मे १९, २००८

नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे.
महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील. जर कॅश ऑन डिलिवरी पाहिजे असेल आणखी २० रू. म्हणजे एकूण २९५ रू. मी विचारले 'असे तुम्ही जाहिरातीत का नाही लिहिले?' मला काही उत्तर नाही मिळाले. तिने पत्ता विचारला तेवढयात फोन बंद झाला. तरी दुसर्‍या दिवशी त्यांचा पुन्हा फोन आला तेव्हा मी ती नोंदणी नक्की केली.
आता मंगळवारी घरी तो संच पोहोचवण्यात आला. कार्यालयातून घरी आल्यावर पाहिले ते पाकिट. ह्या टाईम्स वाल्यांचे CD पाठवणे मला आवडते. चांगली बांधणी असते सामानाची. उघडून पाहिले तर दोन ऑडीयो सीडी व एक व्हिडीओ सीडी प्लॅस्टीक मध्ये घालून तीन कप्प्यात लावून दिल्या आहेत. ह्म्म.. थोडा हिरमोड झाला, कारण टाईम्स वरील विश्वास पूर्ण सार्थ नाही झाला. जाऊ द्या, आज काल पैसे वाचवण्याकरीता सर्वच कंपन्या काही ना काही करत आहेत.
तर काय काय आहे ह्या संचामध्ये?
सुरूवातीला कुसुमाग्रजांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रमाणपत्र दिले आहे. पुढील पानावर कुसुमाग्रजांबद्दल गुलजार ह्यांचे शब्द, कुसुमाग्रजांना मिळालेले पद्मभूषण सम्मानपत्र आणि सर्वांत आत सीडी.
सीडी १
कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात.
१. प्रस्तावना
२. मराठी माती
३. थेंब
४. पृथ्वीचे प्रेमगीत
५. पाऊल चिन्हे
६. जा जरा पूर्वेकडे
७. मार्ग
८. कोलंबसाचे गर्वगीत
९. नाते
१०. याचक
११. नाही (काही बोलायचे आहे..)
१२. तृणाचे पाते
१३. स्वप्नाची समाप्ती
१४. यौवन
१५. अहि-नकूल
१६. हा चंद्र
१७. म्हातारा म्हणतोय
१८. कोकिळा
१९. राजहंस माझा
२०. वार्ता
२१. काही छोट्या कविता
देणं
डाव
छंद
यमक दुष्काळी
सीडी २
कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात.
१. मुलांसाठी कविता
श्रावण
आजोबांचे गाणे
ते म्हणतात (गवताचं पातं..)
२. क्रांतीचा जयजयकार
३. अखेर कमाई
४. प्रेमयोग श्रीकृष्णाचा
५. स्मृती
६. आगगाडी आणि जमीन
७. प्रेम म्हणजे
८. दिवे
९. प्रार्थना
१०. संत
११. येणं जाणं
१२. राजा आला
१३. शर्त
१४. झोपेन माताजी
१५. आनंदलोक
१६. गाभारा
१७. कणा
गुलजार ह्यांनी केलेला हिंदी अनुवाद त्यांच्याच आवाजात..
१८. रीढ (कणा)
१९. गर्भग्रह (गाभारा)
२०. रद्दी
शिरवाडकरांच्या कविता सर्वांनी वाचल्या असतील, त्यामुळे त्याबद्दल लिहिणे गरजेचे नाही असे वाटते.
व्हिडीओ सीडी मध्ये सोनाली कुलकर्णीने केलेले निवेदन आहे. शिरवाडकरांच्या साहित्याबद्दलची माहिती ह्यात सांगितली आहे. सोनाली कुलकर्णीच्या बोलण्याच्या शैलीत ते निवेदन फार चांगले वाटले.
पुढे आहे ’विश्वनाथ : एक शिंपी’ ह्या कुसुमाग्रजांच्या कथेचे लघुचित्रपटात केलेले रूपांतर. मुख्य कलाकार: निळू फुले, लीलाधर कांबळी व जनार्दन लवंगारे. निळू फुलेंनी आपल्या अभिनयाचा जोर दाखवलाच आहे. लीलाधर कांबळीचा सहअभिनय नेहमीप्रमाणेच प्रमाणशीर. जनार्दन लवंगारेंना मी फक्त नाटकांत व सह्याद्री दूरदर्शन वरील कार्यक्रमातच पाहिले होते. त्यांचा ह्या लघुपटातील प्रवेश छान आहे. एका गावातील शिंप्याच्या जीवनातील हे २२ मिनिटांचे चित्रीकरण त्याची परिस्थिती नेमके दाखवते व त्याची पुढील जिद्दही.
सर्वात शेवटी आहे, सचिन खेडेकरनी केलेले ’सतारीचे बोल’ ह्या कथेचे वाचन. आता ह्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाचनच म्हणता येईल, कारण ते सादरीकरण मला तरी एवढे प्रभावी नाही वाटले. आता आपल्यासमोर पु.ल. देशपांडे, व. पु. काळे, द. मा. मिरासदार ह्यांचे कथाकथन समोर असल्याने सचिन खेडेकरचे ते कथाकथन कमी प्रतीचे वाटणे साहजिकच आहे, पण खरं तर सचिन खेडेकरचे पुस्तक पकडण्याची पद्धत, वाचताना समोर बघण्याची शैली आणि थोडा फार बोलण्याचा ढंग हे सर्व जरा खटकते. मध्ये तर एकदा पान उलटताना त्याने अशी नजर केली की लहान मुलांसमोर आपण जादूच्या पेटीतून काहीतरी खास वस्तू बाहेर काढतो आहे. अर्थात ’सतारीचे बोल’ ही कथा चांगली आहे. दिवसभरात वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देत शेवटी दिवसाखेर सतारीचे बोल कानावर आल्यावर मास्तरांचे मनातील सारे दु:ख विरघळून जाते, हे ह्या कथेत सांगितले आहे.
ह्या संचाबद्दल महाराष्ट्र टाईम्स वर दिलेल्या जाहिरातीत त्यांनी लिहिले आहे की कुसुमाग्रजांच्या सगळ्या कविता त्यांच्याच आवाजात. हे थोडेसे दिशाभूल करणारे वाटते. कारण ह्यात एकूण ४३ कविता आहेत. 'कुसुमावली' ह्या संकेतस्थळावर त्यांच्या इतरही काही कविता आहेत. आता मी काही म्हणतोय कारण ह्या संचातील काही कविता तिथेही नाहीत. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या एकूण कविता किती हे नक्की नाही, आणि ह्या संचात त्यांच्या सगळ्या कविता नाहीत.
असो, व्हिडीओ सीडी जरी नेहमी वापरात नाही आली तरी कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकण्याकरीता ऑडीओ सीडी तर नेहमीच लावू शकतो. त्यामुळे एकंदरीत घरात ठेवायला पाहिजे असा संच आहे. आणि माझ्या मते थोड्या दिवसांत हा संच दुकानातही मिळू लागेलच.

मे १४, २००८

२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्‍या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा कंटाळाही आलेला दिसत होता त्यांच्या बोलण्यात. तरी आता परतीच्या प्रवासात घरून आणलेल्या दिवाळीच्या फराळावर मध्ये मध्ये हात मारणे चालू होते. एकंदरीत तरूणाईची मजा चालली होती म्हणा ना.

अशा गंमतीत, थोड्याफार कंटाळ्यात संध्याकाळचे ७/७:३० वाजले असतील. आमच्या २र्‍या वर्गाच्या स्लीपर डब्यात गर्दी वाढत चाललेली. इकडून तिकडे फिरायला जागा नाही. डब्यात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे लोक बसलेले. लोकांची कुजबुज वाढू लागली. "अरे, ही लोकं जनरल डब्यातील तिकिटे काढून ह्या डब्यात का आलीत?","कोणी काही बोलत का नाही?","आपले सामान कसे सांभाळून ठेवणार आता." वगैरे वगैरे.
संध्याकाळचे खाणे खाऊन झाल्यावर ते सर्व मित्र गप्पा मारत बसले होते. पुन्हा लोकांची कुजबुज ऐकू आली. तेवढ्यात एक स्टेशन आले. आणखी लोक आत चढू लागले.

अचानक, त्याला काय वाटले कोणास ठाउक. तो तडक उठला. त्याच्या जवळ खाली बसलेल्या माणसांना म्हणाला,"तिकिट दाखवा". त्यांनी जनरल डब्याचे तिकिट दाखवल्यावर तो म्हणाला, "हा डबा रिजर्वेशन वाल्यांचा आहे. ज्यांचे कोणाचे रिजर्वेशन नाही त्यांनी इथून बाहेर जावे". कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा त्याने डब्याच्या दरवाज्याजवळ असणार्‍यांना बाहेर जाण्यास सांगितले. कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला. त्याने आपल्या मित्रांना सांगितले," ह्या लोकांना बाहेर जायला सांगा, मी आता खूप रागात आहे."

पुन्हा तो मागे गेला. त्याच्या बसण्याच्या जागेपासून दरवाज्यापर्यंत जेवढे साध्या तिकिटावरचे लोक खाली बसले होते, त्यांना एक एक करून बाहेर जाण्यास सांगू लागला. आम्ही बाकीचे लोक, त्याचे मित्र बघतच राहिले हा काय करत आहे म्हणून. आम्ही कोणी त्याला अडवायचा प्रयत्न केला नाही. पण त्याचे मित्र तयारीत होते की काही धांदल होऊ नये, पुढे त्यांनीही हातभार लावला. ते ही आरडाओरडा करत मग लोकांना बाहेर काढू लागले. एक माणूस म्हणाला, "अरे, राहू दे आम्हाला." पण तो कोणाचे ऐकत नव्हता. दरवाज्यापर्यंतची जागा हळू हळू रिकामी होऊ लागली. लोक उतरून दुसर्‍या डब्यात चढू लागले. तो संडासाच्या जवळ गेला. तिकडे दोन डब्यांना जोडण्याची जी जागा होती तिथल्या लोकांना म्हणाला, "एक तर दरवाज्याच्या ह्या बाजूला रहा किंवा त्या बाजूला." एक दोन जण ह्या डब्यात आले तर म्हणाला, "इथे यायचे तर खाली उतरावे लागेल." ते लोक लगेच डब्यांच्या जोडणीवरून दुसर्‍या डब्याकडे गेले. तिकडील सर्व जागा रिकामी झाल्यावर त्याने ते पत्र्याचे शटर खाली ओढून बंद केले. डब्याच्या त्या बाजूचे दोन्ही दरवाजे बंद केले. व डब्याच्या दुसर्‍या बाजूकडे जाऊ लागला. तिकडे आधीच सर्व रिकामे झाले होते. त्याने लोकांना विचारले, "तो दरवाजा बंद आहे का?" उत्तर मिळाले," हो, ते शटर ही बंद केले आहे."

मग डब्यातील इतर लोकांना तो म्हणाला," तुम्हाला त्या लोकांना बाहेर काढायला काय झाले होते." वास्तविक आमच्या त्या दुसर्‍या कंपार्टमेंट मध्येही लोक म्हणत होते की त्यांना रिजर्वेशनच्या डब्यात जागा नाही द्यायला पाहिजे. त्यांना बाहेर काढल्यावर सर्वांना थोडे बरे वाटले होते.
आम्हाला वाटले "चला, एक कार्यकर्ता मिळाला", आणि मग डबा शांत झाला.

पण नंतर वाटत होते, त्याने जे केले ते किती बरोबर होते?
नव्हती तेव्हा जागा म्हणून आलेत लोक रिजर्वेशनच्या डब्यात. गर्दीच्या दिवसांत करायचे सहन थोडे. आम्ही नव्हतो का सहन करत? त्याच्या सोबतीचे कोणी त्यांत असते तर त्याने हे केले असते का?
जर त्या लोकांनी मारामारी सुरू केली असती तर ? कारण आजकाल मारामारी व्हायला लहानशे कारणही पुरेशे असते.
पुन्हा तो होता रेल्वेमध्ये, स्वत:च्या घरापासून/राहत्या जागेपासून दूर. का घ्यायची ही जोखीम?

असो, ही होती मी पाहिलेली एक क्रांती. एका क्षणात झालेली. एक क्षण चाललेली.

मे ११, २००८

नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले.

नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे. त्यामुळे ५० पैसे समजून ५ रू जाण्याची शक्यता जास्त म्हणून भरपूर लोकांनी सरकारकडे ते नाणे बदलण्याची विनंती केली असे वाचले होते. असा प्रकार आधीही झाला होता जेव्हा २ रू चे स्टीलचे नवीन नाणे काढले होते. मीही १ रू समजूनच ते एकाला देणार होतो. पण तेवढ्यात लक्षात आले, आणि जमा करून ठेवले. आणखी मागे जावे तर १ रू, ५० पैसे, २५ पैसे व १० पैशाची स्टीलची नाणी चलनात आली होती. नाण्यांचे ते सर्व प्रकार दिसतात घरी आताही. स्टीलच्या नाण्यांचे एक बरे आहे ती लोहचुंबकाला चिकटतात त्यामुळे एखाद्या लोहचुंबकावर भरपूर सुट्टे पैसे साठवून ठेवता येतात.

कधी काळी जुनी नाणी जमा करायचाही छंद लागला होता. पण जास्त काळ टिकला नाही. असो, जे छंदिष्ट आहेत ते बरोबर करतात जमा. इतिहासकालीन नाणी, वेगवेगळ्या देशांची नाणी आणि काय काय?
लहानपणी माझ्या आईने ५ पैशाची भरपूर नाणी जमा केली होती. त्यांचे एक जहाज बनवायचे होते म्हणून. पण ते ही काही झाले नाही. वेळेवर ती चलनात काढून टाकली म्हणून बरे, नाहीतर नुकसान झाले असते. ते झाले जुने. २/३ वर्षांपुर्वी मला सवय लागली होती, ऑफिसमधून घरी आल्यावर खिशातील नाणी ड्रॉवर मध्ये टाकायची. मग कधी वेळेवर उपयोगी पडायची.मी माझ्या बहिणीलाही सांगितले होते, 'पाहिजे तेव्हा काढून घे, पण किती जमा झाले मोजायचे नाही.' नंतर मुंबईबाहेर असल्याने त्यात खंड पडला. पण तो घरातील ड्रॉवरमध्ये नाणी जमा होण्यात. मी जिथे रहायचो तिथे हे सुट्टे पैसे एकत्र ठेवणे सुरूच होते. आता २ महिन्यांपुर्वी जेव्हा साफसफाई करताना पूर्ण ड्रॉवर रिकामे केले तेव्हा पाहिले भरपूर नाणी जमा झाली होती, १०० ते ११० रुपये. पण त्यातही थोडे नुकसान हे की २५ पैशांची नाणीही आहेत जी आता कोणी घेत नाही. जरी रिझर्व बँकेने बंद नाही केलीत, (हो, छापणे बंद केले) तरी लोकांनी ती बाद केलीत चलनातून. मधेच ऐकले होते की, बेस्ट चे वाहक घेतात ती नाणी. बघेन प्रयत्न करून.
ह्यावरून आठवले, माझ्यासारखेच किती लोकांनी घरी नाणी जमा करून ठेवली असतील. ज्यातील काही नाण्यांचा उपयोग आता होत नसेल. त्यामुळे आपले व सोबत देशाचेही नुकसान झालेच. तरी ह्यावर मार्ग आहे की बँकेने ती नाणी परत घेतली तर हे टळू शकेल. पण जी नाणी आपण देवाच्या नावाने नदीत/विहिरीत टाकतो ते पैसे तर गेल्यातच जमा आहेत. काही वर्षांपुर्वी त्याबद्दल ही पेपरमध्ये लेख वाचला होता. आधीच नास्तिक त्यात हा लेख वाचल्याने, दुसर्‍यांना नदीत पैसे टाकायला परावृत्त करू लागलो ;)

बरे, नाण्यांचा इतर उपयोग काय?
सर्वात पहिले समोर दिसते ते नाणे उडविणे. TOSS अर्थात नाणेफेकीत कोणाचा कौल लागतो ते पाहण्यासाठी. शोलेमधील ते प्रसिद्ध नाणे सर्वांना माहित असेलच. किंवा मग अंदाज अपना अपना मधील "चित मैं जिता, पट तू हारा". ह्यातील चित म्हणजे छापा की काटा? Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा. पण नंतर ती स्टीलची नाणी आल्यानंतर ते बदलून गेले. पण नंतर कधी छाप काट करण्याकरता काय वापरले आठवत नाही.

तसेच दिव्यात वात नीट रहावी म्हणूनही सर्वात पहिले आपण खिशातील नाणेच बाहेर काढतो.

इतर नाण्यांबद्दल आता नक्की अंदाज नाही, पण १ रुपयाचे नाणे भलतेच उपयोगात आणले गेले सगळीकडे. सार्वजनिक टेलिफोन, वजन करायचे यंत्र, भेट देण्याची पाकिटे. बरं, ह्यातील भेट देण्याच्या पाकिटात १ रूपयाचे नाणे चिकटवून ठेवणे गेल्या ४/५ वर्षात चालू झाले असेल पण टेलिफोन मध्ये ह्याचा वापर फार जुना आहे. अर्थात त्या यंत्रांना हे कळत नसेल की टाकण्यात आलेले नाणे हे खरोखरीचे नाणेच आहे की लोखंडाचा तुकडा, म्हणून तर एक रुपयासारख्या एखाद्या लोखंडाच्या चकतीचा वापरही करण्यात येत होता. किंवा मग खरोखरीच एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडून त्याला दोरा बांधून ते त्या यंत्रात टाकायचे व आतील खटका पडला की ते नाणे परत वर ओढून घ्यायचे असले प्रकार ही लोकांनी केल्याचे मी ऐकले आहे.

अरे हो, आणखी आठवले. माझी फजीतीच म्हणा. लहानपणी वजन करायच्या यंत्रात मी सहज गंमत म्हणून २५ पैशाचे नाणे टाकले ते तिकिट देणार्‍या वाटीत परत आले. मग मी ५० पैशाचे नाणे टाकले. ते ही परत आले. उचापतीत मग मी खिशातील २ रुपयाचे नाणे टाकले तर त्या नालायक यंत्राने ते नाणे आत घेतले. :( तेव्हा केलेले वजन २ रुपयांना पडले. त्यामुळे माझे वजन कमी झाले होते का ते आठवत नाही. पण खिशातील पैशांचे वजन असेही कमी होऊ शकते हे कळले :D
आता तर वजन/उंची/ तसेच वजन-उंची ह्यांचा समतोल आहे की नाही ते सांगणारे (Body Mass Index) यंत्रही आले आहे, जे मागते ५ रुपयांचे नाणे. ह्यावर काही मी तसे करून पाहणार नाही ;)

गेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मित्राकडे गेलो होतो तिथे त्यांनी घरातील ठराविक नाणी पूजेत ठेवण्यास काढली होती. त्यात मी कधी न ऐकलेले १० रू चे नाणे पाहिले. बहुधा हे नाणे ही चलनात आले नव्हते.

असो, माझे नाणेपुराण एवढेच.

रिझर्व बँकेच्या ह्या संकेतस्थळावर भारतीय गणराज्यातील नाण्यांची यादी आहे. त्यात हे १० रुपयाचे नाणे नाही. तसेच १२/१५ वर्षांपुर्वी काढलेली ५ रुपयांची नाणी ही त्यात नाहीत. कोणास आठवतेय का ते नाणे? मोठ्या आकाराचे व मागे श्रीमती इंदिरा गांधीचे चित्र असलेले? तसेच आणि काही नाणी माहीत आहेत का जी रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरही नमूद नाहीत?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter