चित्रपट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रपट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ऑगस्ट ०५, २०१४


हम आपके हैं कौन?
आजपासून बरोबर २० वर्षांपूर्वी ५ ऑगस्ट १९९४ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुरूवातील लग्नाच्या गाण्यांचे चित्रहार, साडे तीन तासांचा लांबलचक चित्रपट म्हणून टीका झाली. पण चांगला चित्रपट आहे आवडला असेही लोक सांगू लागले. निर्माते बडजात्या यांनी चित्रपटाची व्हिडीयो कॅसेट चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याच दिवशी बाजारात न आणता, संपूर्ण भारतात फक्त २७ प्रती काढून प्रदर्शित केला आणि त्याची तिकीटही जास्त ठेवली. पण तरीही प्रेक्षकांनी ह्या चित्रपटाला मोठा प्रतिसाद दिला.

घरातील मंडळी चित्रपट पाहून आली. आल्यानंतर काही दिवस ह्याच चित्रपटाची चर्चा. त्यामुळे ह्या चित्रपटाविषयी आकर्षण निर्माण झाले होते. पण मला बारावीचे वर्ष असल्याने चित्रपटगृहात जाण्याची संधी मिळाली नाही.

त्यानंतर १ वर्षांनी म्हणजे जुलै १९९५ मध्ये हा चित्रपट पाहण्याचा योग आला, तोही त्यांच्या मुख्य चित्रपटगृहात 'लिबर्टी चित्रपटगृह'. तेव्हा त्यांनी चित्रपटाला ५० आठवडे पूर्ण झाले म्हणून २ गाणी आणि १० दृश्ये नवीन जोडलीत असे ऐकले होते. ती दोन गाणी म्हणजे चॉकोलेट लाईम ज्यूस.. आणि मुझसे जुदा होकर... दृश्ये नवीन कोणती ते कळण्याचा मार्ग नव्हता, पण ह्या गाण्याच्या आधीचे २-३ तर नक्कीच असतील.
म्हणजेच मी पहिल्यांदा चित्रपट पाहिला तो पूर्ण. आधीच्या लोकांनी पाहीला तसा निर्बंधित नाही. ;)

त्यानंतर पुन्हा १ वर्षांनी महाविद्यालयीन काळात पाहिला लोणी येथील चित्रपटगृहात. पहिल्यांदा पाहिला तेव्हा ८० रू तिकीट होते आणि नंतर पाहिला तेव्हा ५ रू तिकीट. पण दोन्ही वेळेला पूर्ण ३:४० तासांचा, २ इंटर्व्हल सोबत.

चित्रपटाच्या कथा आणि गाण्यांबद्दल बोलायला नकोच सर्वांनाच माहित आहे. पण एवढेच सांगतो की हा चित्रपट तेव्हाही आवडला होता, आताही आवडतो. कधीही दूरदर्शन वाहिन्यांवर लागला तर जमेल तेवढा नक्की पाहतो. 

(प्रकाशचित्रः आंतरजालावरून साभार)


डिसेंबर २५, २०१३



सर्वांना नाताळ शुभेच्छा.

ख्रिसमस, नाताळ वर भरपूर चित्रपट आले असतील. काही वर्षे आधीपर्यंत विविध वाहिन्यांवर ख्रिसमस च्या निमित्ताने हे चित्रपट दाखवले जायचे. पण हे प्रमाण सध्या खूप कमी झाले आहे. अशाच चित्रपटांतील माझा आवडता एक चित्रपट आहे 'मिरॅकल ऑन थर्टीफोर्थ स्ट्रीट' (Miracle on 34th Street). साधारण १९९४/९५ मध्ये हा चित्रपट स्टार मूव्हीज वर पाहिला होता. वेगवेगळ्या मोठ्या दुकानांत सांताक्लॉज लहान मुलांना भेटून त्यांच्याशी बोलत असतात. त्यापैकी एका दुकानात सांताक्लॉज बनलेला माणूस दारू पिऊन आला असल्याने क्रिस किंगल ला सांताक्लॉज बनविले असते ह्यापासून क्रिस किंगलच खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध करण्यापर्यंतचा प्रवास मला आवडला.



२००६ मध्ये मी ह्या चित्रपटाची VCD ऑनलाईन खरेदी करून मागवली होती. पण तेव्हा मला ह्याच चित्रपटाच्या १९९४ मधील रिमेकची VCD मिळाली. आता रिमेक बनविताना त्यात थोडेफार बदल होत असतातच. ते बदल ठिक आहेत पण ह्यातील क्रिस किंगलच खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध करण्याकरीता जे कारण वापरले ते मला रिमेक मध्ये नाही आवडले पण मूळ १९४७ मधील चित्रपटातीलच आवडले. अजूनपर्यंतही निदान भारतात १९४७ च्या चित्रपटाची VCD/DVD मला मिळाली नाही. ती शोधण्याच्या प्रयत्नात आहे.

(चित्र स्त्रोतः IMDB)

मे २९, २०११


नाही, यूट्युब वर उपलब्ध असलेल्या ३डी चित्रफीती बनविण्याच्या कृतीबद्दल म्हणणे नाही हे. तर घरी बसून त्रिमिती (3D) चित्रपटाचा आनंद घेता येईल त्याबद्दल. :)
हो, आणि महागडा 3D दूरदर्शन संच ही घ्यायची गरज नाही.

त्रिमिती चित्रपट पाहण्याकरीता गरज काय असते? तर 3D प्रक्षेपण आणि त्याचा खास चष्मा. 3D चित्रपट बनविणार्‍यांनी आधी त्यांचे चित्रपट नेहमीच्या डीव्हीडीच्या प्रकारात देत होते. पण आता त्यांनी 2D आणि 3D अशा दोन्ही प्रकारात डीव्हीडी बनविणे सुरू केले आहे. डीव्हीडी सोबतच दोन चष्मेही मिळतात.

असेच २ चित्रपट मी विकत आणलेत.
  • Ice Age: Dawn of the Dinosaurs 
  • The Final Destination 4 



तिसरा आहे उपलब्ध The Polar Express तो आणेन नंतर कधीतरी :)

दोन्ही चित्रपट २००९ मध्ये चित्रपटगृहात पाहिले होते. आणि आता ह्या डीव्हीडीवर.

दोन्ही डीव्हीडीपैकी Ice Age चा त्रिमिती दर्जा चांगला वाटला. पण Final Desination नाही. बहुधा चष्यांचाही दोष असेल. नीट पहावे लागेल.  

आणि ह्याचे २ आणि त्याचे २ असे मिळून ४ चष्मे असले तरी एकाच चित्रपटाला चारही वापरता येत नाहीत. कारण दोघांच्याही प्रणालीत थोडे वेगळेपण आहे. एकात लाल आणि निळा रंग वापरला आहे, दुसर्‍यात लाल आणि निळा. आणि लाल रंग एकात डाव्या डोळ्याला आहे दुसर्‍यात उजव्या.

हे एक सोडले तर घरी बसून 3D चित्रपट पाहणे सोपे झाले म्हणता येईल.

एप्रिल ११, २०११



आता कोणत्यातरी वाहिनीवर 'प्यार के काबिल' हा चित्रपट सुरू असलेला पाहिला. लहानपणी हा चित्रपट कॅसेट आणून पाहिल्याचे आठवले. तेव्हा भरपूर चित्रपट पाहिलेत. हा चित्रपट पूर्णपणे आठवत नसला तरी त्याची कथा लक्षात होतीच इतके दिवस. नवरा बायको (ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे) भांडणानंतर वेगळे राहतात. त्यांच्या जुळ्या मुलींपैकी एक ऋषी कपूर कडे, एक पद्मिनी कोल्हापुरे कडे. थोड्या मोठ्या झाल्यावर एकाच शाळेत असतात. शाळेच्या सहलीमध्ये त्या ठरवून अदलाबदली करून एकमेकींच्या घरी जातात, आईला भेटायला, वडिलांना भेटायला. पुढची कथा सांगण्याची गरज वाटत नाही. :)

मग ह्याच कथेवरचे पाहिलेले इतर चित्रपट लगेच आठवतात.
दो कलियां : विश्वजीत-माला सिन्हा
प्यार के दो पल : मिथुन्-जयाप्रदा
कुछ खट्टी कुछ मिठी : ऋषी कपूर(पुन्हा) - रति अग्निहोत्री

दो कलिया बद्दल माहित नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे इतर तीन तर चालले नाहीत :)

असेच जुळ्या भावांचे किंवा बहिणींचे, थोडेसे वेगळे चित्रपट आठवत असतीलच.
राम और श्याम (दिलीप कुमार)
सीता और गीता (हेमा मालिनी)
चालबाज (श्रीदेवी)
किशन कन्हैया (अनिल कपूर)

वरील चारही चित्रपट एकाच कथेवर. पण चौघांचेही सादरीकरण वेगळ्या धाटणीचे, मस्त. आणि चारही चित्रपट भरपूर चाललेत.

इथे मी फक्त आता आठवणार्‍या हिंदी चित्रपटांचीच नावे दिली आहेत. असेच एकाच कथेवरच्या किंवा प्रेरित (चोरलेल्या?) चित्रपटांबद्दल (जे भरपूर आहेत) पुन्हा लवकरच लिहेन. तसेच मराठी आणि इंग्रजी एकत्र केल्यानंतर लांब यादी तयार होईलच :)

एप्रिल ०८, २०११

आज कार्यालयात धोक्याच्या वेळी (आग वगैरे) घंटा, सूचना कशा पाळायच्या ह्याची एक ओळख झाली. (फायर ड्रिल म्हणतात ते नव्हे) आग लागल्याची घंटा किती वेळा वाजणार, त्याबाबत सूचना स्पीकरवरून झाल्यावर काय करायचे वगैरे वगैरे. अर्थात ह्या गोष्टी बहुतेक सर्वच कार्यालयांत आजकाल होत असतीलच. त्याबाबत हे लेखन नाही. पण ह्यावरून दोन वर्षांपूर्वीची एक घटना आठवली.

२००९ मध्ये अमेरिकावारीत १ सप्टे. ला फायनल डेस्टिनेशन चा चौथा त्रिमितीय (३डी) भाग पाहिला. चित्रपट अर्थातच थरारक वाटला आणि आवडलाही. पण आधीच्या २/३ भागांत विमान, रोलर कोस्टर ह्यांतील अपघातातून वाचलेले मित्र, नंतर त्यांच्यावर नियतीचा घात ह्या गोष्टींनतर हा ३डी चित्रपट जरा जास्तच क्रूर वाटला होता.

त्यानंतर चारच दिवसांनी सहकार्‍यासोबत ३ दिवसांच्या सुट्टीत (५,६,७ सप्टें)  लास वेगस ला गेलो होतो. तिथे जगातील वेगवेगळ्या प्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती, उंच इमारती व त्यांचा दिव्यांचा झगमगाट आणि अर्थातच तिकडचे मुख्य आकर्षण, कॅसिनो ह्यांची भेट घेतलीच. पण तिकडचे आणखी आकर्षण होते स्ट्रॅटोस्फियर टॉवरवरील सफरी (राईड्स)



१०८ मजल्यांच्या वर ह्या सर्व सफरी. मी बसलो तीनही मध्ये. Insanity, X-Scream आणि Big Shot. मस्त एकदम. ह्यातील  x-scream मध्ये प्रत्येक रांगेत २ अशा ४ रांगांत लोकांना बसवितात. मग गच्चीवरून बाहेर मोकळे सोडून देतात, गुरुत्वाकर्षणाच्या भरवशावर. जसे काही आपण खालीच पडत आहोत. मग अचानक थांबवून पुन्हा मागे. आणि परत सोडून देतात.




माझा क्रमांक आल्यावर मी त्यात जाऊन बसलो. नेमकी एकदम समोरची जागा होती. म्हणजे खाली पडताना आपल्या समोर कोणी माणूस नाही, तर थेट १०८ मजले खालची जमीनच दिसणार. खेळ सुरु करणार तेवढ्यात आगीच्या धोक्याची घंटा वाजू लागली. लगेच यंत्र थांबविले व आम्हाला खाली उतरण्यास सांगितले. धोक्याची घंटा वाजतच होती. आता माझ्यासमोर ४ दिवस आधी पाहिलेला फायनल डेस्टिनेशन आठवला. समोर १०८ मजल्यावरचा कठडा, आत आगीची घंटा. म्हटले आपले फायनल डेस्टिनेशन आले जवळ :)



आम्हाला सर्वांना एका ठिकाणी जमा होण्यास सांगितले. ५-१० मिनिटांनंतर आतून घोषणा झाली, "आगीचे ठिकाण शोधण्यात आले आहे. १५ मिनिटांत सर्व ठीक करण्यात येईल."

१५ मिनिटांनी  सगळे ठीक असल्याचे सांगण्यात आले.  खबरदारी म्हणून कोणालाही न बसवता त्या यंत्राची चाचणी घेण्यात आली. पुन्हा आम्हाला त्या x-scream मध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली. पण ह्यावेळी मला पहिल्या रांगेत जागा न मिळता दुसर्‍या रांगेत जागा मिळाली. पहिल्या रांगेची मजा बहुधा मला मिळाली नसेल पण ते x-scream ही थरारकच वाटले.


हा अनुभव मध्ये मध्ये आठवतच असतो, तसा एवढा गंभीरही नाही. पण आज ह्या धोक्याच्या घंटेने त्याबाबत लिहावयास प्रवृत्त केलेय असे म्हणता येईल.

एप्रिल ०२, २०११

गेल्या आठवड्यात सचिन महेश कोठारे आणि अशोक सराफ ह्यांचा आयडियाची कल्पना हा चित्रपट पाहिला. महेश कोठारे आणि सचिन ह्यांचा एकत्र चित्रपट आणि सचिन किंवा महेश कोठारे चे आधीचे चित्रपट बरे वाटायचे. म्हणून त्यांचा हा चित्रपट पहायचा होताच. पण चित्रपटगृहात जाण्याचा योग नाही जमला. मग व्हीसीडी विकत आणली. पण त्यानंतरही १ महिना नाही जमले. मध्ये एकदा लावला होता. पण रात्री उशीर झाला म्हणून आम्ही १५-२० मिनिटांतच बंद केला. पण त्या १५ मिनिटांतच कल्पना आली की ही आयडिया नवीन नाही. ह्या चित्रपटाची 'आयडियाची कल्पना' जुन्या हिंदी चित्रपटावरून घेतली आहे


मग गेल्या आठवड्यात एकदाचा लावला तो चित्रपट. नायिकेच्या गाडीने धक्का लागल्याने सचिन रुग्णालयात असतो. सचिनला रुग्णालयात ठेवल्यानंतर अशोक सराफचे फोन वर बोलणे पाहून कल्पना आली होतीच की ह्याची पुढची कथा कशी असेल. नायिकेचा भाऊ महेश कोठारे हा सांगतो की अपघात त्याच्यामुळे झाला आहे, म्हणून अशोक सराफ मेव्हण्यासोबत लहानपणी घडलेल्या घटनेचा फायदा आता पैसे उकळवायला घ्यायचा असे ठरवून खटला दाखल करतो. पुढे मग जुळे भाऊ दाखवण्याकरिता त्यांचे दुहेरी रूप दाखवणे, वगैरे वगैरे नेहमीचेच खेळ.

महेश कोठारे पोलीस कमिशनर म्हणून बरा वाटतो, आणि नेहमी प्रमाणेच त्याचे नाव महेशच दाखवलेय. सचिन घरातून पळाल्यावर महेश कोठारेची नेहमीची 'डॅम इट' म्हणण्याची पद्धत इथेही दाखवलेली आहे.

अशोक सराफने ही वकिलाची भूमिका चांगली केली आहे. चांगली म्हणण्यापेक्षा नेहमीसारखीच. काही वेळ चांगले वाटते. मग तोच जुना टिपिकल अभिनय.

सचिनला तरुण दाखवून आताच्या तरुण नायिकेसोबत नाच करणे डोक्यात जाते. त्यापेक्षा सुप्रीयालाच घेऊन काही चित्रपट काढला असता तरी चालला असता.

शेवटपर्यंत मग चित्रपट आपल्या जुन्या थाटातच. असो सांगायची गरज नाही वाटत. नंतर कधी वाटल्यास नीट परीक्षण लिहीन.

अरे हो.. तो जुना हिंदी चित्रपट सांगायचाच राहिला. संजीव कुमार, फारुख शेख, अनिता राज अभिनित लाखों की बात. त्यातील संजीव कुमारला एकदम चतुर दाखवणे, त्याच्याशी हात मिळवल्यास हाताची बोटे पुन्हा मोजून घेणे हे लहान प्रकार ही उचलले गेले आहेत.
थोडक्यात सचिन ने नवीन काही न आणता जुन्याच चित्रपटाची 'आयडियाची कल्पना' घेऊन खास काही दाखवले असे वाटले नाही.

आणखी एक मराठी चित्रपट चांगला वाटला होता. 'एक डाव धोबीपछाड'. त्या चित्रपटाची कल्पना आणि त्यांचा सर्वांचा अभिनय मस्त वाटला होता. म्हटले मराठीत असे वेगळे चांगले चित्रपट ही निघायला लागले. पण गेल्या आठवड्यात हिंदी चित्रपट पाहिला. मिथून चक्रवर्ती चा 'डॉन मुथू स्वामी'. त्याची ही तीच कथा. वाटले मराठीवरून घेतला असेल. (होते असे कधी कधी. माहेरची साडी नाही का नंतर साजन का घर म्हणून आला होता?) पण ह्या दोघांचे प्रदर्शित होण्याचे वर्ष एकच. तारीख/दिनांक माहीत नाही.

जर यांची आयडियाची कल्पना ही दुसऱ्याची आहे तर मूळ कल्पना कोणाची? म्हणजेच मूळ चित्रपट कोणता सांगाल का?


डिसेंबर २९, २०१०

"लता मंगेशकर ए आर रहमान करीता पहिल्यांदा गाणार." 
’दिल से’ चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी त्या लोकांनी जाहिरात केली होती. मी आणि माझ्या मित्राची चर्चा चालू होती की लता मंगेशकर ने गाणे गायला सुरूवात केल्याच्या कितीतरी वर्षांनंतर हा संगीतकार आला. त्यात मग लता मंगेशकर ने त्याच्याकरीता गाणे गायले ह्यात एवढे काही खास नाही. (लता मंगेशकर ओ. पी. नय्यर कडे गायली नाही ही गोष्ट सोडा. ती गोष्ट घडली असती तरी बातमी झाली असती का माहित नाही.) पण चित्रपटसृष्टीत (आणि इतरत्र ही) असे पहिल्यांदा होणारी, खूप वर्षांनी होणारी गोष्ट प्रकाशझोतात आणली जाते. काही वेळा त्यात किती तथ्य असेल ते ही न पाहता. अनुराधा पौडवाल ने १९९८/९९ मध्ये कोणत्या तरी सिनेमात गाणे गायले होते तेव्हाही असेच काहीतरी म्हणत होते की अनुराधा पौडवाल १० वर्षांनी पुन्हा चित्रपटात गाणे गात आहे. पण त्या आधीच १९९७ मध्ये ’और प्यार हो गया’ चित्रपटात तिचे गाणे ऐकले होते. आता शोधले तर १९७६ ते २००८ मध्ये प्रत्येक वर्षी तिने गाणे गायलेले दिसते. त्यांना बहुधा ’टी सीरीज’च्या बाहेर १० वर्षांनंतर म्हणायचे असेल. आमिर खान आणि काजोलचा ’फना’ सिनेमा आला तेव्हा दोघे पहिल्यांदा एका चित्रपटात, एका फ्रेम मध्ये असे काही तरी चालले होते. पण त्या आधी दोघे ’इश्क’ चित्रपटात येऊन गेले होते हे ते लोक विसरले होते किंवा मग त्यांना हे दोघे नायक-नायिका जोडीत पहिल्यांदा आलेत असे म्हणायचे असेल.


असो. हे जुने झाले. आता नवीन ताजी बातमी आहे. मराठीतील दोन दिग्गज कलाकार/दिग्दर्शक पहिल्यांदा एकत्र येत आहेत, ’आयडियाची कल्पना’ ह्या नवीन चित्रपटात. ते दोघे आहेत महेश कोठारे आणि सचिन (पिळगांवकर). ही गोष्ट खरोखरच बातमीसारखी आहे असे मला तरी वाटते. गेले कित्येक वर्षे मी मराठी चित्रपटांबद्दल बोलतो तेव्हा ह्या दोघांचे नाव अर्थातच पुढे असते. त्यातच माझ्या निरीक्षणातील गोष्ट होती की महेश कोठारेच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे नेहमी असायचा आणि सचिनच्या चित्रपटात अशोक सराफ. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे अनुक्रमे सचिन आणि महेश कोठारेंच्या चित्रपटात अधून मधून असत. पण सचिन आणि महेश कोठारे हे एकमेकांच्या चित्रपटात नव्हते. आता कित्येक वर्षांनंतर महेश कोठारे सचिनच्या दिग्दर्शनाखाली त्याच्या चित्रपटात काम करणार आहे. ही माझ्याकरीता बातमीच आहे. 

तसेच ह्या चित्रपटाद्वारे आणखी एक गोष्ट पहिल्यांदा होत आहेत. ते म्हणजे गायनानंतर आता सचिनचे संगीतकार म्हणून नवीन क्षेत्रात पदार्पण.

सचिन आणि महेश कोठारेचा विषय निघालाच आहे तर आणखी एक जाणवलेली गोष्ट. सचिनच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचे (आणि इतर सर्वजणांचेही) काम संतुलित वाटायचे. पण महेश कोठारेच्या चित्रपटात तो मोकाट सुटलेला दिसायचा. आणि बहुधा इतरही लोक. 

आता ह्या नवीन चित्रपटात पाहू कोणाचे काम कसे आहे ते आणि एकंदरीत पूर्ण चित्रपट कसा आहे ते.

(जाता जाता: आमिर खानचा पहिला चित्रपट ’कयामत से कयामत’ किंवा खरे तर ’यादों की बारात’ हा आहे. त्याच्या भावाचा, फैजल खानचा, पहिला चित्रपट कोणता? )

डिसेंबर २७, २०१०

’तीस मार ख़ान’ ह्या अक्षय कुमार अभिनित चित्रपटाबद्दल गेले काही दिवस ऐकत होतो, पाहत होतो. अक्षय कुमारचे ह्या आधीचे विनोदी चित्रपट आवडले होते ('दिवाने हुए पागल' सारखे अपवाद सोडून) त्याचे अशा चित्रपटांतील कामही आवडत होते. तसेच फराह खान चे ही ह्या आधीचे दोन चित्रपट (’मैं हू ना’ आणि ’ओम शांती ओम’) चांगले वाटले होते. म्हणून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होतीच. त्यात मग शनिवार २५ डिसें ला हा चित्रपट पहायची संधी मिळाली.





पण चित्रपटाच्या सुरूवातीलाच काही अंशी अपेक्षाभंगाला सुरूवात झाली. पहिल्या प्रसंगापासूनच सर्व लोकांचा म्हणजे सचिन खेडेकर, विजय पाटकर, अक्षय कुमार, अली असगर, कतरीना कैफ, अक्षय खन्ना ह्यांचा अभिनय हा नाटकीच वाटत गेला. आता नाटकी म्हणजे नाटकात पहायला मिळतो तसा नाही. तिथेही सुंदर अभिनय पहायला मिळतो. पण इथे तसला प्रकार नाही. गाणी बरी आहेत. ’शीला की जवानी’ हे बहुचर्चित गाणे मी तरी पहिल्यांदाच पाहिले. ऐकायलाच बरे वाटते. चित्रपटाची कथा तेवढी चांगली वाटली आणि पुर्वार्धापेक्षा उतरार्ध त्यामानाने चांगला आहे, थोडा वेगवान. त्यामुळे मग चित्रपट एकदम आवडला तर नाही पण कंटाळवाणा नाही वाटला. अरे हो, चित्रपटाच्या सुरूवातीचे आणि शेवटचे नामप्रदर्शन चांगले आहे.


फराह खानचा ’ओम शांती ओम’ आला तेव्हा ऐकले होते की ज्यांना ’मै हूं ना’ आवडला नसेल त्यांना ’ओम शांती ओम’ आवडेल. माझ्याकरीता तरी ’मैं हूं ना’ एकदम चांगला चित्रपट होता. ’ओम शांती ओम’ त्यापेक्षा कमी. पण ’तीस मार खान’ एकदमच कमी. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर एका तासात मी हा चित्रपट पाहिल्याचेही विसरून गेलो होतो.


माझ्याकडून तरी चित्रपटाला ५ पैकी २ ते २.५ तारे मिळतील ;)
(चित्रपटाचे चित्र indiafm.com वरून)

नोव्हेंबर २२, २०१०

CBFC कडून दिलेल्या जाणार्‍या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली.

असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही.

त्यातील काही नावे म्हणजे:


'संतान' -
कलाकार जितेंद्र. जुना चित्रपट आला होता १९७६ मध्ये. आणि त्यानंतर १९९३ मध्ये. पहिल्या चित्रपटात जितेंद्रनेच संतान साकार केला होता. दुसर्‍या चित्रपटात दिपक तिजोरीने आणि जितेंद्र ने त्याच्या वडिलांची भुमिका केली होती.

'दिवार'
-  कलाकार अमिताभ बच्चन. पहिला आला होता १९७५ मध्ये. सह कलाकार शशी कपूर (भाऊ). दुसरा २००४ मध्ये. सह कलाकार अक्षय खन्ना (मुलगा).

'बरसात'
- कलाकार बॉबी देओल. पहिला चित्रपट आला होता १९९५ मध्ये. ग्रीक देवतेच्या पुतळ्याप्रमाणे दिसणारा बॉबी देओल (असे मी ’गुप्त’ चित्रपटाच्या परीक्षाणात वाचले होते :) ) नंतर फार चमकला नाही, पण त्याचे चित्रपट मधे मधे येत राहिले. २००५ मध्ये  त्याच्या पुन्हा 'बरसात' नावाच्या चित्रपटाचे नाव पाहिले तेव्हा वाटले होते, की ह्याचा पहिला आणि शेवटचा दोन्ही चित्रपट एकाच नावाचे असतील की काय? ;) पण तसे झाले नाही.


मला सध्या तरी आठवत असलेल्या तीन चित्रपटांची ही नावे. तुम्हाला आणखी माहीत असल्यास जरूर सांगा. तेवढीच आपल्या गंमतीशीर ज्ञानात थोडी भर :)


जाता जाता- १९९९ मध्ये आलेल्या 'संघर्ष' ह्या सिनेमात अमन वर्मा ह्या कलाकाराने काम केले होते. त्याचे नाव चित्रपटात दुसरेच होते. पण अक्षय कुमारचे नाव त्या चित्रपटात अमन वर्माच होते. हा योगायोग होता का?

नोव्हेंबर १४, २०१०

'गोलमाल', 'चष्मेबद्दूर', 'चुपके चुपके': मजेदार, विनोदी चित्रपट. भरपूर वेळा पाहिलेले. त्यांचा व्हिसीडी संच घेतला होता. आता नाही आहे.

 

मग दुकानात 'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके' ह्यासोबतच 'खट्टा-मिठा' हा चित्रपट मिळून चार चित्रपटांचा डिव्हीडी संच असलेला पाहिला. तो घ्यायचे ठरवले.


पण मग परवा नवीन काय आले आहे हे पाहण्यास दुकानात गेलो तिथे हा १२ विनोदी चित्रपटांचा नवीन संच दिसला "फूलटू कॉमेडी".


ह्यात होते:
'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके',
'बावर्ची', 'सत्ते पे सत्ता',
'हेराफेरी', 'फिर हेराफेरी',
'नो एंट्री', 'हलचल', 'आवारा पागल दिवाना',
'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी'

शेवटच्या ३ पैकी 'आवारा पागल दिवाना', 'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी'. ह्यातील आवारा पागल दिवाना कधी तरी पूर्ण पाहिला होता. चांगला वाटला. पण एकदम नाही. 'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी' मी पूर्ण पाहिलेले नाहीत. पाहताना बरे वाटले. चांगले आहेत असे ऐकले होते. पण बाकीचे ९ चित्रपट भरपूर वेळा पाहिलेले आणि आवडलेले. त्यांच्याबाबतीत तर काही म्हणालयाच नको. त्यामुळे रू. ९९९/- किंमतीच्या मानाने १२ चित्रपटांचा हा संच वाजवी दरात मिळतोय असे वाटले. लगेच खरेदी केला. (आणि कोणाला घ्यायचा असेल तर शेमारू च्या संकेतस्थळावरूनही मागवू शकता. किंमतही कमी. मला नंतर कळले :( )

कंटाळा आला की आता ह्यातील एखादा चित्रपट काढून पाहता येईल. :)


('नॉन स्टॉप कॉमेडी' आणि 'कॉमेडी क्लब'ची चित्रे शेमारू च्या संकेतस्थळावरून साभार.)

नोव्हेंबर ११, २०१०

त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, ’छोटा चेतन’ द्वारे.  आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला ’शिवा का इन्साफ’. ’सामरी’ सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :)


त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी पुस्तके आणून वाचण्याचा कार्यक्रम झाला. नंतर आलेली ’छोटा चेतन’ची नवीन आवृत्ती हरीश आणि उर्मिला मातोंडकरला सोबत घेऊन. चित्रपटगृहात तर नाही पहायला मिळाली, नंतर एका दूरदर्शन वाहिनीवरच पाहिली. २००३ मध्ये आलेला ’छोटा जादूगर’ सिनेमा ही पुन्हा त्रिमितीच.


खूप वर्षांनी म्हणजे साधारण १८ वर्षांनी पाहिलेला. एवढ्या काळात तो अनुभव थोडाफार विसरून गेलो होतो. पण ह्या चित्रपटाने पुन्हा मजा आली. माझ्या निरिक्षणशक्तीने त्यातील फरक ओळखायचा प्रयत्न केला होताच. आधीचे त्रिमिती चष्मे हे निळ्या आणि लाल काचांचे (प्लॅस्टिक) चे बनविलेले होते. पण हे पूर्ण राखाडी रंगाचे होते. चित्रातही बदल होताच. नेमका काय बदल झाला तो तेव्हा शोधायचा प्रयत्न केला नाही, नंतर केला. पण ती माहिती मी येथे देत नाही. विकिपिडियावर फार चांगल्या रितीने दिले आहे ते. ;)


थोडे शास्त्र आणि तांत्रिक बाजू पाहताना मी वाचलेल्या ऐकलेल्या काही गोष्टी सांगतो. आपल्या दोन्ही डोळ्यांनी मिळून आपल्याला अंदाजे २०० अंशांपर्यंतचे दष्य दिसते आणि एका डोळ्याने फक्त १२० अंशांपर्यंत दिसते. अर्थात फक्त दृष्यविस्तार नव्हे तर दोन डोळ्यांमुळे त्रिमितीचा अनुभव ही येतो. एका डोळ्याने वस्तूची लांबी आणि रूंदी (किंवा उंची) दिसते तर दुसया डोळ्यामुळे त्या वस्तूची खोली किती आहे त्याचा अंदाज येतो. त्याचा फायदाच होतो. पण ह्यातच एक उलट गोष्ट आहे. सुईत दोरा टाकताना दोन डोळ्यांनी सुईतील छिद्राचा अंदाज येत नाही त्याकरिता आपल्याला एक डोळा बंद करून द्विमितीचा उपयोग करावा लागतो.


असो, शास्त्र बाजूला ठेवून इतर भाग. त्रिमिती चित्रपटांप्रमाणेच आणखी एक प्रकार फार पहायला मिळतो, तो म्हणजे होलोग्राम. एखादे चिन्ह किंवा चित्र त्रिमितीचा आभास निर्माण करून दाखवले जाते. हा प्रकार लहानपणी वापरलेल्या पट्ट्य़ांमध्ये ही पहायला मिळाला होता. पण मुख्यत्वे, एखादी वस्तू ओरिजिनल किंवा अस्सल आहे हे ओळखण्याकरीता उत्पादक आपल्या उत्पादनावर आपले मानकचिन्ह होलोग्राममध्ये बनवून चिकटवितात. आता जर नकली उत्पादकानेही तसाच होलोग्राम बनविला असेल तर त्यामध्ये अस्सल कोणते आणि नकली कोणते हे ओळखण्यात काही वेळा गल्लत होऊ शकते असे मला वाटते. :)


गेल्या वर्षी पुन्हा ३ त्रिमिती चित्रपट पाहिले. एक पूर्ण ऍनिमेशन (Ice Age 3), दुसरा मिश्र (G Force) आणि तिसरा संपूर्ण नेहमीसारखा (Final Destination 3D). ह्यातही दाखविले जाणारे चित्र तसेच चष्मा ह्यात बदल वाटला. तसेच भरपूर चित्रपट त्रिमितीमध्ये येत आहेत असे जाहिरातींत दिसले. एका मित्राने सांगितले की ते तंत्रज्ञान विकसित केल्याने त्रिमिती चित्रपट बनविणे थोडे सोपे झाले असल्याने धडाधड त्रिमित्री चित्रपट बनत आहेत. त्याचा फायदा आपल्यालाच.


त्यानंतर चर्चा वाढलीय त्रिमिती दूरदर्शन संचाची. एका संचासोबत १ ते २ त्रिमितीदर्शक चष्मे. कारण थेट त्रिमिती आभास तर मिळू शकत नाही. त्यामुळे चित्रपटगृहाचा अनुभव घरी एवढाच फरक असेल का? इतर देशांनंतर आपल्या देशात ह्याचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाले असे वाटतेय. ह्या दिवाळीत तर काय त्रिमित्री दूरदर्शन संच आणि LED संचांची भलतीच जास्त जाहिरात होत होती. आमचा घरचा दूरदर्शन संच बिघडण्याच्या मार्गावरच आहे. त्यामुळे एकाने सल्ला दिला, थोडे थांबून 3D संचच घे. पण मला तसे वाटत नाही. कारण एक तर त्याची किंमत भरपूर जास्त आहे. इतर देशांत तरी त्रिमिती वाहिन्या बनविणे चालू झाले आहे. पण भारतात तशा वाहिन्या बनण्याला बहुधा ३/४ वर्षे जातील असे मला वाटते. पण ज्याप्रकारे दूरदर्शन संच जरा जास्त वेगात भारतात आले त्याच वेगात वाहिन्याही आल्या तर काय सांगता येत नाही. असो. पण मी तरी सध्या त्रिमिती दूरदर्शन संचाच्या मागे नाही.


आता गेल्या महिन्यापासून त्रिमिती भ्रमणध्वनीची ही जाहिरात येत आहे. त्यात वापरायचा पडदा तसेच व्हिडियो त्रिमितीमध्ये दिसेल असा त्यांचा दावा आहे. मी तरी अजून तो भ्रमणध्वनी पाहिला नाही आहे. पण त्यात बिना चष्म्याने त्रिमितीचा अनुभव मिळणे कितपत शक्य आहे अशी शंका वाटते. अर्थात होलोग्रामप्रमाणे तर असेलच किंवा त्याहीपेक्षा भरपूर जास्त. पण तंत्रज्ञानाने आघाडी घेतली असेल तर चांगलेच आहे.


असो, आता एवढे त्रिमितीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने दर्शक आणि ग्राहक ह्यांना फायदा आहेच. आणखी काय काय पुढे येते ते पाहूच.

ऑक्टोबर २३, २०१०

नगीना, निगाहें
स्टाईल, एक्स्क्युज मी
कोई मिल गया, क्रिश
धूम, धूम २
वास्तव, हथियार
सरकार,सरकार राज
फू़ंक, फूंक २

सर्व सिक्वेल... म्हणजे दुसर्‍या भागात कथा पुढे नेलेली.
'आंखे' चा दुसरा भाग येणार असे ऐकले होते. पण अजून काही बातमी आली नाही.

इंग्रजी चित्रपट भरपूर निघालेत. त्यांची नावे नकोत.

तसेच तेच कलाकार आणि तीच नावे घेऊन चित्रपट आलेत.
जसे 'मुन्नाभाई एम बी बी एस' आणि 'लगे रहो मुन्नाभाई'.
'गोलमाल', 'गोलमाल रिटर्न्स'
दोन भागांत कथा वेगळ्या, पण पात्रे तीच. त्यांची पद्धत तीच.

आता वरील पैकी मी फूंक चे दोनही भाग नाही पाहिलेत. बाकी सर्व चित्रपट पाहिलेत.

'स्टाईल' नंतर 'एक्स्क्युज मी' च्या वेळी एन. चंद्रा ह्यांनी सांगितले की त्या चित्रपटाचा तिसरा भाग काढणार आहेत.
'सरकार राज' नंतर राम गोपाल वर्माने सांगितले की 'सरकार' चा तिसरा भाग बनवणार आहेत.
'मुन्नाभाई चले अमेरिका' चे तर ट्रेलर पण २००७ पासून पाहत आहोत. (किंवा तेव्हाच पाहिले होते)

पण ह्या सर्वांत 'गोलमाल' ने बाजी मारली. त्यांचा 'गोलमाल ३' तयार होऊन आलाही. ५ नोव्हें ला प्रदर्शितही होणार आहे.
ह्याचे दोनही भाग चित्रपटगृहात पाहिले नाहीत. 'गोलमाल' व्हीसीडी आणून पाहिला. 'गोलमाल रिटर्न्स' डीव्हीडी वर.

आता ह्याचा तिसरा भाग कसा पाहू? चित्रपटगृहात की आधीप्रमाणे व्हिडीयो वर प्रदर्शित झाल्यावर? व्हीसीडी, डीव्हीडी नंतर नवीन पर्याय म्हणून 'ब्लू रे डिस्क' नका म्हणू. ;)

सप्टेंबर २८, २०१०

गेले २ दिवस 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ची गाणी ऐकली. पुन्हा एकदम ताजेतवाने वाटायला लागले. पूर्ण ७ गाणी त्याच प्रकारे ज्या प्रकारे कॅसेट मध्ये आहेत. एकामागोमाग एक. त्याच क्रमात :)
आणि मग सिनेमाही डोळ्यांसमोर आला.

नाही. मी ह्या सिनेमाचे किंवा गाण्यांचे परीक्षण लिहिणार नाही आहे. १५ वर्षांनंतर त्या सिनेमाचे परीक्षण लिहिण्यात काय मजा नाही. मजा आहे ती हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहण्यात. इथे लिहिणार ते फक्त मनातील विचार. 

हा सिनेमा मला खूप आवडला. पहिल्यांदा पाहीला तेव्हा मधूनच पाहिला होता. तेव्हा माझे अभियांत्रिकीचे पहिले वर्ष होते. दिवाळीच्या सुट्टीत घरी आलो, तेव्हा पाहणार होतो. पण नाही जमले. पण एकदा कसातरी पोहोचलो सिनेमाला. त्यांची ट्रेन सुटते तेव्हापासूनचा पाहिला. तेव्हा काही खास वाटला नाही. पण त्यानंतर जेव्हा पूर्ण पाहिला तेव्हा आवडला. नंतर पाहत गेलो आणखी आवडत गेला. त्यानंतर १ २ वर्षात १७ वेळा चित्रपटगृहात जाऊन पाहिला. नंतर त्याची व्हीसीडी आली त्यानंतर किती वेळा पाहिला त्याची गणती नाही. :)

महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षी हा सिनेमा त्या गावी आला. पहिल्याच दिवशी पहायला गेलो. तिकडे काय ओपन थियेटर. आत खुर्च्या नाहीत. खडी/वाळुवर बसायचे. त्या सिनेमाची लोकप्रियता माहित होती आणि आमचा आवडता सिनेमा. म्हणून भरपूर आधी जाऊन बसलो. गेलो तेव्हा पूर्ण मोकळे मैदान. पण चित्रपट सुरू होईपर्यंत एवढी गर्दी झाली की इकडे तिकडे हलायला जागा नव्हती. आणि जास्त करून आम्ही विद्यार्थीच. अभियांत्रिकी, वैद्यकिय महाविद्यालयातले. पूर्ण धमाल.

शाहरूख खान आणि काजोल चा अभिनय की राज-सिमरन ची प्रेमकथा, इतर ही भरपूर काही. चित्रपटात काय आवडले ते नेमके सांगता येणार नाही. आणि असे म्हणतात की काही आवडले तर का आवडले ते शोधत बसू नये. त्याचा फक्त आनंद घ्यावा.

गाणी तर काय मस्त. एक एक शब्द. कथानकाला धरून. ही गाणी एवढी आवडली की कुठेही ऐकली, कोणत्याही कडव्यापासून किंवा मधल्या संगीतापासून. पुढील गाणे आपोआप गुणगुणणे सुरू होते. त्यावेळी तर जर कधी मूड खराब असला तर मी फक्त ह्या चित्रपटाची गाणी लावून ठेवायचो. मग थोडया वेळात मूड मस्त. अर्थात चित्रपटाचे संवाद आणि दृष्यही सर्व पाठ होते.  एवढे की कधी जर सुरूवातीपासून सिनेमा डोळ्यांसमोर आला तर पूर्ण संपेपर्यंत एक एक दृष्य आठवणार.

आणखी एक आहे. ह्या चित्रपटानंतर काजोल मला आवडायला लागली. 'दिलवाले दुल्हनिया...' सर्वात आवडता सिनेमा आणि काजोल ही सर्वात आवडती अभिनेत्री.  अजून तरी त्यात काही बदल नाही पडला.

सिनेमा पुन्हा पहावासा वाटतोय. पण सध्या उपलब्ध नाही. पाहिन ऑनलाईन आहे का?  (पायरेटेड नाही. शिव्या नका घालू मला. राजश्री किंवा बिगफ्लिक्स वर. अधिकृत)

ह्या चित्रपटाबद्दल भरपूर लिहावेसे वाटते. पण नंतर कधीतरी...

आता पुन्हा तीच गाणी लावून ठेवतो. आणि हो, आता ह्या आठवड्यात परत भारतात येणार तर, 'घर आ जा परदेसी..' गाणे ही प्रसंगाला धरूनच आहे ;)

एप्रिल १५, २०१०

पुढे लिहिलेले चित्रपट मी कमीत कमी २ वेळा तरी पाहिले आहेत (पहिले चार) किंवा एकदाच पाहिले असल्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. त्यानुसार मी हे आवडलेले चित्रपट म्हणून सांगत आहे. ह्या चित्रपटाच्या कथानकाचा, कलाकारांच्या कलेचा दर्जा एकदम उच्च नसला तरी आवडण्यासारखाच वाटला. तसेच आता पाहिल्यास तेवढेच आवडतील का ह्याची खात्री मलाही नाही :) पण तुम्हा सर्वांसमोर ही यादी देण्यासारखे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. तसेच कथानक लिहिण्यास/वाचण्यास आवडत नसले तरी वाचकांना ह्या चित्रपटांची ढोबळ कल्पना यावी म्हणून तेही लिहिले आहे.

यूंही कभी
-एक साध्या, नेहमी लोकांना मदत करणार्‍या माणसाला देव भेटतो व जगाचे रक्षण करण्याकरीता लोकांना संदेश देण्याकरीता सांगतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग ह्यात दाखवलेले आहेत.
कलाकार: कुमार भाटिया, अशोक कुमार, अर्चना पुरण सिंह, नविन निश्चल.

ऐसी भी क्या जल्दी है?
-इंग्रजी सिनेमा ’फादर ऑफ द ब्राईड’ वरून घेतलेला सिनेमा. स्वत:च्या मुलीवर अतिप्रेम करणार्‍या व अतिचिंता करणार्‍या वडिलांचे, मुलगी लग्न झाल्यावर घरातून जाईल ह्या कारणाने मुलीच्या आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात/लग्नात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे दाखवले आहे.
कलाकार: सचिन, सॄष्टी बहल, विवेक मुशरन, अर्चना पूरण सिंह

हंसते खेलते
-पृथ्वीवरील वाढते असामाजिकीकरण आणि पृथ्वीचा होणारा र्‍हास पाहून देव पृथ्वीचा संपूर्ण नाश करण्याचे ठरवतो. पण ३ देवदूत त्याला विरोध करतात. तेव्हा देव त्यांना संधी देतो की एका आठवड्यात एखादा माणूस दाखवावा जो स्वार्थ न दाखवता इतरांवर प्रेम करेल व प्रसंगी त्यागही करेल. ह्या प्रकरणी ते ३ देवदूत राहूल रॉय ला निवडतात. त्यांच्या कामात अडथळे आणतो सैतान
कलाकार: राहूल रॉय, असरानी, राकेश बेदी, अनंत महादेवन, इशरत अली.

ढूंढते रह जाओगे
-एक तरूण (अमर उपाध्याय) त्याच्या प्रेमिकेला भेटण्यासाठी ती असलेल्या मोठ्या हॉटेल मध्ये येतो. तिथे एका व्यापार्‍याने (सतीश शहा) आपल्या एका हिर्‍याचा लिलाव करायचे ठरवले असते. तो हिरा चोरण्याकरीता चोर (जावेद जाफरी), एक खुनी (नसीरूद्दीन शाह) हे ही आलेले असतात. त्यांच्यात झालेले विनोदी प्रसंग ह्यात दाखविण्यात आले आहेत.

दो लडके दोनो कडके
-दोन गरीब तरूण पैसे मिळविण्याकरीता एका श्रीमंताच्या मुलाला पळवून आणतात. पण त्यांच्या घरातच दोन चोर चोरी करायला आलेले असताना त्या मुलाला पळवून नेतात. त्यानंतरचे प्रसंग.
कलाकार: अमोल पालेकर, असरानी. बाकीचे आठवत नाहीत :)

तेरा नाम मेरा नाम
-अजीत पाल आणि (बहुधा) बबलू मुखर्जी हे दोन तरूण मित्र. एक ब्राह्मण व दुसरा इतर जातीतला. ब्राह्मण मुलाला नोकरी पाहिजे असते पण तिथे आरक्षणामुळे त्याला मिळत नाही तर दुसर्‍याचे एका मुलीवर प्रेम असते. पण तिचे वडील तो ब्राह्नण नसल्याने त्याला विरोध करतात. म्हणून दोघेही नाव बदलतात. त्यानंतरची कथा दाखविली आहे.
ह्या सिनेमाचे नाव तेव्हा मला माहित नव्हते. पण एकदा दूरदर्शनवर रात्री दाखवला होता तेव्हा पाहिला. तेव्हा बरा वाटला. त्यानंतर पाहिले की ह्याच कथेवर नंतर आशिक मस्ताने (१९९६) आणि तेरे मेरे सपने (१९९६) हे चित्रपट ही बनलेत.

इना मिना डिका (मराठी)
-प्रशांत दामलेला (इना) कुठेही,केव्हाही झोपायची सवय असते. आणि त्याने झोपताना जे छायाचित्र पाहिले असते ते तो झोपलेला असेल तोपर्यंत प्रत्यक्षात येतात. त्याची बायको आणि त्याचा मित्र अशोक सराफ (मिना) त्याला एका डॉक्टरकडे , सुधीर जोशी (डिका) घेऊन जातात. डिका त्याच्या ह्या सवयीचा आणि चमत्काराचा फायदा घेऊन पैसे कमवायचा विचार करतो. त्यानंतरचे कथानक.
नंतर ह्याच नावाचा हिंदी सिनेमाही आला होता, ऋषी कपूर, जुही चावला आणि विनोद खन्ना ह्यांचा. पण त्या चित्रपटाच्या मानाने हा मराठी चित्रपट चांगलाच वाटला ;)

ही यादी पूर्ण नाही आहे. पण सध्या एवढेच आठवत आहेत. जमल्यास पुन्हा लिहिन.
तुम्हालाही असे काही वेगळे चित्रपट आवडले आहेत का?

एप्रिल ०५, २०१०

'ब्लू' नावाचा सर्वात जास्त खर्च केलेला हिंदी सिनेमा चालला नाही आणि २ ते ३ महिन्यात कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आला. त्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी', अलाद्दीन वगैरे चित्रपटही फार थोड्याच दिवसांत दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात आले. ह्यावरून मनात सर्वसाधारणपणे विचार येत होते की हे चित्रपट चालले नाहीत म्हणून दाखवतात का? त्यातच काल मटामध्ये हा लेख वाचला आणि हे वाचत असतानाच लहानपणापासूनचे अनुभव डोळ्यांसमोरून गेले.

साधारण ८६/८७ च्या काळापासून (आधीचे आठवत नाही) सर्व चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची विडीयो कॅसेट (चलचित्रफीत) त्याच दिवशी सर्व विडीयो कॅसेट लायब्ररीमध्ये मिळायची (इथे मराठी भाषांतर करत नाही आहे कारण तेच नाव वापरात होते) त्याच काळात आमच्या घरात नवीन व्हीसीआर आला असल्याने जवळपास दररोजच एका चित्रपटाची कॅसेट आणली जात होती. नंतरही पाहिजे तेव्हा एखादा सिनेमा आणून पाहिला जात असे.

तेव्हा एका कॅसेटचे भाडे १० रू पडत असे. पण नंतर मागणी पुरवठा तत्त्वावर काही चित्रपटांकरीता ते वाढून १५ रू ही केले होते. मला आठवतोय तो 'गंगा जमुना सरस्वती' चित्रपट. ह्याच्या कॅसेटचे १५ रू घेतले असे सांगण्याकरीता त्या दुकानदाराने घरी एक चिट्ठी लिहून पाठवली होती. तसेच काही चित्रपटांच्या कॅसेटकरीता वेळेचे बंधन होते. ४/५ तासांत परत करणे वगैरे. 'मि. इंडिया' सिनेमाकरीताही असेच बंधन होते. नेहमीच ती कॅसेट मिळत नव्हती. एके दिवशी घरून चर्चा करून निघालो पण घेऊन आलो 'सुहाग' सिनेमा. बहिण म्हणाली, ' मि. इंडिया' ची कॅसेट लवकर पाहून परत करायची या कारणाने वडिल कार्यालयातून लवकर आले होते. पण मी घोळ घातला होता :|

ह्म्म.. कॅसेट चर्चा खूप झाली. सांगायचा मुद्दा हा की चित्रपटाची कॅसेट प्रदर्शित झाल्याच्या दिवशीच मिळायची. तरीही चित्रपटगृहांत गर्दी असायची तो भाग वेगळा. 'आंखे' सिनेमा (गोविंदाचा) चित्रपटगृहातच एवढा चालला होता तेव्हा मी आणि माझी बहीण बोलत होतो की हा सिनेमा एवढा कसा चालतोय? पण मित्राच्या घरी कॅसेटवर तो सिनेमा पाहिला, आवडला आणि कारण कळले. तसेच तेव्हा केबल हे प्रकरण नवीनच सुरू झाले होते. त्यावरही मग ते चित्रपट दाखवणे सुरू होते. त्यामुळे कॅसेट आणणे बंद नाही झाले तरी कमी झाले, केबलवर सिनेमा पाहणे सुरू झाले. पण तरीही काही चित्रपट पहायला आम्ही आवर्जून चित्रपटगृहात जायचो. त्यातच होता 'अंदाज अपना अपना'. ह्या सिनेमाची आम्ही १३ जणांनी तिकिटे काढली होती. रविवारी संध्याकाळी चित्रपट पहायला जायचे तर शनिवारी रात्री केबलवर तो चित्रपट दाखविला जात होता. पण आम्ही तेव्हा पाहणे कटाक्षाने टाळले. कारणे २. एक तर चित्रपटाची तिकिटे काढली होती आणि दुसरे म्हणजे कधीतरीच आमचा गट चित्रपट पहायला एकत्र जात होता, तिकडे जास्त मजा आली असती.

त्याच काळात मग (माझ्या माहितीप्रमाणे) 'हम आपके है कौन!' च्या वेळी राजश्री प्रॉडक्शन ने त्या चित्रपटाची चित्रफीत प्रदर्शित केली नाही व सुरूवातीला एकच प्रिंट लिबर्टी सिनेमाकरीता आणि मग नंतर फक्त २७ प्रिंट काढल्या होत्या. आणि काही चित्रपटगृहांमध्ये तिकिटांचे दरही वाढविले होते. पण तो चित्रपट तुफान चालला. हे मुख्य कारण असेल बहुधा. आणखी काय गणिते होती मला अंदाज नाही. पण सर्व चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची चलचित्रफीत बनवून त्याच दिवशी प्रदर्शित करणे बंद केले. ते आजतागायत चालू आहे. ह्यामुळे कितपत फायदा त्यांना झाला हे तेच सांगतील पण चित्रपट चाचेगिरी (पायरसी) वाढली असे म्हणतात आणि तसे दिसत आहेच.

त्यानंतर आले मल्टिप्लेक्स. त्यांनी तर तिकिटांचे दर अवाजवी वाढवून ठेवले. पण तरीही लोकांचे चित्रपटगृहात जाणे बंद झाले नसले तरी पायरसी वाढली असे म्हणता येईल. कारण ज्या ठिकाणी ३०/४० रू बालकनीला द्यायचे तिथे ८०/१००, नंतर १५०/२०० आणि आता तर ३०० रू प्रत्येकी देण्यापेक्षा ३० ते ५० रू रस्त्यावर मिळणारी व्हिसीडी/डिव्हीडी घेणे लोकांना स्वस्त वाटणे आणि त्यांनी त्या विकत घेणे स्वाभाविक झाले.

असो, ह्या सर्वांवर तोडगा म्हणून निर्मात्यांनी मटाच्या लेखात लिहिलेला मार्ग अवलंबिला असला तरी त्यामुळे आपला (प्रेक्षकांचा) फायदा हा निश्चितच आहे असे वाटते. कारण साधारण २ महिन्यांत नवीन सिनेमा एखाद्या वाहिनीवर दाखवला जातो. त्यामुळे घरबसल्या पाहता येतो. पण त्यात व्यत्यय असतो जाहिरातींचा. जर तो व्यत्यय नको असेल तर दुसरा मार्ग आहे, व्हिसीडी/डिव्हीडी विकत घेण्याचा. चोरीची म्हणजे पायरेटेड नव्हे तर खरी (ओरिजिनल) :) कारण तो चित्रपट वाहिन्यांवर दाखवला गेला म्हणजे त्याचा व्हिडीयो प्रदर्शित झाला असे म्हणता येईल आणि मग त्याची व्यवस्थित, खरी आवृत्ती बाजारात विकत मिळते. आणि त्यात तर काय, मोझर बेयर ने अतिशय कमी किंमतीत पर्याय उपलब्ध करून दिला आहे त्याचा फायदा घेऊ. 'ब्लू', 'अजब प्रेम की गझब कहानी' आणि कालच पाहिलेला 'दे दना दन' हे चित्रपट मी दूरदर्शन वाहिन्यांवरच पाहिलेत. आणि आज नाही पाहिला तर आपल्याला तो सिनेमा पाठ होईपर्यंत त्या वाहिनीवर दिसत राहील याची सोय त्या वाहिन्या करत आहेतच की ;).

तर मग काय, आधी होत असल्याप्रमाणेच चित्रपटगृहात पाहणे आवडत असल्यास, परवडत असल्यास सिनेमा पहायला चित्रपटगृहात जा, नाही तर थोडे दिवसांनी घरी पहायला मिळेलच :)

जानेवारी १६, २०१०

लाफ्टर चॅलेंज नंतर प्रसिद्ध झालेला विनोदी कलाकार सुनील पाल ह्याने दिग्दर्शित व निर्माण केलेला 'भावनाओं को समझो' नावाचा सिनेमा काल प्रदर्शित झाला. हा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही. ह्या सिनेमाबद्दल मला माहितही नव्हते. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ह्या सब टीव्ही वरील विनोदी मालिकेत सुनील पाल पाहुणा कलाकार म्हणून आल्यानंतर कळले. त्या मालिकेत खरं तर सिनेमाची जाहिरात करावी हाच उद्देश होता.
असो, तर हे लिहिण्यामागचे कारण असे की आताच एका वृत्तवाहिनीवर पाहिल्याप्रमाणे ह्या सिनेमाचे नाव 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये घेण्यात आले आहे. ५१ स्टँड-अप कॉमेडियन ह्यांनी एकाच सिनेमात भूमिका केल्याने ह्या सिनेमाच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. त्या सिनेमामागील सर्व कलाकार व सहकार्‍यांचे अभिनंदन. पण एरवी कुठल्याही लहान गोष्टीला उचलून धरणार्‍या वृत्तवाहिन्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केले असे दिसतेय. फक्त एक-दोन वृत्तवाहिन्यांनीच ह्याची दखल घेतली म्हणून खंत वाटली. पण बहुधा सिनेमाच्या चमूने सिनेमाची किती जाहिरात केली असेल ह्यावरही हे थोडेफार अवलंबून आहेच.

आता हा सिनेमा कधी पहावा ह्याचा विचार चालू आहे। सुनील पाल, राजू श्रीवास्तव, जॉनी लीवर ह्यांनी सादर केलेले विनोद आधी आवडायचे। त्यामुळे त्यांचा एक विनोदी सिनेमा, तसेच आता ह्या विक्रमामुळे पहावा असे वाटते। पण लाफ्टर चॅलेंज नंतर ह्या लोकांनी सादर केलेले तेच तेच, किंवा त्याच प्रकारचे विनोद, तसेच २००७ मध्ये आलेल्या ह्या कलाकारांची भूमिका असलेला 'जर्नी -बॉम्बे टू गोवा' सिनेमा (थोडासा) पाहिल्यानंतर आता हा सिनेमा आवर्जून पहायला जावे असे सध्या तरी वाटत नाही.

जानेवारी १०, २०१०

अपेक्षेप्रमाणे 'शिक्षणाच्या आयचा घो' सिनेमाच्या नावावर वाद उठला. मराठा महासंघाने त्या नावावर आक्षेप घेतला आहे. गेल्या आठवड्यात उठलेला "झेंडा" सिनेमाचा वाद आणि आता हा. जमेल ते पक्ष , संघटना आता समोर येऊन आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहेत. ( मराठा महासंघाची पत्रकार परिषद सध्या चालू आहे त्यात तर त्यांचेच वाक्य आहे की सिनेमा प्रदर्शित झाला तर आम्ही आमची ताकद दाखवू.)
साध्या विचारांत तरी मला हे कळत नाही की नेमका सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच हे वाद का उठतात? (सिनेमाच्या पथ्यावर पाडण्यासाठीही असू शकतात हे तर भरपूर वेळा दिसतेच. पण इथे ती शक्यता आहे का?)

आता 'झेंडा' सिनेमाचे एक वेळ मानू शकतो की त्यातील दृश्यांवर किंवा त्या व्यक्तिरेखेवर त्यांचा आक्षेप आहे, ते सर्व सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळू शकतात, काही वेळा सिनेमाच्या प्रोमो मधूनही. पण सध्या तरी हा सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही आणि प्रोमोमध्ये तरी काही आक्षेपार्ह संवाद वगैरे दाखविले नाहीत. मग 'स्वाभिमान' ने सिनेमा न पाहताच त्यावर आक्षेप कसा नोंदवला?

आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्या सिनेमाबद्दल म्हणायचे, तर ह्या नावाचा सिनेमा येणार आहे हे ३ महिने आधीपासूनच आपल्याला माहीत होते. ते नाव वाचून मी तेव्हाच मित्रांना म्हणालो होतो की ह्यावर ही वाद उठणार. मग त्या मराठी महासंघाला ३ महिने काहीच माहीत नव्हते का? आधीच का नाही तक्रार आली?

आणि सरकारचे तर काय म्हणावे? नेहमीप्रमाणे बघ्याचीच भूमिका घेणार. कोणी कायदा हातात घेतला तर आम्ही पाहून घेऊ म्हणतात. त्याआधीच का नाही काही करत?

असो, आपण तर काय सिनेमा पहायला मिळेल त्यानंतरच ठरवू काय चांगले आणि काय वाईट ते.

सप्टेंबर २८, २००९

आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले.
सुरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अ‍ॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता थोडावेळ असेल. अर्थात दाखविलेला भाग, त्याची चित्रांची कला चांगलीच होती. पण मी कमल हासनचा सिनेमा म्हणून पाहत होतो. १ तास झाला तरी अनिमेशन काही संपतच नव्हते. म्हटले काहीतरी गोंधळ झाला असेल. त्याआधी मध्येच येऊन IMDB वर वाचले की कमल हासनच्या सिनेमाचे हिंदी नाव 'दशावतार'च आहे.
पण असो, मी तर हा अ‍ॅनिमेशन सिनेमा पाहत होतो की पुढे काहीतरी असेल. पण २ तासांनी सिनेमा संपला तेव्हा कळले की हा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे. :D

सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रावर दोन तारखा असतात: जारी करने की तारीख (Issue Date), समाप्ती की तारीख (Expiry Date)
ह्यात १० वर्षांचा फरक असतो. म्हणजेच ते प्रमाणपत्र १० वर्षांपर्यव वैध असते. ह्याच बाबतीत असेही ऐकले होते की त्या १० वर्षांत त्या सिनेमाचे नाव पुन्हा कोणी वापरू शकत नाही.
तर मग दशावतार नावाचेच २ सिनेमे तेही एकाच वर्षात, एकाच दिवशी आलेत, म्हणजे हा नियम आता बहुधा नसेलही.

आणि वाचनात आल्याप्रमाणेच विष्णूने जवळपास २० अवतार घेतले होते. त्यातील १०च वापरून ’दशावतार’ बनविला आहे. ते ही दोनही सिनेमांत. त्याचीही मला गंमत वाटली.

असो, मी पाहिलेला हा सिनेमा तसा चांगला वाटला पहायला. पुराणकथेतील माहिती पुन्हा पहायला मिळाली.

इतर कोणी दोन्हीपैकी एखादा सिनेमा पाहिला आहे का? त्याबद्दल तुमचे काय मत आहे?

मे ०२, २००९

गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.)



तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत. अर्थात हिंदी चित्रपट प्रदर्शित न होणे हे ही कारण असू शकेल, पण आनंद वाटला की मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्स मध्ये पाय पसरायलाही जागा मिळाली. पण प्रेक्षागृहात शिरताक्षणी तो आनंद मावळून गेला. जेमतेम १० ते १५ टक्के खुर्च्या भरल्या होत्या. असो.(बोक्याची टक्केवारीही काढायला पाहिजे असे वाटले. तो सिनेमा बहुधा अजूनही चांगला चालत आहे.)

ह्या सिनेमाची कथा तशी काही वेगळी नाही. (मला चित्रपटाची कथा ऐकायला आणि सांगायला आवडत नाही, पण ह्यात काही खास वळणं नाहीत. चित्रपटाच्या जाहिरातीतच सर्व दिसून येते.) एका गावातील एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन जण- एक आमदार, एक सरपंच. व त्या दोघांत राहून दोघांचीही कामे करत स्वतःचा फायदा करून घेणारा गावातील एक माणूस नारायण. सुरूवातीपासून आमदार टोपे (सयाजी शिंदे) आणि सरपंच डोळे (नागेश भोसले) ह्यातील एकमेकांवर वरचढ होण्याची भांडणे दाखविली आहेत. त्यात नारायण (मकरंद अनासपुरे) दोघांकडून असल्याचा आव आणत, त्यांच्यात कळ लावत, त्यात भर घालत असतो, व स्वतःचाही फायदा करून घेत असतो. पुढे एका भांडणातून नारायण ठरवितो की तो स्वतःच निवडणूकीला उभा राहणार. मग जे राजकारणी डावपेच सूरू होतात ते सर्व पुढील चित्रपटात दाखवले आहे.

संपूर्ण चित्रपटात विनोदी वातावरण कायम राहते, आणि हा विनोद हा एका पातळीवरच राहतो. ना एकदम घसरला ना एकदम उंचावला आहे. त्यामुळे ठिक आहे. बाकी नारायणाच्या नावावरून विनोद, आमदार टोपेच्या मेव्हण्याचे एकच वाक्य ३/४ म्हणणे अशा प्रकारात थोडा कंटाळा येतो. सुरूवातीला नारायण सायकलवरून उतरल्यावर पायांची जी हालचाल करतो त्यावरून असले अंगविक्षेपाचे विनोद असल्याचे खटकले होते, पण तो प्रकार २ वेळाच दाखवला आहे. एखाद्याशी बोलत असताना आमदाराचा मुलगा मध्ये मध्ये आपले बोलणे लावत असतो ते प्रसंग नेहमीचेच वाटतात पण तरीही हसवून जातात.

वेगळेपण वाटले ते नारायण जे काही करत असतो ते नेमके कशाकरीता करत असतो त्याचा अंदाज लगेच आला नाही. एखादी गोष्ट घडून जातानाच त्यामागचे कारण कळते. उदा. डोळे व टोपे दोघांनाही शेवटच्या दिवशी ४ वाजता निवडणूकीचा अर्ज का भरायला लावतो हे मला तरी लगेच कळले नाही. त्या कार्यालयात ४ वाजल्यानंतरच कळले.

चित्रपटाला तशी एक सलग कथा असल्याचे मला तरी जाणवले नाही. एकमेकांना धूळ चारणे हा मूळ हेतू समोर ठेवून त्यानुसार मग प्रसंग टाकलेले आहेत. सयाजी शिंदे व मकरंद अनासपुरे ह्यांचे काम नेहमीच्याच शैलीत आहे. नागेश भोसलेचा अभिनय मी जास्त पाहिलेला आठवत नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'हसरतें' मालिकेतील त्याचे काम आवडले होते. पण त्यातील युनियन लीडरचा आवेश ह्यात सरपंच असला तरी वाटला नाही. बाकी इतर पात्रे म्हणजे आमदार/सरपंचाची बायका,मुले ह्यांची ही कामे बरी वाटली. सरपंचाच्या बायकोचा (लग्नाआधीचा) प्रियकर जो महाराज बनून वावरतो त्याचेही काम चांगले वाटले. लावणी कलाकार म्हणून असलेल्या नायिकेचे कामही बरे वाटले. एक परदेशी युवती तेथे कला शिकण्यासाठी आलेली असते त्याची गरजही सुरूवातीला वाटत नाही परंतु नंतर गरज कळते. संपूर्ण चित्रपटात दिल्लीचे नाव नाही. आहे ते फक्त लावणी मध्ये व चित्रपटाच्या शेवटी. नावावरून वाटले होते की गल्लीत म्हणजे स्वतःच्या प्रांतात काही गोष्टी करण्यासाठी दिल्लीमध्ये काही ना काही कथानक घडत असेल. पण सिनेमात नुसता गावातील कुरघोडींचा गोंधळच आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना एवढा काही खास प्रभाव माझ्यावर पडला असे वाटले नाही. त्यातल्या त्यात नंतरच्या १ तासात मी हा सिनेमा पाहिला हे ही विसरून गेलो.

असो, मी ही अजूनही गोंधळलो असल्याने माझे लिखाणही तसेच वाटत असेल. पण ह्या सिनेमाबद्दल मत असे की सिनेमा तसा वाईटही नाही आणि आवर्जून पहावा असाही नाही.

मार्च २१, २००९

दोन आठवड्यांपूर्वी रेडियो मिर्ची वर किशोर कुमारचे 'पडोसन' चित्रपटातील 'मेरे सामने वाली..' हे गाणे ऐकले. पण खास गोष्ट म्हणजे ते गाणे दुख:द छटेचे आहे. सिनेमात किंवा कॅसेटमध्येही ते गाणे कधी पहायला/ऐकायला मिळाले नाही. आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार ते गाणे प्रदर्शित झाले नव्हते. पण ते गाणे ऐकण्यास जरूर मिळाले.

मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|
अफसोस ये है के वोह हमसे कुछ उखडा उखडा रहता है|
पहले तो हवा उन जुल्फों से खुशबू भी चुराकर लाती थी|
भूले से कभी उडती उडती आवाज भी आ जाती थी|
आवाज से भी महरूम हुए, इस बात का दुखडा रहता है|
मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|


हे गाणे जर सिनेमात असते तर कोणत्या प्रसंगात असते असा मी विचार करत होतो. घरातील चर्चेनुसार 'भोला' (सुनील दत्त) ला गुंडानी मारल्यावर नंतर असेल. पण मला असेही वाटले की 'बिंदू'(सायरा बानू) जेव्हा मास्टरजीसोबत (मेहमूद) लग्न करण्याचे ठरवते तेव्हा. पण गाण्याचे शब्द आणि प्रसंगांचा ताळमेळ जमला नाही.

म्हटले तुम्हाला विचारू.
तुमच्या मते हे गाणे सिनेमात कुठे असू शकले असते व ह्या गाण्याबद्दल इतर, म्हणजे ध्वनीमुद्रित झाले होते तर सिनेमात किंवा कॅसेटमध्येही का नाही आले वगैरे वगैरे, माहिती मिळू शकेल का?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter