ऑगस्ट २७, २००८

'फूंक' चित्रपट थियेटर मध्ये एकट्याने बघणार्‍याला रामगोपाल वर्माने ५ लाख रूपये देण्याचे आव्हान दिले होते असे वाचण्यात आले.

अशीच एक पैज एका इंग्रजी सिनेमाकरीता ठेवली होती असे लहानपणी ऐकले होते. तो कोणता सिनेमा त्याचे नाव आठवत नाही. त्यावेळीही सिनेमागृहाच्या बाहेर एक ऍम्बुलन्स ठेवली होती असेही सांगण्यात आले होते. आणखी एक चित्रपट, बहुधा 'The Exorcist'. ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत. त्यामुळे त्या सिनेमाच्या मूळ प्रिंट्स जाळून टाकल्या गेल्या व त्याच कथेवर नवीन सिनेमा पुन्हा त्याच नावाने बनविण्यात आला.

आमच्या लहानपणी भूताचे सिनेमे पाहताना जरी भीती वाटत नसली तरी रात्री झोपताना थोडीफार भीती वाटायचीच. तशात कधी कधी माझी बहिणही मुद्दाम घाबरवत असे. घरीच व्हीडीओ प्लेयर असल्याने सुट्ट्यांमध्ये तर सिनेमे आणून पाहणे चालूच होते. भूताचे हिंदी चित्रपटही भरपूर पाहिलेत. काही वेळा आम्ही व्हीडीओ लायब्ररीत जाऊन भूताचे इंग्रजी सिनेमे देण्याची खास मागणी करत असू. जरी स्वत:हून भूताच्या सिनेमाची कॅसेट मागितली तरी एक-दोन चित्रपट आम्ही पूर्ण न पाहताच परतही केले होते. सुरूवातीला हे सर्व सिनेमे पाहताना भीती वाटायची. पण काही सिनेमात भूताचे(की राक्षस?) रूप पाहून काही वेळा हसूही येत असे. 'तहखाना' सिनेमात तर शेवटच्या मारामारीच्या वेळी भूत कोणाला तरी पायाने मारताना दाखविले तेव्हा त्याने कॅनवासचे बूट घातले असल्याचे आम्हाला वाटले होते. :) नुकताच येउन गेलेला ’भूलभूलैय्या’ सिनेमा प्रियदर्शनचे दिग्दर्शन, अक्षय कुमार व परेश रावल ह्यांचा सहभाग असल्याने बहुधा लोकांनी त्याला सुरूवातीपासूनच विनोदी सिनेमा गृहित धरला होता.

'फूंक' सिनेमा किती थरारक आहेत हे तर सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल, पण त्याकरीता सिनेमागृहात जाणे जमेल की नाही अंदाज नाही. मला वाटते की अशा प्रकारचे सिनेमे सिनेमागृहात पाहण्यातच जास्त मजा येते. मोठा पडदा, मध्येच दचकवण्याकरीता टाकलेला चढा आवाज ह्याने थोडेसे भयप्रद वातावरण तयारच असते. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की असले चित्रपट चित्रपटगृहात जाउनच पहावेत.
आता भीती वगैरे काही वाटत नाही. पण सिनेमांतील काही प्रसंग जे पाहून खरोखरच भीती वाटली होती ते म्हणजे,
'वीराना': ह्यातील कारमध्ये बसलेल्या भूताचे पाय उलटे फिरविताना दाखविले होते. तो प्रसंग नंतरही काही दिवस मला घाबरवत होता.
'गहराई': एकदा रात्री दूरदर्शनवर दाखविला होता. तेव्हा मी सिनेमा पाहता पाहताच झोपी गेलो होतो. मध्येच जाग आली तेव्हा बहुधा पद्मिनी कोल्हापुरेच्या सिनेमातील दुहेरी आवाजाच्या प्रसंगामुळे भीती वाटली होती.
'राज' ह्या सिनेमात बिपाशा बसूला भूत प्रथम जेव्हा आरशात दिसलेले दाखविले तो प्रसंग भयप्रद वाटला होता.
'भूत' सिनेमात उर्मिला रात्री पाणी प्यायला जाते. परत येताना ती जेव्हा पायर्‍या चढून परत जाते त्यावेळी अचानक समोर भूत दाखविले तेव्हा खरोखरच दचकलो होतो.
लहानपणी ड्रॅकुलाचा कुठलासा इंग्रजी सिनेमा आणला होता. त्यात थोड्या सुरूवातीनंतर ड्रॅकुला जेव्हा शवपेटीचे झाकण उघडतो, तो प्रसंग पाहून तेव्हा का कोण जाणे आम्हाला एवढी भीती वाटली होती की आम्ही तो सिनेमा तेव्हाच बंद केला होता.

तुम्हालाही असे काही सिनेमे आठवतात का ज्यात, निदान तो सिनेमा पाहताना तरी, भीती किंवा कमीत कमी दचकणे तरी अनुभवले असेल?

ऑगस्ट २५, २००८

निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व.
शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती. पण त्या वाचनावर, ठरलेल्या विषयांवरच लिहिले जायचे तरीही पूर्ण गुण मिळण्याची खात्री नसायची.
तसेच नेत्यांच्या जयंती/पुण्यतिथीलाही आपण त्या त्या नेत्याबद्दल भाषण लिहून (घेउन) व त्याची तयारी करून मग व्यासपीठावर बोलायला जायचो. मग ते शाळेत असो किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना. माझ्या आठवणीप्रमाणे मी एका शाळेत जाऊन डॉ. हेडगेवारांवर भाषण केले होते. बाकी सर्व आपल्या शाळेतच. पण ते सर्व लिहिण्यातही कोणीतरी आपल्याला मदत केलेली असायचीच.

नंतर मग शाळेच्या बाहेरही थोडाफार सहभाग होऊ लागला. कॉलनीमधील गणपती उत्सवात एखाद-दुसरे एकपात्री कथन ही केले. मी ८/९ वीत असताना घरातील गणपतीची तयारी होत असताना मी व माझ्या बहिणीने गप्पा-गप्पांतच एक कथा तयार केली. ती आम्हालाच एवढी आवडली की मग आम्ही त्यावर एक अंकी नाटक लिहून काढले. मग इतरांची मदत घेऊन सार्वजनिक गणपतीत त्या नाटकाचे सादरीकरण केले.

हळू हळू (म्हणजे रखडत नाही हो, मी एक हुशार विद्यार्थी होतो :) ) वरच्या इयत्तेत गेलो, कॉलेज मध्ये गेलो तर तो अनुभव वाढत गेला. इतर पुस्तक वाचन, वर्तमान पत्रे वाचणे सुरू झाले. भरपूर लोकांची पुस्तके, कथा वाचल्या. बातम्या, सिनेमे, गावा-गावांतील अनुभव गाठीशी येत गेले. तसेच विचारशक्ती वाढत गेली. त्यामुळे मित्रांसोबत/इतर लोकांसोबत चर्चा वाढत गेल्या. वादही घालू लागलो. त्यात वेगळेपणही वाटायचे.
मग आंतरजालावरील भ्रमण सुरू झाले. कॉलेज संपल्यावर काही मित्र दूर गेले. मग त्यांच्याशी इमेलवर संपर्क चालू राहिला. स्वत:चे अनुभव त्यांना मोठ्या-मोठ्या विपत्रांतून लिहून पाठवणे चालू झाले.
आंतरजालावर भ्रमण वाढत गेले. तेव्हा मराठी संकेतस्थळेही नावारूपाला आली होती. त्यांचे सदस्यत्व घेउन वाचन चालू झाले. तिथे प्रतिक्रिया देता देता नवीन गोष्टी कळत गेल्या. मग स्वत:चेही काहीतरी लिहिणे चालू झाले. प्रतिसाद मिळत गेले तसे हुरूप आला. काही वेळा विरोधातही प्रतिक्रिया मिळाल्या. पण आता सवय झालीय. त्यामुळे आता लिहितानाच असे विषय निवडतो की ज्यात मला माहित आहे, जमल्यास वाद घालण्यासही तयारी असा ;)
आता ब्लॉगमुळे तर गेल्या वर्षापासून स्वत:च्या मनातील विचार/तक्रारी खरडणे चालू झाले.

हे सर्व आठवत असताना नुकताच पिवळा डांबिस ह्यांचा हा अग्रलेख वाचला. आणि वाटले मला वाटत असलेले विचार ह्यात आहेतच. जसा सर्वांमध्ये फरक पडला, तसा शाळेतील निबंधापासून आता थोडेफार ललित लेखनापर्यंत स्वत:हून लिहिण्याइतपत माझ्यात फरक नक्कीच पडलाय. (लोक वाचतील, नाही वाचतील तो भाग वेगळा ;) )

तेव्हा चला, आपले लिहिणे सुरूच ठेवूया. पाहू आणखी किती फरक पडतो ते :)

ऑगस्ट २३, २००८

पुन्हा महावितरणाने सांगितले की पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत वीज भारनियमन अटळ आहे.

ह्या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले होते की 'पुणे पॅटर्न' मध्ये युनिटमागे जास्त पैसे दिल्यास पुणेकरांना भारनियमन सोसावे लागणार नाही. त्याला बहुतेकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे पुण्यात जास्त पैसे आकारून नियमित वीज देणे सुरू झाले(नक्की ना? चू. भू. द्या. घ्या.) हाच 'पॅटर्न' मग त्यांनी ठाणे, नवी मुंबईकरीता वापरला. त्यामुळे अखंडित वीज पुरवठा मिळेल असे वाटून जास्त कोणी ह्या विरोधात गेले नाही.

मग पाऊस कमी पडल्याने वीज अपुरी असल्याचे कारण पुढे करून पुन्हा तीनही ठिकाणी भारनियमन सुरू केले. तर गेल्या महिनाभरात जोरदार पाऊस झाल्याने तो तोटा भरून निघाला असे म्हणून भारनियमन बंद केले.
आता नवीन कारण आहे की, 'आम्हाला वीज नियमित नाही मिळत म्हणून आम्ही भारनियमन टाळू शकत नाही.'

ह्या सर्वात वाढविलेला दराबद्दल त्यांचे काही म्हणणे नाही व भारनियमन असूनही आपल्याला येणारे विजेचे बिलही तेवढेच असते, ह्याबाबतही काही विधाने नाहीत.
मग मला आधी वाटलेले विचार पुन्हा समोर येतात, 'नुसते वीज दर वाढविण्याला लोकांना विरोध केला असता, त्यामुळे आम्ही अखंडित वीज देऊ असे सांगून वितरणाने दर वाढविले आणि नंतर इतर कारणे देऊन पुन्हा भारनियमन चालू ठेवले.'

आजकाल वीजेचा वापर आपण नीट केला पाहिजे हे मान्य आहे. तसे करण्याचे आमचेही प्रयत्न चालू आहेत. पण मुळात सर्वत्र वीजेचा तुटवडा असताना, एकाला वीज वाचवायला सांगून दुसयाला जास्त दराने वीजपुरवठा करणे व त्यात अखंडित वीज अवाजवी वापरणांर्‍यावर बंधने कमी ठेवणे किंवा न ठेवणे ह्यातून तर कोणाचाच फायदा होणार नाही.

ह्याकरीता आपण व महावितरणाने नक्की काय केले पाहिजे? ह्यामागील नेमके व्यवस्थापन कसे आहे व कसे असावे हे समजू शकेल का?

ऑगस्ट ०६, २००८

रात्री घरी परत येत असताना घराजवळील एका रस्त्यावर एक लहान मुलगा रस्ता पार करत मस्त लकेर घ्यावी तसा आव आणून गात होता,
"बिना दूध की चाय बना लो,
शक्कर मत डालो...
सबसे आगे होंगे हिंदुस्तानी"
पुढे आणखी काही म्हणून मी ऐकत राहिलो पण काही ऐकायला नाही आले कारण तो मुलगा रस्ता ओलांडून पलिकडे गेला होता व मी ही पुढे निघून आलो होतो.
मनात विचार आला की लहान मुले काय काय गात असतात. बहुधा ९५-९६ मध्ये माझा एक भाचा गात होता, "तू तू तू तू तारा, चलते का नऊ ते बारा"
पुढे हाच प्रकार अनु मलिक ने खरोखरच वापरला होता जुडवा मधील गाण्यात, "टन टना टन टन टारा, चलती है क्या नौ से बारा"
तेव्हा वरील प्रकारातील मुलाने गायलेली ओळ एखाद्या सिनेमातीला गाण्यातही येण्याची शक्यता नाकारता येत नाही :)
खरोखरच ते गाणे असल्यास आणखी माहिती घेण्यास इच्छुक आहे.
(ता. क. ’सबसे आगे होंगे हिंदुस्तानी’ ही ओळ तर मुकुल आनंदच्या अर्धवट राहिलेल्या ’दस’ सिनेमातील गाण्याची आहे. तेव्हा गरजूंनी पहिल्या ओळींना हात लावावा ;) )

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter