तरीही त्याविरोधातही जास्त काही घडले नाही. एखाद्याला व्यसनापासून मुक्त करणारे नायक नायिका फारच क्वचित दिसतात. पण पिणारे खूप दिसतात. आपण म्हणतो की चित्रपट हे प्रथमतः मनोरंजनाकरीता बनतात. (अपवादः काही चित्रपटांपासून खुप काही शिकण्यासारखे असते) पण चित्रपटांचा काही वेळा फक्त मनोरंजन म्हणून उपयोग होत नाही. लोक(मुख्यत्वे तरूण आणि लहान मुले) त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. एकतर्फी प्रेमप्रकरणातून झालेला हिंसाचार हे बहुधा त्याचाच परिणाम असावा. आणखीही बरेच प्रकार असतील.

मी चित्रपटांच्या विरोधात हे लिहीत नाही आहे. उलट मीही खूप चित्रपट पाहतो. ते तर माझे मनोरंजनाचे एक साधन आहे. मी ही काही वेळा ते डोक्यावर घेतले आहेत. पण मला जाणीव आहे की सर्व काही प्रत्यक्षात घडत नसते.

सिनेमाला सेन्सॉर बोर्ड एक प्रमाणपत्र देतेच की. ( ते किती उपयुक्त आहे हा वेगळ्या वादाचा विषय आहेः-) )

आता काय बघावे आणि काय बघू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आजकाल हिंदी चित्रपटाच्या नायक नायिकांना आदर्श मानले जाते. "तो सिगरेट पिताना छान दिसतो, मीही प्रयत्न करतो. त्याने मुलगी पटविली तशी मीही पटवीन." आता हे आचरणात आणावे की नाही हा विचार ज्याचा त्याने करावा. मुलगी मिळाली नाही म्हणून दारू पिणे किंवा जीव देणे हे आता सामान्य/नित्याचे झाले आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे काही अपवाद असतात. उदा. 'आनंद.' हा चित्रपट माणसाला जगण्याची एक उमेद देतो. हल्लीचाच 'क्या यही प्यार है' हाही चित्रपट सांगतो हेच सांगतो की प्रेम हेच आयुष्यात महत्वाचे नाही.

हा लेख लिहिण्याचा मूळ उद्देश हाच की चित्रपटाचा आपल्यावर होणार परिणाम हा कसा असावा? आपण ते कोणत्या प्रकारे हाताळावेत? ह्यावर आपणा सर्वांची प्रतिक्रिया मिळेल ही अपेक्षा.

आणखी, सर्व काही चित्रपटांमुळेच घडते असे नाही. त्याला आणखी काही गोष्टीही जबाबदार असतील.

दोन वर्षांपूर्वी एका ईमेल मध्ये आलेले हे विचार. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम ह्यांचे. तेव्हा मी हे इथे टाकले होते.
खूप आवडले. आचरणात आणण्याजोगे. स्वत: आणि इतरांनीही. मी तर आधीच सुरूवात केली होती. ह्या विचारांनंतर त्यास दुजोरा मिळाला.

आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का?
तुम्ही तुमच्या देशासाठी दहा मिनिटे देऊ शकता का? जर हे शक्य असेल, तर पुढील मजकूर वाचा : तुम्ही म्हणता की, आपले सरकार अकार्यक्षम आहे. तुम्ही म्हणता की, आपले कायदे फारच जुनेपुराणे, म्हणून कालबाह्य झाले आहेत. तुम्ही म्हणता की, महानगरपालिका कचऱ्याचे ढिगारे उचलण्यात दिरंगाई करते. तुम्ही म्हणता की, फोन काम करत नाहीत. रेल्वेसेवा म्हणजे मोठा विनोद आहे. विमानसेवा ही जगातील अत्यंत भिकार सेवा आहे आणि पत्र पत्त्यावर कधीही पोचत नाहीत. तुम्ही म्हणता की, आपला देश खड्ड्यात गेला आहे. तुमचे हे रडगाणे सतत चालू असते; पण याबाबत सुधारणा व्हावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता? आपले कोडकौतुक केले जावे, अशा आशेने आपण आरामात हे सारे अलिप्तपणे बघत बसतो आणि आपण काहीही न करता, सरकारने सर्व काही केले पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. सरकारने सर्वत्र स्वच्छता राखावी, अशी आपली अपेक्षा असते; पण कचरा-घाण इतस्तत: टाकण्याची एकही संधी आपण सोडत नाही किंवा वाटेत पडलेला कागदाचा एकही कपटा उचलून कचरापेटीत टाकत नाही. रेल्वेने स्वच्छ प्रसाधनगृहे पुरवावीत, अशी आपली अपेक्षा असते; पण या प्रसाधनगृहांचा योग्य प्रकारे कसा वापर करावा, हे शिकावेसे आपणाला कधीही वाटणार नाही. इंडियन एअरलाइन्स व एअर इंडियाने सवोर्त्तम जेवण व प्रसाधने पुरवावीत, असे आपल्याला वाटते; पण भुरट्या चोऱ्या करण्याची एकही संधी आपण कधी सोडत नाही. मग आपण काय सबब देतो? ही संपूर्ण व्यवस्थाच आमूलाग्र बदलायला हवी. मग या व्यवस्थेचा कायापालट करणार तरी कोण? आणि या व्यवस्थेचे घटक तरी कोणते? आपण आपल्या सोयीनुसार असे समजतो की, या व्यवस्थेत शेजारीपाजारी, अन्य कुटुंबीय, इतर शहरवासी, अन्य जातीजमाती आणि सरकार यांचा अंतर्भाव असतो. मात्र या व्यवस्थेत तुमचा व माझा काहीही संबंध नाही. या व्यवस्थेत खरोखरच काहीतरी सुधारणा, विधायक योगदान करण्याची जेव्हा पाळी येते, तेव्हा आपण आपल्याला आपल्या कुटुंबासह एका सुरक्षित कोशात कोंडून घेतो आणि दूरवरच्या अन्य देशांकडे बघत बसतो किंवा कोणी 'मिस्टर क्लीन' येईल आणि जणू जादूची कांडी फिरवून सारे कसे स्वच्छ करील, अशी वाट पाहत बसतो. प्रिय भारतीयांनो, तुमचा हा उद्वेग खूपच विचारप्रवर्तक आहे आणि तो आपणाला अंतर्मुख करायला भाग पाडणाराही आहे. तसेच तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लावणाराही आहे. जॉन एफ. केनेडी यांनी आपल्या देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण मी तुम्हाला करून देऊ इच्छितो. ते म्हणाले होते, 'आपला देश आपल्यासाठी काय करू शकतो, हे विचारू नका, तर आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो, हे स्वत:ला विचारा.'
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

भारताच्या प्रथम नागरिकांच्या दहा मिनिटांच्या संदेशाने आम्हाला आमच्या युवा वाचकांसाठी हे जीवनचरित्र प्रकाशित करण्याची प्रेरणा दिली. आम्हाला आशा आहे की, ते आपल्या जीवनातील अत्यंत रमणीय अशा काळात डॉ. कलाम यांच्या सदाबहार, प्रेरणादायी संदेशातून प्रेरणा घेतील आणि 'स्वप्ने पाहा, स्वप्ने पाहत राहा, स्वप्ने विचारात रूपांतरित होतील आणि विचार कार्यरूपाने साकारतील.'

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter