मे २९, २०१३

असे म्हणतात की जाहिरातीवाचून उत्पादन विकणे म्हणजे एखाद्या मुलीला अंधारात डोळे मारणे.

अर्थातच ह्याच तत्वावर अर्ध्याहून अधिक जग चालत असेल, मुलीला डोळे मारणे ह्या नाही...तर जाहिरातबाजीच्या.


लहानपणापासूनच दूरदर्शन, आकाशवाणीवर (दोन्ही ढोबळ मानाने तंत्रज्ञान आणि संच म्हणा, त्यावर वेगवेगळ्या वाहिन्या नव्हत्या तेव्हा) कार्यक्रम पाहताना, ऐकताना मधे मधे जाहिरातींची सवय होती. त्यात एक संरचना होती. ठराविक वेळानंतरच जाहिराती असणार. म्हणजे कशा, तर कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आणि नंतर, किंवा थोडक्यात दोन कार्यक्रमांच्या मध्ये. शनिवार - रविवारी चित्रपट पाहताना एक मध्यांतर असायचे ते बातम्यांचे. तेव्हा पुन्हा त्या दोन प्रसारणांच्या मध्ये जाहिरात.

नंतर आले वारे चित्रपट चलचित्रफीतींचे (व्हिडिओ कॅसेट हो). त्या भाड्याने मिळायच्या, पण त्यातही चित्रपटाच्या सुरूवातीला, चित्रपटाच्या मध्येच जाहिराती सुरू झाल्या. भाड्याने कॅसेट घ्यायला गेलो की काही वेळा दुकानदार सांगायचा, ओरिजिनल प्रिंट आहे म्हणून. म्हणजेच चित्र/आवाजाचा दर्जा उत्तम आणि दुसरे म्हणजे त्यात जाहिराती नसणार.

त्यानंतर आले केबल टीव्ही. पण त्याकरीता उपग्रह वाहिन्या कारणीभूत होत्या. नुसते चित्रपट पाहण्याकरीता किंवा दाखवण्याकरीता कोणी एवढ्या वायरचे जाळे गुंतविले नसते. मग भाड्याने कॅसेट आणण्यापेक्षा केबलवर नवीन चित्रपट, किंवा जे लागतील ते पाहणे. ह्या सर्वांमध्ये जाहिरातींनी डोके वर काढायला सुरूवात केली होती.  त्यात कॅसेटमधील जाहिराती तर असायच्याच, पण मग स्थानिक दुकाने किंवा तत्सम जाहिराती येऊ लागल्या. जाहिरातींनी नंतर चालत्या कार्यक्रमाच्या पडद्यावर आक्रमण सुरू केले. खालची २० ते ३०% पट्टी जाहिरातींनी भरलेली, वरचीही थोडीशी पट्टी. त्यात प्रेक्षकांनी आपला चित्रपट शोधून पहायचा.
त्याच काळात, 'खुदा गवाह' चित्रपट सुरू होता केबलवर. इतर चित्रपटांत निदान एखादा प्रसंग किंवा दोन्-चार वाक्ये म्हटली पात्रांनी की जाहिरात दाखवायचे. पण ह्यांनी तर कहरच केला. एक वाक्य  तर सोडाच, मारामारीच्या दृष्यात एक मुक्का मारला की दाखव जाहिरात, एक लात मारली की दाखव जाहिरात.

उपग्रह वाहिन्यांनी कार्यक्रमात 'ब्रेक' सुरू केला. "मिलते है ब्रेक के बाद". असे म्हणणे आधी खेळ, स्पर्धा व तत्सम कार्यक्रमात आले. मग मालिका आणि चित्रपटांमध्येही. नंतर आपल्यालाही अंदाज यायला लागला की कार्यक्रमात आता केव्हा जाहिरात दाखवणार.

आता व्यावसायिकदृष्ट्या वाहिन्यांना आपला खर्च काढायचा म्हणजे जाहिरातीतून पैसा घेणार हे आलेच. पे चॅनल ची संकल्पना अशी ऐकली होती की त्यात ग्राहकांकडून पैसे घेतले असल्याने मग त्यात वाहिनीवर जाहिराती नसणार. पण एकंदरीत ती संकल्पनाचा मोडीत काढली गेली किंवा वाहिन्यांनी त्याला हरताळ फासला. इथे प्रेक्षकांकडून तर पैसे घेतातच पण वर जाहिरातींचा भडीमार.  तो भडीमार आता इतका झाला आहे की जाहिरातींचा कंटाळा येतो ते तर सोडाच, पण आजकाल जाहिरातींच्या मध्ये कार्यक्रम दाखवतात असे दिसायला लागले आहे. १५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात. त्यात  त्यांचा प्राईम टाईम म्हणजे विचारायलाच नको. ते प्रमाण ५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात असेही जाते. मग त्यांनी लोकांना आपल्या कार्यक्रम पाहण्याकरीता (खासकरून चित्रपट) वन ब्रेक मूव्ही, नो ब्रेक मूव्ही, ठराविक मिनिटांच्या जाहिराती म्हणजेच ब्रेक सुरू झाला की तेव्हाच सांगणार १ मिनिटांत परत. २ मिनिटांत परत. बरे, जाहिरात दाखवण्याकरीता चित्रपटातले प्रसंग कापतील पण जाहिराती कमी नाही करणार.

तसे म्हटले तर टेलिशॉपिंग अर्थात दूरदर्शनवर उत्पादन पाहून त्याची खरेदी फोनवरून करणे ह्याकरीताही आता नवीन वाहिन्या निघाल्यात, परंतु त्या जाहिराती इतर वाहिन्यांवरही दाखवल्या जातातच. ती ही एवढ्या प्रमाणात की B4U, Zee च्या काही चित्रपट वाहिन्या ह्यांवर तर ५ मिनिटे चित्रपट दाखवून एकच जाहिरात प्रत्येक ब्रेक मध्ये. जणू काही ती जाहिरात सतत पहायचा कंटाळा नको म्हणून मध्ये चित्रपट आहे.

तुम्ही म्हणाल मी एवढे पाल्हाळ का लावले आहे? तर TRAI ने काढलेला नवीन नियम. दूरदर्शन वाहिनीवर एका तासात १२ मिनिटांच्यावर जाहिराती दाखवण्यास निर्बंध घातले आहे. १० मिनिटे जाहिराती आणि २ मिनिटे कार्यक्रमांची जाहिरात. चांगला नियम अर्थात आपण प्रेक्षकांकरीता. खरे तर TRAI ने ह्या नियमाबद्दल २००७ मध्येच जाहीर केले होते. पण ते अंमलात आणायला एवढा वेळ का लागला ते कळत नाही. माझ्या आठवणीप्रमाणे जानेवारी २००७ मध्ये ह्याबद्दल ऐकले होते. त्यानंतर आता ऑक्टोबर २०१३ पर्यंत म्हणजे जवळपास पावणे सात वर्षांनी त्याचा वापर होईल असे दिसते. तरीही वाहिन्यांनी डिसेंबर २०१३ पर्यंतचा वेळ मागितला आहे. तेव्हा तरी ह्याचे पालन होते की नाही ते पाहू.

अजूनही एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेलच. कार्यक्रम सुरू असताना मध्येच जाहिरात आली की तिचा आवाज खूप मोठा असतो. अचानक आवाज वाढल्याने कानांना त्रास होईल असा. आधी वाटायचे कार्यक्रमाचा आवाज कमी असतो आणि जाहिरातींचा मोठा म्हणून असे असेल. पण प्रत्येक कार्यक्रमात असे कसे असेल? ते मुद्दामच तसे ठेवतात असे कुठेतरी ऐकले/वाचले होते. पण ह्यामागचे नेमके कारण कळले नाही.
पण एक दिसले. अमेरिका आणि कॅनडामध्ये ह्याविरोधातही त्यांना नियम बनवावे लागले. 'जाहिरातींचा आवाज हा कार्यक्रमांच्या आवाजाएवढाच किंवा त्यापेक्षा कमी असावा'. हा नियम आपल्याकडेही लवकरात लवकर यावा अशी अपेक्षा. शक्यतोवर आता आलेल्या ह्या नवीन नियमावलीतच.

2 प्रतिक्रिया:

Anagha म्हणाले...

आमच्या पोटावरच लाथ मारताय की ओ तुम्ही भाऊ ! ;) :)

देवदत्त म्हणाले...

लाथ नाही मारत, जेवणावर मर्यादा घालत आहेत :)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter