डिसेंबर ३१, २००७

आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे. अर्थात किशोर कुमार सोबत इतर लोकांचाही आवाज असल्याने ते लगेच लक्षात येते. (आठवले, तीन देवियां सिनेमातील हे गाणे.)
दहावीत (बहुधा ११ वीत ) असतानाची गोष्ट. मला ताप आला होता. त्यामुळे मी झोपलो होतो. मध्येच जाग आल्यावर पाहिले तर मी खोलीत एकटाच होतो. रात्री ११च्या नंतर बेला के फूल मध्ये हे गाणे सुरू होते. ते गाणे ऐकताना एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे आता कधी ही हे गाणे ऐकले की एकदम फ्रेश्श वाटते ;)
(आताही हे लिहिता लिहिता मागे गाणे ही सुरू ठेवले आहे :) )

घूंघट की आड से..
आमिर खान, जुही चावलाचे हे गाणे ऐकायला मस्तच आहे. त्यातील शब्दही छान आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या लहानपणीचा सार्वजनिक गणपती समारंभ आठवतो. ज्यात कॉलनीतील एका मुलाने व त्याच्या घरी आलेल्या एका मुलीने ह्या गाण्यावर नाच केला होता.

ह्या सोबतच तम्मा तम्मा लोगे (थानेदार) तसेच आशिकी मधील गाणी ऐकली की तेच सर्व गणपतीचे दिवस आठवतात, ज्यात दिवसभर ही गाणी सुरू असायची. तम्मा तम्मा लोगे वर तर मनात येईल तसा नाच केला होता.

फरेब मधील ओ हमसफर हे गाणे ऐकले की महाविद्यालयातील दुसरे वर्ष आठवते. आणि बाहेर पाऊस पडत आहे असेच वाटते. ह्याचे कारण हे की ही गाणी जेव्हा चालत होती तेव्हा पावसाळा होता आणि माझ्या बाजूच्या खोलीतील मुले हीच गाणी लावून ठेवत होती.

यह जो थोडे से है पैसे, मुझसे नाराज हो तो.. पापा कहते हैं मधील ही गाणी ऐकली की परीक्षेच्या आधी दिलेल्या सुट्ट्या आठवतात. अर्थात त्या सुट्ट्या अभ्यासाकरीता होत्या पण त्यात गाणी ऐकणे, सिनेमे पाहणे हे थोडेच थांबते. :)

अश्विनी ये ना..
गंमत जंमत मधील हे गाणे ऐकले की आधी किशोर कुमारची गाण्याची पद्धत, जी दूरदर्शन वर दाखविण्यात आली होती, आठवत होती तसेच त्यातील अशोक सराफ ची जी बायको दाखविली आहे (चारूशिला साबळे) तिचे झाडू घेऊन नाचणे आठवायचे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिले आमचे एक सर प्रत्येक वार्षिक समारंभाला हे गाणे गायचे, आणि त्यांच्या शाखेच्या फ्रेशर पार्टीलाही. त्यामुळे आता कधीही हे गाणे ऐकले की कॉलेजचे ते समारंभ आठवतात.

ॐकार स्वरूपा..

कॉलेज मधील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ह्याच गाण्याने व्हायची (आताही होत असेल). त्यामुळे हे गाणे ऐकले की मग ते समारंभ आठवणे आलेच.

मैं हूं झूम झूम झूमरू..
लहानपणी गणपतीतील अंताक्षरीच्या निवडफेरीत मी हे गाणे फक्त सुरुवातीच्या संगीतावरून ओळखून म्हटले होते. त्यामुळे अंताक्षरीत मी निवडला जाण्यास फायदा झाला होता. :)
तसेच कार्यालयाच्या सेमिनार वजा सहलीत औरंगाबादला असताना अजिंठा लेण्यात जाताना बसमध्ये हे गाणे गायलो होतो.
हे दोन प्रसंग ह्या गाण्याशी निगडीत राहतील असे वाटते.

ताक धिना धिन ताक धिना धिन...

रखवाला सिनेमातील हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे. मी नेहमी गुणगुणत असे. शाळेत मग आमच्या वर्गात एक दोन वेळा मला गायलाही सांगितले होते. एकदा तर काय झाले की, आमच्या वर्गात दुसऱ्या वर्गातील मुलगा येऊन आमच्या टीचरला म्हणाला की मला त्यांच्या वर्गात बोलावले आहे. माझ्या टिचर ने मला पाठवले. तिकडे गेल्यावर कळले की त्यांच्या वर्गात अभ्यास संपला होता. मग मनोरंजन करण्याकरीता मला गाणे गायला सांगितले. तेव्हाही मी हेच गाणे गायलो होतो. आता ती इयत्ता/साल आठवत नाही, पण हे गाणे ऐकले की तो प्रसंग नक्की आठवतो.

अरे हो,
प्यार हमें किस मोड पे ले आया
सत्ते पे सत्ता चे हे गाणे तर राहिलेच. बंगळूरच्या ऑफिसच्या सहलीत सकाळी एका ठिकाणाहून परत येताना हे गाणे गाऊन मी धमाल केली होती. त्याच दिवशी मग संध्याकाळी बंगळूरला परत येताना ३ बस पैकी कोणत्या बसमध्ये बसावे हे विचार चक्र चालू असताना मित्रासोबत बसलो होतो. तेव्हा सकाळी आम्ही फिरायला गेलेल्या गटातील एक मुलगा मला शोधत आला व त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला. तिथे तर मग काय हे गाणे, आणखी भरपूर धमाल गाणी गात, खेळ खेळत आम्ही परतीचा प्रवास केला होता.

छैया छैया
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास सर्व खोल्यांत हेच गाणे वाजविले जात होते. एवढा वैताग आला होता की मी माझ्या २/३ मित्रांना तर सांगितले होते की माझ्यासमोर हे गाणे लावायचे नाही. त्यांनी तर एकदा मग गंमत केली. मी एकाच्या खोलीत गेलो असताना मुद्दाम हे गाणे लावले व दुसऱ्या मित्राला जाऊन सांगितले की मी हे गाणे लावायला सांगितले. काय रागावला होता मग तो माझ्यावर. अर्थात मग नंतर ते आम्ही निकालात काढले होते.

आणखी ही गाणी आहेत, काही सध्या आठवत नाहीत.

तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?

डिसेंबर २९, २००७

ह्या आधीचा लेख इथे वाचावा.

जरी लहान मुलांना जवळपास सर्व वस्तू हव्या असतात तरी आपल्या वस्तू कोणाला द्याव्यात न द्याव्यात हेही त्यांना तितकेच चांगले कळते असे मला वाटते. समजा एखाद्या मुलाकडे एक खेळणे आहे, जर कोणी मोठा माणूस ते घ्यायचा प्रयत्न करेल तर तो त्याला घेऊ देईल. कारण त्याला माहीत आहे की हा काही हे घेऊन टाकणार नाही. पण तेच खेळणे जर त्याच्याच वयाच्या (किंवा थोडाफार लहानमोठ्या) मुलाने घेतले तर तो काही ते घेऊ देणार नाही. लगेच त्यांच्यात स्पर्धा सुरू होईल किंवा मग रडारड. अर्थात दोन्हीतही त्या मुलाला दुसऱ्याबद्दलची वाटणारी ओळख कशी आहे ह्यावर ही ते अवलंबून असेल. एखाद्या नवीन माणसाला ते काही देणार नाहीत किंवा मग सर्व काही उदार मनाने देतील. तेच दुसऱ्या लहान मुलाकरीताही.

खाणे.. ही गोष्ट तर लहान मुलांची आवडीची. समोर मग काहीही असो, ती वस्तू त्यांना खाल्ल्याशिवाय, चाखल्याशिवाय कळतच नाही की ती किती चांगली आहे. :D ही अतिशयोक्ती असेल पण प्रत्यक्षात काहीसे असे आहे. मी दहावीत होतो तेव्हा असेल, शेजारी राहणारा एक मुलगा. नुकताच रांगायला लागला होता. त्याला कसे माहीत पण डोंगळे (मुंगळे) खायची सवय लागली. रांगता रांगता समोर एखादा मुंगळा जाताना दिसला की लगेच तो त्याच्या तोंडात. एके दिवशी मुंगळा त्याला जिभेवर चावला तेव्हा त्याची ती सवय सुटली.

आता थोडया मोठ्या मुलांविषयी. जरी आपल्यापेक्षा लहान मुले,भावंडे ह्यांच्याशी ते खेळत/भांडत असतील तरी त्यांच्याबद्दलची जबाबदारीही कळते. हे जरी भरपूर ठिकाणी पाहिले असेल तरी त्यातील एक पाहिलेला अनुभव सांगावासा वाटतो. बहुधा २००४ मध्ये, आम्ही मित्र पुण्यात फिरत होतो. तेव्हा पाहीले की एका मोटार सायकलवर मागे बसलेली २ मुले (वय ४ आणि ५/६ वर्षे असेल). लहान मुलाला मोठ्याने एकदम नीट पकडून ठेवले होते. जाणवत होते की तो मोठा मुलगा आपल्या लहान भावाची जबाबदारी कशी घेतो आहे ते.

असो, एखादे सर्वेक्षण करून आणखी भरपूर गोष्टी लक्षात येतील. पण वरील सर्व गोष्टी मी अर्थातच अनुभवातूनच लिहिल्या आहेत. आणि अनुभव तर पुढे येत राहतीलच.

डार्विनच्या त्या सिद्धांताप्रमाणे आणि मानवाच्या, जगाच्या प्रगतीवरून ही क्षमता वाढतच राहील हेच खरे.

डिसेंबर २६, २००७

भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी. ती वाचून वाटले की हे लोक स्वत:च्या वृत्तपत्राला वाचक मिळावेत म्हणून एखाद्या गोष्टीला मोठ्ठी करून सांगतात.

बातमी अमिताभ बच्चन ह्यांच्या आई श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराची.
दि. २३ डिसे. २००७ ला मुंबई मिरर ह्या दैनिकाच्या पहिल्या पानावर लिहून होते, Surprize Visitor at Teji's Funeral.
ह्या बातमीत आत काय लिहिले होते?
"विवेक ओबेराय ने अचानक श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचून इतरांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिषेक/ऐश्वर्या त्यांच्याशी अंतर ठेवून होते. अमिताभ, अमर सिंग आणि निखिल नंदा ह्यांचे चेहऱ्यावरील भाव चुकवू नका. वगैरे वगैरे."

त्यांच्या संकेत स्थळावर आणखीही विचित्र प्रकारे छायाचित्रांना वाक्ये जोडलेली आहेत. अभिषेक-ऐश्वर्या एकत्र बसले असताना त्याचा मथळा लिहिला "जोडी कमाल की" आणि पुढे लिहिलेले- आम्ही दोघांना विचारांत गुंग असताना छायाचित्र घेतले.

अरे, काय चाललंय काय? एखाद्याच्या अंत्यसंस्काराला कोणी माणूस पोहोचला तर त्यात तुम्हाला एवढी मोठी बातमी बनवायची गरज काय? मी तर म्हणतो हक्कच काय? आणि त्यांना दु:खाच्या प्रसंगी तरी सोडा. जर त्यांना काही नाही आवडले तर ते बघून घेतील.

पूर्ण बातमी (वाचावीशी वाटल्यास) इथे पहा.

तसेच टाईम्स ऑफ इंडीया मध्येही पहिल्या पानावर अभिषेक-ऐश्वर्याचे छायाचित्र आणि मथळा "कुछ ना कहो". अरे, फिल्मी ढंगात लिहायला ही बातमी पाहिजे का तुम्हाला? इतर ठिकाणी वाट लावताय ते पुरे नाही का?

लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख.

डिसेंबर १७, २००७

नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प.

१५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?"
आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच.

हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो. पण कामावरून उशीरा आल्यावर कसले लवकर उठणे आणि कसला संकल्प. व्यायामाचेही तेच.

गेल्या (ह्याच) वर्षाचेच बघा की, कार्यालयातील कामाचा आढावा, मिटींग, पुढील कामे लिहिण्याकरीता एक प्लॅनर विकत घेतला. पण तो प्लॅनर नीट वापरणे जमलेच नाही. कारण काय तर एका कामातच एवढा गुंतलो की पुढे काय करायचे तेच ठरवता आले नाही. मग प्लॅनर मध्ये काय लिहिणार? @^%&@^@((@#%">%&@^%
बरं मग, दुसऱ्याला त्रास न देणे ठरवावे का? अरे, मी काही एवढा वाईट नाही आणि खरे तर मी कोणाला त्रास देतच नाही. तेच स्वत:च येतात त्रास करून घ्यायला. ;) जसे मागील आठवड्यात ठरवले होते की ह्या आठवड्यात शांत रहायचा प्रयत्न करीन. पण कसले काय, नेमके ह्याच सौजन्य सप्ताहात लोक असे विचित्र वागतात की ... (काय गरज होती त्या कार वाल्याला रस्त्यात गाडी पार्क करून जायची? )
एक आठवडयाचा संकल्प पाळता येत नाही, निघाला नवीन वर्षाचा संकल्प करायला.

पण काय करणार, जगाप्रमाणे वागायला पाहिजेच. मग करूया की नवीन वर्षाचा संकल्प.
काय करूया बरं?

एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प.
मग, तुमचा काय आहे नवीन वर्षाचा संकल्प?

डिसेंबर १५, २००७

आज सकाळी कार्यालयात जाण्याकरीता बसमध्ये बसलो होतो. माझा भ्रमणध्वनी वाजला. पाहिले तर बहिणीचा फोन. उचलला पण काही आवाज नाही आला. थोड्या वेळाने बहिणीने संदेश पाठवला की तिने फोन नाही केला. अनिकेत फोनशी खेळत होता. अनिकेत म्हणजे माझा भाचा. वय फक्त ९ महिने. मी बहिणीला संदेश पाठवला. "बरे आहे. त्याला कळते की फोन कसा लावावा. आता तो फक्त बोलणे जमण्याची वाट बघत असेल." :)
आता ह्यात अनिकेतला खरोखर किती कळते ते माहित नाही, पण नेहमीचाच विचार मनात आला, "आज काल लहान मुलांना जास्त कळते."

बहुतेक जण म्हणत असतात की आज कालची मुले smart असतात. ह्याबाबतीत मला माझ्या बहिणीचे मत पटते. "जे सभोवताली असते, त्यातूनच मुले शिकतात ना? आपल्या पालकांनी आपल्याला फक्त चांगल्या गोष्टीच आपल्या समोर ठेवल्यात. ज्या गोष्टी नकोत त्या समोर नाही आणल्यात. त्यावरून आपण शिकलो की काय वस्तू कशाप्रकारे वापरावी. कुठे कसे वागावे. पुढे मग आपण आपल्या अनुभवातून पुन्हा त्या गोष्टींत नवीन जगाप्रमाणे भर टाकली. आता त्या गोष्टी आपण लहान मुलांसमोर ठेवणार. त्यामुळे मुळात जुन्या जगातील नको असलेल्या गोष्टी चाळून गाळूनच इतर त्यांच्यासमोर येणार."
डार्विनचाच सिद्धांत आहे ना तो? (शाळेतले आठवत नाही हो आता)
आता ह्या उदाहरणात, लहान मुलांसमोर आपण ज्याप्रमाणे भ्रमणध्वनी सारखा वापरतो, त्याप्रमाणे त्यांनाही तो हवासा वाटतो. पुढे मग आपले पाहून मग ते लहानपणीच भ्रमणध्वनी वापरायला शिकतील. चुकलो, शिकायला लागलेत.
पण खरोखरच, लहान मुलांची आकलन शक्ती हा अभ्यासाचा विषय आहे. लोकांनी त्यावर संशोधनही केले आहे आणि सुरूही आहेत. बसमध्ये, रस्त्यावर पहा ना. लहान मुले कशी सर्व गोष्टी निरखून पाहत असतात. अर्थात त्यांच्याकरीता सर्व नवीनच असते. पण प्रत्येकाचे निरिक्षण वेगवेगळ्या प्रकारे होत असेल असे मला वाटते. एखाद्या मुलाला भडक रंग जास्त आवडत असतील (बहुतेक लहान मुलांना त्याचे आकर्षण असतेच.) एखाद्याला हलणाऱ्या गोष्टींचे जास्त आकर्षण असेल.
२/३ वर्षांपुर्वी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता. त्यात लहान मुले चालताना शिकतात तेव्हा बहुतेक गोष्टी त्यांना आधीपासूनच माहित असतात असे सांगितले होते, नीटसे आठवत नाही. एखादा मुलगा चालताना, जिना उतरताना आपल्याला तोल सांभाळता येतो की नाही ते नीट पाहतो मगच चालायचा प्रयत्न करतो.
त्या कार्यक्रमात दाखवल्याप्रमाणे, एका लहान मुलाला एका टेबलावर उभे ठेवले आहे. त्या टेबलजवळच दुसरा टेबल ठेवला आहे. दुसऱ्या टेबलजवळ त्याची आई त्याला बोलावते (की असेच काहीतरी). दोन्ही टेबलांच्या मध्ये, तो मुलगा फक्त एकच पाय ठेवून दुसऱ्या टेबलवर जाऊ शकेल एवढ्या रूंदीची पट्टी /फळी ठेवली आहे. त्या मुलाला आधाराकरीता हाताच्या उंचीवर एक दुसरी लाकडी पट्टी दिली आहे, जेणेकरून तो त्या पट्टीचा आधार घेउन त्या फळीवरून दुसऱ्या टेबलवर जाऊ शकेल. इथे तो मुलगा सहजपणे गेला.
पुढे त्याच प्रयोगात हाताच्या लाकडी पट्टीऐवजी एक रबरी पट्टी लावली आहे. जेव्हा त्या मुलाला पुन्हा दुसऱ्या टेबलवर बोलावले, तेव्हा त्याने त्या रबरी पट्टीला हात लावला. त्याला कळले की ही पट्टी आपल्याला आधार देऊ शकत नाही तर तो पुढे गेलाच नाही, आणि रडायला लागला.
तसेच जिना चढताना उतरतानाही लहान मुले कठड्याचा वापर करूनच उतरतात हेही दाखविण्यात आले होते.
आता तुमच्यापैकी बहुतेकांनी हे आधी पाहिले असेलच.
एका मित्राच्या मुलाचे (वय जवळपास १० महिने) तोल सांभाळणे मी पाहिले तेव्हा ते कौतुकास्पद वाटले. झाले काय की मी सोफ्यावर बसलो होतो. तो मुलगा सोफ्यासमोरील टेबलचा आधार घेऊन उभा राहीला. त्याला सोफ्यावर यायचे होते. त्याने उजव्या हाताने टेबल पकडून डाव्याने सोफ्याला हात लावायचा प्रयत्न केला. तो सोफा लांब असल्याने त्याने उजव्या हाताने माझ्या पायाचा आधार घेतला. पुढे आला. मग डाव्या हाताने माझ्या पायाचा आधार घेऊन उजव्या हाताने सोफा पकडला आणि मग सोफ्याजवळ गेला. तेव्हा मला तो डिस्कव्हरीचाच कार्यक्रम आठवला.
जवळपास १२ वर्षांपुर्वी एक ३/४ वर्षांचा मुलगा एक व्हिडीयो गेम खेळत होता. मी गमतीत त्याचे सेल काढून घेतले आणि त्याला सांगितले की हे चालत नाही. त्याने नीट पाहिले, गेमच्या मागील सेलचा कप्पा उघडला आणि म्हणाला की ’इथे सेल पाहिजेत.’ घ्या. आता त्यांना काय काय माहित आहे.
एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो.
आणि भरपूर गोष्टी असतील. सध्या तरी एवढेच आठवत आहे. बाकी नंतर कधीतरी.

डिसेंबर १०, २००७

ह्या आधीचा लेख इथे पहा.
सिनेमातील मला लक्षात राहिलेली आणखी काही वाक्ये....
मेरे दो दो बाप...गोपी-किशन चित्रपटात दोन्ही सुनील शेट्टी एकत्र पाहिल्यावर सुनील शेट्टीचा (गोपी) मुलगा म्हणतो. त्या मुलाची हे बोलण्याची शैली एकदम वेगळी.
आमच्या संगणक कार्यक्रमात (program) काही ड्यूप्लिकेट दिसले की हे वाक्य आठवते.

क्या करू संजना, ऐसा ही हूं मैं.... मत रहो ऐसे...
पहिले वाक्य अजय देवगण चे दुसरे वाक्य काजोलचे. अजय देवगणच्या त्या वाक्यावर काजोल ज्या तऱ्हेने लगेच त्याला म्हणते "मत रहो ऐसे" ते मनाला लागून जाते. चित्रपट: प्यार तो होना ही था.

तुमने अपने गॉड को देखा है क्या? फिर भी तुम उससे प्यार करती हो ना?.
संजय कपूरला न बघताही प्रिया गिल त्याच्यावर प्रेम करत असते. तिची मैत्रीण तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रिया गिल चे हे वाक्य खूप काही सांगून जाते. चित्रपट: सिर्फ तुम

मुर्गी वालों अपनी मुर्गी संभालो.
तेजाब सिनेमात चंकी पांडे आणि मंडळी इतरांना फसवून आपल्या खाण्याचे पैसे भरायला लावतात.त्या संदर्भातील हे वाक्य त्या सर्वांच्या तोंडी असते. मस्त धमाल करतात ते.

दरवाजा छोटा हो और सर झुकाना पडे तो आदमी छोटा नही हो जाता.
मेकॅनिक असलेल्या ॠषी कपूरकडे नाना पाटेकर जाण्यास नकार देतो, तेव्हा त्याचा मामा (मोहन जोशी) त्याला समजावत असतो की आपले काम असले तर त्याच्याकडे जाण्यात काही गैर नाही. सिनेमा: हम दोनो.

अगर ऍक्टींग कर पाता तो सिनेमा में काम न करता?
हे वाक्य सिनेमातील नाही. परंतु एक धारावाहिक "इंडीया कॉलिंग" मधील आहे. हे इथे लिहिण्याचे कारण त्यात अयुब खान हे वाक्य म्हणतो. त्याला तसे म्हणताना पाहून आम्ही मित्र म्हणालो होतो की, त्याने हृदयावर दगड ठेवून हे वाक्य म्हटले असेल. :)

वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो.
सत्ते पे सत्ता सिनेमात हेमा मालिनी रागविल्यानंतर एक बुटका गुरखा अमिताभला दटावत असतो. तेव्हा हेमा मालिनी गेल्यावर अमिताभ त्याला कॉलरला पकडून वर उचलतो आणि म्हणतो "वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो".
पुणे-मुंबई (जुन्या) महामार्गावर मी एशियाड मधील दरवाजाजवळील खुर्चीवर बसलो होतो. तेव्हा मागून एक दुचाकीवाला नुसता हॉर्न वाजवत पुढे गेला. चालकाने त्याला बसमधील उंचीवरून त्याला ज्या तऱ्हेने पाहिले ते पाहून मला अमिताभचे हे दृष्य/वाक्य आठवले.

ह्या सिनेमातील हेमा मालिनीचा अमिताभच्या घरील संवाद म्हणजे एकदम धमाल येते पाहताना.. राहवत नाही म्हणून लिहित आहे-
"कचरा, तुम खुद एक कचरा हो. बल्की कचरा भी तुमसे अच्छा होता है. गंदे... बदबूदार.... बरसों से नहायें नही. पास से जाओ तो ऐसा लगता हैं की घोडे के अस्तबल से निकल के आया हो.
तुम्हे क्या लगता हैं तुम्हे कोई लडकी चाहेगी, तुमसे कोई प्यार करेगा? अरे.. तुम तो कोई डराने की चीज हो डराने की. किसी को जहर देकर मारने की बजाय तुम्हारी शक्ल दिखायें तो वह खुद ब खुद मर जायेगा."


यार, मैं यहा कार की बात कर रहा हू और तुम बेकार की बात किये जा रहे हो.
शान चित्रपटात शशी कपूर बिंदिया गोस्वामीला बघत असतो आणि अमिताभ तिच्या कारला. त्यानंतर हे वाक्य. ते दृष्यानंतर प्रत्येकाचा गोष्टी बघण्याची तऱ्हा आणि ह्या वाक्यातील शब्द एकदम खास वाटले.

डुकरा बोलले म्हणून काय घर सोडून जायचे का?
भुताचा भाऊ सिनेमात जॉनी लीव्हर एक तांत्रिक दाखवला आहे. त्याला आपल्या प्लॅन मध्ये सामिल करण्यासाठी वर्षा उसगांवकर नाते बनवायचा प्रयत्न करत असते. तो चित्रपट पाहताना अचानक असे वाक्य ऐकून खूप हसू आले होते.

बेइमानी मैं करता नहीं और मेरे साथ बेइमानी करने वाले को मैं बख्शता नहीं.
त्यागी सिनेमात गुलशन ग्रोव्हर आपल्या एका मित्राला सांगत असतो. का माहित नाही पण हे वाक्य अजून ही लक्षात आहे.(तेव्हा त्या चित्रपटातील एकूण एक वाक्य पाठ झाले होते.)

दीदी..मुझे वह छतवाला ज्यादा पसंद है.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये काजोल ची बहिण तिला सांगते. पहिल्यांदा (नीट न )पाहिला तेव्हा त्यातील संवाद एवढे लक्षात नाही राहिले. पण एका मैत्रिणीने हे वाक्य त्यात आहे हे जेव्हा सांगितले त्यानंतर सिनेमात त्या दोघींचा हा संवाद वेगळेच काही सांगून गेला. (काय ते विचारू नका. तसा हा चित्रपटही अजूनही काही वेगळाच वाटतो.)

तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था.
सरकार चित्रपटात अभिषेक बच्चन झाकिर हुसेन (सिनेमात रशीद) ला म्हणतो. तेव्हा चित्रपटातील खिळून राहिल्यानंतर अभिषेक चे हे वाक्य आणि ह्यापुढील काही वाक्ये (स्वामी आणि मुख्यमंत्र्याला म्हटलेली) बोलण्याची शैली मस्त वाटली. त्यामुळे लक्षात आहे.

ह्यातच दुसरे एक वाक्य दिपक शिर्के ला म्हटलेले... "मैं भी यही चाहता हूं."

अशी भरपूर वाक्ये असतील. जमल्यास पुढे कधीतरी लिहेन. हिंदी चित्रपट बनणे आणि आम्ही ते पाहणे तर काय बंद
नाही होणार.

डिसेंबर ०९, २००७

आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात.
उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार करती है तो ये पलट के जरूर देखेगी... पलट... पलट' हे वाक्य. माझ्या मते हे वाक्य नेहमी वापरात यावे, लक्षात रहावे अशाच विचाराने लिहिले असेल. पण त्याच्या सादरीकरणावरही तेवढाच जोर दिला गेला.

आता असेच वाक्य शाहरूख खानच्याच राजू बन गया जंटलमन मध्ये वापरले गेले होते. किंवा खरे तर राजू बन गया.. मधील हे वाक्य "अगर वह पलट के सिस्टर की ऑंखो में आँखें डाल के देखेगा तो फिर वह जा नही पायेगा.... पलट... पलट" पुन्हा दिलवाले दुल्हनिया मध्ये वापरले गेले. हे वाक्य ज्या प्रकारे सिनेमात वापरले गेले आणि एवढे लोकप्रिय झाले, की ते पुन्हा वापरायचा मोह आवरता आला नसेल. पण एक आहे, ते वाक्य खरोखरीच अर्थपूर्ण आहे. :)

आता आणखी थोडी सर्वांना आवडलेली वाक्ये..
तुम्हारा प्लान ही गलत है.. लगता है कच्चा खिलाडी है.पहिले वाक्य आमिर खान परेश रावल ला म्हणतो, दुसरे वाक्य सलमान खानला. सिनेमा: अंदाज अपना अपना.. ह्या सिनेमातील तर एक एक वाक्ये लक्षात राहण्याजोगी आहे,

इसको क्या घडी करके डालू क्या?
अपना प्यारा सर्कीट, ह्याबद्दल जास्त लिहिणे नको. सर्वांनाच माहित आहे.

केक के लिये हम कहीं भी जा सकते है...
सैफ अली खान, डिंपल ला म्हणतो. सिनेमा दिल चाहता है.
अशी इतर प्रसिद्ध वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न नाही. तो तर सगळीकडेच चालू असेल.
इथे आहेत मला लक्षात राहिलेली काही वाक्ये... आता ती तुमच्याही लक्षात नसतील, अर्थपूर्ण नसतील, खास कोणाच्या लक्षात रहावीत म्हणून लिहिली नसतील. पण काही कारणाने माझ्या लक्षात राहिलीत.

शैतान जहाँ जहाँ राम वहाँ वहाँ
राम लखन मधील हे वाक्य. सिनेमात शेवटच्या मारामारीच्या आधी आहे. मी आणि माझ्या बहिणीने ऐकल्याबरोबर प्रतिक्रिया दिली.. क्या डायलॉग है.

खुशकिस्मती सिर्फ़ एक ही बार दरवाजा खटखटाती है, पर बदकिस्मती तब तक दरवाजा खटखटाती है जब तक तुम दरवाजा ना खोल दो.

हमारा दिल आपके पास है. तनाझ कूरीम ऐश्वर्या ला सांगत असते. त्यातील शब्दांमुळे लक्षात राहिलेय अजून.

मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया.
चायना गेट.. मुकेश तिवारीच्या तोंडी हे वाक्य आहे. मी सिनेमा अजून पूर्ण पाहिला नाही पण हे वाक्य जरूर पाहिले आहे. एक वेगळे वाक्य म्हणून लक्षात राहिले.

अंकुश दिखने में भले ही छोटा हो, पर वह हाथी को काबू कर लेता है.
सिनेमा: मि. बेचारा. अनिल कपूर च्या छापखान्यात काम करणारा मुलगा कर्जाचे पैसे मागणाऱ्या लोकांना सांगतो.

धनाजी रामचंद्र वाकडे... ध.रा.वा. आता कोणाला धरावा?
धूमधडाका: अशोक सराफ जेव्हा शरद तळवळकरांच्या घरासमोर येतो तेव्हा हे वाक्य आहे. लहानपणी बहुधा पहिल्यांदा अशा प्रकारचे वाक्य ऐकले (किंवा समजले) असेल म्हणून अजुनही लक्षात आहे.

अरे मारने से पहले यह तो जान लिया होता के जिसे मार रहे वह कोई लुच्चा हैं या अपने मालिक का बच्चा है.
बोल राधा बोल... कादर खान ऋषी कपूरला मारल्याबद्दल गावकऱ्यांना जाब विचारत असतो. नक्की माहित नाही कोणी लिहिले ते. पण मला वाटतं हे वाक्य नक्की कादर खाननेच लिहिले असणार. अशाच प्रकारची बरीच वाक्ये कादर खानने भरपूर सिनेमांत म्हटली आहेत. कादरखानच्या तोंडी तशाच प्रकारचे संवाद असलेला सिनेमा म्हणजे स्वर्ग से सूंदर.
ह्यावरून आठवले. कादर खान हा हिंदीचा प्रोफेसर आहे असे ऐकले होते. त्याच्याच तोंडी हे असले संवाद/वाक्ये मग खटकतात.

घर का दूध खत्म हो गया है.
परिणीता मध्ये विद्या बालन संजय दत्त ला सांगते. पूर्ण सिनेमात एकदम अर्थपूर्ण, मस्त आणि छान वाक्ये असताना हे वाक्य ऐकून मला, माझ्या मित्रांना हसू आले. हे वाक्य नको होते असे वाटते.

मुझे दो दस चाहिये. एक दस.. दो दस.
जान से प्यारा मध्ये मतिमंद(?) गोविंदा आपल्या आईला (की इंस्पेक्टर भावाला) २० रू मागताना म्हणतो. एक वेगळे वाक्य आणि गोविंदाच्या संवाद शैलीने ते वाक्य लक्षात आहे.

याल्लोग को तडीपार नही बोलने का.
तडीपार सिनेमात मिथून बहुतेक वेळा स्वत:ला याल्लोग (की असेच काहीतरी) म्हणत असतो.

अठासी... नवासी... अस्सी
पनाह सिनेमात नसिरुद्दीन शहा ने इतरांना शिक्षा दिलेली असते, तेव्हा तो त्या नेणार असलेल्या मुलाला आकडे मोजावयास सांगतो. त्या मुलाची अठासी.. नवासी नंतर गफलत होऊन तो पुन्हा अस्सी वर सूरू करतो.

be patient be patient.. ok doctor.. ok doctor
ऐसी भी क्या जल्दी है सिनेमात विवेक मुशरान ची वाट पाहत सर्व बसले असताना सचिन म्हणतो की विवेक ला उशीर झालाय. अशोक सराफ त्याला म्हणतो be patient be patient.. तेव्हा सचिन म्हणतो ok doctor..ok doctor... (ह्यात अशोक सराफ डॉक्टर दाखविला आहे.)

समीर.. मुझे अपनी बाहों में भर लो..
मोहोब्बतें मध्ये किम शर्मा जुगल हंसराजला म्हणते. किम शर्माच्या त्या संवाद फेकीवर आम्हाला भरपूर हसू आले होते.

एक टीव्ही है फ्रीज है.. एक भगवान भी हैं देख...
सत्या सिनेमात स्नेहल (असेच काहीतरी त्याचे नाव आहे) जेव्हा चक्रवर्ती (सत्या) ला दिलेल्या खोलीत घेऊन येतो तेव्हा म्हणतो.

चाय से ज्यादा साला केटली गरम है.
पुन्हा स्नेहल.. हेराफेरी सिनेमात बस स्टॉप वर असरानीला दलाल समजून जेव्हा एक मुलगी देण्याकरता सांगतो, त्यात शेवटचे वाक्य. एक वेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणून लक्षात राहिले.
पुढील दोन वाक्ये तेरे मेरे सपने सिनेमातील.

दोस्ती में पुछने का नही.. कर डालने का.

यार पहले तो तू सिर्फ करोडपती था.. अब तो अनमोल हो गया है.अर्शद वारसी म्हणत असतो चंद्रचूड सिंग ला, आपल्या घरी नेण्याआधी.

अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा..
ह्या सिनेमाचे नाव ओळखा पाहू.... नाना पाटेकर, परेश रावल बद्दल अतुल अग्निहोत्रीला सांगत असतो.

अधर्मी... पापी.. दुराचारी.. बोल सॉरी..
एका धमाल चित्रपटात शेवटी असलेल्या धमाल नाटकातील वाक्य. जाने भी दो यारो सिनेमातील शेवटच्या महाभारत नाटकात नसिरुद्दीन शहाचे वाक्य.
ह्या सारखी खूप वाक्ये असतील, जी आपल्याला ह्या ना त्या कारणाने लक्षात राहिली असतील. सारखी सर्व सिनेमात वापरतात म्हणून नाही.

बाकीची वाक्ये पुन्हा कधीतरी.

डिसेंबर ०२, २००७

अर्थव्यवस्था म्हटले की समोर येते शेअर बाजार, सेन्सेक्स,विदेशी गुंतवणूक, चलनाचे दर, कर्ज, भाववाढ वगैरे वगैरे. पण ह्यात मी ह्याबद्दल काही लिहिणार नाही. इथे आहेत ते फक्त मी एक कॉलेज विद्यार्थी म्हणून माझे अनुभव. आता त्यात पैसे कमावण्याचा संबंध फारच कमी लोकांचा येतो. असतो तो फक्त खर्च. आईवडिलांनी दिलेल्या पैशांचा. कधीतरी लिहिल्याप्रमाणे, आज काल जेव्हापासून नोकरी करतोय तेव्हापासून पैसे हातात असतात. स्वत:चा/घराचा खर्च करू शकतो. अर्थात त्यामुळे उगाच उधळणे करत नाही. पण कधीही पैसे खर्च करताना कमी पडले की वसतीगृहातील अनुभव आठवतात. आजकाल ते दिवस आठवले मन भरून येते. ते होते काही वेगळे दिवस...

तेव्हा घरून आई पैसे देत होती. एखादे पुस्तक घेणे किंवा बाहेर खाणे ह्यामध्येही पैसे नीट विचार करून खर्च व्हायचे. इतरांसोबत सिनेमा बघणे, थोडाफार अवांतर खर्च तर व्हायचाच, पण तो काही उधळपट्टीत नाही येत. वसतीगृहात राहताना बहुतेकांना दर महिन्याच्या सुरूवातीला घरून पैसे यायचे. त्यामुळे बहुतेक मुले मनीऑर्डरची वाट पहायचे. त्यात ती मुले कसा, किती, कुठे खर्च करायचे ह्याबद्दल मी जास्त विचार केला नाही. त्यामुळे एखाद्याला पाहून आपण खर्च करणे किंवा त्याला वायफळ खर्चापासून अडविणे आपल्या अखत्यारित नव्हते. पण एक गोष्ट मी निरखून पाहिली आहे. (इतर मुलांनीही सांगितली होती). काही मुले जी सिगारेट प्यायची ती महिन्याच्या सुरुवातीला मस्त सिगारेटची पाकिटे विकत घ्यायचे. हळू हळु महिना सरत गेला, पैसे संपत गेले की मग त्या सिगरेट ची संख्या कमी व्हायची. पुढे मग सिगरेट संपली की उरलेली जमा करून ठेवा. एकदम गरज पडली तर ते उरलेले तुकडे पेटवून वापरणे, एकदम शेवटी तर सिगरेट ऐवजी वीडी पिणे ही होत असे. मी पाहिले नाही पण ऐकल्याप्रमाणे काही मुले तर चौकीदार/मेस वाल्यालाही विडी मागायचे. अर्थात मी त्या सर्वात (सिगरेट पिण्यात) नव्हतो. कारण ती सवय मी लावली नाही.

दुसर्‍या वर्षाच्या दुसया सत्रात मला पैसे कमी पडत होते. तेव्हा मी घरी जेव्हा फोन केला होता तेव्हा आईनेच विचारले होते की ’पैसे आहेत की पाठवू?’. ह्याआधी कधी अतिरिक्त पैसे मागावे लागले नव्हते, पण ह्यावेळी गरज होती त्यामुळे, का कोण जाणे, मला खूप हसायला आले. एवढे, की न आवरून मी फोन मित्राला दिला. तो आईला म्हणाला की "का माहित नाही, पण हा खूप हसत आहे." थोड्या वेळाने मग मी त्याला काय ते सांगितले.

त्यानंतर बहुधा मला कधी पैसे कमी पडले असे नाही झाले (शेवटच्या वर्षापर्यंत, हो.. सांगतो ते), की घरी फोन करावा नाही लागला की पैसे पाठवा. कारण, घरून येताना पैसे घेऊनच यायचो. ते तिकडील बँकेत ठेवायचे. मग १०-१५ दिवसांनी जेवढे लागतील तेवढे काढायचे. जर मित्राने काही वेळा पैसे मागितले तर ते ही मी द्यायचो. आणि काही वेळा आपण असेही करतो ना की आज मी पैसे देतो तू नंतर दे किंवा पुढच्या वेळी तू दे. किंवा कोणी घरून येत असेल तर त्याला सांगायचे हे हे घेऊन ये, मी तुला आल्यावर पैसे देतो. मग कधी कधी ते हिशोबात मोजले जायचे की तुझ्याकडे एवढे आहेत, मी तुला एवढे द्यायचे आहे.

ह्यावरून आठवले. २र्‍या की ३र्‍या वर्षी, नक्की आठवत नाही ३रे असेल, एक मित्र त्याच्या खोलीत बसून हिशोब करत होता. ह्याच्याकडून एवढे येतील, त्याच्याकडून एवढे येतील, फोटोचे ह्यांचे पैसे येणे बाकी आहेत वगैरे वगैरे. त्याचा येणार्‍या पैशांचा हिशोब झाला जवळपास ९०० ते ९५० रू. मी त्याला म्हणालो, "तू मला ८५० द्यायचे आहेस." तो म्हणाला, "साल्या, तू तर सावकारच निघालास. मी एवढे थोडे थोडे करून पैसे जमा करत आहे. आणि तू एका फटक्यात जवळपास सर्वच पैसे काढून नेतोयस." :)

आमचे कॉलेज शिर्डीपासून जवळ होते. त्यामुळे बहुतेक वेळा आम्ही शिर्डीवरूनच घरी यायचो. केव्हाही बस मिळायची. तर, तिसर्‍या वर्षी मी आणि एक मित्र शिर्डीवरून येणार होतो. बस निघण्याच्या आधी जेवण झाल्यावर विचार केला आईसक्रिम खाऊया. म्हणून एका दुकानात दरफलकावर बघत होतो कोणते परवडेल. पण एकदम कोणतेही आईसक्रिम खाण्यासारखे वाटत नव्हते. मग आम्ही विचार केला- हे असे करण्यापेक्षा थेट आइस्क्रिम ठेवतात तिकडेच पाहू कोणते पाहिजे. मग त्यानुसार आम्ही बघितले. 'ब्लॅक करंट’ खाण्यासारखे वाटले म्हणून ते घेतले. शेवटी पैसे देताना लक्षात आले की आम्ही खाल्लेले 'ब्लॅक करंट’ हेच सर्वांत महाग होते. :D

आता आपण केलेला खर्च वेगळा. पण वसतीगृहाच्या खानावळीत प्रत्येक विद्यार्थ्याचे महिन्याचे खाते ज्या माणसाकडून बघितले/सांभाळले जात, त्याने ही वेगळ्या प्रकारे आमच्या खिशाला खड्डा पाडण्याचा प्रयत्न केले होते. झाले काय, की परीक्षेच्या आधी सुट्टी असल्यावर भरपूर मुले घरी जात असत तेव्हा जर कोणी त्यावेळी वसतीगॄहात असेल व त्या खानावळीत खात असेल तर तिथे वहीत लिहावे लागत असे. महिन्याच्या शेवटी मग प्रत्येक मुलाचे किती दिवस खाणे झाले होते त्यावरून मग आधीच भरलेल्या पैशांपेक्षा जास्त झाले असेल तर मग महाविद्यालयात ते पैसे भरावयाचे असत. काही मुलांनी ती खातेवही बघण्यास मागितली तेव्हा पाहिले की काही मुलांच्या नावासमोर त्याने महिन्याचे ३२-३४ दिवस खाल्ले असे दाखविले होते. मग काय तक्रार केली त्याची.

हे सर्व झाले एखाद्या वेळी एखाद्यावर आलेला प्रसंग. पण ४थ्या वर्षी तर जणू अर्ध्या बॅचसमोरच पैशाची अडचण उभी राहीली होती. जवळपास सर्व प्रॅक्टिकल(प्रयोग) परीक्षांचे जर्नल(प्रयोगवही) तपासून तयार. सर्वजण परीक्षेचे अर्ज भरून नंतर घरी जाण्याच्या तयारीत. ह्यात मग ते पैसे वेगळे काढल्यावर बहुतेकांच्या लक्षात आले, आर्थिक आघाडीवर आपण मार खातोय. मग त्या २-३ दिवसांत मुलांचे खर्च बघण्यासारखे (की न बघण्यासारखे?) होते. आमच्या दररोजच्या जेवणावर त्याचा एवढा फरक पडला नाही, कारण डबा लावला होता. त्यामुळेही बहुधा ते आधी जाणवले नाही. पण रविवारी दुपारी फिस्ट असल्याने रात्रीचे जेवण बाहेरच करावे लागे. आता रात्री काय जेवावे? कसे तरी स्वत:च्या सर्व सामानातून धुंढाळून पैसे जमा केले व रात्री मॅगी खाल्ले. तो होता स्वस्त उपाय. तरीही मला एक दिवस आणखी काढायचा होता. पण हॉस्टेल मधील एका मित्राला आणखी काही दिवस (की परीक्षा होई पर्यंत) तिकडेच थांबायचे होते. त्याचा पैशाचा बंदोबस्त होण्यास थोडा वेळ होता. आम्ही मग जुनी पुस्तके शोधून काढली जी विकू शकतो. आता हे असे करण्यात काही गैर नव्हते. आपण पुस्तके टाकू नये म्हणतो. पण शेवटी भरपूर पुस्तके रद्दीतच देतो ना? जुनी पुस्तके ठेवण्याचे कारण असे की पुढे दुसया मुलांना ते विकू शकतो. किंवा आपल्या वापरण्याकरीताही ठेवू शकतो. पण ती विकण्यास आम्ही धजावलो. कारण वेळच तशी होती. तरीही का कोण जाणे आम्ही वेगळा विचार केला. म्हटले, पुस्तके विकून पैसे घेणे नको. इतर मुले नाहीत पण आपले मोठे लोक आहेत ना उधार मागण्यास. मग मी विचार केला, कॉलेजच्या सरांनाच मागवेत पैसे.

दुसर्‍या दिवशी सकाळी परीक्षेची फी भरल्यानंतर असेच सर्व मित्र पायर्‍यांजवळ जमा होतो गप्पा मारत. काही खाण्याचा विचार केला. पण आठवले, खिशात फक्त ३ रूपये आहेत, ज्यात चहाच मिळू शकेल. एक मित्र म्हणाला, "आहेत माझ्याकडे पैसे. मी देतो." सर्व ओरडलो,"चला". कँटीनमध्ये जाऊन मग आम्ही बर्गर खाल्ले (मॅकडोनाल्डचे नाही हो, साधे, गावठी) आणि चहा प्यायलो. आणि अर्थात त्या मित्राच्या नावाने थ्री चिअर्स करणे आलेच. पुढे थोड्या वेळाने मग त्यानेच बँकेत जाऊन थोडे पैसे काढले व आम्हाला दिले. चला, घरी जाण्याची तर व्यवस्था झाली.

हे प्रकरण होत असताना दुसरा एक मित्र म्हणाला की, "तुला मी जे RAM आणायला सांगितले होते ते तू मुंबईहून घेऊन ये. मी पैसे देतो." दुपारी त्याच्या खोलीवर गेल्यावर तो म्हणाला की त्याने पैसे त्याच्या खोलीतील मित्राच्या बॅगेत ठेवलेत आणि तो मित्र घरी गेलाय. संध्याकाळपर्यंत परत येईल. घ्या, इथे मुलांकडे पैसे नाहीत. आणि ह्या मुलाकडे, जो मला १६०० रूपये देणार होता, पैसे असूनही तो त्याला हात लावू शकत नव्हता. तरीही कसे तरी त्याने ते पैसे मिळविले (कसे ते मला आठवत नाही) व मला दिले. सकाळी मिळालेले २०० आणि हे १६०० ह्यात माझे घरी जाणे तर आरामात होणार होते, मला सरांना पैसे मागावे लागले नाहीत आणि सध्याच्या गरजेपेक्षा अतिरिक्त पैसा होता. म्हणून त्या हॉस्टेलवाल्या मित्राला विचारले की "पैसे पाहिजेत का?" तो म्हणाला, "नको.हॉस्टेलच्या मालकाकडून घेतलेत."

रात्री मी शिर्डीला पोहोचल्यानंतर बसचे तिकिट काढून मग खाण्याकरीता पळालो. खिशात भरपूर पैसे असल्याने खाण्यास स्पेशल पाव भाजी सांगताना काही तरी वेगळेच वाटत होते.
२ दिवस अंधारात राहिल्यानंतर जेव्हा आपल्याला लख्ख प्रकाश दिसल्यावर वाटते तसेच काही.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter