जुलै ३१, २००८

मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली. गेल्या काही वर्षांत लहान दोन अक्षरी नावाचेही भरपूर सिनेमे येत गेले. सध्या तर इंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमांचेही चलन आहे.

तरीही ह्या सर्वात ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ जास्त लक्षात राहतात. नुसते चांगले आणि लांब नावाचे सिनेमे म्हणून नव्हे, तर त्यांच्या लांबीमुळे सुद्धा. हिंदी (व मराठीही) सिनेमाची लांबी साधारणत: २:३० तास असते व इंग्रजी सिनेमे १:३० ते २:०० तासांचे असायचे. पण ह्याला अपवाद असणारे हे दोन सिनेमे. हम आपके हैं कौन - ३:४५ तास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे - ३:१५ तास. आणखी काही अपवाद म्हणजे संगम (४ तास), शोले (३:३० तास) व लगान(३:४५). मुख्य म्हणजे हे सर्व सिनेमे तुफान चाललेत. पण म्हणून प्रत्येकाने मोठ्या लांबीचे सिनेमे बनविण्याचा प्रघात नाही आला.

आणखी एक प्रकार जो इंग्रजी सिनेमांतून आला. सिक्वेल. सिनेमाचा पुढील भाग काढणे. ’नगीना-निगाहें’, ’वास्तव-हथियार’, ’स्टाईल-एक्सक्यूज मी’. नुकतेच आलेले ’हेराफेरी- फिर हेराफेरी’ आणि ’सरकार-सरकार राज’. मी ऐकल्याप्रमाणे एन चंद्राने ’स्टाईल-एक्सक्यूज मी’ सोबत तिसरा सिनेमा काढणार आहेत. तसेच ’फिर हेराफेरी’ ही शेवटी असा अडकवून ठेवला आहे की त्यातून पुढे कथा चालू करू शकतात. २००२ मध्ये आलेल्या ’आंखे’चे ही दोन शेवट आहेत. जेणेकरून अर्धवट ठेवलेल्या प्रसंगापासून पुढील सिनेमा चालू करता येईल.

तरी आता लहान लांबीचे सिनेमे बनविणे हे ही जरा फॅशनमध्ये आहे.१:३० तास ते २ तासाचे. तरी हे सर्व एकाच कथेची लांबी होती हो. त्यात मग नवीन प्रकाराची भर घातली राम गोपाल वर्माने. सिनेमा ’डरना मना हैं’. ह्यात वापरल्या सहा कथा. तीन कथालेखक, एक दिग्दर्शक. मग त्याला छेद दिला त्यानेच. ’डरना जरूरी है’. सहा कथा, सात दिग्दर्शक. पण त्या प्रकारातही जास्त कोणी हात मारायचा प्रयत्न नाही केला. ह्यामागचे कारण बहुधा असेल की ते चालले नाहीत. तरी ह्याच प्रकारात मागील वर्षी आला ’दस कहानियां’. १०-१२ मिनिटांच्या कथा. हा सिनेमा मी परवा पाहिला टीव्ही वर. पूर्ण नाही पहायला मिळाला. पण एक फायदा आहे. वेगवेगळ्या कथा असल्याने पुन्हा पाहताना कुठल्याही कथेपासून सुरूवात करू शकतो. ;)

असो, हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज एका वाहिनीवर नवीन हिंदी सिनेमाची माहिती पाहिली. ’मुंबई कटींग’ नावाचा नवीन सिनेमा येणार आहे. त्यात ११ लघुकथा आहेत. ११ दिग्दर्शक. जवळपास १० मिनिटांची एक कथा, म्हणजे ११० मिनिटे म्हटले तर चित्रपटगृहात जास्तीत जास्त २ तास.

चला पाहूया, हा सिनेमा काय बदल घडवून आणतो ते.

जुलै २७, २००८

शाहरूख खान शिक्षक असलेल्या ’क्या आप पांचवी पास से तेज हैं’ ची आज सांगता झाली.
त्याची सुरूवात आणि शेवट दोन्ही, नाही हो, एकंदरीत पूर्ण कार्यक्रम मला तरी आवडला. सुरूवात ह्यासाठी की त्यांनी केलेला प्रचार किंवा जाहिरातबाजी, आणि मुख्यत्वे काहीतरी वेगळा व माहितीदर्शक कार्यक्रम.(नाहीतर काय, त्यातील किती प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत होती?) ह्या कार्यक्रमाआधी दररोज रात्री आठ वाजता शाळेची घंटी वाजवायचे. तसेच बहुतेक काय सर्वच कार्यक्रमाच्या मध्ये त्याची जाहिरात. आणि कार्यक्रम सुरू झाला त्यादिवशी ’स्टार’ ने पहिले पाच मिनिटे त्यांच्या सर्व वाहिन्यांवर तो कार्यक्रम दाखविला होता. जेणेकरून सर्वांना कळेल की हा कार्यक्रम सुरू झाला आहे. ह्या जाहिरातबाजीबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
शेवट ह्यासाठी नाही आवडला की तो कार्यक्रम संपला. संपल्याने काही खास दु:ख किंवा आनंदही नाही झाला. तो कार्यक्रम चालू असताना बघायला तरी आवडायचे. त्यामागचे कारण मग त्यातील प्रश्न असो की शाहरूख खान असो नक्की माहीत नाही.
पण, तर आजचा भाग तरी ’लालू प्रसाद यादव’ ह्यांच्या प्रतिसादामुळे चांगला वाटला. त्यात येते त्यांची बोलण्याची शैली, लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तर्‍हा आणि ५वी पर्यंतच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा आत्मविश्वास वगैरे सर्व. आणि सर्व उत्तरे अचूक, तपशिलासकट. त्यामु़ळे ते एक कोटी रूपये जिंकले. अर्थात एक करोड जिंकणारे ते पहिले नव्हते. ह्या आधी कॉग्निजंट कंपनीची एक मुलगी १ कोटी रुपये जिंकली होती. पण त्यात त्यातील मुलांचाही हातभार होता. पण आज एकही 'चीट' न वापरता एक करोड. :) (आता ते प्रश्न सिद्धार्थ बासूंनी कसे निवडले तो माझा प्रश्न नाही.)

असो, सध्या तरी त्याला त्यांनी अर्धविराम (किंवा स्वल्पविराम) सांगितला आहे. आताही ती शाळा पूर्ण अशी चालली नाहीच, त्यामुळे पुढे तो कार्यक्रम पुन्हा सुरू होतो की नाही ते 'स्टार' ला माहित आणि त्यामुळे पुन्हा तो कार्यक्रम किती चालतो ते......

.... बघूया.

जुलै २१, २००८

गेले १५-२० दिवस चर्चेत असलेल्या श्री. मनमोहन सिंग ह्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाची कृती आज सुरू झाली. आत्ता रात्रीचे ८ वाजत आले आहेत तरीही बहुतेक सर्व (?) पक्षाचे खासदार संसदेत उपस्थित राहून चर्चा करीत आहेत. जेव्हा स्वत:च्या भवितव्याची चिंता ग्रासू लागली तेव्हा हे सर्व लोक जमा आहेत. मग तसाच देशाच्या भवितव्याचा विचार करून जर दररोज त्यांची उपस्थिती राहिली व काही चांगले कार्य केले तर ह्या सर्व ठरावांची गरजच भासणार नाही असे वाटते.
पण बहुधा आज व उद्याच ही परिस्थिती दिसेल. नंतर आताचे सरकार पडो की राहो, नंतर मात्र पुन्हा तेच. जमेल तेवढ्या वेळा एखादा गोष्टीचा मुद्दा बनवून तेच सभात्याग करणे, व इतर वेळी देशातील जनतेला वेठीला धरणे.
आपण मात्र महागाई, भारनियमन, पाणी कपात वगैरेला तोंड देत पहायचे की हेच सरकार राहते की दुसरे येते आणि मग त्याचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो?

असे म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते , त्याचेच उदाहरण का हे? आजकाल हा इतिहास फार लहान काळाचा झाला आहे, नाही?

जुलै १४, २००८

"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना."

मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्‍या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते :) काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे फाटलेल्या, जीर्ण होत चाललेल्या नोटाही वापरात ठेवल्या होत्या लोकांनी. ती नोट एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून त्यासोबत आपल्या नावाचा कागद ठेवायचे व झाल्या चलनी नोटा वापरण्यालायक.

ह्यावरूनच एक मार्मिक विनोद आठवला. एक कागद एका नोटेला म्हणाला, "तुझ्या आणि माझ्यात फरक काय? तू आणि मी दोघेही कागदाचेच तर आहोत." त्यावर नोट म्हणाली, "हो, पण मी आयुष्यात कधी कचर्‍याचा डबा नाही बघितला."
काय गंमत आहे ना? चलनी नोटांची किंमत कमी होत नाही ते असे.

बाकी नोटांचे काय हो, ते ही एक वचनपत्र असते ना? धनादेशाप्रमाणे. "मैं धारक को xx रूपये अदा करने का वचन देता हूं.", असे लिहून रिजर्व बँकेचे गव्हर्नर ग्वाही देतात की ह्या कागदाची ही किंमत आहे. अर्थात हे १ रू.च्या वरील नोटांकरीता असते. एक रुपयाच्या नोटेवर तशी ग्वाही नसते. खरे तर एक रुपयाच्या नोटेवर भारत सरकार लिहिले असून त्यावर अर्थखात्याच्या सचिवांची सही असते. इतर सर्व नोटांवर रिझर्व बँकेचे नाव असून त्यावर बँकेच्या गव्हर्नरची सही असते आणि त्याची हमी देते केंद्र सरकार (केंद्रीय सरकार द्वारा प्रत्याभूत/Guaranteed by the Central Government). आणि म्हणूनच एक रूपयाची नोट हे आपले खरे चलन म्हटले जाते असे ऐकले होते.

भारतात नोटा किती प्रकारच्या छापतात? त्याची माहिती येथे मिळेल. सध्या आपण १०, २०, ५०, १००, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा वापरतो. १, २ व ५ रू. च्या नोटांची छपाई बंद झाली असली तरी त्या नोटा चलनातून बाद नाही झाल्यात अजून.
अरेच्च्या, काय हो? सरकारने/बँकानी सर्व जुन्या नोटा घेणे बंद केले नाही ना अजून. काही सांगता येत नाही बुवा. कधी काळी सरकारने १००० ते १०००० (५००० व १०००० च्या ही नोटा चलनात होत्या हे मला माहितच नव्हते)च्या नोटा काळाबाजार रोखण्यासाठी बंद केल्या होत्या. त्याप्रमाणे आताही बंद करू शकतात. तर, ह्या सर्व जुन्या नोटा बंद होण्याच्या आधी चलनात काढून, किंवा कमीत कमी बँकेत परत करून आपण आपले(आणि सरकारचेही) नुकसान कमी करू शकतो. बहुधा माझ्याकडे आहेत थोड्या जमविलेल्या नोटा. पाहतो, त्यात किती जुन्या नोटा आहेत ते.

आता मुद्दा निघालाच आहे तर सुरूवातीला थोडे मोठ्या नोटांविषयी.
सध्याच्या काळात मोठ्या म्हणजे ५०० व १००० च्या नोटा. फार पुर्वी ५०, १०० ची नोटही मोठी मानली जात होती. तर त्यांचा फायदा हा की कमी नोटांमध्ये जास्त पैसे खिशात/बॅगेत/कपाटात राहू शकतात. पँटच्या खिशातील चोरकप्प्यातही. तसे आजकाल तर ५०० व १००० च्या नोटा सहज मिळतात. पण आधी तसे नव्हते. कॉलेज मध्ये असताना माझ्या मित्राने त्याच्या एका नातेवाईकांचा अनुभव सांगितला होता. त्यावेळी ५०० च्या नोटा एवढ्या प्रचलित नव्हत्या. त्यांना दीड लाख रूपये घेऊन मोटारसायकलवर एका गावातून दुसर्‍या गावात जायचे होते. त्यांना तशी धास्ती वाटत होतीच. त्यामुळे एका बँकेत जाऊन त्यांनी मॅनेजरला आपली अडचण सांगितली व ५०० च्या नोटांची ३ बंडले घेऊन एक खिशात व दोन पायांच्या मोजात दोन अशी बंडले ठेऊन थोड्या कमी भीतीत प्रवास केला.
काही वर्षांपुर्वी हर्षद मेहतानी सांगितल्याप्रमाणे त्याने नरसिंह रावांना जे १ करोड रुपये एका सूटकेस मध्ये दिले ते ५० आणि १०० च्या नोटांमध्ये होते. त्यावेळी ५०० व १००० च्या नोटा असत्या तर ती बॅग किती लहान झाली असती नाही? ;)
खरे तर सर्व नोटांवर जुन्या नोटांवर अशोकस्तंभाच्या खाली ’सत्यमेव जयते’ लिहिलेले असायचे. पण मी पाहिलेल्या काही ५० व बहुधा १०० च्या नोटांवर फक्त अशोकस्तंभ होते, सत्यमेव जयते नाही. ह्याच ५० व १०० च्या नोटा हर्षद मेहतानी वापरल्या होत्या का?
आता सर्व नोटांवर महात्मा गांधींचे चित्र असते. मला नेहमी प्रश्न पडायचा फक्त महात्मा गांधीच का हो? बाकी नेते का नाहीत? पण आता वाटते ते ही बरे आहे नाहीतर पुन्हा आमच्या नेत्याचे चित्र ठेवा म्हणून लोक आंदोलन करतील. आणि पुन्हा आपले नुकसान. पण एक वाईट वाटते, की मग एक ५०० किंवा १००० रूपयांच्या नोटेचा उल्लेख 'एक गांधी खर्चावा लागेल' असा लोक करतात. निदान आधी १०० रू.च्या नोटेला हरी पत्ती किंवा हिरवी नोट म्हणायचे. त्यावरून खर्च जास्त आहे हा अंदाज यायचा.

बरं, ह्या मोठ्या नोटा वापरायचे म्हणजे ज्या अडचणी येतात त्या पहा.
मोठ्या नोटा असल्या तर त्यांचे आकारमान लहान होते. म्हणून मोठी रक्कम बाळगताना असतानाची धास्ती वगळून इतर पाहूया.
सर्वात पहिली अडचण म्हणजे.. आठवा, तबू व ॠषी कपूरचा 'पहला पहला प्यार' सिनेमा. तबू नेहमी ५०० ची नोट समोर करत असते. त्यामुळे नेहमी ॠषी कपूरलाच पैसे भरावे लागतात. तसेच संजीव कुमारचा कुठलासा सिनेमा होता, त्यातही त्याच्याकडे सुट्टे नसल्याने नायिकेला प्रत्येक ठिकाणी पैसे भरावे लागतात. हाच प्रसंग मग फिर हेराफेरी ह्या सिनेमातही उचलला होता.
हं, तर पहिली अडचण सुट्टे पैसे मिळण्याची. त्यामुळे मी आपला बाजारात जाताना बहुतेक वेळा सुट्टे किंवा वेगळ्या शब्दांत म्हणायचे तर १० ते १०० रू.च्या नोटा ठेवतो. ५०० किंवा १००० ची नोट दिसली की लोक विचारतात, "सुट्टे नाहीत का हो?". आधी हीच गत १०० च्या नोटेची होती. रिक्षा वाल्यांना ५० किंवा १०० ची नोट दिली तर हीच अडचण. मग त्या नोटेचे सुट्टे करण्याकरीता खटपट. कोणीच सुट्टे नाही देत म्हटले तर मग नाइलाजाने काहीतरी खरेदी करावे लागते. पण काही लोकांना जास्त खटपट करावी लागत नाही. मी बहुधा अकरावीत असेन तेव्हाची गोष्ट. एका किराणा मालाच्या दुकानात मी काहीतरी खरेदी करायला गेलो होतो. तसे ते आमचे नेहमीचे दुकान. आमच्या कॉलनीत बहुतेकांच्या घरी त्याच दुकानातून सामान यायचे. पण मी जास्त कधी अशा मोठ्या नोटांचा प्रश्न त्यांना पडू दिला नाही. तर, तिथे माझ्या शेजारी राहणारा एक मुलगा आला. त्याने २ रुपयाची काही वस्तू घेतली. दुकानदाराला ५०० ची नोट देऊ का विचारले आणि त्या दुकानदाराने त्याला ४९८ रूपये परत केले. त्यावेळी मला त्याचे आश्चर्य वाटले होते. तरीही मी कधी तेवढा प्रयत्न नाही केला. असो, मी तर बहुतेक वेळा रिक्षा मध्ये बसल्यावर लगेच विचारतो, की बाबारे तुझ्याकडे १०० रू.चे सुट्टे असतील ना? उगाच नंतर मला (व काही वेळा त्यालाही अडचण) नको.
तसे म्हणायला गेलो तर लहान नोटा वापरताना उलट परिस्थिती ही असते. खिशात सुट्टे असले की लवकर संपतात, आणि त्यांचा हिशोबही लागत नाही. हॉस्टेलमध्ये असताना ह्याची पहिल्यांदा प्रचिती आली. १०० ची नोट असली की आपण विचार करतो की ही नोट मोडायची गरज नाही. जेवढे पैसे आहेत त्यात भागवून घेऊ. त्यामुळे पैसेही जास्त खर्च होत नाहीत. एकदा का ही नोट मोडली की मग उरलेले पैसे ही लवकर संपतील. म्हणून बँकेतून, किंवा इतरांकडून पैसे घेताना सांगायचो की, 'मला १० च्या नोटा देऊ नका. ५०/१०० च्या द्या.'

(माझी) दुसरी अडचण. खिशातील पाकिटात ह्या नोटा ठेवायचे म्हणजे तेवढे मोठे पाकिट पाहिजे. त्यामुळे नवीन पाकिट घेताना ५०० (व आता १०००) ची नोट ठेवून बघतो. आधी नाणी ठेवायला जागा (कप्पा) आहे का तेही बघायचो. पण नंतर नाण्यांमुळे पाकिटही जाड आणि जड वाटायला लागले तर तो नाद सोडून दिला. आजकाल तर पाकिट घेताना हे ही बघतो की ह्यात क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड ठेवायलाही किती जागा आहे.
तुम्ही म्हणाल की "नेहमी नोट मावेल असे पाकिट का घ्यायचे? नोट घडी करून ठेवायची ना मग?" अहो, पण जर नोट न दुमडताच चांगली ठेवता येत असेल तर का नाही? खरे तर आधी आम्हाला एक सवय होती, बाजारात जाताना आईने पैसे दिले की त्या नोटेची मस्त घडी पाडायचो. का ते माहित नाही. पण हळू हळू पण तेव्हा लवकरच ती सवय सुटली. बरे झाले सुटली ते. नाही तर उगाच आता अपराध्यासारखे वाटायचे की सरकार एवढे सांगते आहे की नोटा खराब नका करू आणि आपण सर्रास त्या कशाही वापरतो.

तिसरी आणि मोठी अडचण आहे ती फक्त माझी किंवा तुमची अशी एकट्या दुकट्याची नाही तर सर्वांचीच म्हणजे जनतेची,बँकांची तसेच सरकारची ही आहे. ती म्हणजे नकली नोटा. नुसते देशाबाहेरील काही लोक नाही तर भारतातील अंतर्गत शत्रूही नकली नोटा बाजारात आणून गोंधळ घालण्याच्या व स्वत:च्या फायद्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे मोठ्या नोटा घेताना लोक पडताळून पाहतात. भरपूर लोक तर ती नोट कोणी दिली त्याचा फोन नंबर नोटेवर लिहून ठेवतात. तरी बरे, आता नोटा लवकर गहाळ होऊ नयेत म्हणून रिझर्व बँकेनेच नोटांवर लिहिणे, स्टॅपलरच्या पिना वापरणे ह्यावर बंदी घातली आहे. नाहीतर बहुतेक नोटांवर टेलिफोन डायरी झाली असती :)
ठाण्याला पासपोर्ट कार्यालयाजवळ जे महाराष्ट्र वीज वितरणाचे कार्यालय आहे तिथे तळ मजल्यावर बिल वसूली केंद्र आहे. तिथे मी सूचना वाचली होती की "५०० च्या नोटेवर ग्राहकाने आपला दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवावा". स्वत: सरकारचीच खाती ह्याचे पालन करत नसेल तर काय म्हणावे.

आणि एक आहे हो, बहुतेक लोक ही नोट दिसली की पडताळून पाहण्याकरीता प्रकाशात धरून पाहतात. सर्वांनाच त्यात किती कळते ही शंका आहे. मला एवढे माहित होते की जुन्या नोटांमध्ये एक चांदीची तार असायची, ती नोटेत आहे की नाही हे लोक पहायचे. तसे ती तार काढण्याचे प्रकार बहुतेक लोक करायचे. मी ही १ २ वेळा तसा सफल प्रयत्न केला आहे (लहानपणी. उगाच आता माझ्यावर संशय नको). शासनाला किंवा लोकांना फसविण्याकरीता नाही, तर असे करता येते का ते पाहण्यासाठी. ती नोट व तार मी सांभाळून ठेवली होती, आता नाही मिळत :(. पण आता तेही नाही. सरकारने तशी तार ठेवलीच नाही. पण एक ’RBI भारत’ लिहिलेली चांदीची वेगळीच चपटी तार गूंफून ठेवली आहे.

हं, तर ही खरी नोट कशी ओळखायची? त्याकरीताही सरकारने माहितीपत्रके काढली आहेत. आता एवढे सर्व आपण नेहमीच पडताळून पाहत नाही. मला माहित असलेल्या गोष्टी म्हणजे ती चांदीची तार, नोटेच्या डाव्या बाजूला असलेले त्रिकोण, चौकोन. त्या भूमीतीय आकृत्या थोड्याशा उंच राहतील अशा छापल्या असतात. जेणेकरून दृष्टीने अधू असलेल्या लोकांना त्या
आकारांच्या स्पर्शाने ती नोट कोणती आहे ते ओळखता येईल. मी दादर-ठाणे लोकल मध्ये एका अंध पुस्तक विक्रेत्याची नोट कोणती आहे ते ओळखण्याची वेगळीच कला पाहिली. त्याने ह्या आकारांचा उपयोग केला की नाही माहित नाही पण त्याने नोटेची लांबी-रूंदी मोजून ती नोट १० ची आहे की २० ची ते पडताळले होते.
माझ्या एका मित्राने नकली नोट ओळखायची एक शक्कल लढविली. खरे तर तसे काही नव्हते पण उगाच गंमत म्हणून. काय तर, ती नोट गोळा केल्यासारखी केली व टेबलावर आपटली. उचलून म्हणाला "चष्मा फुटला असेल तर ही नकली नोट आहे, नाहीतर असली नोट."
गंमती करायला तर तशा भरपूर आहेत. ते नाही का, एखादी नोट दोरा बांधून ठेवून रस्त्यावर ठेवायची. कोणी ती उचलायला गेले तर तो दोर्‍याने ती नोट ओढायची वगैरे वगैरे.

आता नोट नेमकी कशी छापतात ते मला माहित नाही. पण सिनेमात तर हे लोक नकली नोटा छापण्याकरीता उसाचा रस काढायच्या यंत्रासारखे यंत्र किंवा मग लोखंडी ठसा वापरतात. आपला हिरो मग त्या ठशाची विल्हेवाट लावण्याकरीता मारामारीही करतो.
ह्यावरून आठवले. एक माणूस नकली नोटा छापत असतो. तो एकदा १५ रू. नोट छापतो. पण नंतर त्याला कळते की १५ रू. ची नोट काही चलनात नाही. तरीही तो प्रयत्न करतो. एका पानवाल्याकडे जातो. त्याला म्हणतो ’मला १५ रू.नोटेचे सुट्टे पाहिजे आहे.’ पानवाला म्हणतो, ’सुट्टे मिळतील पण मी एक रूपया कमी देईन.’ हा माणूस विचार करतो, '१४ तर १४ रू. नोट तर चालते आहे.' तो म्हणतो ’दे मला १४ रू.’ तर पानवाला त्याला ७ रू च्या दोन नोटा परत करतो.

बरं, नोटा सांभाळून ठेवणे हे ही एक वेगळेच काम. आधी तर मला सवय होती की नोटा वरच्या खिशात ठेवायचो. अर्थात १०० च्या वगैरे नाही पण ५, १० , २० च्या. खरं तर दहावी/ बारावी पर्यंत तेव्हा एवढ्या मोठ्या नोटा जवळ बाळगायचोच नाही ;) जर नेमके माहित असेल ह्यांची गरज आहे तरच. एकदा लोकलमधून कॉलेजला जात होतो. तेव्हा दरवाज्यात लटकून उभा होतो. पाहतो तर बाजूच्या माणसाने अलगदपणे बोटांनी माझ्या खिशातील नोटा काढायचा प्रयत्न केला होता. माझ्या नेमके लक्षात आले आणि मी त्याच्यावर रागावलो.
तसेच काही वेळा खिशात नोटा राहिल्या तर त्या शर्ट पँट सोबत धुवायलाही जातात. आधी हाताने कपडे धुतले तर त्या नोटेची पार वाट लागून जायची. आता तसे नाही. धुलाई यंत्रामध्ये कपडे धुताना जर नोट राहीलीच तर ती फक्त ओली होते, थोडीशी खराब होते. मग बाहेर काढून ती सुकवायची. किंवा मग इस्त्री करायची. नोटेला इस्त्री केली की किती मस्त कडक होते ना ती :). अर्थात त्याला नवीन कोर्‍या नोटेची सर नसते तो भाग वेगळा.
आणखी थोडे वेगळे प्रकार म्हणजे, नोट पुस्तकात ठेवायची सवय. त्यामुळे भरपूर वेळा एखाद्याला पुस्तक दिले तर त्या नोटा सोबत जाण्याची भीती. माझ्या एका मैत्रीणीने तर एकदा घरातील रद्दी कागदे फाडताना एका वहीतील दहा रूपयांची नोटही चूकून फाडली होती. :( त्यामुळे मग मी नोटा फक्त खिशातील पाकीटात ठेवणे सुरू केले. तरी आता पुन्हा खिशात पैसे ठेवायला लागलोय. बदलायला पाहिजे ती सवय. :|

तुम्ही नोटा घेतल्यावर कशा प्रकारे मोजता हो? डाव्या हातात बंडल पकडून उजव्या हाताच्या अंगठा व मधल्या बोटाने एक एक नोट वेगळी करून डाव्या हाताच्या अंगठा व तर्जनीने डाव्या हातात घेत मोजायची की डाव्या हातात पूर्ण बंडल पकडून एक एक नोट उजव्या हातात हस्तांतरीत करायची? की आणि काही? काहीही असो, सर्वच पद्धतीत नेमक्या नोटा मोजताना दमछाक होतेच. काही वेळा नोटा चिकटलेल्या असल्यामुळे गोंधळ होऊन जास्त नोट जाण्याची भीती. अशा परिस्थितीत आपल्याला एखादी नोट जास्त आली की खूष व्हायचे आणि आपल्या हातून एखादी नोट जास्त गेली की दु:खी व्हायचे. आपण नेहमी बँकेतून नोटा घेताना नीट मोजून घेतोच. एकदा आम्हाला दहाच्या नोटांच्या बंडलात २ नोटा जास्त आल्या. आम्ही लगेच त्या रोखपालाला सांगितले. नाहीतर काय हो? आपल्याला एखादी नोट कमी आली की आपण लगेच तक्रार करतो, मग त्यांनी चुकून जास्त नोटा दिल्या तर सांगायला नको? आता तरी बँकांकडे नोटा मोजायचे यंत्र आले आहे. त्यामुळे ह्यातील चुका नगण्य झाल्या आहेत. नगण्य ह्याकरीता म्हणालो कारण मी स्वत: ह्या यंत्रांनीही एखादी नोट कमी मोजल्याचे पाहिले आहे. त्यामुळे एटीएम मशीनमधून एखादी नोट जास्त मिळाल्याचे (५०० किंवा १००० हं, कारण आजकाल ह्याच नोटा जास्त मिळतात एटीएम मधून) स्वप्नही आपण पाहू शकतो.

असो, माझे नोटापुराण एवढेच. पण पुन्हा कोणी समारंभात नोटांचा हार बनवून किंवा दहीहंडी वगैरे ठिकाणी नोटा लटकावून ठेवत असेल तर तक्रार करण्यासोबत हे नोटापुराण त्याला ऐकवायचेही विसरू नका. ;)

(आमचे नाणेपुराण येथे वाचता येईल)

जुलै ०८, २००८

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते.

मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन 'रामायण' आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच. त्यात त्यांनी वेळ निवडली प्राईम टाईमची. नक्की माहित नाही पण एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे, एनडीटीव्ही ला त्याचा फायदा झाला. (जरी लोक आय़ पी एलचे सामने जास्त बघत होते तरी त्यांना तेवढे नुकसान झाले नाही.)

आमच्या घरी रामायण पाहणे सुरू असते. सुरूवातीला तसे बरे वाटले. अजूनही बरेच चांगले सूरू आहे. तरीही जुन्या रामायण मालिकेसोबत तुलना होणे स्वाभाविकच आहे. त्यात स्टार उत्सव वर ती जुनी मालिका दाखवित आहेत. मग तर काय संध्याकाळी जुने रामायण, रात्री नवीन रामायण. आता ह्यात जास्त तुलना होते ती कलाकारांच्या अभिनयाची, सादरीकरणाची. नवीन रामायणात मला सुरूवातीला तरी थोडा तजेलदारपणा वाटला. नवीन वाहिनी, नवीन कलाकार, नवीन तंत्रज्ञान. ह्याचा फरक तर दिसणारच. पण ह्यात राण्यांचा पेहराव, त्यांचे थोडेफार वागणे ह्यात सांस बहू मालिकांचा प्रभाव दिसत होता. मग पुढे दिसू लागला संगणकीय प्रभाव. हे मान्य आहे की ह्यात राक्षस, बाणांचा वर्षाव वगैरे आणि भरपूर गोष्टी प्रत्यक्षात दाखवू शकत नाही, तेव्हा त्यामागे स्पेशल इफ़ेक्ट्स वापरावे लागतात. पण इतर ठिकाणी तो जिवंतपणा वाटत नाही आहे. राजा दशरथाचा महाल बाहेरून दाखविण्यात संगणकाचा वापर जास्त केला असे दिसून येते. संध्याकाळचे राजमहालाचे दृष्य पाहताना त्याची जाणीव होते. इतरही वेळा वाटते की काहीतरी कृत्रिम दाखवण्यात येत आहे.

मग सुरू झाले 9x वाहिनीवर महाभारत सुरू होण्याचे वारे. गेले २ महिने रणभूमी, गदा, धनुष्य वगैरे दाखवून महाभारतातील एक एक गोष्टी समोर आणत त्याची जाहिरात दाखवत होते. त्या जाहिराती बघतानाही जाणवत होते की ह्यात थोडी अंधाराची छटा आहे. इथेही कृत्रिमतेचा भास होत होता. म्हटले पाहूया ह्यात काय आहे ते? काल परवा ह्याची नवीन जाहिरात पाहिली तेव्हा वाटले की हे पूर्ण फिल्मी प्रकारात चित्रीत केले आहे. आज कालचे नायक/खलनायक ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे ती पात्रे दिसत होती.

आज रात्री ९ वाजता महाभारत दाखविणे सुरू झाले. सुरूवातीलाच धर्मराज खेळात हरलेला दाखविला. दुर्योधन सांगतो की द्रौपदीला घेउन ये. हे सर्व पाहत असताना मला वाटले की मी संगणकावर एखादा नवीन गेम बघत आहे. तेच स्पेशल इफेक्ट्स. ह्यात प्रजा दाखविली ती पूर्णत: संगणक निर्मित. मागील महालही तसाच वाटला. मग दुशासन द्रौपदीला आणायला जाताना दाखविला. पूर्णत: कृत्रिम माणूस. चेहयावरील भाव काहीच प्रभाव पाडत नाहीत. महालातील दासी तशाच. त्याआधी बाहेर युधिष्ठिर दाखवला होता. त्याला पाहताना मला राम गोपाल वर्माच्या ’कंपनी ’ मधील चंदू (विवेक ओबेराय)ची झलक दिसली. त्यात भर पाडली ती पार्श्वसंगीताने. ’सरकार’ मधील पार्श्वसंगीत जसे आहे तसेच. मला वाटले थोड्या वेळाने ’गोविंदा गोविंदा’ही सुरू होईल व द्रौपदीला वाचवायला कृष्ण आला आहे असे दाखवतील. पण आमच्या मातोश्रींना दुसरी मालिका पहायची होती म्हणून मग वाहिनी बदलण्यात आली.

तर हे सांगण्याचा उद्देश हाच की आता पौराणिक कथा पुन्हा तयार करून दाखवत आहेत हे कौतुकास्पद आहे. पण ते पाहताना आपण रामायण/महाभारत, राम/कृष्ण पाहत आहोत हे जाणविले पाहिजे. सध्या तरी रामायणामध्ये ते थोडेभार दिसते. पण नवीन महाभारताच्या पहिल्या दहा मिनिटांतच मला वाटले की ह्यात काहीतरी कमी आहे. कितपत चांगले वाटते ते बघू.

जमल्यास थोडी आणखी वाट पाहूया. २१ जुलै पासून नवीन वाहिनी ’कलर्स’ वर श्रीकृष्णावर (की बालकृष्णावर) मालिका येत आहे. ह्याच्या जाहिरातीही सुरू आहेत. त्यात तरी हा कृत्रिमपणा जाणवत नाही. खरं काय ते मालिका सुरू झाल्यावरच कळेल.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter