जुलै २९, २०११


 गेले २ दिवस एवढा पाऊस पडतोय. सकाळी उठलो तेव्हा वाटले नव्हते की जोरात पाऊस पडत आहे. पण कार्यालयात जाता जाता जोरात पाऊस पडत होता. त्यामुळे दुचाकीवरून जातान वेगळा त्रास तर होताच. त्यात महानगरपालिकेच्या कृपेने जागोजागी खड्डे तर आहेतच. दुचाकीवरून जायचे म्हणजे आपण लोक तर डावीकडची बाजू पकडून ठेवणार. पण नेमके त्या बाजूला पाणी जमा झालेले असते. मधून जायचे म्हटले तर सांभाळूनच जावे लागते आणि पुन्हा खड्डा असला तर आणखी वैताग. आज संध्याकाळी परत येताना पुन्हा जोरात पाऊस सुरू झाला. अंधार पडलेला आणि जोरदार पाऊस.

 

मग मि. नटवरलाल चित्रपटातील शेवटच्या भागातील अमिताभच्या युक्तीप्रमाणेच जायचे ठरविले. किंवा ते करायचे म्हटले आणि मि. नटवरलाल चित्रपट आठवला असे म्हणणे जास्त बरोबर असेल.

जाणे आहे ते डावीकडूनच. पाण्यामुळे खड्डा कळला नाही तर बोंब. नटवर कसा विक्रमच्या पावलांच्या ठशांवर पाय ठेवून बाँबच्या खटक्यापर्यंत पोहोचतो... तसेच. पुढे जाणार्‍या दुचाकीच्या मागेच जायचे. पुढच्याला खड्डा लागला की आपण सावरून जायचे. मध्येच कुठले तरी व्यंगचित्र आठवले. त्यात म्हटल्याप्रमाणे "रस्त्यांवर भरपूर खड्डे झाल्याने गाड्यांकरीता उड्डाणपूल बांधलेत. पण उड्डाणपूलावरच खड्डे पडलेत आता काय?" त्याप्रमाणे आज ऐरोली आणि तीन हात नाक्यावरील पुलांवर सुद्धा खड्डे पाहिले. ते खड्डे खोल होऊन वरून एखादी दुचाकी खालील गाडीवर लँड होवो त्या आधी पाऊस तरी थांबावा आणि/किंवा महानगरपालिकेला खड्डे बुजविण्याची आठवण देवो.

जुलै २८, २०११




भारतातील पहिले आणि एकमेव मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय लोणावळ्यात आहे आहे असे ऐकले होते. पुण्याला जाताना रस्त्यावरच आहे असेही कळले. रस्त्यातच (म्हणजे एकदम रस्त्यावर नव्हे... मुंबई-पुणे रस्त्यावर. पण हो रस्त्यावरच आहे. जुन्या महामार्गावरून जातानाच दिसते) खास आडवळणात जायची गरज नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर त्याचे फलकही लावलेले पाहिले. पण लोणावळा आल्यावरही नेमके कुठे वळायचे ते नाही लिहिले त्यांनी फलकावर. माझ्या बायकोला ते ठिकाण माहीत असल्याने तिने सांगितले की लोणावळ्यातून जुन्या महामार्गावर वळू. म्हटले जाता जाता एक चक्कर मारू. पाहिले तर चक्कर मारण्याइतकेच ते लहान आहे :) प्रत्येकी १०० रू. चे तिकीट काढून आत गेलो.

आत गेल्यावर पहिलाच पुतळा एकदम मस्त वाटला. बालाजी तांबे ह्यांचा. दोन तीन जणांच्या मध्ये तो पुतळा म्हणजे खरोखरच कोणीतरी उभे आहे असे वाटत होते. म्हटले चला काहीतरी खरोखर चांगले आहे.

बाजूलाच महात्मा गांधींचा पुतळा. पंडित नेहरू. मग राजीव गांधी.



डावीकडे शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळ गर्दी होती म्हणून सरळ पुढे सरकलो.




आतल्या खोलीत गेल्यावर उजवीकडे कोणाचा पुतळा ओळखता आला नाही. नाव वाचले तर छगन भुजबळ. बाहेर गांधी, नेहरू ह्यांचे पुतळे पाहून ह्यांचे पुतळे असणारच म्हणून वेगळे काही वाटले नाही. पण छगन भुजबळ ह्यांचा पुतळा पाहून लगेच म्हटले, "पूर्ण काँग्रेसप्रणित संग्रहालय आहे हे".




















आणि खरोखरच भरपूर नेत्यांचेच पुतळे दिसले. तेही दक्षिण भारतातील. असो बा, पण ज्यांची नावे कधी ऐकलीही नव्हती त्यांचे पुतळे पाहून राजकारण किती प्रभावशाली आहे ते दिसले. आता प्रत्येकाचे नाव सांगत बसत नाही. जे ओळखता येतात त्यांचे नाव सांगायची गरज नाही आणि जे ओळखता येत नाहीत त्यांची नावे मलाही माहित नाहीत/आठवत नाहीत. जास्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर आहे.

तुम्हीच पहा त्याची (मी काढलेली) प्रकाशचित्रे :)



















लास वेगस मधील वॅक्स म्युझिअम च्या मानाने भरपूर कमी पुतळे होते. दर्जाचा मी विचार करत नाही आहे. पुतळ्याला हात लावू नये अशी सूचना आत गेल्या गेल्याच मिळाली होती. पण तिथली स्वच्छता आणि पुतळ्यांच्या आसपासची पाहून थोडासा प्रश्न पडला, की हे जास्त काळ टिकेल का?. :(
नेते लोकांचा प्रभाव पाहून थोडा हिरमुसला झालो, पण एकंदरीत पुतळे सरासरीत चांगले वाटले.  

जुलै १४, २०११

काल मुंबईमध्ये बाँबस्फोट झाले,सरकारने लगेच मोठमोठ्या शहरात हाय अलर्ट घोषित केला.


ह्याचा अर्थ काय?

माझ्या मते भारतीय हाय अलर्ट म्हणजे, सामान्य माणसाला होणार्‍या त्रासात आणि नेत्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ .

नाही तर काय? बाँबस्फोटानंतर काल रात्री, आज सकाळी, पुन्हा आता रात्री मी तरी काही फरक नाही पाहिला. अंधेरी ते ठाणे ह्या रस्त्यावर कुठेही हाय अलर्टची काही चाहूल नव्हती. हो, जिथे बाँबस्फोट झाले त्या भागात वाढविली असेल सुरक्षा. त्या भागात लोकांना जाण्यास मनाई केली आहे असे ऐकले. एक तर तिकडचे पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून आणि दुसरे म्हणजे ते मंत्री लोक जातील ना त्या जागांना भेट द्यायला. मग त्यांना काही झाले तर? आणि ही वाढीव सुरक्षा फक्त २ दिवस जास्तीत जास्त १०.

अशा वेळी बहुतेक करून गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढविली जाते म्हणतात. म्हणजे आधीच लोकांना गर्दीमुळे उशीर होत असतो, त्यात सुरक्षा म्हणून करण्याच्या चाचपणीचा देखावा केला जातो असेच वाटते. तुम्ही म्हणाल, 'पुढे तिथे बाँब फुटला तर परत मी त्यांनाच शिव्या घालणार'. जर ती चाचपणी नीट होत असेल तरी झाले तर नाही शिव्या घालणार. पण आधीच म्हटल्याप्रमाणे तो मला देखावाच वाटतो. २००५ की ०६ मध्ये मुंबईत रेल्वे स्थानकांवर धातू शोधक (मेटल डिटेक्टर) यंत्रणा लावणार होते. त्याची प्राथमिक चाचणी करण्याकरीता पहिले स्थानक कोणते निवडले तर मुंबई सीएसटी. अरे, तुम्हाला चाचणी करायची आहे ना मग थेट सर्वात जास्त गर्दी असलेल्या स्थानकावर का? कमी गर्दीच्या स्थानकांवर करा ना? तिकडे गोंधळ झाला तो होणारच होता.

आणि मग समजा एखाद्याकडे आढळली बंदूक तर काय करणार? मॉलमध्ये वगैरे जेव्हा मेटल डिटेक्टर वगैरे पाहतो तेव्हा 'मॅट्रीक्स' सिनेमातील प्रसंग आठवतो. त्यात शेवटी दोघांना सुरक्षा अधिकारी विचारतो. 'काही आहे?' म्हणून. निओ लगेच जॅकेट उघडून दाखवतो, आणि धाड धाड गोळीबार सुरू.... तसेच जर खरोखरच एखादा आला तर काय फरक पडणार आहे त्या मेटल डिटेक्टरचा? आणि बहुधा प्रत्यक्षात तसे सीएसटी स्थानकावरच २००८ मध्ये कसाब आणि त्याच्या साथीदारांनी करून दाखविले.

हे जरा थेट शस्त्रास्त्रे घेऊन हल्ला करण्याबद्दल झाले .

पण आजचेच उदाहरण घ्या ना. मी वर म्हटले तसे मला रस्त्यात कुठेही सुरक्षा वाढविल्यासारखे वाटले नाही. वाढल्यासारखे सोडा, काही बदल असल्याचेही जाणवले नाही.कार्यालयाच्या संकुलात शिरताना ओळखपत्र दाखविल्याशिवाय जाऊ देणार नाही असा नियम आहे. पण माझा सहकारी सांगत होता की दुचाकीवरून आला तेव्हा त्याला ओळखपत्राबद्दल विचारले. पाऊस पडत होता म्हणून ते आत ठेवले होते. त्याला थांबविले आणि ते दाखवण्यास सांगितले. तो रेनकोट काढून खिशातून कार्ड बाहेर काढणार त्या आधीच विचारणा झाली, आहे ना? ठीक आहे जा. ओळख न दाखवता आत जाता येणं शक्य आहे.

असेच माझ्यासोबतही झाले होते. २००६ मध्ये बँगलोरच्या आयटीपीएल मध्ये बाँब असल्याचा फोन आला. त्यामुळे मग आम्हाला कार्यालयांतून बाहेर काढण्यात आले. सर्वत्र चाचणी केली. बेसमेंट मध्ये बाँब असेल अशी शक्यता होती. आम्हाला घरी पाठविण्यात आले. खरे तर तिथेही ओळखपत्र दाखविल्याशिवाय आत जाऊ देत नाहीत. पण दुसर्‍या दिवशी, दुसर्‍याच दिवशी सकाळी मी ओळखपत्र दाखविल्याशिवाय आत गेलो होतो.

वरील दोन उदाहरणांतून हेच सांगायचे आहे की इतर वेळी तर असे दुर्लक्ष देणे घडत असतेच, पण काहीतरी खरोखरच घडले आहे तरी त्यांना त्याचे गांभीर्य वाटत नव्हते.

तसेच, अजून एक. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. २००९ मध्ये अमेरिकेत जाण्याकरीता रात्री विमानतळावर पोहोचलो. आई आणि बायको Guest Areaमध्ये थांबले होते. मी चेक-इन करून त्यांच्याशी बोलायला परत आलो. प्रवासी आणि पाहुणे ह्यांच्याकरीता विभागलेल्य त्या भागात लोखंडी/स्टीलच्या खांबांचे होते. पण ते दोघे एकदम दुसर्‍या टोकाला होते. यायला वेळ लागला असता. जुन्या अनुभवाप्रमाणे बोर्डींग पास मिळाल्यावर आपण बाहेर येऊ शकत होतो. म्हणून मी तिकडील सुरक्षा पोलिसाला विचारले की, 'मी बाहेर जाऊन त्यांना भेटून येऊ का?'. तो नाही म्हणाला. तरीही त्याने वरीष्ठ अधिकार्‍यालाही माझ्यासमोर विचारले. तोही नाही म्हणाला. मी म्हटले, 'ठीक आहे. हरकत नाही. परवानगी नाही तर राहू दे. इथूनच भेटून घेऊ'. थोड्या वेळाने तो पोलिस माझ्याकडे आला व म्हणाला,"जल्दी वापस आना" मी म्हटले, 'ठीक आहे'. मी बाहेर मुख्य दरवाजातून बाहेर पडता पडता त्याने म्हटले, "वापस आने के बाद मेरे चायपानी का भी देख लेना." मी म्हटले, 'कुछ देना वगैरा है तो छोडो. नहीं जाऊंगा मै.' मग क्षणभर विचार करुन तो म्हणाला, "जाओ" मी घरच्यांना भेटून १० मिनिटांत परत आलो.

ह्या उदाहरणांत मला ते नियम चुकीचे नाही वाटले. पण जो निष्काळजीपणा दाखवला जातो त्याबद्दल राग आला म्हणा, वाईट वाटले म्हणा, विचित्र वाटले म्हणा , की फक्त दाखविण्याकरीता आहे का हे? विमानतळावरचे म्हणाल तर जर तो माणूस काही रुपयांकरीता नियम मोडू देऊ शकतो तर भरपूर रक्कम मिळाली तर गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळेच पोलिस तसे नसतील पण बहुतेक घटनांमध्ये तसेच झाले असू शकेल.

शितावरून भाताची परीक्षेचाच प्रकार झाला हा. पण काय करणार आजकाल तशीच परिस्थिती दिसतेय. म्हणूनच कोणी हाय अलर्ट म्हटले की वाटते.. 'हाय अलर्ट? घंटा'


जुलै १२, २०११

गेले काही दिवस पुन्हा तेच. काहीतरी मनात आलेले लगेच लिहायला घेतो, पण लिहिता लिहिता मध्येच काहीतरी काम आल्याने ते लिखाण अर्धवटच राहिले. अशा ४ ५ गोष्टी अजूनही प्रकाशित करायच्या राहिल्यात. 
पाहतो किती जमते ते.

जाता जाता: भ्रमणध्वनी मधून मराठी लेखन प्रकाशित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न :-)


इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter