वाहतूक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाहतूक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जानेवारी १३, २०१६

नेहमीप्रमाणे काल ऑफिसला दुचाकीने जात होतो. मुलुंड टोलनाक्यावर सर्वात डाव्या बाजूने दुचाकी आणि रिक्षांना जाण्याकरीता जो मार्ग दिलेला आहे, दररोज तिथे भरपूर गर्दी असते. सर्वच चालकांना आपली गाडी पुढे दामटायची असते. मग काही लोक चारचाकींकरीता (किंवा खरं तर इतर सर्व गाड्यांकरिता) असलेल्या रांगेतून आपली गाडी पुढे नेतात. पुढे वाहतूक पोलिस उभे असतात पण ते सहसा ट्रक, टेम्पो ह्यांना थांबवून त्यांची कामे करीत असतात. पण काल खाकी वर्दीधारी पोलिसही प्रत्येक मार्गिकेसमोर उभे होते. वाटले, 'वा, चांगले आहे. कोणीतरी येत असेल.'

मी सहसा इतर मार्गिकेमधून जात नाही. पण गर्दी पहिल्या रांगेत खुपच ओढाताण वाटली म्हणून दुसर्‍या रांगेतून गाडी पुढे घेतली तर नेमके मला पोलिसांनी थांबविले. मग नेहमीचेच सोपस्कार (लायसन्स, गाडीची कागदे) झाल्यावर मी विचारले.


पूर्ण संभाषण देत नाही, त्याचा गोषवारा.


मी : "मला नक्की का थांबविले ते तर सांगा. पुढील वेळी लक्षात ठेवेन :)..."

पो : "काय राव, तुम्हालाही सर्व समजवावे लागेल का?..."
मी : मी ह्या रांगेतून नेहमी येत नाही, आज आलो म्हणून अडविले. पण मग इतरांनाही अडवा की..."
त्यांचे म्हणणे होते की एकालाच सगळे जमत नाही.


मग  आणखी थोडी चर्चा करून मी पुढे निघालो.


ऑफिस मध्ये आल्यावर सहकार्‍याशी बोलताना कळले की वाहतूक विभागाचा सुरक्षा सप्ताह सुरू आहे. मग सगळी गोष्ट लक्षात आली.


संध्याकाळी घरी जाताना त्याच टोलनाक्यावर पाहिले तर आमच्या (म्हणजे दुचाकी/रिक्षाच्या) रांगेला अडवून बेस्टची बस त्यांच्या पहिल्या रांगेत घुसत होती.

आता ह्या लोकांना पोलिसांनी का थांबवले नाही हा प्रश्न विचारावासा वाटला, पण नाही विचारला.

(प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)


फेब्रुवारी १९, २०१५


दररोज दुचाकीने ऑफिसला जाताना एक गोष्ट जाणवली. लहान (दुचाकी) गाड्या छोट्याशा जागेतून निघून पुढे जाऊ शकतात. ते लोक फुटपाथवरून जातात हा भाग सध्या सोडून द्या.  पण कार, ट्रक, बस अशा मोठ्या गाड्या जेव्हा आपली गाडी जाऊ शकत नाही तरी समोरील जागा अडवून उभे राहतात.

अशावेळी मोठ्या गाड्यांनी आपला अहंकार :) बाजूला ठेवून थोडीशी जागा दिली, तर लहान गाड्या आपल्या प्रवासाच्या ठिकाणावर लवकर पोहोचू शकतात.

हीच गोष्ट जीवनातील इतर गोष्टींनाही लागू होते, नाही का?

(प्रकाशचित्रः आंतरजालावरून साभार)


सप्टेंबर ०५, २०११


माजिवडा उड्डाणपूलापासून कल्याणकडे जाणारा महा(?)मार्ग. उजवीकडे वळल्यानंतर साधारण २०० मीटर अंतरापासूनच गाड्या खोळंबलेल्या दिसल्या. घरातून निघताना ठरवले होते की जास्त गर्दी असली तर अर्ध्या रस्त्यातूनच परत निघायचे. तसेच काहीतरी होईलसे वाटत होते. कार्यालयाच्या रस्त्यावर, घराच्या आसपास, आणि इतरत्र रस्त्यांची हालत तर पाहूनच आहे, त्यामुळे खोळंब्याचे कारण तर लक्षात आले होतेच. हळू हळू करत (पण किती ते हळू? १ मीटर जाऊन २ मिनिटे थांबायचे?) पुढे जात होतो. साकेत च्या समोरील पुलावर पोहोचेपर्यंत रस्ता एकदम चांगला तर नाहीच, पण त्या पुलाजवळ पोहोचल्यावर कळले की ह्याला रस्ता म्हणून घेण्याची लायकीच नाही. समुद्रामध्ये बोट कधी हेलकावे खात असते त्याच प्रकारे कार हेलकावे खात होती. साधारण अर्धा ते एक किलोमीटरचा रस्ता हा असाच. २ किमी चा रस्ता पार करायला १:४५ तास? टोलनाक्यावर कोणी टोल भरलाच नाही. पुढे कल्याण फाट्यापर्यंत तसा चांगला रस्ता. पुन्हा मग कल्याणमधील खड्ड्यांच्या समुद्रात शिरलो. परत येताना टोल भरणार नाही असे वाटले होते पण भरावा लागला.

ह्यावर्षी हे अतीच झालेय. की अजून बाकी आहे?. एकही रस्ता, मोठा रस्ता सोडा, गल्लीगल्लीसुद्धा नीट नाही आहे.

'अ' चे पालिकेत राज्य आहे तर 'ब' हा विरोधी पक्ष कधी तरी बोलतो. तेच 'ब' चे दुसरी कडे राज्य आहे तर 'अ' हा त्या विरुद्ध बोलतोय असे मध्ये वाचले होते. पण स्वत:च्या पालिका हद्दीत काही सुधारणा नाही. आता तर ती बोंबाबोंबही बंद आहे.

गणेशोत्सवात सगळीकडे गणपतीच्या स्वागताचे स्वत:च्या नावाचे पोस्टर लावून ठेवलेत ते ही त्याच खड्ड्यांच्या समोर. हे खड्डे आम्ही बनविलेत असे तर नाही सांगत ना ते?

केंद्र/राज्य सरकार मधील कॉंग्रेसला ला शिव्या घालूत असू पण महानगरपालिकेत तर शिवसेना आहे. ते ही तर काहीच नाही करत आहेत. नवनिर्माण करणारेही गायब झालेत. त्यामुळे जरी एकाच्या विरोधात गेलो तरी दुसऱ्याचा फायदा नाहीच. आणि हे सुद्धा फेब्रुवारी २०१२ च्या महानगरपालिका निवडणूका तोंडावर असताना. गंमत आहे ना?

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत थोडे फार तथाकथित यश मिळाले असेल (हो तथाकथितच. ते नंतर कधीतरी) पण आधी खड्डा विरोधी मोहिम सुरु करून तिला यश मिळवून दिले पाहिजे असेच वाटते.

जुलै २९, २०११


 गेले २ दिवस एवढा पाऊस पडतोय. सकाळी उठलो तेव्हा वाटले नव्हते की जोरात पाऊस पडत आहे. पण कार्यालयात जाता जाता जोरात पाऊस पडत होता. त्यामुळे दुचाकीवरून जातान वेगळा त्रास तर होताच. त्यात महानगरपालिकेच्या कृपेने जागोजागी खड्डे तर आहेतच. दुचाकीवरून जायचे म्हणजे आपण लोक तर डावीकडची बाजू पकडून ठेवणार. पण नेमके त्या बाजूला पाणी जमा झालेले असते. मधून जायचे म्हटले तर सांभाळूनच जावे लागते आणि पुन्हा खड्डा असला तर आणखी वैताग. आज संध्याकाळी परत येताना पुन्हा जोरात पाऊस सुरू झाला. अंधार पडलेला आणि जोरदार पाऊस.

 

मग मि. नटवरलाल चित्रपटातील शेवटच्या भागातील अमिताभच्या युक्तीप्रमाणेच जायचे ठरविले. किंवा ते करायचे म्हटले आणि मि. नटवरलाल चित्रपट आठवला असे म्हणणे जास्त बरोबर असेल.

जाणे आहे ते डावीकडूनच. पाण्यामुळे खड्डा कळला नाही तर बोंब. नटवर कसा विक्रमच्या पावलांच्या ठशांवर पाय ठेवून बाँबच्या खटक्यापर्यंत पोहोचतो... तसेच. पुढे जाणार्‍या दुचाकीच्या मागेच जायचे. पुढच्याला खड्डा लागला की आपण सावरून जायचे. मध्येच कुठले तरी व्यंगचित्र आठवले. त्यात म्हटल्याप्रमाणे "रस्त्यांवर भरपूर खड्डे झाल्याने गाड्यांकरीता उड्डाणपूल बांधलेत. पण उड्डाणपूलावरच खड्डे पडलेत आता काय?" त्याप्रमाणे आज ऐरोली आणि तीन हात नाक्यावरील पुलांवर सुद्धा खड्डे पाहिले. ते खड्डे खोल होऊन वरून एखादी दुचाकी खालील गाडीवर लँड होवो त्या आधी पाऊस तरी थांबावा आणि/किंवा महानगरपालिकेला खड्डे बुजविण्याची आठवण देवो.

फेब्रुवारी २५, २०११

आज अंधेरीत दुचाकीवरून जात होतो. लहानशा रस्त्यावरून (गल्ली नाही, दोन गाड्यांएवढी रूंदी आहे त्याची) मुख्य रस्त्यावर येत होतो. उजवीकडून उलट दिशेने पोलिसांची गाडी सायरन वाजवत गेली. पुढे आलो तर मुख्य रस्त्यावर जाण्याकरीता गाड्या उभ्या होत्या त्या गर्दीत थांबलो.

डावीकडे पुढे पोलिसांची दुसरी गाडी लाल/पिवळा दिवा लावून आमच्याच गर्दीत होती. तेवढ्यात त्यांनीही सायरन वाजवायला सुरूवात केली. त्यांना पुढे जायचे होते. पण पुढे गाड्या असल्याने त्यांना जायला जमत नव्हते. मी तोपर्यंत गाड्यांमधून एकदम समोर आलो. समोर उजवीकडून डावीकडे रहदारी सुरू होती. रस्त्याच्या मध्ये एक वाहतूक पोलिस भ्रमणध्वनीवर (मोबाईल हो) बोलत उभा होता. मला वाटले तो आमच्या बाजूची वाहतूक सुरू करेल. पण नाही.

मग त्याचे बोलणे झाल्यावर तो उभा राहिला. मी हॉर्न वाजवून त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाटले, मला पुढे जायची घाई आहे म्हणून मी हॉर्न वाजवत आहे. त्याने फक्त हात दाखवून थांब म्हटले. तोपर्यंत मागे सायरन सुरूच होता. मग अर्ध्या एक मिनिटाने त्या वाहतूक पोलिसाने आमच्या बाजूच्या गाड्यांना परवानगी दिली. मी जाता जाता त्याला सांगायचा प्रयत्न केला की, "मागे पोलिसांची गाडी सायरन वाजवत होती म्हणून मी तुम्हाला सांगत होतो." त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी ही विचार केला, "जाऊ देत. कुठे त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा." आणि पुढे निघालो.

पुढील वेळी ही विचार करेन

फेब्रुवारी २२, २०११

आज सकाळी पूर्व दृतगती मार्गावरून पवईकडे जाण्यासाठी डावीकडे वळलो. ह्या मार्गावर सिग्नलला वाहतूक खोळंबा असतोच. आज तर एवढा की गाड्यांना परवानगी नसलेल्या पदपथावरही दुचाकी अडकून राहिल्या होत्या.


कहर म्हणजे एक माणूस बिचारा पदपथावरून न जाता मग रस्त्यावरून जागा काढत जात होता.

पुढे आलो सिग्नलजवळ तेव्हा वाहतूक पोलिसाने हात दाखवून आम्हाला थांबविले. त्याला पाहताच मला मॅट्रिक्स सिनेमातील निओ आठवला. वाटले, He is also the One :)
निओ ने हात दाखवून बंदुकीह्या लहानशा गोळ्याच थांबवल्या होत्या. ह्याने हात दाखवल्या की मोठ्या मोठ्या गाड्या थांबतात. :)


असेच काहीतरी पुन्हा कधीतरी.

फेब्रुवारी ०८, २०११

(ह्याच विषयावर मी आधी ही येथे लिहिले होते. पण तो बसमध्ये/इतर गाड्यांमध्ये बसून घेतलेला अनुभव होता. आजचे लेखन आहे स्वत: गाडी चालवताना घेतलेल्या अनुभवांवरून)

शुक्रवारी
रात्री माझ्या दुचाकीवरून कार्यालयातून घरी येत होतो. तीच नेहमीची गर्दी. मुलुंड चेकनाका पार करून ठाण्यात शिरलो. जकातीसाठी ट्रक हळू हळू पुढे जात होते. मी ते रांगेत होते म्हणत नाही आहे. त्यांतून मार्ग काढत कार आणि दुचाकी जात होत्या. जकात नाका पार करून पुढे आलो. दोन रुग्णवाहिका पुढे जाण्याच्या प्रयत्नात होत्या. पण ट्रक आणि कार मधून पुढे जाणे कठीण पडत होते. त्याने शेवटी सायरन वाजवला. एक दोन गाड्यांमधुन जागा मिळाल्यावर पुढे गेले. मी ही आपला मागून जागा शोधत/काढत त्यातून पुढे आलो. पुढे तीन हात नाक्याच्या उड्डाणपुलावर पुन्हा ट्रकची गर्दी. तिकडून पूल उतरल्यावर पाहिले दोन्ही रुग्णवाहिका अजून तिकडे रस्ता मिळण्याची वाट पाहत ट्रकच्या मागे जात होत्या. नीट पाहिले तेव्हा कळले की तो ट्रक डावीकडच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उजवीकडून पुढे जात होता. पण त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झाल्याचे त्याला जाणवले नाही. रुग्णवाहिकेचे चालक अधूनमधून सायरन वाजवत होते. मी मग कसातरी मार्ग काढत त्या दोन रुग्णवाहिकांच्या पुढे गेलो. त्या ट्रकचालकाच्या सहकार्‍याला म्हटले,"मागून रुग्णवाहिका येत आहे त्याला तरी जागा द्या रे. नेहमी ओव्हरटेक काय करायचे असते तुम्हाला" त्याने मागे पाहिले आणि ट्रक डावीकडे घ्यायला सांगितला. पण तोपर्यंत आम्ही पुढील उड्डाणपूलापर्यंत पोहोचलो होतो. मी पूलावर न जाता डावीकडे गेलो आणि त्या रुग्णवाहिका जागा मिळाल्याने ट्रकच्या पुढे जात आहेत असे दिसले. पुढे त्यांना किती मोकळा रस्ता मिळाला त्याचा अंदाज नाही. 

हे नेहमीचेच झाले आहे. आधी कंपनीच्या बसने यायचो तेव्हा काय त्यांच्या वेळेवर निघणे. बाकी त्या चालकाचे काम आम्हाला आमच्या ठिकाणी नेणे. पण भरपुर वेळा काम असल्याने उशीरा निघायला लागायचे तर बस चुकायची म्हणून दुचाकीने जायला सुरूवात केली. सुरूवातीला वेगळे वाटले पण नंतर कार्यालयातून घरी निघताना विचार सुरू असतो केव्हा बाहेर पडायचे? कारण गेटबाहेर निघाल्यावरच वाहतुकीचा खोळंबा सुरू झालेला असतो. लगेच समोर मोकळा रस्ता असला तरी पुढच्या सिग्नलला गर्दी असणारच. उदा. अंधेरीकडून पवईमार्गे पूर्व दृतगती मार्गावर जाताना गेल्या वर्षी पवई तलावापासून आय आय टी मुख्य द्वारापर्यंत रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा असायचा. तो रस्ता ठीक झाल्यावर वाटले की चला मार्ग मोकळा झाला. तसे नाही. आता कांजुरमार्ग/गांधीनगर जोडणीला मस्त गर्दी असायची. तशीच ह्या बाजूला  एल अँड टी चा पूल सुरू व्हायच्या आधी. आता पहावे तर कांजूरमार्ग ते पूर्व दृतगती मार्गावरचा जो पूल आहे तिथे थांबून रहावे लागते. थोडक्यात उर्जेच्या नियमाचा थोडासा प्रकार म्हटला तर ह्या सिग्नलवरून त्या सिग्नलवर
  स्थलांतरीत होत असतो.

ह्यातही लोक सरळ गाडी चालवतील तर एकवेळ समजू शकतो. पण आधीच गर्दी असेल तिथे वाकडी तिकडी गाडी चालवून गोंधळ वाढवत असतात. एका गाडीच्या मागे जायचे सोडून दोन गाड्यांच्या मधून गाडी चालवणार म्हणजे त्या दोघांमध्ये जागा मिळाली की लगेच त्यात गाडी घुसवता येईल ह्या विचाराने. त्यामुळे होते काय की एक गाडी पुढे त्याच्या मागे उजव्या बाजूला, गाडीचा डावा भाग थोडासा रांगेतून आत ठेवत काहीसे असे
--_     --
    --     --
       --
म्हणजे होते काय की मध्ये भरपूर रिकामी जागा असते पण फक्त स्वतःला पुढे जायला कधी मिळेल ह्या चढाओढीत रस्ता अडवून ठेवला आहे हे बहुतेक वेळा पाहिलेच जात नाही. (लोकलमध्ये कसे असते पहा दरवाज्यावर सर्व लोक लटकून असतात आणि सांगतात आत जागा नाही. प्रत्यक्षात आता भरपूर जागा असते) आणि हे फक्त कारचालक करतात असे नाही तर दुचाकी, रिक्षा, बस, ट्र्क सर्व चालक. मग आता जी वर मोकळी जागा आहे त्यातून मी दुचाकीवरून आरामात पुढे निघून जातो. पण त्या तिथे पोहोचण्याकरीता चक्रव्यूह पार करावे लागते. बरं त्यात पोहोचलो तरी आराम नाहीच. पुन्हा इकडून तिकडून कोण मध्ये यायचा प्रयत्न करेल सांगता येत नाही. अजून एक. साधारणपणे दुचाकीस्वार डाव्या बाजून पुढे जायच्या प्रयत्नात असतात. मग तिथे त्यांच्यात चढाओढ असते. मग मध्येच गाडी डावीकडे टाक, लगेच उजवीकडे असेही काही. आणि आता हद्द म्हणजे ह्यांनी रस्त्याच्या बाजूचे चालण्याकरीता बनविलेले पदपथ (फूटपाथ हो) सोडले नाही. बहुतेक दुचाकीस्वार त्या पदपथावरून पुढे जात असतात. मी आपला शिस्तीत रस्त्यावरुन जात असतो. लागले १० मिनिटे जास्त लागू दे.

तरी आधी रात्री थोडे उशिरा निघून कमी गर्दीत घरी जाता येईल असे वाटत असे. आता तर तिथेही अडचण. ९च्या नंतर निघालो तर ट्रकलाही परवानगी दिलेली असते. मग तेही लोक जमेल तशी गाडी हाकत असतात. आणि तुम्ही हळू जात असाल तर डाव्या बाजून जावे असे नाही, भले मी हळू जात असेन, समोरच्या ट्रकपेक्षा किंचित जास्त वेग घेऊन मला त्याच्या पुढे जायचे आहे. पण ह्या त्यांच्या प्रयत्नात मागे किती गाड्या अडकून पडल्या आहेत ते पाहत नाही. २ महिन्यांपूर्वी असेच गुजरातमध्ये जायचे होते म्हणून सकाळी ५:३० ला निघालो. पण त्या महामार्गावर एवढे ट्रक असे रस्ता अडवून जात होते की सकाळी लवकर निघून लवकर पोहोचण्याचा विचार विरुन गेला.

हं तर सुरूवात केली होती रुग्णवाहिकेवरून. रुग्णवाहिका जात असेल तर साधारणपणे आपण त्या गाडीला रस्ता द्यायचा असतो हे बहुधा कोणी लक्षात घेतच नाही. अमेरिकेत एक अनुभव आला (कोण रे ते म्हणाले, अमेरिकेत काय आता कोणीही जायला लागलेत :P ) सिग्नलवर पांढरा बारीक दिवा लावला असतो. तो तार्‍यांप्रमाणे लुकलुक करत असतो. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, किंवा पोलिसांची गाडी जाणार असेल तर तो दिवा सुरू करतात. तेव्हा, किंवा मध्येच सायरन ऐकू येईल तेव्हा सर्व बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबते. लोक आपली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला थांबवून ठेवतात. म्हणजे डावीकडून त्या गाड्यांना मार्ग मिळेल. तिकडे आणि इथे नेमकी तुलना करणे नाही. तसे काही करायचेही बहुधा इथे आता नेमके शक्य नाही. पण निदान त्या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना थोडी तरी जागा मिळावी ही अपेक्षा. काही लोक तर रूग्णवाहिकेला मार्ग मिळाला तर त्यामागे रिकामी जागा असते म्हणून त्या गाडीच्या मागे आपली गाडी नेत असतात. हा प्रकार काही कळला नाही. 


सध्या तरी एवढेच. काही वेळा वाटते आधी इथे वाहन चालवायची थोडी शिस्त होती. ती बिघडत चालली आहे. तसेच मी ही नीट चालवतो असे मला वाटते. पण 'जावे त्याच्या देशा' किंवा 'When in Rome... 'ह्या प्रमाणे किंवा गर्दीश सिनेमातील मुकेश ऋषी च्या "तुम्हे जिंदा रहना है, तो मुझे मारना पडेगा" वाक्याप्रमाणे हा प्रकार असाच वाढत जाणार असेच वाटते. 


(अजून एक बाब आहे, सर्वांच्याच परिचयाची. पण ती पुढील वेळी)

फेब्रुवारी ०६, २०११

दिलेल्या पत्त्यावर नीट पोहोचणे म्हणजे एक कसरतच आहे. तरी अजूनही मोठ्या शहरांतच जाणे झाले आहे. मी इथे आधी सांगितल्याप्रमाणे मला पत्ता लवकर मिळत नसेल :) पण महामार्गावर कुठे वळून कुठे जाता येते याबाबत तरी नीट फलक लावावेत की जाणार्‍याला रस्ता नीट कळेल.



आज पनवेलच्या पुढे गेलो होतो कर्नाळ्याला. पण पनवेल वरून गोवा महामार्गावर जाण्याकरीता मुख्य रस्त्यावर डोक्यावर फलक लावून ठेवला आहे, पणजीम् ->. तिकडे वळून सरळ गेलो. पुढे गेल्यावर पाहिले तर मुंबईकडे जाणारा रस्ता. मध्ये पेट्रोलपंपावर विचारून परत त्याच रस्त्यावर आलो. पुन्हा उजवीकडे वळून थोडे पुढे गेलो तर डाव्या बाजूला जो रस्ता जातो त्या कोपर्‍यात डाव्या बाजूला फलकामध्ये लिहून ठेवले आहे, <- पणजीम् (की गोवा?). अरे, गोवा हे किती मोठे/प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिकडे जाण्याचा फलक असा लहानसा आणि कोपर्‍यात? (आधी गेलो होतो त्या रस्त्यावर मुंबई/उरण वगैरे मोठ्या अक्षरात डोक्यावर लिहून ठेवले आहे)


३/४ वर्षांपुर्वी एका हिंदी वृत्तवाहिनीवर दाखवले होते की काही शहरांमध्ये हे असे फलक कसे चुकीने लावले आहेत. उदा. एका ठिकाणी जाण्याचे अंतर जर ५० किमी असेल तर पुढे काही अंतरावर तेच अंतर वाढवून ७० किमी वगैरे दाखवले होते.

तरी बरे, भरपूर ठिकाणी असे चुकलो तर पुढे जाऊन यु टर्न घेऊन परत तरी येता येईल पण काही ठिकाणी ती ही सोय नाही आहे.

फेब्रुवारी ०४, २०११

वाहने वाढलीत, गर्दी वाढली, रस्ते भरून गेले. पुढे जायची सर्वांनाच घाई.
पण म्हणून स्वत: वाहन चालवताना रूग्णवाहिकेला तरी रस्ता द्यावा असेही वाटू नये लोकांना?

(आता सविस्तर लिहिणार होतो. पण उद्या लिहितो)

जानेवारी २३, २०१०

blog.aarp.org/shaarpsession/traffic.jpg
http://www.newsandreviews.in/media/blogs/Home/mumbai%20traffic.jpg

शुक्रवारी दुपारी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बोलत होतो. पहिले प्रकाशचित्र दाखवून मी म्हणालो,"मला ह्या लोकांचा हेवा वाटतो. एवढी गर्दीची वाहतूक असूनही हे लोक किती नियमबद्ध पद्धतीने गाड्या उभ्या करतात. नाहीतर, आपल्याकडे कशीही गाडी दामटली जाते." नंतर मग नेहमीचीच चर्चा. हे असे वागतात, ते तसे वागतात.

संध्याकाळी आईचा फोन आला की माझा मावसभाऊ घरी आला आहे. मी म्हटले, "ठीक आहे मी सहा वाजता निघेन. ७:१५ पर्यंत पोहोचतो". पण कसले काय. दुपारी जी चर्चा केली तीचेच रूप समोर दिसत होते. नेहमी ज्या प्रवासाला २० मिनिटे लागतील त्याला ६०-६५ मिनिटे लागली. कारणही तेच, वाहतुकीची गर्दी. नेमके कारण कळले नाही. बहुधा मध्य रेल्वे वरील मोटरमननी केलेल्या संपामुळे वाहतुकीवर ताण वाढला असेल. पण त्या गर्दीत लोक कसेही(काही लोक कसेतरी) गाड्या चालवत होते. इकडून ही गाडी घुसव. तिकडून ती गाडी मध्येच आली. मग आमच्या वाहनचालकाचे नेहमीप्रमाणे दुसऱ्यांवर ओरडणे. घरी पोहोचायला ८ वाजले. तरी बरे, आठच वाजले. आमची गाडी पूर्व दृतगती मार्गावर गाडी येण्यास जेवढा वेळ लागला, त्यावरून तर वाटले होते की ९ वाजतील. काय पण योग(की योगायोग) असतात ना?

पण खरोखरच, नेहमीच्या ह्या वाहतुकीच्या त्रासामुळे वैताग येतो. अर्थात गाड्यांची संख्या भरमसाट वाढली हे खरे आहे. जागेची कमी आहे हे ही मान्य. पण तरीही काहीतरी शिस्त पाळायची? तीन गाड्यांच्या लेन आहेत पण त्यात चार-पाच गाड्या चालतात. दहा पंधरा वर्षांपूर्वी चंद्रपूर-नागपूर मधील आमचे नातेवाईक म्हणायचे की, मुंबईचा वाहनचालक नागपुरात गाडी नाही चालवू शकत. कारण तिकडे कशाही गाड्या चालवतात आणि तिकडचा चालक मुंबईत गाडी नाही चालवू शकत, कारण इकडे शिस्तीत गाडी चालवतात ज्याची त्याला सवय नाही. पण गेल्या ३-४ वर्षांपासून वाटते की इकडची शिस्तही गेली आहे. मी असे म्हणत नाही की सर्वच बेशिस्त आहेत. पण काही लोकांमुळे सर्वच वाट लागते.

आता काही गोष्टी बघा ना.

गेल्या आठवड्यात, कार्यालयातून निघालो. बसमध्ये गर्दी खूप. म्हणून रिक्षाने येत होतो. (मी सार्वजनिक वाहतूक वापरली नाही मान्य. पण त्यावर वाद नंतर घालू ;) ) सीप्झ पासून पुढे एल एंड टी च्या पुलापर्यंत यायला दहा मिनिटे लागायची तिकडे ३० मिनिटे लागली. गाड्या रेंगाळत पुढे चालल्या होत्या. पुढे पोहोचलो तर बघितले, एक ट्रक चालक ट्रक उभा करून कोणाची तरी वाट पाहत होता. त्यामुळे त्याच्या बाजून एकाच गाडी पुढे जाऊ शकत होती. अरे त्याला गाडी उभी करायला दुसरी जागा नव्हती का?
माझा रिक्षाचालक म्हणाला, "दोन दिवसांपूर्वीही तिकडेच कुठेतरी एक रिक्षाचालक लघुशंकेसाठी म्हणून थांबला तर त्याने रिक्षा डाव्या बाजूला नाही, उजव्या बाजूला उभी केली होती." :|

२००७ मध्ये वाशी वरून ठाण्याला येत असताना ऐरोलीजवळ वाहतुकीची कोंडी झाली होती. गाड्या एकदम हळू हळू जात होत्या. आम्ही कसे तरी तेथे पोहोचलो तर दिसले की, एक मोठा ट्रक वळण घेत होता पण नीट जमले नसल्याने तो हळू हळू प्रयत्न करत होता पण त्याच्या बाजूने इतर वाहने पुढे जायच्या प्रयत्नात कोंडी वाढवत होते. आम्ही ट्रकच्या पुढे गेलो तर पाहिले दोन वाहतूक पोलीस कोणातरी दुचाकीस्वारासोबत बोलत उभे होते. म्हटले वा, इकडे त्यांच्या मागे वाहतूक नीट चालत नाही आणि हे लोक गप्पा मारण्यात गुंग आहेत.

बरं
, ठीक आहे. वाहनात काही बिघाड झाला म्हणून गाडी बाजूला घेण्यात वेळ गेला किंवा नाही जमले तर हा घोळ होऊ शकतो. पण काही जण तर अशा गर्वात असतात की आपल्याकडे गाडी आहे म्हणजे माझ्या समोरचा रस्ता मोकळा पाहिजे. नाही तर जमेल तशी गाडी दोन तीन लेन मधून घुसवायचा प्रयत्न करणार. त्यात गाड्यांचा प्रेमालाप झाला तर आपणहून मग दुसऱ्या गाडीच्या वाहनचालकाशी गळाभेट करणार. ह्यात मागे वाहतुकीची वाट लागली आहे हे त्यांच्या गावी नसते. हम्म.. असेही ऐकले की काही टक्कर वगैरे झाली तर विम्याकरीता त्यांचे प्रतिनिधी येईपर्यंत त्या गाड्या तशाच ठेवाव्यात. तेव्हा वाहतुकीचे काय होईल असा विचार येतो.

काही लोक भ्रमणध्वनीवर गप्पा मारत गाडी चालवतात. त्यामुळे त्यांची गाडी मधल्या रस्त्यामध्ये हळू जातेय की नीट जात नाही ह्याकडे त्यांचे लक्ष नाही. पुन्हा त्यांना काही म्हटले की आपल्यालाच खत्रूड नजरेने पाहणार. वाहतूक खात्याने नियम बनवलेत की गाडी चालवताना भ्रमणध्वनी वापरायचा नाही. पण तेच ह्याकडे लक्ष देत नाहीत. पुण्यात माझ्या समोरील गाडीत एका माणूस भ्रमणध्वनीवर बोलता बोलता गाडी हळू नेत होता. नेऊ दे म्हणा हळू पण लोकांना त्रास का? कडे कडेने जा की. आणि ते ही सिग्नलच्या जवळच. तिकडे उभ्या असलेल्या दोन पोलिसांसमोरून तो निघून गेला. मग मी त्या पोलिसांना विचारले की, 'त्याला अडवले की नाही?' ते म्हणाले,'आमचे लक्ष नव्हते. तू त्याचा गाडीचा नंबर दे आम्हाला'. मी म्हटले, 'ठीक आहे. तुम्ही लक्ष नकाच देऊ. आता पुढे दिसला तर पाठवतो मी त्याला मागे.'

भरपूर ठिकाणी गाड्या उभ्या करण्यास बंदी असते. तरी काही लोक गाड्या उभ्या करून जातात. दुचाकी असली तर ती उचलून नेली जाते. पण चारचाकी असली तर त्याला भला मोठा 'जॅमर' लावला जातो. त्यांच्याकडे चारचाकी गाड्या ठेवायला जागा नसते हे मान्य. पण तिकडेच त्यांना जॅम करून वाहतूकीची कोंडी वाढली जाते असे मला वाटते. आणि रस्त्याच्या बाजूला हे लोक जेव्हा पार्किंग लाईट लावून एखाद्याची वाट पाहत उभे असतात, तेव्हाही त्यांना काहीच केले जात नाही.

अजूनही भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे ह्या वाहतुकीचा वैताग येतो. पण काय करणार, ह्यातून जावेच लागणार. पुण्याला असताना एक विचार मनात आला होता. थंड पाण्याने आंघोळ करायचे म्हटले तर आपली जी स्थिती असते, तीच नाही पण, तशीच ही स्थिती आहे. सुरुवातीचे एक दोन लोटे पाणी थंड वाटते, नकोसे वाटते. पण नंतर मग पूर्ण बादली आपण संपवितो. त्याप्रमाणेच ह्या वाहतुकीत शिरायचे म्हणजे वैताग वाटतो, पण एकदा त्यात घुसले की मग आपली गाडी अंतिम स्थानापर्यंत पोहोचवतो.

ता. क. : दोन्ही चित्रे आंतरजालावरून साभार. पहिले चित्र तेच ज्यावरून चर्चा सुरु झाली. दुसरे चित्र शोधताना कळले, माझ्यासारखेच बहुतेक लोकांनी लिहून ठेवले आहे. :)

[जमल्यास अशाच आणखी वैतागांबद्दल नंतरही लिहेन.]

एप्रिल २०, २००९

मागील वर्षी ऑगस्टमध्ये आमचे शेगावला जायचे ठरले होते. पण भरपूर पाऊस असल्याने जायचे टाळले होते. नंतर मला कामातून वेळ मिळत नसल्याने ह्याबाबत जास्त विचार करता आला नाही. आता १० एप्रिलला गुडफ्रायडे, शनिवार व रविवार असे ३ दिवस सुट्टी मिळत होती. त्यामुळे मग ह्यावेळी जायचे ठरविले. एक दोघांच्या सांगण्यावरून रेल्वेने जाणे सोयिस्कर पडेल असा सल्ला मिळाला. एखादी कार भाड्याने घेउन जावे असे माझे मत होते. एकच आठवडा असल्याने रेल्वेचे तिकिट मिळण्याची शक्यता नव्हतीच. तरीही रेल्वेच्या संकेतस्थळावर पाहिले तर सर्व वर्गाची तिकिटे वेटिंग लिस्ट मध्ये. तसेच प्रवास हा थेट शेगाव व येता येता शिर्डीवरून येणे असा विचार होता. त्यामुळे मग कारनेच जाणे पक्के केले. पण निघायच्या २ दिवस आधी. तोपर्यंतही काही नक्की होत नव्हते म्हणून मग जास्त कोणाशी विचारणाही करता आली नाही. उन्हाळ्यात जात असल्याने उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही गुरूवारी रात्री निघण्याचे ठरविले. कार ज्यांच्याकडून घ्यायची त्यांना रात्रीचा प्रवास करायचा आहे ह्याची कल्पना देऊन ठेवली.

गुरूवारपर्यंत गूगल मॅप वर जायचा रस्ता पाहून ठेवला होता. गूगल मॅपची सुविधा बरी वाटली, की किती अंतरानंतर कुठे वळायचे व पुढे कसे जायचे हे वाक्यांमध्ये लिहून तसेच नकाशातही दर्शविते. (अमेरिका, इंग्लंड मध्ये राहणार्‍यांना ह्याची सवय झाली असेल, पण इथे अजून ते तितकेसे वापरले जात नाही असे वाटते. असो) ऑफिसमधून त्याचे एक प्रिंटही काढून ठेवले.(ते घ्यायला विसरलो निघताना :( ) पाहता पाहताच लक्षात आले की मोबाईलमधूनही मी गूगल मॅप वापरू शकतो. अशा गोष्टी मी सोडत नाही. लगेच ते माझ्या मोबाईलमध्ये कार्यान्वित करून घेतले. GPRS ची सुविधा आधीपासून आहेच. २ दिवस आधीच मोबाईल कंपनीला संपर्क करून रोमिंग चालू आहे व जात आहे तिकडे चालू असेल ह्या गोष्टींची खात्री करून घेतली होती, त्यात GPRS ची विचारणा होतीच.



रात्री १०:३० वाजता आम्ही प्रवासाला सुरूवात केली. ड्रायव्हरने पहिली गुगली टाकली, "शिर्डी जायचे आहे ना?" म्हटले नाही, "शेगाव". पण त्याला एवढा अंदाज होता की आम्हाला रविवार रात्रीपर्यंत परत यायचे आहे. त्यामुळे ३ दिवस आम्ही शिर्डीला काय करणार असा प्रश्न त्याला पडला होता का हा प्रश्न मी मनात येऊन सोडून दिला. त्याला सांगितले की 'शेगावला जायचे आहे'. सोबत हे ही सांगितले की '५५० किमी आहे'. उगाच त्याने नंतर अडचण नको सांगायला. पण तो काही म्हणाला नाही. आई म्हणाली, 'आधी शिर्डीला जाऊ'. मी म्हटले, 'आधी निघूया. नाशिकला पोहोचेपर्यंत आपल्याकडे ३ तास आहेत, त्या वेळेत विचार करू.' थोडक्यात, आम्ही नाशिकला प्रयाण केले.
नाशिकचा महामार्ग नेहमीपेक्षा मला कमी गर्दीचा वाटला. थोडे बरे वाटले. वाटले, पुणे महामार्गाप्रमाणे हा ही सुधारला आहे. अर्धा तासातच आम्ही पहिल्याच मतावर कायम राहिलो. आधी शेगावला जायच्या.

वास्तविक रेल्वेने जाताना मार्ग असतो, "ठाणे-नाशिक-मनमाड-चाळीसगाव-पाचोरा-जळगाव-भुसावळ-अकोला" (मधली स्थानके जाऊ द्यात ;) ) पण मला गूगलने रस्ता सांगितला तो "ठाणे-नाशिक-मालेगाव-धुळे-जळगाव-भुसावळ-अकोला". वाटले, आपण उगाच फिरून तर जाणार नाही ना? नंतर विचार केला, नाशिकमध्ये विचारता येईल. (रात्री २-३ वाजता किती लोक असू शकतात रस्ता सांगायला, ही शंका तेव्हा नव्हती आली पण आता आली). नाशिकला द्वारका पार केल्यानंतर एका चौकात खरोखरच २/३ रिक्षाचालक व इतर माणसे उभी होती. त्यांच्याकडून खात्री करून घेतली की मालेगाव-धुळ्याचाच रस्ता बरोबर आहे. पुढे एका हॉटेल मध्ये चहा घेताना ड्रायव्हर म्हणाला की आपण ८/८:३० पर्यंत पोहोचून जाऊ. पण आता मला साडे दहा तासांची खात्री नव्हती. म्हटले १० तरी वाजतील. नाशिकहून पुढे निघालो मालेगावच्या रस्त्यावर. रस्ता आतापर्यंत चांगला होता, पण मालेगाव येईपर्यंत तेवढा चांगला राहिला नाही. खड्डे खड्डे नाही, पण एकाच वेगात गाडी न नेण्यासारखा. मालेगावला केव्हा पोहोचलो आठवत नाही. ४-४:३० झाले असतील. नंतर पुढे धुळे यायच्या आधी पुन्हा मोबाईल बाहेर काढला व नेमके कुठे वळायचे आहे ते पाहून घेतले. ड्रायव्हरला म्हटले, 'ऍग्रीकल्चर कॉलेजच्या पुढे उजवीकडे वळायचे आहे.' तोपर्यंत ६ वाजत आले होते. चहा प्यायचेही ठरविले. तसा मनात विचार आला, 'आता NH3 आणि NH6 असे दोन महामार्ग भेटत आहेत तो चौक मोठा असेलच व त्याच्या आसपास धाब्यावर चहा घेता येईल. ड्रायव्हरला ही आराम करता येईल थोडा वेळ.' पण पाह्तो तो काय, जंक्शन चांगले होते, जळगावला वळायचे लगेच कळले. पण चहाकरीता एकच टपरी होती. ती लक्षात येईपर्यंत पुढे निघून गेलो. म्हटले, पुढे कुठेतरी घेऊ चहा.



साधारण अर्ध्या तासानंतर ड्रायव्हर स्वतःहूनच म्हणाला आता झोप येतेय. त्याला म्हटले, थांबव गाडी जिथे जमेल तिथे. वाटल्यास मी चालवतो. तो म्हणाला, 'तुम्ही बोलत रहा. बोलता बोलता झोप येणार नाही'. पण मला रिस्क वाटत होती. गाडीच्या टेपच्या स्पीकरची वायर निघाली होती. तो म्हणाला, 'गाणी लावूया.' त्याकरीता एका ठिकाणी गाडी थांबविली. मी पाहिले तर एका पडिक वाटणार्‍या जागेत बहुधा हॉटेलचा बोर्ड आहे. अर्थात हॉटेल नव्हते. पण तिकडे असलेल्या माणसांना विचारले तर ते म्हणाले, 'चहा मिळेल येथे.' चला, चहाची तर सोय झाली. जसा असेल तसा. तिकडेच थोडेफार पाय मोकळे केले, चहा घेतला, बैलांचे (आणि बैलांसोबत) फोटो काढले.
.
  

मला वाटले की शेगाव असेल ९०-१०० किमी. पण माझी नकाशातून अंतर मोजण्यात चूक झाली होती. नकाशावरून तर दिसत होते की फार लांब आहे पण लिखाणातील अंतराची बेरीज होती १०० किमी. पुढे एका फलकावर पाहिले, भुसावळच १०० किमी च्या वर आहे. तेव्हा लक्षात आले, शेगाव अजून २०० किमीच्या वर आहे. ४/५ तासांची निश्चिंती. :(
भुसावळ येईपर्यंत एकही हॉटेल नाही जिथे नाश्ता करता येईल. भुसावळमध्ये ही पुढे पुढे करत बाहेरच आलो. १० वाजेपर्यंत कुठेच काही नाही. मला मधे आलेली शंका बरोबर होती ते एका तेव्हाच उघडत असलेल्या हॉटेलमध्ये कळले. त्या भागात हॉटेल ११/११:३० च्या नंतरच उघडतात, तेही थेट जेवणाकरीता. मग एका ठि़काणी कचोरी, भजे व चहा घेउन नाश्ता केल्यासारखे खाल्ले.

रात्रीचे जागरण आणि आता जाणवणारे ऊन ह्यामुळे मी खामगावला पोहोचेपर्यंत थोडी झोप काढली. गूगलने सांगितल्याप्रमाणे खामगाव मध्ये तीव्र डावे वळण घ्यायचे होते. त्यानुसार मग मी एखादा चौक पाहत होतो.पण प्रत्यक्षात लोकांनी सांगितले त्याप्रमाणे खामगाव बस स्टँडपासून सरळ जायचे होते. तिथे जाऊन पाहिले तर शेगावकरीता हलकेसे डावे वळण होते व तीव्र उजवीकडचा रस्ता अकोल्याकडे जात होता. असो, पूर्ण तर चुकले नाही ना.



आता शेगाव संस्थानाचे फलक दिसू लागले होते. "सर्वात प्रथम भक्त निवास क्र. ५ मध्ये जागेची चौकशी करणे" हे फलक सर्वात जास्त दिसले. वाटले, थांबण्याची सोय झाली. असे करत अंदाजे दुपारी १२ वाजता आम्ही शेगावला पोहोचलो.

(क्रमशः)

जानेवारी ०६, २००९

आज संध्याकाळी स्कूटरवरून घरी येत होतो. समोर एक बाई लहान मुलाला हात धरून घेऊन चालली होती. लहानसा रस्ता असल्याने आधीच रहदारीत एकदम हळू जावे लागते. त्यात लहान मुलगा समोर असल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी हळू नेत होतो. नेमका माझ्या स्कूटरच्या डाव्या बाजूला आल्यानंतर त्याने अशी हालचाल केली की मला त्या कमी वेगातही कचकन ब्रेक दाबावा लागला. अर्थात दोघांनीही एकमेकांना काही न बोलता आमची वाटचाल सुरू झाली. पण कित्येक दिवस मनात असलेला प्रश्न पुन्हा उफाळून आला.

रस्त्यावरून चालताना लोक लहान मुलांना हात पकडून रस्त्याच्या बाजूने ठेवून आपण आत राहत का चालतात?

फूटपाथ सोडून रस्त्यावरून लोक जात असतात हे काहीवेळा ग्राह्य आहे. पदपथावर लोक दुकाने मांडून ठेवतात, किंवा गर्दीही असते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर लोक येतात तेव्हा वाहन चालक व पादचारी ह्यांच्यात थोडीशी खुन्नस असतेच. तरीही त्यात थोडी समंजसताही असते हो. लोक स्वत: रस्त्यावरील वाहनांपासून सांभाळत चालत असतात (काही नसतात तो भाग वेगळा). पण लहान मुले रस्त्याच्या बाजूला असताना ते स्वत:ला किती सांभाळणार हो? ते तर स्वत:च्याच मस्तीत असतात. त्यात मग धक्का लागला तर मुलगा कसा प्रतिसाद देईल तेही माहित नाही. पण त्याचे पालक लगेच वाहनचालकावर डाफरणार.

गेल्या वर्षी कार्यालयातील एका सहकार्‍याशी ह्याच बाबतीत बोलणे चालू होते. तो म्हणाला की बहुधा लहान मुलांना आपला चळवळ्या हात धरून ठेवलेला आवडत नाही. तसे केले तर ते उगाच आणखी चळवळ करतात. म्हणून डावा हात पकडून ठेवतात. उजवा हात मोकळा असतो.
अरे हो, ह्यात डावा/उजवा हाही प्रकार येतो का? माझ्या नेमके लक्षात नाही पण बहुतेक वेळा मुलगा उजव्या बाजूला असतो व त्याला नेणारा त्याचा डावा हात पकडून असतो (आणि जाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने) , असेही आहे का?

लहान मुलांना रस्त्यावरून चालत नेणे हा प्रकार मी स्वत: जास्त अनुभवला नाही आहे. त्यामुळे ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही.
आणि बहुधा त्यामुळेच लहान मुलांची आकलनशक्ती ह्यात मी हे टाकू शकलो नाही. ;)

तुमचा ह्या बाबतीत काय अनुभव आहे किंवा काय मत आहे?

ऑक्टोबर ०४, २००८

ही माझी स्कूटर. वेस्पा १५०.



जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो.

वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी मस्त वापर केला गाडीचा. पण त्यांच्या निधनानंतर बंदच पडून होती. नंतर एक वर्षांनी आम्ही ती चालण्याइतपत नीट करून घेतली.

१९९५ मध्ये मी ह्या स्कूटरवर पहिल्यांदा चालवण्याकरीता बसलो. त्यावेळी अंधेरीत राहताना तेथील मित्रांनी दुचाकी शिकण्यास मदत केली ती ह्याच स्कूटरवर. त्याआधी एका मित्राने त्याच्या कायनेटीक होंडा वर एक प्रात्यक्षिक दिले होते. पण ते जुजबी. फक्त एक दोन वेळा. बाकी सर्व ह्याच स्कूटरवर. तेव्हाच अभियांत्रिकीत प्रवेश घेतल्याने मग घरापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे नीट सराव नाही झाला. पण जेव्हा कधी घरी येईल तेव्हा स्कूटर बाहेर काढून शिकणे चालूच होते. १९९६ मध्ये आम्ही रहायला आलो ठाण्याला. पण तेव्हा ही सोबत आणली नव्हती. शेजारीच राहणार्‍या एका मित्राला आईने ह्या स्कूटरला रंगरंगोटी करावयास त्याच्या ओळखीच्या मेकॅनिककडे द्यायला सांगितले होते. त्यानंतर ती त्याच्याच कडे होती. शेवटी १९९७ मध्ये त्याच्याकडून आणली मस्त रंगवून डागडुजी केलेली गाडी. तोपर्यंत मी ही चालविणे शिकलो होतोच. मग शिकाऊ परवाना घेऊन तयारी चालू केली. परंतु पक्का परवाना काढायला जायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे पहिला परवाना तर तसाच वाया गेला. मग दुसरा शिकाऊ परवाना काढला तेव्हा कार चालविणेही शिकत होतोच. मग दोन्ही पक्के परवाने एकत्रच घेतले. मग तर काय काहीही काम असले की स्कूटरवरूनच बाहेर जाणे होत होते. मित्राकडे, बाजारात, नुसते फिरणे :D

कॉलेजला होतो तेव्हा विचार केला होता की शेवटच्या वर्षी स्कूटर घेउन जाईन तिकडे. घरून परवानगीही घ्यायची होती. पण स्कूटरच्या कागदांचा गोंधळ होता. आणि ही गाडी नागपूरवरून इतर ठिकाणी नेल्यानंतर त्याची नोंदणीच नव्हती केली. मग १९९९ मध्ये माझ्या आतेभावाकडून नागपूरवरून त्या कागदपत्राची पूर्तता करून गाडी माझ्या नावावर करून घेतली व ती कागदे इकडे आल्यावर ठाण्यातील RTO मध्ये काय ती फी भरून सर्व गोंधळ संपविला. नंतर ह्या स्कूटरची अद्ययावत नोंदणी वही परत घेताना मी विचारले, ’आणखी काही करायचे आहे का?’ तेव्हा मला उत्तर मिळाले, ’आता इकडे यायची गरज नाही.’ मी ऐकले होते की काही तरी One Time Tax असतो गाड्यांचा. नोंदणी वहीत पाहिले तर तो ही भरला होता. त्यामुळे मग जास्त काही विचार नाही केला आणि बिनधास्त स्कूटरवर हुंदडणे चालू झाले. एवढे करूनही कॉलेजकडे गाडी नेणे जमले नाही. :(

तेव्हा तरी ठाण्यातच गाडी चालविणे होत होते. मग हळू हळू ठाण्याच्या परिघाच्या बाहेरही नेणे चालू झाले. इकडे मुलुंड, मग पवईच्या आयआयटी कॉलेजपर्यंत, तिकडे बेलापूरपर्यंत. नंतर कार्यालयात जायला लागल्यापासून दररोज सकाळी स्टेशन पर्यंत स्कूटरवर जाणे. तिकडे गाडी लावून मग लोकलने दादरला ऑफिस. संध्याकाळी परत आल्यानंतर बस-रिक्षाची कटकट नव्हती. मग एक दोन वेळा दादरपर्यंतही ही स्कूटर नेली.
तुम्ही म्हणाल, आता स्कूटरच आहे ती. एवढ्या ठिकाणांपर्यंत नेली तर एवढे काय? अहो, ह्यात मुद्दा आहे की ह्या गाडीकडे पाहून लोकांचा पहिला प्रश्न असतो, 'केव्हाची ही गाडी?' माझे उत्तर असते, '१९७१'. माझ्यापेक्षाही वयाने भरपूर मोठी आहे ही स्कूटर. त्यामुळेच कधीही कुठे ती न्यायची म्हटले तर भरपूर लोकांना प्रश्न पडतो की ही गाडी जाईल का? बाकी गाडीमध्ये काही अडचण नाही हो. (काय ते 'टचवूड' म्हणतात ते ही करतो आता ;) ) मध्ये २/३ वेळा रस्त्यातच बंद पडली होती तेव्हा तिकडे जवळच असलेल्या मेकॅनिककडे ठेवून मग घरी आलो होतो. पण अर्थात त्यात चुकी माझीच होती. नीट काळजी नाही घेतली तर असे त्रास होणारच. माझे वडील तर दर रविवारी स्कूटर उघडून साफ करायचे. पण मला काही ते जमत नाही. तरीही मेकॅनिकला सांगून दर ३/४ महिन्यांनी डागडुजी करून घेतो. बाकी वडील वापरायचे त्यापेक्षा मी गाडीची वाटच लावली आहे.:(



तर ह्याच सर्व परिस्थितीत म्हणजे लोक गाडीच्या चालण्यावरून शंका घेत असताना, मी गेल्या वर्षी ही स्कूटर पुण्याला नेण्याचे ठरविले. कागदपत्रांची पूर्तता बरोबर आहे की नाही हे कोणाला नीट माहित असेल असा प्रश्न आल्याने मग मी थेट रस्त्यावर चौकात उभे असलेल्या वाहतूक पोलिसांनाच त्याबद्दल विचारले. ते म्हणाले, RC बुक, PUC व विमा एवढेच पाहिजे, आणि काय तो कर भरलेला असला पाहिजे. महाराष्ट्रातच गाडी असल्याने ’ना हरकत प्रमाणपत्रा’ची भानगड नाही. मित्रांसोबत ह्याबाबत बोललो की मी नेतोय गाडी पुण्याला, ते ही स्वत: चालवत. तेव्हा एक मित्र बोललाही की 'स्वत: नको नेऊस म्हणून. घाटात पहिल्या गेअर मध्ये ही त्रास होऊ शकतो.' पण मी जिद्दीला पेटलो तेव्हा त्यानेच रस्त्याची नीट माहिती दिली व सांगितले की मध्ये गाडी घाटात चढली नाही तर काही Towing वाले असतात त्यांना सांगायचे, ते गाडी उचलून आणून देतील. त्याच्या दुसर्‍या दिवशी मी सकाळी ७ ते ११ असा ४ तास प्रवास करत माझी ही स्कूटर पुण्य़ापर्यंत पोहोचविली. घाटात पहिल्याच काय दुसर्‍या गेअर मध्येही नीट चालली. तेव्हा मग लक्षात आले, ह्या गाडी अजूनही पुढे मला साथ देईल. मग एक वर्ष पुण्याचीही रपेट ह्या स्कूटरवरून केली. तिथेही मित्रांचे म्हणणे होतेच, 'किती जुनी ही गाडी' :)

आता गेले २/३ महिने आणखी एक प्रश्न समोर आला, १५ वर्षांवरील गाडीची नोंदणी दर ५ वर्षानी पुन्हा करावी लागते. ह्याबाबत मला माहित नव्हते. २ आठवड्यांपुर्वी गाडीचे सर्व कागदपत्रे पुन्हा नीट जमा केली व क्षेत्रिय वाहतूक कार्यालयात जाऊन त्यांच्यासमोर कागदपत्रे ठेवली व विचारले की साहेब, ह्यात काय काय करावे लागेल. तेव्हा त्यांनी सांगितले की 'काही नाही. गाडी अधिकार्‍याकडून तपासून घ्या व १६० रू भरून पुनर्नोंदणी करून घ्या'. दुपारी त्यांनी सांगितलेल्या दुसर्‍या कार्यालयात गेलो. तेव्हा कळले की २ वाजता अर्ज व फी भरणे बंद होते. मला शनिवार शिवाय बाकी दिवस वेळ नसल्याने पुन्हा २ आठवडे थांबणे आले. दरम्यान कळले की गाडीची स्थितीही चांगली पाहिजे. त्यामुळे मग काल मेकॅनिककडे घेउन गेलो. त्याला सांगितले की 'असे असे आहे, बघ काही करायचे बाकी आहे का?' त्याकडून दिव्यांची डागडुजी करून घेतली. तो म्हणाला की 'बहुधा १६० रूपयांमध्ये होणार नाही. ७००/७५० रू जातील'. मी म्हटले, 'जेवढे आहेत तेवढे, बघुया.' :) सकाळी अर्जात वाचले की Chassis क्रमांक ही ते तपासतात. आता वाहन नोंदणी वहीत त्याची नोंद होती त्यामुळे अर्जात लिहायला त्रास नाही झाला. पण अधिकारी ते तपासणार म्हणजे? त्या मेकॅनिककडे गेलो. तो नव्हता. त्याच्याच दुकानातील दुसर्‍या व्यक्तीने सांगितले की एवढ्या जुन्या गाडीचा पत्रा सडल्याने तो क्रमांक आतापर्यत निघूनही गेला असेल. म्हटले आता आली का पंचाईत? शेवटी काय निकाल लागायचा तो लागू दे म्हणून गाडी घेउन गेलो. तिकडे अधिकार्‍यांकडे सांगायला गेलो की ,'साहेब, गाडीच्या नोंदणीचे नूतनीकरण करायचे आहे'. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, 'chassis क्रमांक दिसतो का?' :( म्हणालो, 'नक्की माहित नाही.' ते म्हणाले, 'आधी ते पाहून ये'. गाडीकडे गेलो. शोधायचा प्रयत्न केला. त्या माझ्या ओळखीच्या मेकॅनिकला फोन केला. तो म्हणाला की, 'डीकीच्या खाली साफ करून बघ, तिथे असेल'. नाही मिळाला. तेव्हा मग तिकडच्या एका एजंटला मदत मागितली. त्याने सांगितले की 'हा इथे आहे, नीट साफ केला की दिसेल'. झाले काम. पुन्हा गेलो. अधिकारी म्हणाले फी भरून ये. फी भरली. एका अधिकार्‍याने पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ३०+१००= १३० व दंडाचे १००. कारण १९९९ नंतर २००४ मध्ये मी नूतनीकरण करायचे होते ते नाही केले. ह्या गाडी तपासणार्‍या अधिकार्‍यांकडे गेलो ते म्हणाले, १३० नाही १६० रू. पुन्हा जादा ३० रू भरून आलो. मग पाहिले तर चेसिस क्रमांकाचा पेन्सिलीने ठसा अर्जावर उमटवायचा आहे. तो उमटविला. शेवटी त्यांनी पूर्ण तपासून स्कूटरच्या नोंदणीच्या नूतनीकरणावर सही व शिक्का मारला. हुश्श्श्श्श. आता पाच वर्षे चिंता नाही. फक्त गाडी नीट ठेवणे,चालविणे व PUC दर सहा महिन्यांनी करत रहायचे.



अजूनही भरपूर लोक, मित्र म्हणत असतात, ’विकून टाक ही स्कूटर आता.’ पण मी म्हणतो, ’चालू आहे नीट, २५ ते ३० चा एवरेज देते आणि मला कुठे लांब न्यायची आहे?’ आणि आज जे गाडीचे नूतनीकरण झाले त्यावरून तर मी हाच विचार करतोय जोपर्यंत ही माझी स्कूटर नीट चालतेय तोपर्यंत तरी चालवत रहायचे.

चल मेरी वेस्पा :)

जानेवारी १४, २००८

काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने इंडिका बाजारात आणली. ती गाडी मारूती ८००, सँट्रो प्रमाणे तुफान चालली की नाही हे आठवत नाही. परंतु इंडिकाही भरपूर लोकांच्या पसंतीस पडली. मी काही जास्त गाड्या अनुभवल्या आहेत असे नाही परंतु मलाही इंडिकाच आवडतेय. कोणती गाडी घेणार विचारले तर मी प्रथम इंडिकाच म्हणतो.
त्याच्या कामगिरीचा एक पैलू असाही आहे, की इंडीकाने जी इंडीकॅब आणली तिचा भाड्याने गाडी देणारे, आजकालच्या कंपन्यांमध्ये असलेली कॅब सर्विस, टॅक्सी सर्विस ह्यांनी जास्त वापर सुरू केला. त्यामुळे पांढरी इंडिका दिसली की लोक म्हणतात कॅब आहे.

तसेच जेव्हा मारुतीने स्विफ्ट गाडी बाजारात आणली तेव्हा तिचा आकार बघून मला एवढी खास नाही वाटली. मनात आले, आपल्याकडे गाडी आहे म्हणण्यात जी (थोडीथोडकी का असेना) शान वाटावी ती ह्या गाडीत वाटत नाही. अर्थात हे माझे मत आहे. लोकांचे म्हणणे होते की ही गाडी मस्त आहे. (हळू हळू मग त्यातील नकारात्मक गोष्टीही समोर आल्यात ही बाब ह्या लेखात नको.)

आता हे लिहिण्यामागचे प्रयोजन हे की नुकतीच टाटांनी त्यांची (एक) लाखांची गाडी आणली. त्यावरून बहुतेक लोकांचे स्वत:कडे कार असण्याचे स्वप्न पुर्ण होईल. मी ही माझ्या मित्राला म्हणालो, "चला, आता पैसे जमा करायला लागूया."

पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत. (सध्या सामनावर बातमीचा दुवा मिळत नाही आहे)

हे वाचून मनात आले, जर ती परवानगी मिळाली तर जरी एखाद्याला स्वत:कडे कार असण्याची कामना पूरी होईल, पण वरील उदाहरणांप्रमाणे त्याच्या(माझ्याही) तथाकथित कार असण्याच्या गर्वाला त्याने धक्का जरूर बसेल.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter