भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डिसेंबर ३०, २०१०

गेल्या आठवड्यात नागपूरला जाण्याचा योग आला. साधारण ६ १/२ वर्षांनंतर फेरी होत होती, मे २००४ नंतर. स्वत:च्या कामाकरीता मामेभावासोबत त्याच्या दुचाकीवरच तिकडे भटकंती(ढोबळ मानाने) करता आली.  त्याबद्दल थोडेसे.

मी तिकडे पोहोचलो बुधवारी रात्री. ठाणे- मुंबईत तापमान २० च्या खाली जाऊन थंडी वाढली तेव्हा तिकडचे तापमान १० च्या खाली आहे असे बातम्यांमध्ये ऐकत होतो. त्यामुळे त्या तयारीनेच गेलो होतो. पण विमानातून उतरतानाच त्यांनी घोषणा केली बाहेरचे तापमान २१.५ आहे. बाहेर भाऊ भेटला, तो म्हणाला आज थंडी नेहमीपेक्षा खूप कमी आहे. माझ्या पूर्ण सहलीत तापमान वाढलेलेचे होते. आता थंडी कमी म्हणून आनंद मानावा की नागपूरची थंडी अनुभवता येणार नाही ह्याची खंत? ;)

२००१/२ मध्येच पाहिल्याप्रमाणे, ठाणे शहरानंतर तिकडे गेलेल्या टी. चंद्रशेखर ह्यांनी नागपूर शहराचा कायापालट केला होता. रस्ता रुंदीकरण ही त्यातली मोठी गोष्ट. सगळीकडे फिरताना मोठे मोठे रस्ते दिसत होते. त्यामानाने तर ह्यावेळी भरपूर बदल दिसला होता. रस्ते तर काय शहराचाच विस्तार दिसत होता.

ह्याच विस्ताराकरीता कारणीभूत असणारे एक आहे नागपूर सुधार प्रन्यास किंवा Nagpur Improvement Trust (NIT).


 पण सुधारणांच्या प्रशंसेसोबतच त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागते. कारण नागपूर महानगर पालिकेसोबतच लोकांना मालमत्तेच्या कामाकरीता ह्यांचे वेगळे नियम ही पाळावे लागतात आणि त्यांना वेगळे कर वगैरे देणेही.


तसेच पाहिलेले (NITचेच) Krazy Castle Aqua Park. पाण्यातील खेळांचे उद्यान. आतून तर नाही पाहिले, पण त्याच्यासमोरून फिरताना जमेल तसे चित्र घेण्याचा प्रयत्न केला.


ही आहे रिझर्व बँकेची इमारत.



नागपूर शहर भारताच्या केंद्रस्थानी आहे हे माहित होते. पण त्याचे एक शून्य मैलाचे स्थान आहे व तिकडे काही वास्तूही उभारली आहे हे माहित नव्हते. ह्या भटकंतीत हे ही पाहून घेतले.


ह्या शून्य मैलाच्या दगडाशेजारी आधी एक पेट्रोलपंप होते, जे ह्या चित्रात स्तंभाच्या मागे आहे. (ह्या चित्राचे स्त्रोतः विकिपिडिया)


पण ह्या जागेचे वेगळे महत्व असल्याने त्यांना ती जागा रिकामी करायला सांगून दुसर्‍या एका मोक्याच्या ठिकाणी त्या पेट्रोलपंपाला जागा देण्यात आली. आता ती मोकळी जागा अशी आहे.
 

ह्या भटकंतीत एवढेच.

अरे हो राहिलेच.
हा पहा नागपूरचा सांताक्लॉज. अजुन एक पाहिला होता, लाल ऐवजी पूर्ण राखाडी/चंदेरी रंगाचे कपडे घालून. पण त्याचे छायाचित्र नाही घेता आले.



येताना नागपूरची प्रसिद्ध हल्दीरामची संत्र्याची बर्फी आणली आहे.
 


रविवारपर्यंत संपर्क केल्यास (आणि उरली असल्यास) मिळण्याची शक्यता सांगू शकतो ;) 

मे १०, २००९

ह्या आधी:
भटकंती (ठाणे ते शेगाव)
भटकंती (शेगाव- आनंदसागर)
शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात जायचे होते दर्शनाला. साधारण ८ वाजता तयार होऊन आम्ही निघालो. विचार केला होता की दर्शन घेऊन तसेच थेट निघता येईल. म्हणून मग सर्व सामान गाडीत ठेवले व हॉटेलची खोली सोडून दिली. आम्ही असलेली जागा ही मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर होती. ते द्वार सध्या दुरूस्तीकरीता बंद होते. त्याच्याच उजव्या बाजूनेही दुसरे आणखी एक प्रवेश द्वार होते. त्यातून आम्ही आत गेलो. (रात्रीही ह्याच मार्गाने गेलो होतो, पण आता थोड्या जास्त माहितीसोबत)

दर्शन घेतल्यावर आम्ही थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसलो होतो. तिथेच स्वागत कक्ष, देणगी केंद्रे बनविली आहेत एका बाजूला पोथी वगैरेचे पारायण करण्याकरीताही एका हॉलमध्ये सोय केली आहे. तशाच आणखीही सोयी आहेत. मंदिराच्या आसपासच्या भागात म्हणजे खालील फोटोत दिसणार्‍या द्वारातून आत गेले की पूर्ण भागात कॅमेरा वापरण्यास बंदी होती, त्यामुळे बाहेरील भागात जमतील तशी चित्रे कॅमेर्‍यात बंदिस्त केली (अर्थात संस्थानाच्या कार्यकर्त्यांच्या परवानगीनेच). त्यामुळे गजानन महाराजांच्या मूर्तीचा फोटो वगैरे ह्यात नाही.

ह्या द्वारातून आम्ही आत आलो.

हे संस्थानाचे सभागृह,

आजूबाजूच्या आवारातही इतर लहान मंदिरे बांधलेली आहेत.




शेगाव संस्थानाचे भक्त निवास क्र १. इथेही अशाच प्रकारे इतर निवासस्थाने क्र २ ते ६ बनविली आहेत.

हे मुख्य प्रवेशद्वार (आतून). ह्या प्रवेशद्वारापर्यंत येण्याची गाडी, रिक्षा ह्यांना परवानगी आहे. ह्यापुढे चालतच जायचे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर फुल/प्रसाद व इतर साहित्याची दुकाने आहेत.



हे सर्व पाहताना एक जाणवले की मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत सगळीकडे चांगली स्वच्छता पाळली गेली आहे. असेच आनंदसागर येथेही अनुभवले होते.

मंदिरातून निघून मग आम्ही मुख्य मंदिरापासून ६/७ कि.मी अंतरावर असलेल्या नागझरी ह्या ठिकाणी जायला निघालो. तेथे जाण्याचा रस्ता जाणीव करून देत होता की आपण एखाद्या खेडेगावातून जात आहोत. लहान रस्ता, आजूबाजूला घरे. रस्त्यावरून ऊस वाहून नेणाया बैलगाड्या. एखादी गाडी समोर असली की त्याला सहज पार करून जाणे अशक्य. दोघांनीही एकमेकांकरीता रस्ता मोकळा करून द्यायचा. गावातून बाहेर निघालो तर एकदम निर्जन, ओसाड वाटणारा प्रदेश. पण शेतीकरीता वापरला जाणारा असेल असा अंदाज. रस्ता एकदम खडबडीत.


आम्ही नागझरीला पोहोचलो. तिथे गेल्यावर कळले की येथे गजानन महाराजांच्या गुरूंचे मंदिर आहे. तिथे बाहेरच मोठे प्रवेशद्वार बनविले आहे. आम्ही त्या प्रवेशद्वारातून न जाता उजवीकडील वेगळ्या रस्त्याने खालपर्यंत गाडी घेऊन गेलो व तिकडून दुसर्‍या पायर्‍या उतरलो.


आत एक पाण्याचे कुंड बनविले आहे जिथे गायीच्या तोंडातून पाण्याचा उगम आहे. पुढे मंदिराच्या वरच्या भागात एक मंदिर आहे (कोणाचे ते आठवत नाही) तिकडून खाली उतरल्यावर गुहेत आत गेल्याप्रमाणे पायर्‍या बनविल्या आहेत व तिथे गुरूंचे मंदिर आहे. (पुन्हा त्या मूर्तीचा फोटो घेण्यास मनाई)

खाली उतरल्यावर पाहिले की प्रसाद (जेवण) बनविण्याकरिता तेथे एक मोठे स्वयंपाकघर बनविले आहे. आणि दुसर्‍या खोलीत भांडी ठेवण्याची व्यवस्था आहे. तिकडची भांड्यांची मांडणी एकदम पद्धतशीर होती, ते मला एवढे वेगळे वाटले आणि आवडले की मी त्याचा फोटो घेणार होतो, पण तेथील मुख्य असलेल्या व्यक्तीने (काय संबोधन होते तेही विसरलो आता) नकार दिल्याने तो विचार सोडून दिला.

तेथून मग आम्ही अंदाजे ११:४५ ला निघालो. पुन्हा शेगावच्या मंदिराजवळ आलो. तिथे ११ ते १ महाप्रसाद मिळतो. मी रांगेत लागून तो प्रसाद घेतला, व पुढे मग जेवणाकरीता हॉटेल शोधत निघालो. शेगावच्या बाहेर निघताना एक चांगले हॉटेल दिसले. रात्री जेवलेल्या हॉटेलपेक्षा हे भरपूर चांगले होते, आणि त्याच्या थोडेच पुढे होते. त्यामुळे काल रात्री आणखी थोडा शोध घेतला असता तर बरे झाले असते असे वाटले.

असो, तिकडे जेवण करून मग आम्ही शेगावहून शिर्डीकरीता प्रस्थान केले.




एप्रिल २१, २००९

ह्या आधीचे: भटकंती (ठाणे ते शेगाव)



शेगावला पोहोचल्यानंतर पहिले गेलो ते भक्त निवास क्र. ५ कडे. भक्त निवास क्र. ३ ते ६ हे चार बाजूंना बांधून मध्ये मोकळी जागा ठेवली आहे. तिथूनच आनंद सागर करीता शेगाव संस्थानाचा बस थांबा आहे. त्या थांब्यावर खूप मोठी रांग होती. एकंदरीत अंदाज आला होता की आनंदसागरला काहीतरी चांगले आहे. मित्राने आधीच सांगून ठेवले होते की आनंद सागर नक्की पहा म्हणून. भक्त निवासाच्या कार्यालयात गेलो तर तेथेही रांग होती(त्याची अपेक्षा होतीच). एका कार्यकर्त्याने सांगितले,'रांगेत रहा. जसजसे खोल्या रिकाम्या होतील, एकेकाला आम्ही त्या उपलब्ध करून देऊ.' कागद पाहिला. ५ क्रमांकाच्या निवासस्थानात पूर्ण वातानुकूलीत खोल्या. इतर मध्ये ३/४ लोकांकरीता मिळून सोय. काहींमध्ये खोलीतच बाथरूम, काहींना बाहेरचे. नाहीतरी १ तास गेला असताच आणि बाहेरील हॉटेलमधील खोल्यांचे भावही जवळपास तेवढेच, त्यामुळे बाहेरच खोली पाहण्याचे ठरविले. अर्धा एक तासाच्या शोधानंतर (त्यात भक्त निवास १ व २ ही आलेत. पण तिथेही जागा नव्हती)एका हॉटेलमध्ये खोली पक्की केली, सामान उतरविले व आराम केला.

आईने सांगितले, 'मी आनंदसागर बघितले आहे व तसेच तिकडे भरपूर चालणे मला जमणार नाही." ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू असते व मंदीर १०:३० पर्यंत. त्यामुळे मी बायकोसोबत आनंदसागरला जायला निघालो. गाडीत बघितले तर ड्रायव्हर गाढ झोपला होता. त्याला न उठवता एक रिक्षा पकडून आम्ही निघालो तेव्हा साधारण ५ वाजत आले होते. जाताना आसपास पाहिले तर मंदिराच्या आसपास ज्याप्रकारे दुकाने/हॉटेल आहेत त्या मानाने गाव तेवढे विकसित नाही वाटले. एखाद्या लहानशा खेडेगावातच फिरत आहे असे वाटले. आनंदसागरला पोहोचता पोहोचता रस्त्यात आणखी एक भक्त निवास दिसले.



तिथून थोडेच पुढे गेल्यावर आनंद सागरचा फलक पाहिला. त्याचे आणि आसपासचे फोटो.



प्रवेश तिकिटाकरीता ३/४ खिडक्या होत्या. बहुधा मंदिरात काही दान दिल्याची पावती दिल्यास तिकीट फुकट होते. मी सध्या तरी काही दिले नसल्याने पैसे देउन तिकीट घेतले व आत गेलो. तिकिटावर पाहिले तर मी दिलेले पैसेही देणगी स्वरूपातच स्विकारले असल्याची पावती होती व प्रवेशाची तिकिटे तशीच दिली होती.



आत फिरता फिरताच पाहिले सुरूवातीलाच गोलाकार परीसरात वेगवेगळ्या संत/महापुरूषांचे पुतळे मांडून ठेवले आहेत. सर्व पाहिलेही नाहीत आणि जेवढे होते त्यातील एक हा.



एका ठिकाणी आनंदसागर मध्ये फेरफटका मारण्यासाठी एका लहानशा रेल्वेगाडीकरीता रांग पाहिली. आसपास मस्त झाडे लावली आहेत बाग बनविली आहे. त्या भव्य परिसराचे वर्णन जमत नाही आहे. ह्या काढलेल्या प्रकाशचित्रांवरून अंदाज घेता येईल. एका झाडावर हे निळे पक्षी दिसले म्हणून जवळून पाहायला गेलो (ते खोटे होते :)). त्यांचे चित्र घेत असतानाच चुक् चुक् असा आवाज आला तर पाहिले त्याच झाडाच्या दुसर्‍या फांद्यांवर ३/४ खारी फिरत होत्या.


हे मंदिर पिसाच्या मनोर्‍याप्रमाणे तिरके वाटत आहे, पण तो बहुधा माझ्या हातांचा प्रताप आहे ;)


त्याच्याच आसपास असलेले मुनीवर्य.(ह्यांचे नाव मला कळले नाही)


आसपास कुठेतरी मत्स्यालयही आहे असे फलकावर वाचले. डाव्या ठिकाणी मोठे उपहारगृह होते. त्याच फलकावर वाचले की ध्यानकेंद्रही आहे. पण त्याची बंद होण्याची वेळ ६:३० होती. कन्याकुमारीला विवेकानंदांचे स्मारक पाहिले होते. तिथल्या ध्यान केंद्राचा अनुभव होता. त्यामुळे असेल पण माझा तिकडे जाण्याकडे जास्त कल होता. पण वाटले थोडा वेळ आहे, इतर गोष्टी पाहून घेउया. एका ठिकाणी पक्षांचा मोठमोठ्याने आवाज ऐकला. काय आहे पहायला म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. तलावावरून जाणारा एक पूल बनविला होता. तिकडे जाता जाता कळले, त्यांनी ध्वनीक्षेपकावर प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाज लावून ठेवले आहेत. ते बहुधा लोकांना आकर्षित करण्याकरीता असेल पण त्याचे नेमके प्रयोजन नाही कळले. लाकडी पुलावरून पुढे गेल्यावर पाहिले तिथे लहानशे उपहार केंद्रही बनविले आहे. तसेच झाडांच्या आसपास बसण्यास व फिरण्यास जागा बनविली आहे.





तिकडुनच पाहिले ध्यानकेंद्र समोरच दिसत आहे, पण त्याकरीता तलाव पार करून जायचे आहे. वाटले बोटीने जाता येत असेल. विचारणा केली तर सांगण्यात आले की आम्ही आलो त्याच लाकडी पुलावरूनपरत जाऊन तिकडून उजवीकडे तलावाला फेरी मारून चालत जायचे आहे. तेथील चौकीदाराने सांगितले, प्रवेश ६:१५ ला बंद होतो. म्हणून मग लगेच तलावाला फेरी मारायला तयार झालो. बायकोने थोड्या वेळापूर्वी विचारले होते की ती ट्रेन नाही दिसली असून. उजवीकडे वळतानाच ती ट्रेन जाताना दिसली.


वरील फोटोतील उजवीकडे असलेल्या पूलाच्या पलिकडे आम्ही गेलो होतो. तिकडुन मागे फिरून (फोटोत घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने) डावीकडील रस्त्याने फिरत फोटोतील मध्यभागी वर असलेल्या ध्यानकेंद्रात जायचे होते. मग काय चालत निघालो दोघेही.

फिरत जाईपर्यंत १५/२० मिनिटे लागली असतील. पण आसपासचा देखावा मस्त होता. ह्या तलावाबद्दल माझ्या मित्राने सांगितले की ३०० कोटी रूपये खर्च करून हा कृत्रिम तलाव बनविला आहे. एका ठिकाणी चांगलेही वाटत होते पण त्याच वेळेला थोडेसे वाईटही वाटत होते की गावातल्या लोकांकरीता ह्याचा जास्त उपयोग होत असेल का? गावातील आणि मंदिर परिसरातील विसंगती फार खटकत होती.
तर चालत चालत आम्ही पोहोचलो ध्यानकेंद्राजवळ. तिथे पोहोचताच एका कार्यकर्त्याने आमच्या समोर फलक धरला. "ध्यानकेंद्र परिसरात शांतता राखा. मोबाईल बंद ठेवा..." येणार्‍या प्रत्येक माणसाला फलक दाखवण्याची युक्ती मला आवडली. कारण जर प्रवेशद्वाराजवळ हा फलक ठोकून ठेवला तर किती लोक तो नीट पाहतात ह्याची शंका असेल. त्यामुळे प्रत्येकाने तो पाहणे ह्यासाठी, तसेच येणार्‍याने फलक वाचून ते पाळायचा होकार दिला तरच आत प्रवेश देत असतील असे माझे मत झाले. :)


आत जाता जाता आसपासच्या परीसराचे फोटो काढले. केंद्राजवळ गेल्यावर एका कार्यकर्त्याने डावीकडे असलेल्या पायर्‍यांकडे बोट दाखविले. अर्थात आम्हाला आधी तिकडे जायचे होते. पायर्‍या चढून वर गेलो. तर मध्यभागी एक मंदिरासारखे बनवून त्यात रामकृष्ण परमहंस ह्यांचा पुतळा ठेवला होता. त्याचा फोटो काढण्यास एकाला मनाई करण्यात आली होती. मग मी प्रयत्न केला नाही ;)

खाली उतरल्यानंतर मुख्य केंद्रात जाण्याकरीता उभे राहिलो. तिथे एका कार्यकर्त्याने पुन्हा तो फलक दाखविला. मी मोबाईल फोन दाखवून खूण केली की हा बंदच आहे. आत गेल्यावर पाहिले, उजव्या बाजूला स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस ह्यांचे फोटो ठेवले होते (आणखी एक फोटो कोणाचा ते आठवत नाही) आणि त्यांवर प्रकाशझोत पाडला होता. एकदम शांत जागा. आम्ही थोडा वेळ आत बसलो. कन्याकुमारीच्या ध्यानकेंद्रात ॐ चा जप चालू होता. पण इथे पूर्ण शांतता होती. त्या शांततेत डोळे बंद करून एकाग्र होण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले की मनात किती विचार चालू आहेत. साधारण १५ मिनिटे तिकडे मन शांत करायचा प्रयत्न केला. (पण अशा गोष्टी १५ मिनिटांत साध्य होत नाहीत. असो.) बाहेर आलो तर सूर्य नुकताच मावळत होता. थोड्यावेळ तिकडेच बसलो. चपला बूट घेण्यासाठी आलेल्या माणसांपैकी २-३ जण बूट घेतल्यावर जमीनीवर आपटून टाकत होते. वाटले ह्या लोकांना शहाणपणा नाहीच आहे. शांतता पाळायला सांगूनही स्वतःच्या मजेकरीता काहीही करतात.

तिकडून परत निघालो. आता लक्ष्य होते, संगीत कारंजे. मैसूरचे वृंदावन गार्डन व औरंगाबादमधील पैठणच्या बागेतील संगीत कारंजे पाहिले असल्याने ह्याबाबत जास्त आकर्षण नव्हते. तरी आहे तर पाहून घेऊया म्हणून तिकडे गेलो. त्याची व्यवस्था मोठी होती. कारंज्यांसमोर अर्धगोलाकृती आकारात उतरत्या हिरवळीवर बसण्याची सोय केली आहे. संगीत व कारंजे ह्यांचा जास्त मेळ दिसत नव्हता. तरी न बघण्यासारखे ते वाईट वाटले नाही.

तो कार्यक्रमही १५ मिनिटांचा होता. तो आटपून परत निघायला ७:५० झाले होते. त्यामुळे आम्ही परत जायला निघालो. रस्त्यात पाहिले सुरूवातीच्या प्रवेशाद्वारातून चंद्र दिसत आहे. तसेच पुढे एक आगळावेगळा फलक पाहिला.


बाहेर पाहिले तर मस्त गर्दी दिसत होती, बस व रिक्षा दोन्हींकरीता. आम्ही मग रिक्षाने परत आलो. परत आल्यानंतर आईसोबत मंदिरात दर्शनाला गेलो. तिकडूनच मग जेवायला बाहेरच्या हॉटेलमध्ये गेलो. ड्रायव्हर म्हणाला की तो दुपारी मंदिराजवळच्या एका हॉटेलमध्ये जेवला होता. त्याने सांगितले की जेवण एवढे चांगले नाही. पण तोपर्यंत जवळपास ११ वाजले होते. त्यामुळे हॉटेल शोधावे लागणार होते. तेव्हा आठवले की परत येताना रिक्षाचालकाने शिवाजी चौकातील एका हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. म्हणाला ह्या भागात सर्वात चांगले हॉटेल आहे. त्या हॉटेलचा शोध घेऊन मग तिथे जेवण केले. पण तिकडील परिस्थिती त्याने सांगितल्याएवढी चांगली नव्हती. वाटले हे जर चांगले हॉटेल आहे तर बाकीचे कसे असतील? ;)

(क्रमशः)

एप्रिल २०, २००९

मागील वर्षी ऑगस्टमध्ये आमचे शेगावला जायचे ठरले होते. पण भरपूर पाऊस असल्याने जायचे टाळले होते. नंतर मला कामातून वेळ मिळत नसल्याने ह्याबाबत जास्त विचार करता आला नाही. आता १० एप्रिलला गुडफ्रायडे, शनिवार व रविवार असे ३ दिवस सुट्टी मिळत होती. त्यामुळे मग ह्यावेळी जायचे ठरविले. एक दोघांच्या सांगण्यावरून रेल्वेने जाणे सोयिस्कर पडेल असा सल्ला मिळाला. एखादी कार भाड्याने घेउन जावे असे माझे मत होते. एकच आठवडा असल्याने रेल्वेचे तिकिट मिळण्याची शक्यता नव्हतीच. तरीही रेल्वेच्या संकेतस्थळावर पाहिले तर सर्व वर्गाची तिकिटे वेटिंग लिस्ट मध्ये. तसेच प्रवास हा थेट शेगाव व येता येता शिर्डीवरून येणे असा विचार होता. त्यामुळे मग कारनेच जाणे पक्के केले. पण निघायच्या २ दिवस आधी. तोपर्यंतही काही नक्की होत नव्हते म्हणून मग जास्त कोणाशी विचारणाही करता आली नाही. उन्हाळ्यात जात असल्याने उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही गुरूवारी रात्री निघण्याचे ठरविले. कार ज्यांच्याकडून घ्यायची त्यांना रात्रीचा प्रवास करायचा आहे ह्याची कल्पना देऊन ठेवली.

गुरूवारपर्यंत गूगल मॅप वर जायचा रस्ता पाहून ठेवला होता. गूगल मॅपची सुविधा बरी वाटली, की किती अंतरानंतर कुठे वळायचे व पुढे कसे जायचे हे वाक्यांमध्ये लिहून तसेच नकाशातही दर्शविते. (अमेरिका, इंग्लंड मध्ये राहणार्‍यांना ह्याची सवय झाली असेल, पण इथे अजून ते तितकेसे वापरले जात नाही असे वाटते. असो) ऑफिसमधून त्याचे एक प्रिंटही काढून ठेवले.(ते घ्यायला विसरलो निघताना :( ) पाहता पाहताच लक्षात आले की मोबाईलमधूनही मी गूगल मॅप वापरू शकतो. अशा गोष्टी मी सोडत नाही. लगेच ते माझ्या मोबाईलमध्ये कार्यान्वित करून घेतले. GPRS ची सुविधा आधीपासून आहेच. २ दिवस आधीच मोबाईल कंपनीला संपर्क करून रोमिंग चालू आहे व जात आहे तिकडे चालू असेल ह्या गोष्टींची खात्री करून घेतली होती, त्यात GPRS ची विचारणा होतीच.



रात्री १०:३० वाजता आम्ही प्रवासाला सुरूवात केली. ड्रायव्हरने पहिली गुगली टाकली, "शिर्डी जायचे आहे ना?" म्हटले नाही, "शेगाव". पण त्याला एवढा अंदाज होता की आम्हाला रविवार रात्रीपर्यंत परत यायचे आहे. त्यामुळे ३ दिवस आम्ही शिर्डीला काय करणार असा प्रश्न त्याला पडला होता का हा प्रश्न मी मनात येऊन सोडून दिला. त्याला सांगितले की 'शेगावला जायचे आहे'. सोबत हे ही सांगितले की '५५० किमी आहे'. उगाच त्याने नंतर अडचण नको सांगायला. पण तो काही म्हणाला नाही. आई म्हणाली, 'आधी शिर्डीला जाऊ'. मी म्हटले, 'आधी निघूया. नाशिकला पोहोचेपर्यंत आपल्याकडे ३ तास आहेत, त्या वेळेत विचार करू.' थोडक्यात, आम्ही नाशिकला प्रयाण केले.
नाशिकचा महामार्ग नेहमीपेक्षा मला कमी गर्दीचा वाटला. थोडे बरे वाटले. वाटले, पुणे महामार्गाप्रमाणे हा ही सुधारला आहे. अर्धा तासातच आम्ही पहिल्याच मतावर कायम राहिलो. आधी शेगावला जायच्या.

वास्तविक रेल्वेने जाताना मार्ग असतो, "ठाणे-नाशिक-मनमाड-चाळीसगाव-पाचोरा-जळगाव-भुसावळ-अकोला" (मधली स्थानके जाऊ द्यात ;) ) पण मला गूगलने रस्ता सांगितला तो "ठाणे-नाशिक-मालेगाव-धुळे-जळगाव-भुसावळ-अकोला". वाटले, आपण उगाच फिरून तर जाणार नाही ना? नंतर विचार केला, नाशिकमध्ये विचारता येईल. (रात्री २-३ वाजता किती लोक असू शकतात रस्ता सांगायला, ही शंका तेव्हा नव्हती आली पण आता आली). नाशिकला द्वारका पार केल्यानंतर एका चौकात खरोखरच २/३ रिक्षाचालक व इतर माणसे उभी होती. त्यांच्याकडून खात्री करून घेतली की मालेगाव-धुळ्याचाच रस्ता बरोबर आहे. पुढे एका हॉटेल मध्ये चहा घेताना ड्रायव्हर म्हणाला की आपण ८/८:३० पर्यंत पोहोचून जाऊ. पण आता मला साडे दहा तासांची खात्री नव्हती. म्हटले १० तरी वाजतील. नाशिकहून पुढे निघालो मालेगावच्या रस्त्यावर. रस्ता आतापर्यंत चांगला होता, पण मालेगाव येईपर्यंत तेवढा चांगला राहिला नाही. खड्डे खड्डे नाही, पण एकाच वेगात गाडी न नेण्यासारखा. मालेगावला केव्हा पोहोचलो आठवत नाही. ४-४:३० झाले असतील. नंतर पुढे धुळे यायच्या आधी पुन्हा मोबाईल बाहेर काढला व नेमके कुठे वळायचे आहे ते पाहून घेतले. ड्रायव्हरला म्हटले, 'ऍग्रीकल्चर कॉलेजच्या पुढे उजवीकडे वळायचे आहे.' तोपर्यंत ६ वाजत आले होते. चहा प्यायचेही ठरविले. तसा मनात विचार आला, 'आता NH3 आणि NH6 असे दोन महामार्ग भेटत आहेत तो चौक मोठा असेलच व त्याच्या आसपास धाब्यावर चहा घेता येईल. ड्रायव्हरला ही आराम करता येईल थोडा वेळ.' पण पाह्तो तो काय, जंक्शन चांगले होते, जळगावला वळायचे लगेच कळले. पण चहाकरीता एकच टपरी होती. ती लक्षात येईपर्यंत पुढे निघून गेलो. म्हटले, पुढे कुठेतरी घेऊ चहा.



साधारण अर्ध्या तासानंतर ड्रायव्हर स्वतःहूनच म्हणाला आता झोप येतेय. त्याला म्हटले, थांबव गाडी जिथे जमेल तिथे. वाटल्यास मी चालवतो. तो म्हणाला, 'तुम्ही बोलत रहा. बोलता बोलता झोप येणार नाही'. पण मला रिस्क वाटत होती. गाडीच्या टेपच्या स्पीकरची वायर निघाली होती. तो म्हणाला, 'गाणी लावूया.' त्याकरीता एका ठिकाणी गाडी थांबविली. मी पाहिले तर एका पडिक वाटणार्‍या जागेत बहुधा हॉटेलचा बोर्ड आहे. अर्थात हॉटेल नव्हते. पण तिकडे असलेल्या माणसांना विचारले तर ते म्हणाले, 'चहा मिळेल येथे.' चला, चहाची तर सोय झाली. जसा असेल तसा. तिकडेच थोडेफार पाय मोकळे केले, चहा घेतला, बैलांचे (आणि बैलांसोबत) फोटो काढले.
.
  

मला वाटले की शेगाव असेल ९०-१०० किमी. पण माझी नकाशातून अंतर मोजण्यात चूक झाली होती. नकाशावरून तर दिसत होते की फार लांब आहे पण लिखाणातील अंतराची बेरीज होती १०० किमी. पुढे एका फलकावर पाहिले, भुसावळच १०० किमी च्या वर आहे. तेव्हा लक्षात आले, शेगाव अजून २०० किमीच्या वर आहे. ४/५ तासांची निश्चिंती. :(
भुसावळ येईपर्यंत एकही हॉटेल नाही जिथे नाश्ता करता येईल. भुसावळमध्ये ही पुढे पुढे करत बाहेरच आलो. १० वाजेपर्यंत कुठेच काही नाही. मला मधे आलेली शंका बरोबर होती ते एका तेव्हाच उघडत असलेल्या हॉटेलमध्ये कळले. त्या भागात हॉटेल ११/११:३० च्या नंतरच उघडतात, तेही थेट जेवणाकरीता. मग एका ठि़काणी कचोरी, भजे व चहा घेउन नाश्ता केल्यासारखे खाल्ले.

रात्रीचे जागरण आणि आता जाणवणारे ऊन ह्यामुळे मी खामगावला पोहोचेपर्यंत थोडी झोप काढली. गूगलने सांगितल्याप्रमाणे खामगाव मध्ये तीव्र डावे वळण घ्यायचे होते. त्यानुसार मग मी एखादा चौक पाहत होतो.पण प्रत्यक्षात लोकांनी सांगितले त्याप्रमाणे खामगाव बस स्टँडपासून सरळ जायचे होते. तिथे जाऊन पाहिले तर शेगावकरीता हलकेसे डावे वळण होते व तीव्र उजवीकडचा रस्ता अकोल्याकडे जात होता. असो, पूर्ण तर चुकले नाही ना.



आता शेगाव संस्थानाचे फलक दिसू लागले होते. "सर्वात प्रथम भक्त निवास क्र. ५ मध्ये जागेची चौकशी करणे" हे फलक सर्वात जास्त दिसले. वाटले, थांबण्याची सोय झाली. असे करत अंदाजे दुपारी १२ वाजता आम्ही शेगावला पोहोचलो.

(क्रमशः)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter