आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आठवणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एप्रिल १०, २०११

शनिवारी एका कामाकरीता अंधेरी पश्चिमेला गेलो होतो. तिकडे गेलो ३-४ वर्षांनंतर. पण शाळेजवळ गेलो होतो साधारण १४ वर्षांनंतर. सर्व भाग पूर्ण बदललेला. नवीन इमारती, मेट्रोचे पूल वगैरे वगैरे. तिकडूनच मित्रांना फोन केला. दोन मित्र शाळेजवळच भेटले, एक त्याच्या घराजवळ. त्यांच्याशी गप्पा मारताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 'शाळा'  आणि 'दुनियादारी'तील काही भाग समोर आले. :)

मित्रांची खबरबात ऐकताना खूप चांगले वाटत होते. हा इकडे काम करतो, तो तिकडे.. ह्याचे, हीचे लग्न एव्हा एव्हा झाले, ती ह्या कंपनीत काही कामाकरीता गेल्यावर भेटली वगैरे वगैरे. पण ह्या फेरीत शाळेच्या आत जाण्यास नाही जमले. मित्राने सांगितले सुट्ट्या सुरु झाल्यात आजपासूनच. :( पुढील वारीत शिक्षक/शिक्षिकेंनाही नक्कीच भेटेन.

नंतर गेलो मी राहत होतो त्या संकुलात. सरकारी संकुल. आता काही घरे आणि कार्यालय तोडून तिकडे नवीन इमारत बांधलेली पाहिली. २५/३० ओळखीच्या घरांतील फक्त दोन घरांतील व्यक्ती भेटले. इतर सर्व दुसरीकडे रहायला गेले आहेत. तिकडच्याही जुन्या आठवणी येत होत्या. संकुलाची सध्याची स्थिती पाहून वाईट वाटत होते. एक शब्द आठवला 'भकास' :(

आता शाळेतील मित्र आणि राहत्या जागेजवळील शेजार्‍यांतील काहींशी संपर्क अजूनही आहे, काहींशी नाही. पण असो. सर्वजण आपापल्या जागी समाधानात आहेत हेच चांगले. भेटी तर पुढेही होतच राहतील. फक्त ते जुने दिवस आठवणींतच.

एप्रिल ०६, २०११

वर्ष पाचवीचे. पहिल्या चाचणी परीक्षेच्या आधी इंग्रजीच्या टीचरनी आम्हाला सांगितले,"जो कोणी सर्वात जास्त गुण मिळवेल त्याला माझ्याकडून एक बक्षिस मिळेल."

इंग्रजी शिकवण्यास सुरूवात झाली पाचवीपासून. मी त्या आधी थोडेफार इंग्रजी वाचायचा प्रयत्न करायचो. दुकानांवरील फलकांवरून. पण का माहित नाही आवडता विषय बनत गेला. आणि ह्या चाचणी परीक्षेत ४० पैकी ४० गुण मिळाले होते. उत्तरपत्रिका वाटताना अर्थातच सर्वांचे गुण सांगण्यात आले.  तेव्हाच टीचरनी विचारले," काय पाहिजे तुला? चॉकलेट की पुस्तक?" वर्गातील मुले-मुली म्हणायला लागले,"चॉकलेट माग" काही म्हणाले,"पुस्तक". मी विचार केला,"चॉकलेट लगेच संपून जाईल. त्यापेक्षा पुस्तक नेहमी वाचायलाही होईल आणि टिकेलही." म्हणून मग त्यांना 'पुस्तक द्या' असे सांगितले.

पुढील आठवड्यात त्यांनी मला पुस्तक आणून दिले. ते होते इंग्रजी-मराठी शब्दकोश.



त्याआधी आणि नंतरही मला प्रशस्तीपत्रके आणि बक्षिसे मिळाली होती. पण हे बक्षिस नेहमीच माझ्याकरीता खास राहील. आणि जमेल तेवढे वापरातही.

सप्टेंबर १३, २०१०

टुसॉन येथे निलेशच्या ओळखीतील लोकांकडे गणपती पूजेला येण्याचे आमंत्रण मिळाले. म्हटले जाऊन येऊया. गणेशपूजा तर मी करत नाही. पण येथे कसे असते ते पाहणे आणि लोकांशी ओळख करण्यासाठी काल संध्याकाळी निलेश आणि त्याच्या मित्रासोबत गेलो श्री. संकेत यांच्याकडे.  तिथे पाहिले तर गणपतीच्या भोवती सजावट करण्याचे काम सुरू होते. गणपतीची मूर्ती दिसली नाही. तसे मनात आलेच होते की येथे गणपतीच्या मूर्ती आपल्याप्रमाणे बनवून मिळण्याची किंवा आणण्याची शक्यता कमीच आहे. मित्रमंडळी हळू हळू जमा होत होतीच. आता सर्वांचीच नावे लक्षात नाही आणि येथे लिहूही शकत नाही. :) थोड्या वेळात गणपतीची मूर्ती आणि गणपती बसवता येईल असे त्याचे वाहन एक मोठा उंदीर आणण्यात आला दुसर्‍या घरातून. तेव्हा कळले की गणपतीची प्रतिस्थापना/विसर्जन करीत नाहीत. फक्त पूजा. नवीन काहीतरी पहायला मिळाले.

थोड्याच वेळात गणपतीच्या आरतीची तयारी चालू झाली. आरती लिहून असलेले कागद वाटण्यात आले. पण त्याची बहुतेकांना गरज नव्हतीच. लहानपणापासून म्हणत असलेल्या आरतीकरीता पुन्हा वाचायची गरज नाहीच म्हणा.  आरती झाल्यानंतर प्रसाद (आणि महाप्रसाद?) उकडीचे मोदक आणि रगडा पॅटिस, तिसरा पदार्थ काय होता ते नाव विचारायचे राहिले. पण तीनही चवीला मस्त एकदम. शेवयांची खीर ही होती. पण पोट भरल्याने घेतली नाही :) खाता खाता इतरांशी गप्पा मारल्या. थोड्या वेळात निरोप घेऊन परतलो.
(छायाचित्रांच्या प्रतिक्षेत आहे. लवकरच येथे लावेन)

१:३० ते १:४५ तास होतो तिकडे पण तेवढ्यावेळात जुन्या आठवणीही डोळ्यासमोर तरळून गेल्या. घरात गणपती असल्याने त्याची तयारी ४-५ दिवस आधीच सुरू व्हायची. आमची गणपतीची मूर्ती ठरलेली. मग त्याच्या भोवतीची आरास, मखर सर्वांची तयारी. थर्मॉकोल वापरून मंदिर, पाळणा वगैरे तयार केलेले. वेगवेगळे रंगीत कापडं वापरून सर्व सजवून ठेवायचे. १० दिवस गणपती. अनंत चतुर्दशीपर्यंत. शेवटच्या दिवशी घरी अनंताची, सत्यनारायणाची पूजा. दुपारी शेजारील लोक जेवायला घरी. संध्याकाळी कमीत कमी १० जण गणपती विसर्जनाला. सुरूवातीला काही वर्षे आम्ही लगेच परत यायचो. पण मग नंतर रात्री परत येताना तेथील विसर्जनाला आलेले मोठमोठे गणपती पाहत रहायचो. आम्ही गणपती विसर्जनाला अंधेरीत सात बंगल्याला जायचो. तिथेच बस स्टॉप जवळ थांबून मिरवणूकीत चाललेले गणपती पाहत बसायचो. नंतर हळू हळू चालत परत यायचं.  एक गोष्ट नेहमी आठवते. सांताक्रूझच्या बाबुभाई भवानजी की जगजीवनदास ह्यांच्या भलामोठा गणपती आम्हाला नेहमी चार बंगल्याच्या सिग्नल जवळच दिसायचा. १ २ वर्षे आम्ही विचार केला की इथेच (सात बंगल्याला) थांबून पहायचा. पण खूप वेळ वाट पाहून परत निघालो तर तो गणपती तिथेच चार बंगल्याजवळच दिसला.

घरच्या गणपतीसोबतच कॉलनीमधील सार्वजनिक गणपतीची ही तेवढीच आठवण. गणपतीच्या वर्गणीपासून इतर कार्यक्रम कोणते करावेत ह्याकरीता सुरूवातीला झालेल्या चर्चा. नंतर घरोघरी जाऊन वर्गणी जमा करणे. आमच्या घरातील सर्वच जण आणि इतर काही घरे नेहमी गणेशोत्सवाच्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत सर्व गोष्टींत सहभागी. मग गणपतीच्या मखरापासून इतर सजावटीला लागणार्‍या गोष्टीत मदत करणे.  सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी. गाणी, नाटके. अर्थात ह्यात मी जास्त कधी नव्हतो, पण थोडाफार सहभाग होताच. गणपतीच्या आदल्या पूर्ण रात्रभर सजावटीकरीता जागणे, नंतर सकाळी घरातील गणपतीची तयारी. जी जवळपास २ पर्यंत व्हायची. मग परत सार्वजनिक गणपतीजवळ जाऊन गंमती करणे. रात्री ११ १२ पर्यंत कार्यक्रम. मग आम्ही आमच्या गटातील काही मंडळी २/३ वाजेपर्यंत गप्पा, अंताक्षरीमध्ये गुंग असायचो.  पुन्हा दुसर्‍या दिवशी शाळा कॉलेज करून परत हजर. ५ दिवस पूर्ण धमाल असायची. ५ दिवसांनी तो गणपती विसर्जन केल्यानंतर एकदम सुनं सुनं वाटायचं.

ह्या आठवणी नेहमीच राहतील आणि आनंद देत राहतील (हो आठवणीच म्हणा. कारण तेच तसेच दिवस अनुभव पुन्हा मिळणे कठीण.)

आता  तरी मी गणपतीपूजनात सहभागी नसतो बहुधा. पण तरीही घरी गणपती असल्याने त्याबाबतीत जेवढे शक्य जेवढे आवडेल तेवढे करतो. वडिलांच्या जन्मापासून असलेला गणपती आमच्या घरी नेहमीच येत राहिला आहे. फक्त ह्यावर्षीच खंड पडलेला दिसला. मी अमेरिकेत आणि घरातील लोक गावाला गेल्याने.

मार्च २९, २०१०

एखाद्याला शिकण्यासाठी जेव्हा वसतीगृहात रहावयास जावे लागते तेव्हा घरच्या लोकांपासून दूर राहिल्याचे अर्थात वाईट वाटतेच. पण वेगळ्या एका जगात राहिल्याचा अनुभवही मिळतो. मग त्यात एकत्र राहून आणि मोठे कोणी रागवायला नसल्याने गंमती करण्यालाही मोठा वाव मिळतो. माझ्या अशाच काही गंमतीदार आठवणी इथे सांगत आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना, पहिल्या वर्षाचे वसतीगृह हे महाविद्यालयाच्याच आवारात होते. आमच्या खोलीच्या खिडकीतून महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता दिसायचा. रस्ता दिसायचा म्हणजे महाविद्यालय लांब नव्हते, समोरच होते.  त्या रस्त्यानेच समोर उजवीकडे महाविद्यालय, डावीकडे उपहारगृह (कँटीन हो).  परीक्षेच्या आधीचे अभ्यासाच्या सुट्यांचे दिवस. नगर जिल्ह्यातील उन्हाळा म्हणजे तसा कडकच. (थंडी ही तशीच कडक.)  दुपारचे जेवण झाले होते.  नंतर थोड्याफार गप्पा मारून अभ्यास करत होतो.  तेव्हा आमच्यातील एकाला गंमत करायची हुक्की आली.  बाहेर एक मुलगा महाविद्यालयाच्या दिशेने चालला होता.  'शुक शुक' आमच्या खोलीतून आवाज गेला.  बाहेरच्या त्या मुलाने मागे वळून पाहिले. कोण दिसणार आहे?  निघून गेला तो.  पुन्हा दुसर्‍या मुलावर ही तीच क्रिया. त्याचीही तशीच प्रतिक्रिया. आमचे हे काम सुरू.  काही मुले न वळताच निघून जायची.  काही वळून बघायची.  एकाची तर गंमत झाली.  तो मागे वळून बघतोय.  कोणी दिसले नाही.  ऊन येत असल्याने डोळ्यांच्यावर कपाळावर हात ठेवून पहायचा प्रयत्न करत होता.  "ए, कोण आहे रे?" शेवटी तो कंटाळून निघून गेला. मी मित्राला म्हटले, 'बस झाले'.  पण मग त्याने पुन्हा 'शुक शुक' केले.  पाहतो तर आमच्या वसतीगृहाचे सर मागे वळून पाहत होते. काही झाले नाही.  पण पुन्हा शुक शुक नाही केले कोणी.

अशीच गंमत दुसर्‍या एका मुलाने त्याच्या खोलीतून केली. मी त्याच्या खोलीत बसलो होतो. काहीतरी विषयावर बोलणे चालले होते. एवढ्यात ह्याने हाक मारली." ए ____", इथे ___ म्हणजे एका मुलाचे आडनाव. 
मी विचारले;  'काय झाले?'
हा म्हणतो, "काही नाही, गंमत."
बाहेरून आवाज आला, " कोण आहे रे?"
आम्ही काही उत्तर दिले नाही. ह्याने पुन्हा हाक मारली.  बाहेरून पुन्हा तोच प्रश्न. जवळपास अर्धा तास हीच गंमत. आम्ही शांत झालो असतो, पण तो काही विचारणे सोडत नव्हता.  कोणी ही येत असेल त्याला 'ए, तू हाक मारलीस का?' विचारत होता. शेवटपर्यंत त्याला कळले नाही कोण हाका मारत आहे ते. 

पहिल्या सत्राच्या परीक्षेच्या आधीच्या सुट्ट्यांचे दिवस. एका संध्याकाळी मी दुसर्‍या विंग मधून स्वत:च्या खोलीकडे येत होतो. आमच्या विंग मधून जोरजोरात आवाज येत होता मुलांच्या ओरडण्याचा. 'ए ए..ए ए' करत.  वाटले कोणावर तरी कोणी ओरडत असेल काही केले म्हणून.  पण खोलीपर्यंत येईपर्यंत आवाज वाढत गेला. एक एक करत सर्व खोल्यांमधून मुले बाहेर येऊन ओरडायला लागली. आता खरं तर प्रत्येक विंग मध्ये प्रत्येक मजल्यावर कोणी ना कोणी सर 'रेक्टर' म्हणून राहत असतात. पण त्यांची परत येण्याची वेळ साधारणतः जेवणाच्या नंतरचीच म्हणजे ७-८ च्या नंतरचीच धरायची.  इथे मुलांचे ओरडणे ही जेवणानंतरच सुरू झाले होते.  पण वसतीगृहात बहुधा एकही रेक्टर नव्हते.  त्यामुळे हा आवाज वाढतच गेला, आणि दोन्ही विंग मधून.  आवाज का कोणी सुरू केला काहीच माहित नाही.  काही मुलं अभ्यासाला वाचनखोलीत गेलेली होती त्यांनी रात्री आल्यानंतर सांगितले की, कॉलेजच्या आवाराच्या मुख्य द्वारापर्यंत तो आवाज येत होता.  शेवटी काही सर व सुरक्षारक्षक आले त्यानंतर तो आवाज थांबला होता.

ह्यानंतर, एका रात्री मी अभ्यास करून झोपण्याच्या तयारीत होतो. रात्रीचे २:३०-३:०० वाजले असतील. पलंगावर आडवा पडणार तोच 'ढूम्म्म्म्म्म' असा मोठ्ठ्याने आवाज झाला.  सुतळी बॉम्व फुटला होता. संडासात कोणीतरी बॉम्बला उदबत्ती लावून टाईमबॉम्ब बनवला होता. (पण अर्थातच कोणी लावला ते कळणार नव्हतेच.)  सर्व पोरं बाहेर धावत आली.  माझा खोलीतील मित्र झोपेतून उठून धावत सुटला होता.  त्याला नंतर विचारले, 'असे का', तर तो म्हणाला, स्वप्नात होता आणि अचानक आवाज आला. त्याला वाटले की वसतीगृहाची पाण्याची टाकीच फुटली की काय? 

खानावळीतील जेवण म्हणजे एक प्रकारचे दिव्यच. पहिल्या २/३ आठवड्यातच माझा खोलीमित्र म्हणाला होता की, 'हे लोक असे अर्धे कच्चे जेवण देतात. ह्याची सवय झाली तर घरी गेल्यावर चांगले, पूर्ण शिजलेले जेवण खाऊन पोटात दुखायला लागेल.'  पोळ्या तर पाहूनच वाटायचे की कणकेचा गोळा थोडासा भाजून दिलाय.  तसे पोळी गरम असली की खाल्ली जायची.  पण थंड झाली की.... त्यामुळे स्वयंपाकघरातून पोळी घेऊन कोणी वाटणारा आला की सर्व तुटून पडायचे.  मग एखाद्याला दुसरे काही घ्यायचे असेल आणि ताटात चांगली पोळी असेल तर तो मग भाजीचा रस्सा त्यावर ओतून/लावून जायचा, त्यामुळे कोणी ती पोळी उचलणार नाही.  :)

जेवणावरून आठवले.  रविवारी आम्हाला खास जेवण असायचे.  म्हणजे मांसाहारी किंवा मग शाकाहारी मध्ये ही खास पनीरची भाजी, श्रीखंड, पुरी वगैरे. आणि रात्री जेवण नसायचे.  त्यामुळे मुलांना गावात जेवायला जायला लागायचे, जे २ किमी दूर होते.  म्हणून आमच्या कॉलेजच्या कँटीन मालकाने मुलांना तिथेच रात्रीचे जेवण द्यायचा विचार केला. १५ रू त अमर्यादित.  मुलांनी त्याचा फायदा घेण्यास सूरूवात केली.  पण एकदा एका मुलाने त्या अमर्यादित थाळी मध्ये एवढे खाल्ले की पुढच्या वेळेपासून त्यांनी ते देणेच बंद केले. असेही ऐकले आहे की ह्याच मुलाने एकदा खानावळीत जेवण झाल्यानंतर, फक्त पैज लावली म्हणून एक पूर्ण घमेलाभर भात खाऊन संपवला होता.

होळीच्या वेळी आम्हाला महाविद्यालयाने सुट्टी नव्हती दिली म्हणून सर्व मुलांनी ठरवले की आपणच जायचे नाही.  त्यांनी वसतीगृहाचे मुख्य द्वारच बंद करून ठेवले जेणेकरून कोणी बाहेर जाऊ शकणार नाही.  मला आणि काही जणांना हे काही माहित नव्हते.  आम्ही ही वर्गात जाऊन बसलो होतो.  बरं, सर्व मुले त्याच वसतीगृहातच राहत होती असे नाही.  पण बाहेरून येणार्‍या मुलांनाही अंदाज आलाच होता की मुलांनी न यायचे ठरवले आहे ते.  पण कळले की कोणी येत नाही, म्हणून कोणी शिकवायला यायच्या आधीच पळून आलो. आणि खोलीवर आल्यावर मित्रांच्या शिव्या खाल्ल्या. पण त्यादिवशी कोणी वर्गात गेले नाही.

मुलांनाच त्रास देणे गंमती करणे हे तर नेहमीचेच. पण सरांनाही सोडले नाही. एक सर खूप शिस्त पाळायला सांगायचे.  मुलांना ते आवडायचे नाही.  मग एक दिवस त्या सरांच्या खोलीला सकाळी ते बाहेर यायच्या आधी बाहेरून २ कुलुपे लावून टाकली आणि त्याहूनही गंमत म्हणजे सर्व मुले त्या दिवशी वसतीगृहातून बाहेर पडली.  म्हणजे जी मुले दांड्या मारायची ती सुद्धा. (आता ती वर्गात गेली की बाहेर ते माहित नाही.)  शेवटी खानावळीतल्या मुलांना कळल्यावर त्यांनी ती कुलुपे तोडून दरवाजा उघडला.

अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर गंमत चालतच होती.  पण शेवटी, म्हणजे पहिल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कहर केला. परीक्षा संपली. वसतीगृहातील खोली रिकामी करून द्यायची होती.  त्यामुळे सर्वजण आपआपली कपाटे साफ करत होते.  जेवढे सामान घरी घेऊन जायचे ते बॅगेत, सूटकेस मध्ये ठेवले.  जेवढे सामान पुढील वर्षाकरीता वापरायचे ते दुसर्‍या पुट्ठ्यांच्या डब्यांमध्ये वगैरे बांधून ठेवले. उरलेले म्हणजे भरलेल्या वह्या, कागदे, वर्तमान पत्रे समोरील व्हरांड्यातून खाली टाकले.  दोन्ही विंग चौकोनी आकाराच्या आहेत. त्यात मध्ये सर्व कागदे जमा झाली.  बहुतेक मुले संध्याकाळी घरी निघून गेली, उरलेले आम्ही रात्री सिनेमा पाहून नंतर गप्पा मारण्याच्या हिशोबाने दुसर्‍या दिवशी जाणार होतो.  सिनेमा पाहून आल्यानंतर गप्पा झाल्या.  सर्व जण झोपले होते.  रात्री दरवाज्यावर ठकठक झाली.  ठकठक कसली, जोरजोरात दरवाजा ठोठावणे चालले होते.  दरवाजा उघडला.  रात्रीचे ३:४५/४:०० वाजले असतील.  खानावळीतील मुलगा म्हणत होता की सर्वांना खानावळीसमोर बोलावले आहे.  बाहेर पाहिले तर धूर दिसत होता.  अंदाज आला काय झाले ते.  कोणी तरी रात्री त्या समोर फेकलेल्या कागदांवर काडी टाकली होती.  आम्ही पोहोचलो बोलावले तिकडे.    सर्व (उरलेली) मुले जमली होती. सर्वांना तातडीने बोलावले होते.  बहुतेक मुले बनियान, हाफ पँटमधेच येऊन बसले होते.  थंडीही वाजत होती.  सरांनी विचारले, 'कोणी केले हे'? माहित तर नव्हतेच आणि माहित असले तरी कोण सांगणार. मग काय, राग देऊन मग आम्हाला सांगितले, तुमचे परीक्षेचे प्रवेशपत्र जमा करून सकाळी ७ च्या आधी वसतीगृह रिकामे करा.  काय करणार? सकाळी ७/७:१५ ला सर्व वसतीगृह रिकामे झाले.  ह्यात त्या कागदं जाळण्याने वसतीगृहाचे नुकसान झाले नाही त्यामुळे हायसे वाटले.

ह्या असल्या गंमती थोड्याफार फरकाने सर्वांनी अनुभवल्या असतीलच. पण जरी बहुतेक लोक असे काही करत असतील, ऐकून माहिती असतील तरी स्वत: अनुभवलेल्या म्हणून ह्या आठवणी नेहमीच सोबत राहतील.

(हाच लेख ’हास्यगाऽऽरवा’ मध्येही प्रकाशित झाला होता)

ऑगस्ट २५, २००८

निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व.
शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती. पण त्या वाचनावर, ठरलेल्या विषयांवरच लिहिले जायचे तरीही पूर्ण गुण मिळण्याची खात्री नसायची.
तसेच नेत्यांच्या जयंती/पुण्यतिथीलाही आपण त्या त्या नेत्याबद्दल भाषण लिहून (घेउन) व त्याची तयारी करून मग व्यासपीठावर बोलायला जायचो. मग ते शाळेत असो किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना. माझ्या आठवणीप्रमाणे मी एका शाळेत जाऊन डॉ. हेडगेवारांवर भाषण केले होते. बाकी सर्व आपल्या शाळेतच. पण ते सर्व लिहिण्यातही कोणीतरी आपल्याला मदत केलेली असायचीच.

नंतर मग शाळेच्या बाहेरही थोडाफार सहभाग होऊ लागला. कॉलनीमधील गणपती उत्सवात एखाद-दुसरे एकपात्री कथन ही केले. मी ८/९ वीत असताना घरातील गणपतीची तयारी होत असताना मी व माझ्या बहिणीने गप्पा-गप्पांतच एक कथा तयार केली. ती आम्हालाच एवढी आवडली की मग आम्ही त्यावर एक अंकी नाटक लिहून काढले. मग इतरांची मदत घेऊन सार्वजनिक गणपतीत त्या नाटकाचे सादरीकरण केले.

हळू हळू (म्हणजे रखडत नाही हो, मी एक हुशार विद्यार्थी होतो :) ) वरच्या इयत्तेत गेलो, कॉलेज मध्ये गेलो तर तो अनुभव वाढत गेला. इतर पुस्तक वाचन, वर्तमान पत्रे वाचणे सुरू झाले. भरपूर लोकांची पुस्तके, कथा वाचल्या. बातम्या, सिनेमे, गावा-गावांतील अनुभव गाठीशी येत गेले. तसेच विचारशक्ती वाढत गेली. त्यामुळे मित्रांसोबत/इतर लोकांसोबत चर्चा वाढत गेल्या. वादही घालू लागलो. त्यात वेगळेपणही वाटायचे.
मग आंतरजालावरील भ्रमण सुरू झाले. कॉलेज संपल्यावर काही मित्र दूर गेले. मग त्यांच्याशी इमेलवर संपर्क चालू राहिला. स्वत:चे अनुभव त्यांना मोठ्या-मोठ्या विपत्रांतून लिहून पाठवणे चालू झाले.
आंतरजालावर भ्रमण वाढत गेले. तेव्हा मराठी संकेतस्थळेही नावारूपाला आली होती. त्यांचे सदस्यत्व घेउन वाचन चालू झाले. तिथे प्रतिक्रिया देता देता नवीन गोष्टी कळत गेल्या. मग स्वत:चेही काहीतरी लिहिणे चालू झाले. प्रतिसाद मिळत गेले तसे हुरूप आला. काही वेळा विरोधातही प्रतिक्रिया मिळाल्या. पण आता सवय झालीय. त्यामुळे आता लिहितानाच असे विषय निवडतो की ज्यात मला माहित आहे, जमल्यास वाद घालण्यासही तयारी असा ;)
आता ब्लॉगमुळे तर गेल्या वर्षापासून स्वत:च्या मनातील विचार/तक्रारी खरडणे चालू झाले.

हे सर्व आठवत असताना नुकताच पिवळा डांबिस ह्यांचा हा अग्रलेख वाचला. आणि वाटले मला वाटत असलेले विचार ह्यात आहेतच. जसा सर्वांमध्ये फरक पडला, तसा शाळेतील निबंधापासून आता थोडेफार ललित लेखनापर्यंत स्वत:हून लिहिण्याइतपत माझ्यात फरक नक्कीच पडलाय. (लोक वाचतील, नाही वाचतील तो भाग वेगळा ;) )

तेव्हा चला, आपले लिहिणे सुरूच ठेवूया. पाहू आणखी किती फरक पडतो ते :)

जुलै ३१, २००८

मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली. गेल्या काही वर्षांत लहान दोन अक्षरी नावाचेही भरपूर सिनेमे येत गेले. सध्या तर इंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमांचेही चलन आहे.

तरीही ह्या सर्वात ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ जास्त लक्षात राहतात. नुसते चांगले आणि लांब नावाचे सिनेमे म्हणून नव्हे, तर त्यांच्या लांबीमुळे सुद्धा. हिंदी (व मराठीही) सिनेमाची लांबी साधारणत: २:३० तास असते व इंग्रजी सिनेमे १:३० ते २:०० तासांचे असायचे. पण ह्याला अपवाद असणारे हे दोन सिनेमे. हम आपके हैं कौन - ३:४५ तास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे - ३:१५ तास. आणखी काही अपवाद म्हणजे संगम (४ तास), शोले (३:३० तास) व लगान(३:४५). मुख्य म्हणजे हे सर्व सिनेमे तुफान चाललेत. पण म्हणून प्रत्येकाने मोठ्या लांबीचे सिनेमे बनविण्याचा प्रघात नाही आला.

आणखी एक प्रकार जो इंग्रजी सिनेमांतून आला. सिक्वेल. सिनेमाचा पुढील भाग काढणे. ’नगीना-निगाहें’, ’वास्तव-हथियार’, ’स्टाईल-एक्सक्यूज मी’. नुकतेच आलेले ’हेराफेरी- फिर हेराफेरी’ आणि ’सरकार-सरकार राज’. मी ऐकल्याप्रमाणे एन चंद्राने ’स्टाईल-एक्सक्यूज मी’ सोबत तिसरा सिनेमा काढणार आहेत. तसेच ’फिर हेराफेरी’ ही शेवटी असा अडकवून ठेवला आहे की त्यातून पुढे कथा चालू करू शकतात. २००२ मध्ये आलेल्या ’आंखे’चे ही दोन शेवट आहेत. जेणेकरून अर्धवट ठेवलेल्या प्रसंगापासून पुढील सिनेमा चालू करता येईल.

तरी आता लहान लांबीचे सिनेमे बनविणे हे ही जरा फॅशनमध्ये आहे.१:३० तास ते २ तासाचे. तरी हे सर्व एकाच कथेची लांबी होती हो. त्यात मग नवीन प्रकाराची भर घातली राम गोपाल वर्माने. सिनेमा ’डरना मना हैं’. ह्यात वापरल्या सहा कथा. तीन कथालेखक, एक दिग्दर्शक. मग त्याला छेद दिला त्यानेच. ’डरना जरूरी है’. सहा कथा, सात दिग्दर्शक. पण त्या प्रकारातही जास्त कोणी हात मारायचा प्रयत्न नाही केला. ह्यामागचे कारण बहुधा असेल की ते चालले नाहीत. तरी ह्याच प्रकारात मागील वर्षी आला ’दस कहानियां’. १०-१२ मिनिटांच्या कथा. हा सिनेमा मी परवा पाहिला टीव्ही वर. पूर्ण नाही पहायला मिळाला. पण एक फायदा आहे. वेगवेगळ्या कथा असल्याने पुन्हा पाहताना कुठल्याही कथेपासून सुरूवात करू शकतो. ;)

असो, हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज एका वाहिनीवर नवीन हिंदी सिनेमाची माहिती पाहिली. ’मुंबई कटींग’ नावाचा नवीन सिनेमा येणार आहे. त्यात ११ लघुकथा आहेत. ११ दिग्दर्शक. जवळपास १० मिनिटांची एक कथा, म्हणजे ११० मिनिटे म्हटले तर चित्रपटगृहात जास्तीत जास्त २ तास.

चला पाहूया, हा सिनेमा काय बदल घडवून आणतो ते.

मार्च २२, २००८

लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी.
(नवीन काही असल्यासही चालेल. :) )


दुपारचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले चार
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले पाच
दादाने फोडली काच
काच वेचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले आठ
ताईने फोडला माठ
पाणी पुसण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले नऊ
बाबांनी आणला खाऊ
खाऊ खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले दहा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले अकरा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

लेखक/कवी: अनामिक

डिसेंबर ३१, २००७

आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे. अर्थात किशोर कुमार सोबत इतर लोकांचाही आवाज असल्याने ते लगेच लक्षात येते. (आठवले, तीन देवियां सिनेमातील हे गाणे.)
दहावीत (बहुधा ११ वीत ) असतानाची गोष्ट. मला ताप आला होता. त्यामुळे मी झोपलो होतो. मध्येच जाग आल्यावर पाहिले तर मी खोलीत एकटाच होतो. रात्री ११च्या नंतर बेला के फूल मध्ये हे गाणे सुरू होते. ते गाणे ऐकताना एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे आता कधी ही हे गाणे ऐकले की एकदम फ्रेश्श वाटते ;)
(आताही हे लिहिता लिहिता मागे गाणे ही सुरू ठेवले आहे :) )

घूंघट की आड से..
आमिर खान, जुही चावलाचे हे गाणे ऐकायला मस्तच आहे. त्यातील शब्दही छान आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या लहानपणीचा सार्वजनिक गणपती समारंभ आठवतो. ज्यात कॉलनीतील एका मुलाने व त्याच्या घरी आलेल्या एका मुलीने ह्या गाण्यावर नाच केला होता.

ह्या सोबतच तम्मा तम्मा लोगे (थानेदार) तसेच आशिकी मधील गाणी ऐकली की तेच सर्व गणपतीचे दिवस आठवतात, ज्यात दिवसभर ही गाणी सुरू असायची. तम्मा तम्मा लोगे वर तर मनात येईल तसा नाच केला होता.

फरेब मधील ओ हमसफर हे गाणे ऐकले की महाविद्यालयातील दुसरे वर्ष आठवते. आणि बाहेर पाऊस पडत आहे असेच वाटते. ह्याचे कारण हे की ही गाणी जेव्हा चालत होती तेव्हा पावसाळा होता आणि माझ्या बाजूच्या खोलीतील मुले हीच गाणी लावून ठेवत होती.

यह जो थोडे से है पैसे, मुझसे नाराज हो तो.. पापा कहते हैं मधील ही गाणी ऐकली की परीक्षेच्या आधी दिलेल्या सुट्ट्या आठवतात. अर्थात त्या सुट्ट्या अभ्यासाकरीता होत्या पण त्यात गाणी ऐकणे, सिनेमे पाहणे हे थोडेच थांबते. :)

अश्विनी ये ना..
गंमत जंमत मधील हे गाणे ऐकले की आधी किशोर कुमारची गाण्याची पद्धत, जी दूरदर्शन वर दाखविण्यात आली होती, आठवत होती तसेच त्यातील अशोक सराफ ची जी बायको दाखविली आहे (चारूशिला साबळे) तिचे झाडू घेऊन नाचणे आठवायचे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिले आमचे एक सर प्रत्येक वार्षिक समारंभाला हे गाणे गायचे, आणि त्यांच्या शाखेच्या फ्रेशर पार्टीलाही. त्यामुळे आता कधीही हे गाणे ऐकले की कॉलेजचे ते समारंभ आठवतात.

ॐकार स्वरूपा..

कॉलेज मधील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ह्याच गाण्याने व्हायची (आताही होत असेल). त्यामुळे हे गाणे ऐकले की मग ते समारंभ आठवणे आलेच.

मैं हूं झूम झूम झूमरू..
लहानपणी गणपतीतील अंताक्षरीच्या निवडफेरीत मी हे गाणे फक्त सुरुवातीच्या संगीतावरून ओळखून म्हटले होते. त्यामुळे अंताक्षरीत मी निवडला जाण्यास फायदा झाला होता. :)
तसेच कार्यालयाच्या सेमिनार वजा सहलीत औरंगाबादला असताना अजिंठा लेण्यात जाताना बसमध्ये हे गाणे गायलो होतो.
हे दोन प्रसंग ह्या गाण्याशी निगडीत राहतील असे वाटते.

ताक धिना धिन ताक धिना धिन...

रखवाला सिनेमातील हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे. मी नेहमी गुणगुणत असे. शाळेत मग आमच्या वर्गात एक दोन वेळा मला गायलाही सांगितले होते. एकदा तर काय झाले की, आमच्या वर्गात दुसऱ्या वर्गातील मुलगा येऊन आमच्या टीचरला म्हणाला की मला त्यांच्या वर्गात बोलावले आहे. माझ्या टिचर ने मला पाठवले. तिकडे गेल्यावर कळले की त्यांच्या वर्गात अभ्यास संपला होता. मग मनोरंजन करण्याकरीता मला गाणे गायला सांगितले. तेव्हाही मी हेच गाणे गायलो होतो. आता ती इयत्ता/साल आठवत नाही, पण हे गाणे ऐकले की तो प्रसंग नक्की आठवतो.

अरे हो,
प्यार हमें किस मोड पे ले आया
सत्ते पे सत्ता चे हे गाणे तर राहिलेच. बंगळूरच्या ऑफिसच्या सहलीत सकाळी एका ठिकाणाहून परत येताना हे गाणे गाऊन मी धमाल केली होती. त्याच दिवशी मग संध्याकाळी बंगळूरला परत येताना ३ बस पैकी कोणत्या बसमध्ये बसावे हे विचार चक्र चालू असताना मित्रासोबत बसलो होतो. तेव्हा सकाळी आम्ही फिरायला गेलेल्या गटातील एक मुलगा मला शोधत आला व त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला. तिथे तर मग काय हे गाणे, आणखी भरपूर धमाल गाणी गात, खेळ खेळत आम्ही परतीचा प्रवास केला होता.

छैया छैया
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास सर्व खोल्यांत हेच गाणे वाजविले जात होते. एवढा वैताग आला होता की मी माझ्या २/३ मित्रांना तर सांगितले होते की माझ्यासमोर हे गाणे लावायचे नाही. त्यांनी तर एकदा मग गंमत केली. मी एकाच्या खोलीत गेलो असताना मुद्दाम हे गाणे लावले व दुसऱ्या मित्राला जाऊन सांगितले की मी हे गाणे लावायला सांगितले. काय रागावला होता मग तो माझ्यावर. अर्थात मग नंतर ते आम्ही निकालात काढले होते.

आणखी ही गाणी आहेत, काही सध्या आठवत नाहीत.

तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?

डिसेंबर १०, २००७

ह्या आधीचा लेख इथे पहा.
सिनेमातील मला लक्षात राहिलेली आणखी काही वाक्ये....
मेरे दो दो बाप...गोपी-किशन चित्रपटात दोन्ही सुनील शेट्टी एकत्र पाहिल्यावर सुनील शेट्टीचा (गोपी) मुलगा म्हणतो. त्या मुलाची हे बोलण्याची शैली एकदम वेगळी.
आमच्या संगणक कार्यक्रमात (program) काही ड्यूप्लिकेट दिसले की हे वाक्य आठवते.

क्या करू संजना, ऐसा ही हूं मैं.... मत रहो ऐसे...
पहिले वाक्य अजय देवगण चे दुसरे वाक्य काजोलचे. अजय देवगणच्या त्या वाक्यावर काजोल ज्या तऱ्हेने लगेच त्याला म्हणते "मत रहो ऐसे" ते मनाला लागून जाते. चित्रपट: प्यार तो होना ही था.

तुमने अपने गॉड को देखा है क्या? फिर भी तुम उससे प्यार करती हो ना?.
संजय कपूरला न बघताही प्रिया गिल त्याच्यावर प्रेम करत असते. तिची मैत्रीण तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रिया गिल चे हे वाक्य खूप काही सांगून जाते. चित्रपट: सिर्फ तुम

मुर्गी वालों अपनी मुर्गी संभालो.
तेजाब सिनेमात चंकी पांडे आणि मंडळी इतरांना फसवून आपल्या खाण्याचे पैसे भरायला लावतात.त्या संदर्भातील हे वाक्य त्या सर्वांच्या तोंडी असते. मस्त धमाल करतात ते.

दरवाजा छोटा हो और सर झुकाना पडे तो आदमी छोटा नही हो जाता.
मेकॅनिक असलेल्या ॠषी कपूरकडे नाना पाटेकर जाण्यास नकार देतो, तेव्हा त्याचा मामा (मोहन जोशी) त्याला समजावत असतो की आपले काम असले तर त्याच्याकडे जाण्यात काही गैर नाही. सिनेमा: हम दोनो.

अगर ऍक्टींग कर पाता तो सिनेमा में काम न करता?
हे वाक्य सिनेमातील नाही. परंतु एक धारावाहिक "इंडीया कॉलिंग" मधील आहे. हे इथे लिहिण्याचे कारण त्यात अयुब खान हे वाक्य म्हणतो. त्याला तसे म्हणताना पाहून आम्ही मित्र म्हणालो होतो की, त्याने हृदयावर दगड ठेवून हे वाक्य म्हटले असेल. :)

वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो.
सत्ते पे सत्ता सिनेमात हेमा मालिनी रागविल्यानंतर एक बुटका गुरखा अमिताभला दटावत असतो. तेव्हा हेमा मालिनी गेल्यावर अमिताभ त्याला कॉलरला पकडून वर उचलतो आणि म्हणतो "वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो".
पुणे-मुंबई (जुन्या) महामार्गावर मी एशियाड मधील दरवाजाजवळील खुर्चीवर बसलो होतो. तेव्हा मागून एक दुचाकीवाला नुसता हॉर्न वाजवत पुढे गेला. चालकाने त्याला बसमधील उंचीवरून त्याला ज्या तऱ्हेने पाहिले ते पाहून मला अमिताभचे हे दृष्य/वाक्य आठवले.

ह्या सिनेमातील हेमा मालिनीचा अमिताभच्या घरील संवाद म्हणजे एकदम धमाल येते पाहताना.. राहवत नाही म्हणून लिहित आहे-
"कचरा, तुम खुद एक कचरा हो. बल्की कचरा भी तुमसे अच्छा होता है. गंदे... बदबूदार.... बरसों से नहायें नही. पास से जाओ तो ऐसा लगता हैं की घोडे के अस्तबल से निकल के आया हो.
तुम्हे क्या लगता हैं तुम्हे कोई लडकी चाहेगी, तुमसे कोई प्यार करेगा? अरे.. तुम तो कोई डराने की चीज हो डराने की. किसी को जहर देकर मारने की बजाय तुम्हारी शक्ल दिखायें तो वह खुद ब खुद मर जायेगा."


यार, मैं यहा कार की बात कर रहा हू और तुम बेकार की बात किये जा रहे हो.
शान चित्रपटात शशी कपूर बिंदिया गोस्वामीला बघत असतो आणि अमिताभ तिच्या कारला. त्यानंतर हे वाक्य. ते दृष्यानंतर प्रत्येकाचा गोष्टी बघण्याची तऱ्हा आणि ह्या वाक्यातील शब्द एकदम खास वाटले.

डुकरा बोलले म्हणून काय घर सोडून जायचे का?
भुताचा भाऊ सिनेमात जॉनी लीव्हर एक तांत्रिक दाखवला आहे. त्याला आपल्या प्लॅन मध्ये सामिल करण्यासाठी वर्षा उसगांवकर नाते बनवायचा प्रयत्न करत असते. तो चित्रपट पाहताना अचानक असे वाक्य ऐकून खूप हसू आले होते.

बेइमानी मैं करता नहीं और मेरे साथ बेइमानी करने वाले को मैं बख्शता नहीं.
त्यागी सिनेमात गुलशन ग्रोव्हर आपल्या एका मित्राला सांगत असतो. का माहित नाही पण हे वाक्य अजून ही लक्षात आहे.(तेव्हा त्या चित्रपटातील एकूण एक वाक्य पाठ झाले होते.)

दीदी..मुझे वह छतवाला ज्यादा पसंद है.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये काजोल ची बहिण तिला सांगते. पहिल्यांदा (नीट न )पाहिला तेव्हा त्यातील संवाद एवढे लक्षात नाही राहिले. पण एका मैत्रिणीने हे वाक्य त्यात आहे हे जेव्हा सांगितले त्यानंतर सिनेमात त्या दोघींचा हा संवाद वेगळेच काही सांगून गेला. (काय ते विचारू नका. तसा हा चित्रपटही अजूनही काही वेगळाच वाटतो.)

तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था.
सरकार चित्रपटात अभिषेक बच्चन झाकिर हुसेन (सिनेमात रशीद) ला म्हणतो. तेव्हा चित्रपटातील खिळून राहिल्यानंतर अभिषेक चे हे वाक्य आणि ह्यापुढील काही वाक्ये (स्वामी आणि मुख्यमंत्र्याला म्हटलेली) बोलण्याची शैली मस्त वाटली. त्यामुळे लक्षात आहे.

ह्यातच दुसरे एक वाक्य दिपक शिर्के ला म्हटलेले... "मैं भी यही चाहता हूं."

अशी भरपूर वाक्ये असतील. जमल्यास पुढे कधीतरी लिहेन. हिंदी चित्रपट बनणे आणि आम्ही ते पाहणे तर काय बंद
नाही होणार.

डिसेंबर ०९, २००७

आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात.
उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार करती है तो ये पलट के जरूर देखेगी... पलट... पलट' हे वाक्य. माझ्या मते हे वाक्य नेहमी वापरात यावे, लक्षात रहावे अशाच विचाराने लिहिले असेल. पण त्याच्या सादरीकरणावरही तेवढाच जोर दिला गेला.

आता असेच वाक्य शाहरूख खानच्याच राजू बन गया जंटलमन मध्ये वापरले गेले होते. किंवा खरे तर राजू बन गया.. मधील हे वाक्य "अगर वह पलट के सिस्टर की ऑंखो में आँखें डाल के देखेगा तो फिर वह जा नही पायेगा.... पलट... पलट" पुन्हा दिलवाले दुल्हनिया मध्ये वापरले गेले. हे वाक्य ज्या प्रकारे सिनेमात वापरले गेले आणि एवढे लोकप्रिय झाले, की ते पुन्हा वापरायचा मोह आवरता आला नसेल. पण एक आहे, ते वाक्य खरोखरीच अर्थपूर्ण आहे. :)

आता आणखी थोडी सर्वांना आवडलेली वाक्ये..
तुम्हारा प्लान ही गलत है.. लगता है कच्चा खिलाडी है.पहिले वाक्य आमिर खान परेश रावल ला म्हणतो, दुसरे वाक्य सलमान खानला. सिनेमा: अंदाज अपना अपना.. ह्या सिनेमातील तर एक एक वाक्ये लक्षात राहण्याजोगी आहे,

इसको क्या घडी करके डालू क्या?
अपना प्यारा सर्कीट, ह्याबद्दल जास्त लिहिणे नको. सर्वांनाच माहित आहे.

केक के लिये हम कहीं भी जा सकते है...
सैफ अली खान, डिंपल ला म्हणतो. सिनेमा दिल चाहता है.
अशी इतर प्रसिद्ध वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न नाही. तो तर सगळीकडेच चालू असेल.
इथे आहेत मला लक्षात राहिलेली काही वाक्ये... आता ती तुमच्याही लक्षात नसतील, अर्थपूर्ण नसतील, खास कोणाच्या लक्षात रहावीत म्हणून लिहिली नसतील. पण काही कारणाने माझ्या लक्षात राहिलीत.

शैतान जहाँ जहाँ राम वहाँ वहाँ
राम लखन मधील हे वाक्य. सिनेमात शेवटच्या मारामारीच्या आधी आहे. मी आणि माझ्या बहिणीने ऐकल्याबरोबर प्रतिक्रिया दिली.. क्या डायलॉग है.

खुशकिस्मती सिर्फ़ एक ही बार दरवाजा खटखटाती है, पर बदकिस्मती तब तक दरवाजा खटखटाती है जब तक तुम दरवाजा ना खोल दो.

हमारा दिल आपके पास है. तनाझ कूरीम ऐश्वर्या ला सांगत असते. त्यातील शब्दांमुळे लक्षात राहिलेय अजून.

मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया.
चायना गेट.. मुकेश तिवारीच्या तोंडी हे वाक्य आहे. मी सिनेमा अजून पूर्ण पाहिला नाही पण हे वाक्य जरूर पाहिले आहे. एक वेगळे वाक्य म्हणून लक्षात राहिले.

अंकुश दिखने में भले ही छोटा हो, पर वह हाथी को काबू कर लेता है.
सिनेमा: मि. बेचारा. अनिल कपूर च्या छापखान्यात काम करणारा मुलगा कर्जाचे पैसे मागणाऱ्या लोकांना सांगतो.

धनाजी रामचंद्र वाकडे... ध.रा.वा. आता कोणाला धरावा?
धूमधडाका: अशोक सराफ जेव्हा शरद तळवळकरांच्या घरासमोर येतो तेव्हा हे वाक्य आहे. लहानपणी बहुधा पहिल्यांदा अशा प्रकारचे वाक्य ऐकले (किंवा समजले) असेल म्हणून अजुनही लक्षात आहे.

अरे मारने से पहले यह तो जान लिया होता के जिसे मार रहे वह कोई लुच्चा हैं या अपने मालिक का बच्चा है.
बोल राधा बोल... कादर खान ऋषी कपूरला मारल्याबद्दल गावकऱ्यांना जाब विचारत असतो. नक्की माहित नाही कोणी लिहिले ते. पण मला वाटतं हे वाक्य नक्की कादर खाननेच लिहिले असणार. अशाच प्रकारची बरीच वाक्ये कादर खानने भरपूर सिनेमांत म्हटली आहेत. कादरखानच्या तोंडी तशाच प्रकारचे संवाद असलेला सिनेमा म्हणजे स्वर्ग से सूंदर.
ह्यावरून आठवले. कादर खान हा हिंदीचा प्रोफेसर आहे असे ऐकले होते. त्याच्याच तोंडी हे असले संवाद/वाक्ये मग खटकतात.

घर का दूध खत्म हो गया है.
परिणीता मध्ये विद्या बालन संजय दत्त ला सांगते. पूर्ण सिनेमात एकदम अर्थपूर्ण, मस्त आणि छान वाक्ये असताना हे वाक्य ऐकून मला, माझ्या मित्रांना हसू आले. हे वाक्य नको होते असे वाटते.

मुझे दो दस चाहिये. एक दस.. दो दस.
जान से प्यारा मध्ये मतिमंद(?) गोविंदा आपल्या आईला (की इंस्पेक्टर भावाला) २० रू मागताना म्हणतो. एक वेगळे वाक्य आणि गोविंदाच्या संवाद शैलीने ते वाक्य लक्षात आहे.

याल्लोग को तडीपार नही बोलने का.
तडीपार सिनेमात मिथून बहुतेक वेळा स्वत:ला याल्लोग (की असेच काहीतरी) म्हणत असतो.

अठासी... नवासी... अस्सी
पनाह सिनेमात नसिरुद्दीन शहा ने इतरांना शिक्षा दिलेली असते, तेव्हा तो त्या नेणार असलेल्या मुलाला आकडे मोजावयास सांगतो. त्या मुलाची अठासी.. नवासी नंतर गफलत होऊन तो पुन्हा अस्सी वर सूरू करतो.

be patient be patient.. ok doctor.. ok doctor
ऐसी भी क्या जल्दी है सिनेमात विवेक मुशरान ची वाट पाहत सर्व बसले असताना सचिन म्हणतो की विवेक ला उशीर झालाय. अशोक सराफ त्याला म्हणतो be patient be patient.. तेव्हा सचिन म्हणतो ok doctor..ok doctor... (ह्यात अशोक सराफ डॉक्टर दाखविला आहे.)

समीर.. मुझे अपनी बाहों में भर लो..
मोहोब्बतें मध्ये किम शर्मा जुगल हंसराजला म्हणते. किम शर्माच्या त्या संवाद फेकीवर आम्हाला भरपूर हसू आले होते.

एक टीव्ही है फ्रीज है.. एक भगवान भी हैं देख...
सत्या सिनेमात स्नेहल (असेच काहीतरी त्याचे नाव आहे) जेव्हा चक्रवर्ती (सत्या) ला दिलेल्या खोलीत घेऊन येतो तेव्हा म्हणतो.

चाय से ज्यादा साला केटली गरम है.
पुन्हा स्नेहल.. हेराफेरी सिनेमात बस स्टॉप वर असरानीला दलाल समजून जेव्हा एक मुलगी देण्याकरता सांगतो, त्यात शेवटचे वाक्य. एक वेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणून लक्षात राहिले.
पुढील दोन वाक्ये तेरे मेरे सपने सिनेमातील.

दोस्ती में पुछने का नही.. कर डालने का.

यार पहले तो तू सिर्फ करोडपती था.. अब तो अनमोल हो गया है.अर्शद वारसी म्हणत असतो चंद्रचूड सिंग ला, आपल्या घरी नेण्याआधी.

अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा..
ह्या सिनेमाचे नाव ओळखा पाहू.... नाना पाटेकर, परेश रावल बद्दल अतुल अग्निहोत्रीला सांगत असतो.

अधर्मी... पापी.. दुराचारी.. बोल सॉरी..
एका धमाल चित्रपटात शेवटी असलेल्या धमाल नाटकातील वाक्य. जाने भी दो यारो सिनेमातील शेवटच्या महाभारत नाटकात नसिरुद्दीन शहाचे वाक्य.
ह्या सारखी खूप वाक्ये असतील, जी आपल्याला ह्या ना त्या कारणाने लक्षात राहिली असतील. सारखी सर्व सिनेमात वापरतात म्हणून नाही.

बाकीची वाक्ये पुन्हा कधीतरी.

डिसेंबर ०२, २००७

अर्थव्यवस्था म्हटले की समोर येते शेअर बाजार, सेन्सेक्स,विदेशी गुंतवणूक, चलनाचे दर, कर्ज, भाववाढ वगैरे वगैरे. पण ह्यात मी ह्याबद्दल काही लिहिणार नाही. इथे आहेत ते फक्त मी एक कॉलेज विद्यार्थी म्हणून माझे अनुभव. आता त्यात पैसे कमावण्याचा संबंध फारच कमी लोकांचा येतो. असतो तो फक्त खर्च. आईवडिलांनी दिलेल्या पैशांचा. कधीतरी लिहिल्याप्रमाणे, आज काल जेव्हापासून नोकरी करतोय तेव्हापासून पैसे हातात असतात. स्वत:चा/घराचा खर्च करू शकतो. अर्थात त्यामुळे उगाच उधळणे करत नाही. पण कधीही पैसे खर्च करताना कमी पडले की वसतीगृहातील अनुभव आठवतात. आजकाल ते दिवस आठवले मन भरून येते. ते होते काही वेगळे दिवस...

तेव्हा घरून आई पैसे देत होती. एखादे पुस्तक घेणे किंवा बाहेर खाणे ह्यामध्येही पैसे नीट विचार करून खर्च व्हायचे. इतरांसोबत सिनेमा बघणे, थोडाफार अवांतर खर्च तर व्हायचाच, पण तो काही उधळपट्टीत नाही येत. वसतीगृहात राहताना बहुतेकांना दर महिन्याच्या सुरूवातीला घरून पैसे यायचे. त्यामुळे बहुतेक मुले मनीऑर्डरची वाट पहायचे. त्यात ती मुले कसा, किती, कुठे खर्च करायचे ह्याबद्दल मी जास्त विचार केला नाही. त्यामुळे एखाद्याला पाहून आपण खर्च करणे किंवा त्याला वायफळ खर्चापासून अडविणे आपल्या अखत्यारित नव्हते. पण एक गोष्ट मी निरखून पाहिली आहे. (इतर मुलांनीही सांगितली होती). काही मुले जी सिगारेट प्यायची ती महिन्याच्या सुरुवातीला मस्त सिगारेटची पाकिटे विकत घ्यायचे. हळू हळु महिना सरत गेला, पैसे संपत गेले की मग त्या सिगरेट ची संख्या कमी व्हायची. पुढे मग सिगरेट संपली की उरलेली जमा करून ठेवा. एकदम गरज पडली तर ते उरलेले तुकडे पेटवून वापरणे, एकदम शेवटी तर सिगरेट ऐवजी वीडी पिणे ही होत असे. मी पाहिले नाही पण ऐकल्याप्रमाणे काही मुले तर चौकीदार/मेस वाल्यालाही विडी मागायचे. अर्थात मी त्या सर्वात (सिगरेट पिण्यात) नव्हतो. कारण ती सवय मी लावली नाही.

दुसर्‍या वर्षाच्या दुसया सत्रात मला पैसे कमी पडत होते. तेव्हा मी घरी जेव्हा फोन केला होता तेव्हा आईनेच विचारले होते की ’पैसे आहेत की पाठवू?’. ह्याआधी कधी अतिरिक्त पैसे मागावे लागले नव्हते, पण ह्यावेळी गरज होती त्यामुळे, का कोण जाणे, मला खूप हसायला आले. एवढे, की न आवरून मी फोन मित्राला दिला. तो आईला म्हणाला की "का माहित नाही, पण हा खूप हसत आहे." थोड्या वेळाने मग मी त्याला काय ते सांगितले.

त्यानंतर बहुधा मला कधी पैसे कमी पडले असे नाही झाले (शेवटच्या वर्षापर्यंत, हो.. सांगतो ते), की घरी फोन करावा नाही लागला की पैसे पाठवा. कारण, घरून येताना पैसे घेऊनच यायचो. ते तिकडील बँकेत ठेवायचे. मग १०-१५ दिवसांनी जेवढे लागतील तेवढे काढायचे. जर मित्राने काही वेळा पैसे मागितले तर ते ही मी द्यायचो. आणि काही वेळा आपण असेही करतो ना की आज मी पैसे देतो तू नंतर दे किंवा पुढच्या वेळी तू दे. किंवा कोणी घरून येत असेल तर त्याला सांगायचे हे हे घेऊन ये, मी तुला आल्यावर पैसे देतो. मग कधी कधी ते हिशोबात मोजले जायचे की तुझ्याकडे एवढे आहेत, मी तुला एवढे द्यायचे आहे.

ह्यावरून आठवले. २र्‍या की ३र्‍या वर्षी, नक्की आठवत नाही ३रे असेल, एक मित्र त्याच्या खोलीत बसून हिशोब करत होता. ह्याच्याकडून एवढे येतील, त्याच्याकडून एवढे येतील, फोटोचे ह्यांचे पैसे येणे बाकी आहेत वगैरे वगैरे. त्याचा येणार्‍या पैशांचा हिशोब झाला जवळपास ९०० ते ९५० रू. मी त्याला म्हणालो, "तू मला ८५० द्यायचे आहेस." तो म्हणाला, "साल्या, तू तर सावकारच निघालास. मी एवढे थोडे थोडे करून पैसे जमा करत आहे. आणि तू एका फटक्यात जवळपास सर्वच पैसे काढून नेतोयस." :)

आमचे कॉलेज शिर्डीपासून जवळ होते. त्यामुळे बहुतेक वेळा आम्ही शिर्डीवरूनच घरी यायचो. केव्हाही बस मिळायची. तर, तिसर्‍या वर्षी मी आणि एक मित्र शिर्डीवरून येणार होतो. बस निघण्याच्या आधी जेवण झाल्यावर विचार केला आईसक्रिम खाऊया. म्हणून एका दुकानात दरफलकावर बघत होतो कोणते परवडेल. पण एकदम कोणतेही आईसक्रिम खाण्यासारखे वाटत नव्हते. मग आम्ही विचार केला- हे असे करण्यापेक्षा थेट आइस्क्रिम ठेवतात तिकडेच पाहू कोणते पाहिजे. मग त्यानुसार आम्ही बघितले. 'ब्लॅक करंट’ खाण्यासारखे वाटले म्हणून ते घेतले. शेवटी पैसे देताना लक्षात आले की आम्ही खाल्लेले 'ब्लॅक करंट’ हेच सर्वांत महाग होते. :D

आता आपण केलेला खर्च वेगळा. पण वसतीगृहाच्या खानावळीत प्रत्येक विद्यार्थ्याचे महिन्याचे खाते ज्या माणसाकडून बघितले/सांभाळले जात, त्याने ही वेगळ्या प्रकारे आमच्या खिशाला खड्डा पाडण्याचा प्रयत्न केले होते. झाले काय, की परीक्षेच्या आधी सुट्टी असल्यावर भरपूर मुले घरी जात असत तेव्हा जर कोणी त्यावेळी वसतीगॄहात असेल व त्या खानावळीत खात असेल तर तिथे वहीत लिहावे लागत असे. महिन्याच्या शेवटी मग प्रत्येक मुलाचे किती दिवस खाणे झाले होते त्यावरून मग आधीच भरलेल्या पैशांपेक्षा जास्त झाले असेल तर मग महाविद्यालयात ते पैसे भरावयाचे असत. काही मुलांनी ती खातेवही बघण्यास मागितली तेव्हा पाहिले की काही मुलांच्या नावासमोर त्याने महिन्याचे ३२-३४ दिवस खाल्ले असे दाखविले होते. मग काय तक्रार केली त्याची.

हे सर्व झाले एखाद्या वेळी एखाद्यावर आलेला प्रसंग. पण ४थ्या वर्षी तर जणू अर्ध्या बॅचसमोरच पैशाची अडचण उभी राहीली होती. जवळपास सर्व प्रॅक्टिकल(प्रयोग) परीक्षांचे जर्नल(प्रयोगवही) तपासून तयार. सर्वजण परीक्षेचे अर्ज भरून नंतर घरी जाण्याच्या तयारीत. ह्यात मग ते पैसे वेगळे काढल्यावर बहुतेकांच्या लक्षात आले, आर्थिक आघाडीवर आपण मार खातोय. मग त्या २-३ दिवसांत मुलांचे खर्च बघण्यासारखे (की न बघण्यासारखे?) होते. आमच्या दररोजच्या जेवणावर त्याचा एवढा फरक पडला नाही, कारण डबा लावला होता. त्यामुळेही बहुधा ते आधी जाणवले नाही. पण रविवारी दुपारी फिस्ट असल्याने रात्रीचे जेवण बाहेरच करावे लागे. आता रात्री काय जेवावे? कसे तरी स्वत:च्या सर्व सामानातून धुंढाळून पैसे जमा केले व रात्री मॅगी खाल्ले. तो होता स्वस्त उपाय. तरीही मला एक दिवस आणखी काढायचा होता. पण हॉस्टेल मधील एका मित्राला आणखी काही दिवस (की परीक्षा होई पर्यंत) तिकडेच थांबायचे होते. त्याचा पैशाचा बंदोबस्त होण्यास थोडा वेळ होता. आम्ही मग जुनी पुस्तके शोधून काढली जी विकू शकतो. आता हे असे करण्यात काही गैर नव्हते. आपण पुस्तके टाकू नये म्हणतो. पण शेवटी भरपूर पुस्तके रद्दीतच देतो ना? जुनी पुस्तके ठेवण्याचे कारण असे की पुढे दुसया मुलांना ते विकू शकतो. किंवा आपल्या वापरण्याकरीताही ठेवू शकतो. पण ती विकण्यास आम्ही धजावलो. कारण वेळच तशी होती. तरीही का कोण जाणे आम्ही वेगळा विचार केला. म्हटले, पुस्तके विकून पैसे घेणे नको. इतर मुले नाहीत पण आपले मोठे लोक आहेत ना उधार मागण्यास. मग मी विचार केला, कॉलेजच्या सरांनाच मागवेत पैसे.

दुसर्‍या दिवशी सकाळी परीक्षेची फी भरल्यानंतर असेच सर्व मित्र पायर्‍यांजवळ जमा होतो गप्पा मारत. काही खाण्याचा विचार केला. पण आठवले, खिशात फक्त ३ रूपये आहेत, ज्यात चहाच मिळू शकेल. एक मित्र म्हणाला, "आहेत माझ्याकडे पैसे. मी देतो." सर्व ओरडलो,"चला". कँटीनमध्ये जाऊन मग आम्ही बर्गर खाल्ले (मॅकडोनाल्डचे नाही हो, साधे, गावठी) आणि चहा प्यायलो. आणि अर्थात त्या मित्राच्या नावाने थ्री चिअर्स करणे आलेच. पुढे थोड्या वेळाने मग त्यानेच बँकेत जाऊन थोडे पैसे काढले व आम्हाला दिले. चला, घरी जाण्याची तर व्यवस्था झाली.

हे प्रकरण होत असताना दुसरा एक मित्र म्हणाला की, "तुला मी जे RAM आणायला सांगितले होते ते तू मुंबईहून घेऊन ये. मी पैसे देतो." दुपारी त्याच्या खोलीवर गेल्यावर तो म्हणाला की त्याने पैसे त्याच्या खोलीतील मित्राच्या बॅगेत ठेवलेत आणि तो मित्र घरी गेलाय. संध्याकाळपर्यंत परत येईल. घ्या, इथे मुलांकडे पैसे नाहीत. आणि ह्या मुलाकडे, जो मला १६०० रूपये देणार होता, पैसे असूनही तो त्याला हात लावू शकत नव्हता. तरीही कसे तरी त्याने ते पैसे मिळविले (कसे ते मला आठवत नाही) व मला दिले. सकाळी मिळालेले २०० आणि हे १६०० ह्यात माझे घरी जाणे तर आरामात होणार होते, मला सरांना पैसे मागावे लागले नाहीत आणि सध्याच्या गरजेपेक्षा अतिरिक्त पैसा होता. म्हणून त्या हॉस्टेलवाल्या मित्राला विचारले की "पैसे पाहिजेत का?" तो म्हणाला, "नको.हॉस्टेलच्या मालकाकडून घेतलेत."

रात्री मी शिर्डीला पोहोचल्यानंतर बसचे तिकिट काढून मग खाण्याकरीता पळालो. खिशात भरपूर पैसे असल्याने खाण्यास स्पेशल पाव भाजी सांगताना काही तरी वेगळेच वाटत होते.
२ दिवस अंधारात राहिल्यानंतर जेव्हा आपल्याला लख्ख प्रकाश दिसल्यावर वाटते तसेच काही.

नोव्हेंबर २०, २००७

२५ एप्रिल १९९९.
संध्याकाळी ६/७ च्या दरम्यान मी माझ्या संगणकावर DOS मध्ये विषाणूविरोधी संरक्षणाची संहिता चालवत होतो. का माहित नाही पण माझ्या संगणकावर विंडोजवर ते चालत नव्हते. त्यात त्याला C ड्राईव्ह मध्ये काही विषाणू मिळाले. ते मी काढून टाकले. पण D ड्राईव्ह तपासता आली नाही. कारण ती संकुचित होती(compressed). तेव्हा विषाणू मिळणे म्हणजे खास काही वाटत नव्हते.
२६ एप्रिल १९९९.
मी सकाळी झोपलो होतो. ७:३० किंवा ८ च्या दरम्यान स्नेहांशू मला उठवायला आला. "ए, चल ना." "थांब रे जरा.", मी आपला उठायच्या मनस्थितीत नव्हतो.
५/१० मिनिटानी अमीत आला. त्याला स्नेहांशू म्हणाला "संगणक चालू होत नाही." आता संगणक चालू होत नाही म्हटल्यावर माझी झोप उडाली. मी ताडकन उठून बसलो. स्नेहांशू म्हणाला, "संगणक बूट होत नाही आहे". आम्ही तडकाफडकी त्याच्या खोलीवर गेलो (वरच्याच मजल्यावर).
अमीतचा संगणकही स्नेहांशूच्याच खोलीत होता. दोघांचेही संगणक चालू होत नव्हते. संगणकांवर संदेश: Please insert the boot disk. आमच्याकडील bootable फ्लॉपीने संगणक सुरू करून बघितले तर हार्ड डिस्क एकदम साफ. अगदी नवी कोरी असते तशी. मग एका संगणकावर विंडोज टाकले. आवश्यक सॉफ्टवेयर टाकले. काय करणार, त्यांचे प्रोजेक्ट चे काम बाकी होते, परिक्षा होती पुढे. त्यात एक (कुठली/कोणाची ते आठवत नाही) हार्ड डिस्क तपासली तर कळले की एक विषाणू आहे. त्याची माहिती काढली तर कळले, तो होता Win-CIH विषाणू. २६ एप्रिलला कार्यरत होतो. त्यानेच त्या हार्ड डिस्कला पूर्ण चाटून पुसून साफ केले होते.
मग काय... दवंडी पिटविली वसतीगृहात. आजच्या दिवसात संगणक चालू करू नका. (तारीख बदलणे म्हणजे संगणक चालू करावा लागेल.) जो कोणी संगणक असलेला आमच्या ओळखीचा होता त्या प्रत्येकाला सांगितले. संतोष म्हणाला,"मी बाहेर जातो आहे. कोणाला काही संदेश द्यायचा असेल तर सांगा". आमचा काय एकच संदेश, ’संगणक चालू नका करू. हार्ड डिस्क घेऊन आमच्याकडे पाठव.’ कारण ज्या विषाणूविरोधी संरक्षण संहितेने तो विषाणू पकडला होता त्याची सीडी आमच्याकडे होती. इतर कोणाकडे असेल तर त्याची माहिती आम्हाला नव्हती.
थोड्या वेळाने सुमीत आपल्या संगणकाची हार्ड डिस्क घेऊन आला. सुमीत कॉलेजच्या वसतीगृहापासून थोड्या अंतरावरील एका खासगी वसतिगृहात राहत होता. संतोषने संदेश दिल्यावर तो आमच्याकडे आला होता. तो म्हणाला, "रात्री मी संगणक चालू केला. तेव्हापासून गालावर हात ठेवून बसलो होतो". म्हणजे सुमित आमच्यातील सर्वात पहिला बकरा होता तर.
वसतीगृहातील इतर मुलेही आमच्याकडून माहिती घेत होते. आम्ही आपली एक सूचना दारावर लावली.
"येथे संगणक विषाणू काढला जाईल. प्रत्येक फाईलचा १ रू".
तोपर्यंत बहुधा आम्ही २/३ हार्ड डिस्क जमा केल्या होत्या पैसे कमावण्याकरीता ;) (हे गमतीत. कारण सर्व आपलेच मित्र तर त्यांचे काम ही करावे लागेलच ना)
चर्चेतून आम्हाला ह्यामागील कारण कळले. आम्ही सगळे खेळ/छायाचित्रे/सॉफ्ट्वेअर देण्यासाठी सरळ हार्ड डिस्कच इकडे तिकडे फिरवत होतो. त्यातच कुठल्या तरी एकातून तो विषाणू आला असेल. कोण होता तो पापी काय माहित.;) पण आता सर्व झाल्यावर काय करणार, कोणाला काय म्हणणार? चुकी आमचीही होतीच.
ह्या गोंधळात मुफद्दल आला स्नेहांशूच्या खोलीवर. तो म्हणाला की मी ही हार्ड डिस्क घेऊन येतो. आधीच २/३ हार्ड डिस्क होत्या रांगेत. म्हणून आम्ही त्याला ती सीडी दिली आणि सांगितले की हे हे सॉफ़्टवेयर टाकून विषाणू काढून टाकता येईल. तो सीडी घेऊन गेला. बोलता बोलता ध्यानात आले की मुफद्दलने जर का संगणक चालू केला तर?.....
मी आणि एकजण लगेच त्याच्या खोलीवर गेलो धावत, ओरडत. तिकडे गेल्यावर कळले, त्याने ही संगणक चालू केला होता. पण तो चालू नाही झाला. आमच्या संगणकावर काही संदेश तरी येत होते. त्याचा संगणक बिलकूल सुरू नाही झाला. आता काय करावे. पुढे काही दिवसांनी कळले त्या बिचाऱ्याच्या संगणकाचा BIOS उडाला होता. ह्यालाच म्हणतात का स्वत:च्या पायावर कुहाड मारून घेणे?
आता राहिला माझा संगणक. संध्याकाळी मला आठवले की काल मला तो वायरस दिसला होता. मी तो C मधून काढला ही होता. त्यामुळे मला जास्त भीती वाटत नव्हती. पण माझा संगणकही सुरू झाला नाही. मनात शंकेची पाल चुकचुकली. माझ्या संगणकाची हार्डडिस्क अमितच्या संगणकावर लावून बघितली. ती ही मस्त चकचकीत फळ्यासारखी होती. कोरी करकरीत. ह्याचा अर्थ माझा संगणक ही आज दिवसभरात सुरू झाला होता आणि दुसऱ्या ड्राईव्हमध्ये असणाऱ्या विषाणूने माझ्या हार्डडिस्कचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केला होता.
चला, आम्ही ही पुन्हा सुरुवातीपासून सर्व सॉफ्टवेयर टाकण्यास सुरुवात केली.
अजून ही एका फ्लॉपीमध्ये तो विषाणू मी साठवून ठेवला आहे. कोणास पाहिजे असेल तर संपर्क साधावा. :)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter