मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ऑगस्ट ०३, २०११


वसंत पुरूषोत्तम काळे उर्फ वपु. ह्यांची पुस्तके कधीपासून वाचायला लागलो आठवत नाही. त्यांच्या कथाकथनाबद्दलही लहानपणी जास्त माहीत नव्हते. पण जेव्हापासुन ऐकले/वाचले, त्यांचे लेखन भरपूर आवडत गेले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या आपल्यासारख्या सामान्य माणसांचे दर्शन त्यांच्या लेखनातून मिळते गेले. मला कसे वाटले? अप्रतिम. आणखी शब्द पाहिजे असतील तर त्यांच्याच पुस्तकातून शोधावी लागतील ;)

त्यांचे 'वपुर्झा' पुस्तक वाचूनच वाटले की जर त्यांच्या ह्या एका पुस्ज्यात,(ज्यात त्यांच्या इतर पुस्तकांतील काहीच परिच्छेद, विचार दिलेत) जर असे चांगले लेखन आहे, तर पूर्ण साहित्य किती अफाट असेल. हळू हळू एक एक पुस्तक वाचत गेलो. तसेच संग्रही जमा करत गेलो. आजच्या घडीला त्यांची ३१ पुस्तके संग्रही आहेत. बाकीची पुस्तके ही लवकरच घेईन.

सध्या माझ्याकडे असलेली पुस्तके:
चिअर्स
भुलभुलैय्या
निमित्त
आपण सारे अर्जुन
कर्मचारी
घर हरविलेली माणसं
मायाबाजार
काही खरं काही खोटं
सखी
मोडेन पण वाकणार नाही
प्रेममयी
रंग मनाचे
हुंकार
बाई बायको आणि कॅलेंडर
वपुर्झा
चतुर्भुज
गुलमोहर
वपु यांची माणसं
वपुर्वाई

इंटिमेट
पार्टनर
संवादिनी
ऐक सखे
गोष्ट हातातली होती
ठिकरी
नवरा म्हणावा आपला
तप्तपदी
फँटसी एक प्रेयसी
रंगपंचमी
मी माणूस शोधतोय
वपु ८५

पुढील यादीतील पुस्तके:
कथा कथनाची कथा
महोत्सव
झोपाळा
माझं माझ्यापाशी
तू भ्रमत आहासी वाया
वन फॉर द रोड
दुनिया तुला विसरेल
वलय
दोस्त
सांगे वडिलांची कीर्ती
पाणपोई
स्वर
प्लेझर बॉक्स १
ही वाट एकटीची
प्लेझर बॉक्स २
का रे भुललासी

ह्यात त्यांचे एखादे पुस्तक सुटले असल्यास मला सांगावे, ते ही यादीत जोडेन. :)

जून १६, २०११


जालरंग प्रकाशनाच्या 'ऋतू हिरवा २०११' ह्या वर्षा विशेषांकाचे आज १५ जून रोजी प्रकाशन झाले.



ह्यातील 'शाळा सुरू झाली..' हे जुन्या आठवणींचे पुंजके हे मी गेल्या आठवड्यात लिहून दिले होते.

अंक आज प्रकाशित झाला आणि नेमके आजच शाळा सुरू झाल्या असल्याचे पाहिले. त्यामुळे त्या ज्या काही आठवणी लिहिल्या त्याला बरोबर शाळा सुरू होण्याच्याच दिवसाची वेळ जमून आली असेच म्हणता येईल. आज पुन्हा त्या आठवणी समोर आल्या.

आणि हो, पहिल्यांदाच मी संपादकीय ही लिहिले आहे. वाचा आणि सांगा कसा वाटला हा अंक.

एप्रिल २४, २०११

वार्‍यावरची वरात - पु. ल. देशपांडेंचे हे नाटक कधीतरी दूरदर्शनवर पाहिल्याचे पुसटसे आठवते. पण त्यातील नेमके सर्व आठवत नव्हते. नंतर मग २००३ पासून पुलंच्या एक एक करत सर्व कथाकथनांच्या ध्वनीफीती संग्रहात वाढवत गेलो, त्यात ह्याचीही ध्वनीफीत होती.

'वार्‍यावरची वरात नाटकाची व्हीसीडी बाजारात उपलब्ध आहे असे कळले तेव्हा पाहिले तर त्याच्या पुनर्निर्मित (अर्थात रिमेक) नाटकाची व्हीसीडी होती ती. आधीच्या एक दोन रिमेकच्या अनुभवांमुळे मी ते घ्यायचा प्रयत्न नाही केला. (तो अनुभव काय ते पुढच्या लिखाणात सांगेन). बहुतेकांनी सांगितले होते की पुण्याच्या 'अलूरकर म्युजिक'  मध्ये मूळ नाटक मिळेल. पण तिकडून मागवणेही जमले नाही.




आत्ता गेल्या आठवड्यात आमच्या नेहमीच्या म्युजिकच्या दुकानात पाहिले की त्या मूळ नाटकाची व्हीसीडी/डीव्हीडी उपलब्ध आहे. लगेच विकत घेतली. सध्या तरी पाहणे जमले नाही पण ते नाटक पुन्हा लवकरच पाहीन.

एप्रिल ०२, २०११

गेल्या आठवड्यात सचिन महेश कोठारे आणि अशोक सराफ ह्यांचा आयडियाची कल्पना हा चित्रपट पाहिला. महेश कोठारे आणि सचिन ह्यांचा एकत्र चित्रपट आणि सचिन किंवा महेश कोठारे चे आधीचे चित्रपट बरे वाटायचे. म्हणून त्यांचा हा चित्रपट पहायचा होताच. पण चित्रपटगृहात जाण्याचा योग नाही जमला. मग व्हीसीडी विकत आणली. पण त्यानंतरही १ महिना नाही जमले. मध्ये एकदा लावला होता. पण रात्री उशीर झाला म्हणून आम्ही १५-२० मिनिटांतच बंद केला. पण त्या १५ मिनिटांतच कल्पना आली की ही आयडिया नवीन नाही. ह्या चित्रपटाची 'आयडियाची कल्पना' जुन्या हिंदी चित्रपटावरून घेतली आहे


मग गेल्या आठवड्यात एकदाचा लावला तो चित्रपट. नायिकेच्या गाडीने धक्का लागल्याने सचिन रुग्णालयात असतो. सचिनला रुग्णालयात ठेवल्यानंतर अशोक सराफचे फोन वर बोलणे पाहून कल्पना आली होतीच की ह्याची पुढची कथा कशी असेल. नायिकेचा भाऊ महेश कोठारे हा सांगतो की अपघात त्याच्यामुळे झाला आहे, म्हणून अशोक सराफ मेव्हण्यासोबत लहानपणी घडलेल्या घटनेचा फायदा आता पैसे उकळवायला घ्यायचा असे ठरवून खटला दाखल करतो. पुढे मग जुळे भाऊ दाखवण्याकरिता त्यांचे दुहेरी रूप दाखवणे, वगैरे वगैरे नेहमीचेच खेळ.

महेश कोठारे पोलीस कमिशनर म्हणून बरा वाटतो, आणि नेहमी प्रमाणेच त्याचे नाव महेशच दाखवलेय. सचिन घरातून पळाल्यावर महेश कोठारेची नेहमीची 'डॅम इट' म्हणण्याची पद्धत इथेही दाखवलेली आहे.

अशोक सराफने ही वकिलाची भूमिका चांगली केली आहे. चांगली म्हणण्यापेक्षा नेहमीसारखीच. काही वेळ चांगले वाटते. मग तोच जुना टिपिकल अभिनय.

सचिनला तरुण दाखवून आताच्या तरुण नायिकेसोबत नाच करणे डोक्यात जाते. त्यापेक्षा सुप्रीयालाच घेऊन काही चित्रपट काढला असता तरी चालला असता.

शेवटपर्यंत मग चित्रपट आपल्या जुन्या थाटातच. असो सांगायची गरज नाही वाटत. नंतर कधी वाटल्यास नीट परीक्षण लिहीन.

अरे हो.. तो जुना हिंदी चित्रपट सांगायचाच राहिला. संजीव कुमार, फारुख शेख, अनिता राज अभिनित लाखों की बात. त्यातील संजीव कुमारला एकदम चतुर दाखवणे, त्याच्याशी हात मिळवल्यास हाताची बोटे पुन्हा मोजून घेणे हे लहान प्रकार ही उचलले गेले आहेत.
थोडक्यात सचिन ने नवीन काही न आणता जुन्याच चित्रपटाची 'आयडियाची कल्पना' घेऊन खास काही दाखवले असे वाटले नाही.

आणखी एक मराठी चित्रपट चांगला वाटला होता. 'एक डाव धोबीपछाड'. त्या चित्रपटाची कल्पना आणि त्यांचा सर्वांचा अभिनय मस्त वाटला होता. म्हटले मराठीत असे वेगळे चांगले चित्रपट ही निघायला लागले. पण गेल्या आठवड्यात हिंदी चित्रपट पाहिला. मिथून चक्रवर्ती चा 'डॉन मुथू स्वामी'. त्याची ही तीच कथा. वाटले मराठीवरून घेतला असेल. (होते असे कधी कधी. माहेरची साडी नाही का नंतर साजन का घर म्हणून आला होता?) पण ह्या दोघांचे प्रदर्शित होण्याचे वर्ष एकच. तारीख/दिनांक माहीत नाही.

जर यांची आयडियाची कल्पना ही दुसऱ्याची आहे तर मूळ कल्पना कोणाची? म्हणजेच मूळ चित्रपट कोणता सांगाल का?


डिसेंबर २९, २०१०

"लता मंगेशकर ए आर रहमान करीता पहिल्यांदा गाणार." 
’दिल से’ चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी त्या लोकांनी जाहिरात केली होती. मी आणि माझ्या मित्राची चर्चा चालू होती की लता मंगेशकर ने गाणे गायला सुरूवात केल्याच्या कितीतरी वर्षांनंतर हा संगीतकार आला. त्यात मग लता मंगेशकर ने त्याच्याकरीता गाणे गायले ह्यात एवढे काही खास नाही. (लता मंगेशकर ओ. पी. नय्यर कडे गायली नाही ही गोष्ट सोडा. ती गोष्ट घडली असती तरी बातमी झाली असती का माहित नाही.) पण चित्रपटसृष्टीत (आणि इतरत्र ही) असे पहिल्यांदा होणारी, खूप वर्षांनी होणारी गोष्ट प्रकाशझोतात आणली जाते. काही वेळा त्यात किती तथ्य असेल ते ही न पाहता. अनुराधा पौडवाल ने १९९८/९९ मध्ये कोणत्या तरी सिनेमात गाणे गायले होते तेव्हाही असेच काहीतरी म्हणत होते की अनुराधा पौडवाल १० वर्षांनी पुन्हा चित्रपटात गाणे गात आहे. पण त्या आधीच १९९७ मध्ये ’और प्यार हो गया’ चित्रपटात तिचे गाणे ऐकले होते. आता शोधले तर १९७६ ते २००८ मध्ये प्रत्येक वर्षी तिने गाणे गायलेले दिसते. त्यांना बहुधा ’टी सीरीज’च्या बाहेर १० वर्षांनंतर म्हणायचे असेल. आमिर खान आणि काजोलचा ’फना’ सिनेमा आला तेव्हा दोघे पहिल्यांदा एका चित्रपटात, एका फ्रेम मध्ये असे काही तरी चालले होते. पण त्या आधी दोघे ’इश्क’ चित्रपटात येऊन गेले होते हे ते लोक विसरले होते किंवा मग त्यांना हे दोघे नायक-नायिका जोडीत पहिल्यांदा आलेत असे म्हणायचे असेल.


असो. हे जुने झाले. आता नवीन ताजी बातमी आहे. मराठीतील दोन दिग्गज कलाकार/दिग्दर्शक पहिल्यांदा एकत्र येत आहेत, ’आयडियाची कल्पना’ ह्या नवीन चित्रपटात. ते दोघे आहेत महेश कोठारे आणि सचिन (पिळगांवकर). ही गोष्ट खरोखरच बातमीसारखी आहे असे मला तरी वाटते. गेले कित्येक वर्षे मी मराठी चित्रपटांबद्दल बोलतो तेव्हा ह्या दोघांचे नाव अर्थातच पुढे असते. त्यातच माझ्या निरीक्षणातील गोष्ट होती की महेश कोठारेच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे नेहमी असायचा आणि सचिनच्या चित्रपटात अशोक सराफ. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे अनुक्रमे सचिन आणि महेश कोठारेंच्या चित्रपटात अधून मधून असत. पण सचिन आणि महेश कोठारे हे एकमेकांच्या चित्रपटात नव्हते. आता कित्येक वर्षांनंतर महेश कोठारे सचिनच्या दिग्दर्शनाखाली त्याच्या चित्रपटात काम करणार आहे. ही माझ्याकरीता बातमीच आहे. 

तसेच ह्या चित्रपटाद्वारे आणखी एक गोष्ट पहिल्यांदा होत आहेत. ते म्हणजे गायनानंतर आता सचिनचे संगीतकार म्हणून नवीन क्षेत्रात पदार्पण.

सचिन आणि महेश कोठारेचा विषय निघालाच आहे तर आणखी एक जाणवलेली गोष्ट. सचिनच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचे (आणि इतर सर्वजणांचेही) काम संतुलित वाटायचे. पण महेश कोठारेच्या चित्रपटात तो मोकाट सुटलेला दिसायचा. आणि बहुधा इतरही लोक. 

आता ह्या नवीन चित्रपटात पाहू कोणाचे काम कसे आहे ते आणि एकंदरीत पूर्ण चित्रपट कसा आहे ते.

(जाता जाता: आमिर खानचा पहिला चित्रपट ’कयामत से कयामत’ किंवा खरे तर ’यादों की बारात’ हा आहे. त्याच्या भावाचा, फैजल खानचा, पहिला चित्रपट कोणता? )

सप्टेंबर २९, २०१०

धक्का बसला ना?

गेले काही महिने मटावरील बातम्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल चर्चा होत होत्या. नायिकांचे हॉट फोटो, मसालेदार बातम्या वगैरेंची रेलचेल असते अशा प्रकारे काही काही. आणि ते आहेच. मटाच्या पानावर गेले की रंगीबेरंगी चित्रे दिसतात, आणि भरपूर काही :)

पण आज आणखी काहीतरी जास्त दिसले (अमेरिकेतून पाहिले असताना). मटा वर ब्लू फिल्म ची जाहिरात. अर्थात मटा ने स्वतः ती टाकली नसेल. गूगल च्या अ‍ॅडसेन्सची कृपा ती. गूगलने कोणते निकष लावून ती जाहिरात दाखवली माहित नाही. पानावरील मजकूरावरून म्हणायचे तर मी होतो 'हसा लेको' पानावर. इतर पानांवर नाही. किंवा मग मटा ने काय प्राथामिक माहिती त्यांना दिली त्यांनाच माहिती. (गूगल  अ‍ॅडसेन्स बद्दल माहिती असणार्‍यांनी प्रकाश टाकावा ही विनंती. :)




१ २ महिन्यांपूर्वीच गूगलने, जीमेल मध्ये ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यामध्ये सुधारणा केली असे सांगितले होते. आणि आधी माहित असल्याप्रमाणे गूगलने अजून तरी मराठी मजकूराकरीता अ‍ॅडसेन्स बनविला नव्हता. आता आला असेल तर त्यात भरपूर लोचा आहे ;) त्यामुळे माझ्या अनुदिनीकरीता तरी अ‍ॅडसेन्स दूरच राहील. (तसा त्याबद्दल विचारच नाही केला अजून)

असो. मटाची होत असलेली प्रगती आणि आता अशी जाहिरात (चुकून?) आली असली तरी मटावर तसा मजकूर येईल अशी आशा बाळगू नका. भारतातल्या नियमांप्रमाणे त्याला बंदी आहे. ;)

एप्रिल १५, २०१०

पुढे लिहिलेले चित्रपट मी कमीत कमी २ वेळा तरी पाहिले आहेत (पहिले चार) किंवा एकदाच पाहिले असल्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. त्यानुसार मी हे आवडलेले चित्रपट म्हणून सांगत आहे. ह्या चित्रपटाच्या कथानकाचा, कलाकारांच्या कलेचा दर्जा एकदम उच्च नसला तरी आवडण्यासारखाच वाटला. तसेच आता पाहिल्यास तेवढेच आवडतील का ह्याची खात्री मलाही नाही :) पण तुम्हा सर्वांसमोर ही यादी देण्यासारखे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. तसेच कथानक लिहिण्यास/वाचण्यास आवडत नसले तरी वाचकांना ह्या चित्रपटांची ढोबळ कल्पना यावी म्हणून तेही लिहिले आहे.

यूंही कभी
-एक साध्या, नेहमी लोकांना मदत करणार्‍या माणसाला देव भेटतो व जगाचे रक्षण करण्याकरीता लोकांना संदेश देण्याकरीता सांगतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग ह्यात दाखवलेले आहेत.
कलाकार: कुमार भाटिया, अशोक कुमार, अर्चना पुरण सिंह, नविन निश्चल.

ऐसी भी क्या जल्दी है?
-इंग्रजी सिनेमा ’फादर ऑफ द ब्राईड’ वरून घेतलेला सिनेमा. स्वत:च्या मुलीवर अतिप्रेम करणार्‍या व अतिचिंता करणार्‍या वडिलांचे, मुलगी लग्न झाल्यावर घरातून जाईल ह्या कारणाने मुलीच्या आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात/लग्नात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे दाखवले आहे.
कलाकार: सचिन, सॄष्टी बहल, विवेक मुशरन, अर्चना पूरण सिंह

हंसते खेलते
-पृथ्वीवरील वाढते असामाजिकीकरण आणि पृथ्वीचा होणारा र्‍हास पाहून देव पृथ्वीचा संपूर्ण नाश करण्याचे ठरवतो. पण ३ देवदूत त्याला विरोध करतात. तेव्हा देव त्यांना संधी देतो की एका आठवड्यात एखादा माणूस दाखवावा जो स्वार्थ न दाखवता इतरांवर प्रेम करेल व प्रसंगी त्यागही करेल. ह्या प्रकरणी ते ३ देवदूत राहूल रॉय ला निवडतात. त्यांच्या कामात अडथळे आणतो सैतान
कलाकार: राहूल रॉय, असरानी, राकेश बेदी, अनंत महादेवन, इशरत अली.

ढूंढते रह जाओगे
-एक तरूण (अमर उपाध्याय) त्याच्या प्रेमिकेला भेटण्यासाठी ती असलेल्या मोठ्या हॉटेल मध्ये येतो. तिथे एका व्यापार्‍याने (सतीश शहा) आपल्या एका हिर्‍याचा लिलाव करायचे ठरवले असते. तो हिरा चोरण्याकरीता चोर (जावेद जाफरी), एक खुनी (नसीरूद्दीन शाह) हे ही आलेले असतात. त्यांच्यात झालेले विनोदी प्रसंग ह्यात दाखविण्यात आले आहेत.

दो लडके दोनो कडके
-दोन गरीब तरूण पैसे मिळविण्याकरीता एका श्रीमंताच्या मुलाला पळवून आणतात. पण त्यांच्या घरातच दोन चोर चोरी करायला आलेले असताना त्या मुलाला पळवून नेतात. त्यानंतरचे प्रसंग.
कलाकार: अमोल पालेकर, असरानी. बाकीचे आठवत नाहीत :)

तेरा नाम मेरा नाम
-अजीत पाल आणि (बहुधा) बबलू मुखर्जी हे दोन तरूण मित्र. एक ब्राह्मण व दुसरा इतर जातीतला. ब्राह्मण मुलाला नोकरी पाहिजे असते पण तिथे आरक्षणामुळे त्याला मिळत नाही तर दुसर्‍याचे एका मुलीवर प्रेम असते. पण तिचे वडील तो ब्राह्नण नसल्याने त्याला विरोध करतात. म्हणून दोघेही नाव बदलतात. त्यानंतरची कथा दाखविली आहे.
ह्या सिनेमाचे नाव तेव्हा मला माहित नव्हते. पण एकदा दूरदर्शनवर रात्री दाखवला होता तेव्हा पाहिला. तेव्हा बरा वाटला. त्यानंतर पाहिले की ह्याच कथेवर नंतर आशिक मस्ताने (१९९६) आणि तेरे मेरे सपने (१९९६) हे चित्रपट ही बनलेत.

इना मिना डिका (मराठी)
-प्रशांत दामलेला (इना) कुठेही,केव्हाही झोपायची सवय असते. आणि त्याने झोपताना जे छायाचित्र पाहिले असते ते तो झोपलेला असेल तोपर्यंत प्रत्यक्षात येतात. त्याची बायको आणि त्याचा मित्र अशोक सराफ (मिना) त्याला एका डॉक्टरकडे , सुधीर जोशी (डिका) घेऊन जातात. डिका त्याच्या ह्या सवयीचा आणि चमत्काराचा फायदा घेऊन पैसे कमवायचा विचार करतो. त्यानंतरचे कथानक.
नंतर ह्याच नावाचा हिंदी सिनेमाही आला होता, ऋषी कपूर, जुही चावला आणि विनोद खन्ना ह्यांचा. पण त्या चित्रपटाच्या मानाने हा मराठी चित्रपट चांगलाच वाटला ;)

ही यादी पूर्ण नाही आहे. पण सध्या एवढेच आठवत आहेत. जमल्यास पुन्हा लिहिन.
तुम्हालाही असे काही वेगळे चित्रपट आवडले आहेत का?

ऑक्टोबर ०४, २००९

गेल्या आठवड्यात लोकप्रभामध्ये मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाबद्दल(सीडी आवृत्ती) वाचले. लगेच दुपारी ठाण्यातील दुकानांत फोन फिरविले. पण कुठेही ते उपलब्ध असण्याची शक्यता दिसली नाही. मग माझ्या पुढच्या आशास्थानावर लक्ष्य केंद्रित केले. "दादर मधील आयडियल बुक डेपो". तिकडुन ह्याची सीडी घरी आणण्यात आली.
खरंतर ह्या त्यांच्या संकेतस्थळावर ह्या सीडी शब्दकोशाची विस्तृत माहिती दिलेली आहेच. तरीही मला जसे दिसले ते मी येथे लिहीत आहे.
सीडी टाकल्यावर त्यातील EXE फाईल सूरू होते. त्यामुळे काय कसे सुरू करावे ह्याची शोधाशोध करण्याची गरज नाही. उघडलेल्या प्रोग्रॅममध्ये पहिल्याच पानावर 'मोल्सवर्थ यांची प्रस्तावना', 'मोल्सवर्थविषयी थोडेसे', 'जॉन विल्सन यांच्या नोंदी', 'प्रकाशकाचे दोन शब्द', 'हा शब्दकोश कसा वापराल' व (सीडीचा मुख्य भाग) 'शब्दकोश प्रवेश' असे दुवे आहेत.

ह्याबद्दल माहिती लोकप्रभात व त्यांच्या संकेतस्थळावर वाचलीच होती त्यामुळे थेट 'शब्दकोश प्रवेश' हा दुवा निवडला.

ह्यात पाहिजे ते अक्षर निवडून त्या अक्षरावरून सुरू होणरे शब्द ह्यांची यादी निवडता येतो.

तसेच त्या पानावर Find वर टिचकी मारून उघडलेल्या खिडकीत पाहिजे तो (त्या अक्षरावरून सुरू होणारा) शब्द शोधता येतो.

सर्च(Find) अर्थात शोधण्याची सुविधा ही चांगली आहे. खरं तर त्याशिवाय शब्द शोधणे कठीणच जाईल.
प्रकाशकांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या शब्दकोशात सुमारे ६०००० शब्द आहेत. आता मराठी भाषेची व्याप्ती शब्दांनुसार केवढी आहे त्याचा मला अंदाज नाही. परंतु ह्या शब्दकोशात असलेले भरपूर शब्द मला माहित नव्हते. (मी अजून पूर्ण अक्षरे नजरेखालून घातली नाहीत. त्यास भरपूर वेळ आहे) अर्थात मराठी शिकणार्‍यांकरीता हा खूप उपयोगाचा होईल तसेच मराठी येणार्‍यालाही एखाद्या शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात हे पाहण्यासही उपयोगाचा आहे.
वरील जमेचे मुद्दे असूनही काही गोष्टींवर भर द्यावासा वाटतो. त्यांच्या सीडीच्या पुढील आवृत्तीत बहुधा ते हे बदल करतीलही.
  • काही शब्दांचे अर्थ ह्यात नसल्याचे आढळले. उदा. 'केवळ'. हा शब्द ’कांही’ ह्या शब्दाच्या अर्थात ’केवळ उपासी जाऊं नको कांही खा.’ ह्या उदाहरणात वापरला आहे. पण ’केवळ’ ह्या शब्दाचा अर्थ दिला नाही आहे.
  • शब्द शोधण्याच्या सुविधेत युनिकोड मध्ये टंकण्याकरीता एखाद्या वेगळ्या सॉफ्टवेयरची गरज असते त्याबद्दल माहिती देणे गरजेचे वाटले. तसेच त्यांनी युनिकोड फाँट कुठुन मिळेल ह्यासंबंधी संकेतस्थळांचे दुवे दिले आहेत. तरीही जर ते फाँट आणि टंकनाचे सॉफ्टवेयर त्यांनी ह्या सीडीतच दिले असते तरी चालले असते असे वाटले. (नाहीतरी ७०० पैकी ६०८ MB वापरल्याने उरलेल्या जवळपास ८०-८५ MB मध्ये ते येऊ शकते. त्या त्या संकेतस्थंळावर मी फाँट/सॉफ्टवेयर वाटण्याबद्दलची माहिती वाचली नाही आहे अजून. जर काही बंधने असतील तर मग ते वापरणार्‍यावर जबाबदारी देणेच योग्य)
  • शब्द फक्त त्याच अक्षराच्या पानावरील शब्द शोधता येतात. उदा ’अ’ च्या पानावर ’आवड’ हा शब्द सापडत नाही.
  • संगणक वापरणार्‍याला आजकाल शोध करण्याकरीता CTRL+F ची सवय झाली असते. (तो एक अविभाज्य भागच आहे म्हणा) त्याची सुविधा नाही आहे.
तरीही एकूण भरपूर शब्दांचे अर्थ, सीडी असल्याने त्याची जवळ बाळगण्यातील उपयुक्तता, अतिशय वाजवी दर (रू ७५ फक्त) आणि सर्वत्र चालत असलेल्या मराठीबद्दलच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा शब्दकोश आपल्या संग्रहात ठेवणे चांगलेच आहे.

मे ०२, २००९

गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.)



तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत. अर्थात हिंदी चित्रपट प्रदर्शित न होणे हे ही कारण असू शकेल, पण आनंद वाटला की मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्स मध्ये पाय पसरायलाही जागा मिळाली. पण प्रेक्षागृहात शिरताक्षणी तो आनंद मावळून गेला. जेमतेम १० ते १५ टक्के खुर्च्या भरल्या होत्या. असो.(बोक्याची टक्केवारीही काढायला पाहिजे असे वाटले. तो सिनेमा बहुधा अजूनही चांगला चालत आहे.)

ह्या सिनेमाची कथा तशी काही वेगळी नाही. (मला चित्रपटाची कथा ऐकायला आणि सांगायला आवडत नाही, पण ह्यात काही खास वळणं नाहीत. चित्रपटाच्या जाहिरातीतच सर्व दिसून येते.) एका गावातील एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन जण- एक आमदार, एक सरपंच. व त्या दोघांत राहून दोघांचीही कामे करत स्वतःचा फायदा करून घेणारा गावातील एक माणूस नारायण. सुरूवातीपासून आमदार टोपे (सयाजी शिंदे) आणि सरपंच डोळे (नागेश भोसले) ह्यातील एकमेकांवर वरचढ होण्याची भांडणे दाखविली आहेत. त्यात नारायण (मकरंद अनासपुरे) दोघांकडून असल्याचा आव आणत, त्यांच्यात कळ लावत, त्यात भर घालत असतो, व स्वतःचाही फायदा करून घेत असतो. पुढे एका भांडणातून नारायण ठरवितो की तो स्वतःच निवडणूकीला उभा राहणार. मग जे राजकारणी डावपेच सूरू होतात ते सर्व पुढील चित्रपटात दाखवले आहे.

संपूर्ण चित्रपटात विनोदी वातावरण कायम राहते, आणि हा विनोद हा एका पातळीवरच राहतो. ना एकदम घसरला ना एकदम उंचावला आहे. त्यामुळे ठिक आहे. बाकी नारायणाच्या नावावरून विनोद, आमदार टोपेच्या मेव्हण्याचे एकच वाक्य ३/४ म्हणणे अशा प्रकारात थोडा कंटाळा येतो. सुरूवातीला नारायण सायकलवरून उतरल्यावर पायांची जी हालचाल करतो त्यावरून असले अंगविक्षेपाचे विनोद असल्याचे खटकले होते, पण तो प्रकार २ वेळाच दाखवला आहे. एखाद्याशी बोलत असताना आमदाराचा मुलगा मध्ये मध्ये आपले बोलणे लावत असतो ते प्रसंग नेहमीचेच वाटतात पण तरीही हसवून जातात.

वेगळेपण वाटले ते नारायण जे काही करत असतो ते नेमके कशाकरीता करत असतो त्याचा अंदाज लगेच आला नाही. एखादी गोष्ट घडून जातानाच त्यामागचे कारण कळते. उदा. डोळे व टोपे दोघांनाही शेवटच्या दिवशी ४ वाजता निवडणूकीचा अर्ज का भरायला लावतो हे मला तरी लगेच कळले नाही. त्या कार्यालयात ४ वाजल्यानंतरच कळले.

चित्रपटाला तशी एक सलग कथा असल्याचे मला तरी जाणवले नाही. एकमेकांना धूळ चारणे हा मूळ हेतू समोर ठेवून त्यानुसार मग प्रसंग टाकलेले आहेत. सयाजी शिंदे व मकरंद अनासपुरे ह्यांचे काम नेहमीच्याच शैलीत आहे. नागेश भोसलेचा अभिनय मी जास्त पाहिलेला आठवत नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'हसरतें' मालिकेतील त्याचे काम आवडले होते. पण त्यातील युनियन लीडरचा आवेश ह्यात सरपंच असला तरी वाटला नाही. बाकी इतर पात्रे म्हणजे आमदार/सरपंचाची बायका,मुले ह्यांची ही कामे बरी वाटली. सरपंचाच्या बायकोचा (लग्नाआधीचा) प्रियकर जो महाराज बनून वावरतो त्याचेही काम चांगले वाटले. लावणी कलाकार म्हणून असलेल्या नायिकेचे कामही बरे वाटले. एक परदेशी युवती तेथे कला शिकण्यासाठी आलेली असते त्याची गरजही सुरूवातीला वाटत नाही परंतु नंतर गरज कळते. संपूर्ण चित्रपटात दिल्लीचे नाव नाही. आहे ते फक्त लावणी मध्ये व चित्रपटाच्या शेवटी. नावावरून वाटले होते की गल्लीत म्हणजे स्वतःच्या प्रांतात काही गोष्टी करण्यासाठी दिल्लीमध्ये काही ना काही कथानक घडत असेल. पण सिनेमात नुसता गावातील कुरघोडींचा गोंधळच आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना एवढा काही खास प्रभाव माझ्यावर पडला असे वाटले नाही. त्यातल्या त्यात नंतरच्या १ तासात मी हा सिनेमा पाहिला हे ही विसरून गेलो.

असो, मी ही अजूनही गोंधळलो असल्याने माझे लिखाणही तसेच वाटत असेल. पण ह्या सिनेमाबद्दल मत असे की सिनेमा तसा वाईटही नाही आणि आवर्जून पहावा असाही नाही.

मे १९, २००८

नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे.
महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील. जर कॅश ऑन डिलिवरी पाहिजे असेल आणखी २० रू. म्हणजे एकूण २९५ रू. मी विचारले 'असे तुम्ही जाहिरातीत का नाही लिहिले?' मला काही उत्तर नाही मिळाले. तिने पत्ता विचारला तेवढयात फोन बंद झाला. तरी दुसर्‍या दिवशी त्यांचा पुन्हा फोन आला तेव्हा मी ती नोंदणी नक्की केली.
आता मंगळवारी घरी तो संच पोहोचवण्यात आला. कार्यालयातून घरी आल्यावर पाहिले ते पाकिट. ह्या टाईम्स वाल्यांचे CD पाठवणे मला आवडते. चांगली बांधणी असते सामानाची. उघडून पाहिले तर दोन ऑडीयो सीडी व एक व्हिडीओ सीडी प्लॅस्टीक मध्ये घालून तीन कप्प्यात लावून दिल्या आहेत. ह्म्म.. थोडा हिरमोड झाला, कारण टाईम्स वरील विश्वास पूर्ण सार्थ नाही झाला. जाऊ द्या, आज काल पैसे वाचवण्याकरीता सर्वच कंपन्या काही ना काही करत आहेत.
तर काय काय आहे ह्या संचामध्ये?
सुरूवातीला कुसुमाग्रजांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रमाणपत्र दिले आहे. पुढील पानावर कुसुमाग्रजांबद्दल गुलजार ह्यांचे शब्द, कुसुमाग्रजांना मिळालेले पद्मभूषण सम्मानपत्र आणि सर्वांत आत सीडी.
सीडी १
कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात.
१. प्रस्तावना
२. मराठी माती
३. थेंब
४. पृथ्वीचे प्रेमगीत
५. पाऊल चिन्हे
६. जा जरा पूर्वेकडे
७. मार्ग
८. कोलंबसाचे गर्वगीत
९. नाते
१०. याचक
११. नाही (काही बोलायचे आहे..)
१२. तृणाचे पाते
१३. स्वप्नाची समाप्ती
१४. यौवन
१५. अहि-नकूल
१६. हा चंद्र
१७. म्हातारा म्हणतोय
१८. कोकिळा
१९. राजहंस माझा
२०. वार्ता
२१. काही छोट्या कविता
देणं
डाव
छंद
यमक दुष्काळी
सीडी २
कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात.
१. मुलांसाठी कविता
श्रावण
आजोबांचे गाणे
ते म्हणतात (गवताचं पातं..)
२. क्रांतीचा जयजयकार
३. अखेर कमाई
४. प्रेमयोग श्रीकृष्णाचा
५. स्मृती
६. आगगाडी आणि जमीन
७. प्रेम म्हणजे
८. दिवे
९. प्रार्थना
१०. संत
११. येणं जाणं
१२. राजा आला
१३. शर्त
१४. झोपेन माताजी
१५. आनंदलोक
१६. गाभारा
१७. कणा
गुलजार ह्यांनी केलेला हिंदी अनुवाद त्यांच्याच आवाजात..
१८. रीढ (कणा)
१९. गर्भग्रह (गाभारा)
२०. रद्दी
शिरवाडकरांच्या कविता सर्वांनी वाचल्या असतील, त्यामुळे त्याबद्दल लिहिणे गरजेचे नाही असे वाटते.
व्हिडीओ सीडी मध्ये सोनाली कुलकर्णीने केलेले निवेदन आहे. शिरवाडकरांच्या साहित्याबद्दलची माहिती ह्यात सांगितली आहे. सोनाली कुलकर्णीच्या बोलण्याच्या शैलीत ते निवेदन फार चांगले वाटले.
पुढे आहे ’विश्वनाथ : एक शिंपी’ ह्या कुसुमाग्रजांच्या कथेचे लघुचित्रपटात केलेले रूपांतर. मुख्य कलाकार: निळू फुले, लीलाधर कांबळी व जनार्दन लवंगारे. निळू फुलेंनी आपल्या अभिनयाचा जोर दाखवलाच आहे. लीलाधर कांबळीचा सहअभिनय नेहमीप्रमाणेच प्रमाणशीर. जनार्दन लवंगारेंना मी फक्त नाटकांत व सह्याद्री दूरदर्शन वरील कार्यक्रमातच पाहिले होते. त्यांचा ह्या लघुपटातील प्रवेश छान आहे. एका गावातील शिंप्याच्या जीवनातील हे २२ मिनिटांचे चित्रीकरण त्याची परिस्थिती नेमके दाखवते व त्याची पुढील जिद्दही.
सर्वात शेवटी आहे, सचिन खेडेकरनी केलेले ’सतारीचे बोल’ ह्या कथेचे वाचन. आता ह्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाचनच म्हणता येईल, कारण ते सादरीकरण मला तरी एवढे प्रभावी नाही वाटले. आता आपल्यासमोर पु.ल. देशपांडे, व. पु. काळे, द. मा. मिरासदार ह्यांचे कथाकथन समोर असल्याने सचिन खेडेकरचे ते कथाकथन कमी प्रतीचे वाटणे साहजिकच आहे, पण खरं तर सचिन खेडेकरचे पुस्तक पकडण्याची पद्धत, वाचताना समोर बघण्याची शैली आणि थोडा फार बोलण्याचा ढंग हे सर्व जरा खटकते. मध्ये तर एकदा पान उलटताना त्याने अशी नजर केली की लहान मुलांसमोर आपण जादूच्या पेटीतून काहीतरी खास वस्तू बाहेर काढतो आहे. अर्थात ’सतारीचे बोल’ ही कथा चांगली आहे. दिवसभरात वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देत शेवटी दिवसाखेर सतारीचे बोल कानावर आल्यावर मास्तरांचे मनातील सारे दु:ख विरघळून जाते, हे ह्या कथेत सांगितले आहे.
ह्या संचाबद्दल महाराष्ट्र टाईम्स वर दिलेल्या जाहिरातीत त्यांनी लिहिले आहे की कुसुमाग्रजांच्या सगळ्या कविता त्यांच्याच आवाजात. हे थोडेसे दिशाभूल करणारे वाटते. कारण ह्यात एकूण ४३ कविता आहेत. 'कुसुमावली' ह्या संकेतस्थळावर त्यांच्या इतरही काही कविता आहेत. आता मी काही म्हणतोय कारण ह्या संचातील काही कविता तिथेही नाहीत. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या एकूण कविता किती हे नक्की नाही, आणि ह्या संचात त्यांच्या सगळ्या कविता नाहीत.
असो, व्हिडीओ सीडी जरी नेहमी वापरात नाही आली तरी कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकण्याकरीता ऑडीओ सीडी तर नेहमीच लावू शकतो. त्यामुळे एकंदरीत घरात ठेवायला पाहिजे असा संच आहे. आणि माझ्या मते थोड्या दिवसांत हा संच दुकानातही मिळू लागेलच.

एप्रिल ०६, २००८

ह्या आधीचे लेख इथे वाचावेत.
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २

खुशिया बांटने से बढती है, दुख बांटने से कम होता है.
हेराफेरी मधील हे वाक्य. परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ला सांगत असतो. नेहमीच्या जीवनात उपयोगी पडेल किंवा पडत आलेले असे हे.

दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गोली गोली पे लिखा है मरने वाले का नाम
जलजला (की झलझला?) ह्या सिनेमातील वाक्य डॅनीच्या तोंडी आहे. हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हापासून हे वाक्य लक्षात राहिले आहे. (खरे तर तेव्हा एकदाच पाहिला आहे हा चित्रपट. बाकी २ वर्षापूर्वी चालू होता कुठल्याशा वाहिनीवर, पण नाही पहायला मिळाला.)

मै तुम्हे भुल जाऊ यह हो नही सकता और तुम मुझे भुल जाओ यह मैं होने नही दूंगा
सुनील शेट्टी शिल्पा शेट्टीला म्हणतो, धडकन सिनेमात. ह्याच्या गाण्यांची कॅसेट ऐकताना त्यात गाण्यांच्या आधीची वाक्येही ठेवली होती. (हा प्रकार जुन्या सिनेमांच्या गाण्यांच्या कॅसेट मध्ये पहायला मिळायचा. आता मध्ये पुन्हा वापरला गेला होता.) त्यानंतर सिनेमा पहाताना कळले की ह्यात सुनील शेट्टीची ऍक्टींग एकदम तीव्र आहे.

ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?
कुछ कुछ होता है सिनेमात राणी मुखर्जी शाहरूख खानला म्हणते. सिनेमात तो प्रसंग दाखविला नाही आहे पण सुरूवातीला शाहरूख खानला हे वाक्य आठवते असे दाखविले आहे. तसे म्हणायला गेले तर ह्या सिनेमातील एकूण एक वाक्ये त्यावेळी पाठ होती. (अगदी पार्श्वसंगितासोबत, त्याबद्दल नंतर कधीतरी). हे वाक्य वेगळ्या कारणाने लक्षात आहे अजून.वसतीगृहात असताना एका मुलाला, राहूल नाव त्याचे, सहज विचारले, फिल्मी स्टाईल मध्ये. "ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?". तो बहुधा आधीच कसल्या तरी रागात होता, रागात ’नाही’ म्हणून निघून गेला. :)

"नौकरी मिली?" "नही.. आपको?"
स्टाईल सिनेमात प्रिंसिपल दाखविलेला नट, स्वत:ची नोकरी गेल्यावर चंटू बंटू कडे मदत मागायला जातो. रात्री घरी आल्यावर जेवताना तो आपल्या मुलाला विचारतो की नोकरी मिळाली का? तेव्हा त्याचा मुलगा 'नाही' म्हणतो आणि त्याला विचारतो की 'तुम्हाला मिळाली का?' पूर्ण सिनेमा विनोदी असूनही हे ह्या एका वाक्याने इथे आणखी धमाल वाटते.

गाय ने दिवार पे चढके गोबर कैसे किया?
तकदीरवाला सिनेमात असरानीने चित्रगुप्त चे काम केलेले आहे. एका घरासमोर राहून तो काहीतरी न्याहाळत असतो तेव्हा त्या घरातील मुलगी पोलिसांना बोलाविते. तेव्हा असरानी पोलिसाला (बहुधा अनुपम खेरला) हे विचारतो.

T O to, D O do तो फिर G O गू क्यू नही होता.
चुपके चुपके सिनेमात धर्मेंद्र चे ओम प्रकाशला हे विचारणे सर्वांनाच लक्षात असेल.

"काहे मारा उसको?" "आप से मिलना था." "यह कोई तरीका हुआ मिलने का?"
नाना पाटेकर च्या माणसाला मारले म्हणून तो अजय देवगणला जाब विचारतो. तेव्हा अजय देवगण सांगतो की नाना पाटेकरला भेटायचे होते. त्यावर नाना पाटेकरचा प्रश्न. ही काय पद्धत आहे का भेटण्याची? सिनेमा तसा थोडाफार गंभीर होता. त्यात हे वाक्य विनोदी मजा देउन गेले. :D सिनेमा: अपहरण

मार्च २२, २००८

लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी.
(नवीन काही असल्यासही चालेल. :) )


दुपारचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले चार
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले पाच
दादाने फोडली काच
काच वेचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले आठ
ताईने फोडला माठ
पाणी पुसण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले नऊ
बाबांनी आणला खाऊ
खाऊ खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले दहा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले अकरा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

लेखक/कवी: अनामिक

डिसेंबर ३१, २००७

आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे. अर्थात किशोर कुमार सोबत इतर लोकांचाही आवाज असल्याने ते लगेच लक्षात येते. (आठवले, तीन देवियां सिनेमातील हे गाणे.)
दहावीत (बहुधा ११ वीत ) असतानाची गोष्ट. मला ताप आला होता. त्यामुळे मी झोपलो होतो. मध्येच जाग आल्यावर पाहिले तर मी खोलीत एकटाच होतो. रात्री ११च्या नंतर बेला के फूल मध्ये हे गाणे सुरू होते. ते गाणे ऐकताना एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे आता कधी ही हे गाणे ऐकले की एकदम फ्रेश्श वाटते ;)
(आताही हे लिहिता लिहिता मागे गाणे ही सुरू ठेवले आहे :) )

घूंघट की आड से..
आमिर खान, जुही चावलाचे हे गाणे ऐकायला मस्तच आहे. त्यातील शब्दही छान आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या लहानपणीचा सार्वजनिक गणपती समारंभ आठवतो. ज्यात कॉलनीतील एका मुलाने व त्याच्या घरी आलेल्या एका मुलीने ह्या गाण्यावर नाच केला होता.

ह्या सोबतच तम्मा तम्मा लोगे (थानेदार) तसेच आशिकी मधील गाणी ऐकली की तेच सर्व गणपतीचे दिवस आठवतात, ज्यात दिवसभर ही गाणी सुरू असायची. तम्मा तम्मा लोगे वर तर मनात येईल तसा नाच केला होता.

फरेब मधील ओ हमसफर हे गाणे ऐकले की महाविद्यालयातील दुसरे वर्ष आठवते. आणि बाहेर पाऊस पडत आहे असेच वाटते. ह्याचे कारण हे की ही गाणी जेव्हा चालत होती तेव्हा पावसाळा होता आणि माझ्या बाजूच्या खोलीतील मुले हीच गाणी लावून ठेवत होती.

यह जो थोडे से है पैसे, मुझसे नाराज हो तो.. पापा कहते हैं मधील ही गाणी ऐकली की परीक्षेच्या आधी दिलेल्या सुट्ट्या आठवतात. अर्थात त्या सुट्ट्या अभ्यासाकरीता होत्या पण त्यात गाणी ऐकणे, सिनेमे पाहणे हे थोडेच थांबते. :)

अश्विनी ये ना..
गंमत जंमत मधील हे गाणे ऐकले की आधी किशोर कुमारची गाण्याची पद्धत, जी दूरदर्शन वर दाखविण्यात आली होती, आठवत होती तसेच त्यातील अशोक सराफ ची जी बायको दाखविली आहे (चारूशिला साबळे) तिचे झाडू घेऊन नाचणे आठवायचे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिले आमचे एक सर प्रत्येक वार्षिक समारंभाला हे गाणे गायचे, आणि त्यांच्या शाखेच्या फ्रेशर पार्टीलाही. त्यामुळे आता कधीही हे गाणे ऐकले की कॉलेजचे ते समारंभ आठवतात.

ॐकार स्वरूपा..

कॉलेज मधील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ह्याच गाण्याने व्हायची (आताही होत असेल). त्यामुळे हे गाणे ऐकले की मग ते समारंभ आठवणे आलेच.

मैं हूं झूम झूम झूमरू..
लहानपणी गणपतीतील अंताक्षरीच्या निवडफेरीत मी हे गाणे फक्त सुरुवातीच्या संगीतावरून ओळखून म्हटले होते. त्यामुळे अंताक्षरीत मी निवडला जाण्यास फायदा झाला होता. :)
तसेच कार्यालयाच्या सेमिनार वजा सहलीत औरंगाबादला असताना अजिंठा लेण्यात जाताना बसमध्ये हे गाणे गायलो होतो.
हे दोन प्रसंग ह्या गाण्याशी निगडीत राहतील असे वाटते.

ताक धिना धिन ताक धिना धिन...

रखवाला सिनेमातील हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे. मी नेहमी गुणगुणत असे. शाळेत मग आमच्या वर्गात एक दोन वेळा मला गायलाही सांगितले होते. एकदा तर काय झाले की, आमच्या वर्गात दुसऱ्या वर्गातील मुलगा येऊन आमच्या टीचरला म्हणाला की मला त्यांच्या वर्गात बोलावले आहे. माझ्या टिचर ने मला पाठवले. तिकडे गेल्यावर कळले की त्यांच्या वर्गात अभ्यास संपला होता. मग मनोरंजन करण्याकरीता मला गाणे गायला सांगितले. तेव्हाही मी हेच गाणे गायलो होतो. आता ती इयत्ता/साल आठवत नाही, पण हे गाणे ऐकले की तो प्रसंग नक्की आठवतो.

अरे हो,
प्यार हमें किस मोड पे ले आया
सत्ते पे सत्ता चे हे गाणे तर राहिलेच. बंगळूरच्या ऑफिसच्या सहलीत सकाळी एका ठिकाणाहून परत येताना हे गाणे गाऊन मी धमाल केली होती. त्याच दिवशी मग संध्याकाळी बंगळूरला परत येताना ३ बस पैकी कोणत्या बसमध्ये बसावे हे विचार चक्र चालू असताना मित्रासोबत बसलो होतो. तेव्हा सकाळी आम्ही फिरायला गेलेल्या गटातील एक मुलगा मला शोधत आला व त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला. तिथे तर मग काय हे गाणे, आणखी भरपूर धमाल गाणी गात, खेळ खेळत आम्ही परतीचा प्रवास केला होता.

छैया छैया
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास सर्व खोल्यांत हेच गाणे वाजविले जात होते. एवढा वैताग आला होता की मी माझ्या २/३ मित्रांना तर सांगितले होते की माझ्यासमोर हे गाणे लावायचे नाही. त्यांनी तर एकदा मग गंमत केली. मी एकाच्या खोलीत गेलो असताना मुद्दाम हे गाणे लावले व दुसऱ्या मित्राला जाऊन सांगितले की मी हे गाणे लावायला सांगितले. काय रागावला होता मग तो माझ्यावर. अर्थात मग नंतर ते आम्ही निकालात काढले होते.

आणखी ही गाणी आहेत, काही सध्या आठवत नाहीत.

तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?

डिसेंबर १०, २००७

ह्या आधीचा लेख इथे पहा.
सिनेमातील मला लक्षात राहिलेली आणखी काही वाक्ये....
मेरे दो दो बाप...गोपी-किशन चित्रपटात दोन्ही सुनील शेट्टी एकत्र पाहिल्यावर सुनील शेट्टीचा (गोपी) मुलगा म्हणतो. त्या मुलाची हे बोलण्याची शैली एकदम वेगळी.
आमच्या संगणक कार्यक्रमात (program) काही ड्यूप्लिकेट दिसले की हे वाक्य आठवते.

क्या करू संजना, ऐसा ही हूं मैं.... मत रहो ऐसे...
पहिले वाक्य अजय देवगण चे दुसरे वाक्य काजोलचे. अजय देवगणच्या त्या वाक्यावर काजोल ज्या तऱ्हेने लगेच त्याला म्हणते "मत रहो ऐसे" ते मनाला लागून जाते. चित्रपट: प्यार तो होना ही था.

तुमने अपने गॉड को देखा है क्या? फिर भी तुम उससे प्यार करती हो ना?.
संजय कपूरला न बघताही प्रिया गिल त्याच्यावर प्रेम करत असते. तिची मैत्रीण तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रिया गिल चे हे वाक्य खूप काही सांगून जाते. चित्रपट: सिर्फ तुम

मुर्गी वालों अपनी मुर्गी संभालो.
तेजाब सिनेमात चंकी पांडे आणि मंडळी इतरांना फसवून आपल्या खाण्याचे पैसे भरायला लावतात.त्या संदर्भातील हे वाक्य त्या सर्वांच्या तोंडी असते. मस्त धमाल करतात ते.

दरवाजा छोटा हो और सर झुकाना पडे तो आदमी छोटा नही हो जाता.
मेकॅनिक असलेल्या ॠषी कपूरकडे नाना पाटेकर जाण्यास नकार देतो, तेव्हा त्याचा मामा (मोहन जोशी) त्याला समजावत असतो की आपले काम असले तर त्याच्याकडे जाण्यात काही गैर नाही. सिनेमा: हम दोनो.

अगर ऍक्टींग कर पाता तो सिनेमा में काम न करता?
हे वाक्य सिनेमातील नाही. परंतु एक धारावाहिक "इंडीया कॉलिंग" मधील आहे. हे इथे लिहिण्याचे कारण त्यात अयुब खान हे वाक्य म्हणतो. त्याला तसे म्हणताना पाहून आम्ही मित्र म्हणालो होतो की, त्याने हृदयावर दगड ठेवून हे वाक्य म्हटले असेल. :)

वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो.
सत्ते पे सत्ता सिनेमात हेमा मालिनी रागविल्यानंतर एक बुटका गुरखा अमिताभला दटावत असतो. तेव्हा हेमा मालिनी गेल्यावर अमिताभ त्याला कॉलरला पकडून वर उचलतो आणि म्हणतो "वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो".
पुणे-मुंबई (जुन्या) महामार्गावर मी एशियाड मधील दरवाजाजवळील खुर्चीवर बसलो होतो. तेव्हा मागून एक दुचाकीवाला नुसता हॉर्न वाजवत पुढे गेला. चालकाने त्याला बसमधील उंचीवरून त्याला ज्या तऱ्हेने पाहिले ते पाहून मला अमिताभचे हे दृष्य/वाक्य आठवले.

ह्या सिनेमातील हेमा मालिनीचा अमिताभच्या घरील संवाद म्हणजे एकदम धमाल येते पाहताना.. राहवत नाही म्हणून लिहित आहे-
"कचरा, तुम खुद एक कचरा हो. बल्की कचरा भी तुमसे अच्छा होता है. गंदे... बदबूदार.... बरसों से नहायें नही. पास से जाओ तो ऐसा लगता हैं की घोडे के अस्तबल से निकल के आया हो.
तुम्हे क्या लगता हैं तुम्हे कोई लडकी चाहेगी, तुमसे कोई प्यार करेगा? अरे.. तुम तो कोई डराने की चीज हो डराने की. किसी को जहर देकर मारने की बजाय तुम्हारी शक्ल दिखायें तो वह खुद ब खुद मर जायेगा."


यार, मैं यहा कार की बात कर रहा हू और तुम बेकार की बात किये जा रहे हो.
शान चित्रपटात शशी कपूर बिंदिया गोस्वामीला बघत असतो आणि अमिताभ तिच्या कारला. त्यानंतर हे वाक्य. ते दृष्यानंतर प्रत्येकाचा गोष्टी बघण्याची तऱ्हा आणि ह्या वाक्यातील शब्द एकदम खास वाटले.

डुकरा बोलले म्हणून काय घर सोडून जायचे का?
भुताचा भाऊ सिनेमात जॉनी लीव्हर एक तांत्रिक दाखवला आहे. त्याला आपल्या प्लॅन मध्ये सामिल करण्यासाठी वर्षा उसगांवकर नाते बनवायचा प्रयत्न करत असते. तो चित्रपट पाहताना अचानक असे वाक्य ऐकून खूप हसू आले होते.

बेइमानी मैं करता नहीं और मेरे साथ बेइमानी करने वाले को मैं बख्शता नहीं.
त्यागी सिनेमात गुलशन ग्रोव्हर आपल्या एका मित्राला सांगत असतो. का माहित नाही पण हे वाक्य अजून ही लक्षात आहे.(तेव्हा त्या चित्रपटातील एकूण एक वाक्य पाठ झाले होते.)

दीदी..मुझे वह छतवाला ज्यादा पसंद है.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये काजोल ची बहिण तिला सांगते. पहिल्यांदा (नीट न )पाहिला तेव्हा त्यातील संवाद एवढे लक्षात नाही राहिले. पण एका मैत्रिणीने हे वाक्य त्यात आहे हे जेव्हा सांगितले त्यानंतर सिनेमात त्या दोघींचा हा संवाद वेगळेच काही सांगून गेला. (काय ते विचारू नका. तसा हा चित्रपटही अजूनही काही वेगळाच वाटतो.)

तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था.
सरकार चित्रपटात अभिषेक बच्चन झाकिर हुसेन (सिनेमात रशीद) ला म्हणतो. तेव्हा चित्रपटातील खिळून राहिल्यानंतर अभिषेक चे हे वाक्य आणि ह्यापुढील काही वाक्ये (स्वामी आणि मुख्यमंत्र्याला म्हटलेली) बोलण्याची शैली मस्त वाटली. त्यामुळे लक्षात आहे.

ह्यातच दुसरे एक वाक्य दिपक शिर्के ला म्हटलेले... "मैं भी यही चाहता हूं."

अशी भरपूर वाक्ये असतील. जमल्यास पुढे कधीतरी लिहेन. हिंदी चित्रपट बनणे आणि आम्ही ते पाहणे तर काय बंद
नाही होणार.

डिसेंबर ०९, २००७

आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात.
उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार करती है तो ये पलट के जरूर देखेगी... पलट... पलट' हे वाक्य. माझ्या मते हे वाक्य नेहमी वापरात यावे, लक्षात रहावे अशाच विचाराने लिहिले असेल. पण त्याच्या सादरीकरणावरही तेवढाच जोर दिला गेला.

आता असेच वाक्य शाहरूख खानच्याच राजू बन गया जंटलमन मध्ये वापरले गेले होते. किंवा खरे तर राजू बन गया.. मधील हे वाक्य "अगर वह पलट के सिस्टर की ऑंखो में आँखें डाल के देखेगा तो फिर वह जा नही पायेगा.... पलट... पलट" पुन्हा दिलवाले दुल्हनिया मध्ये वापरले गेले. हे वाक्य ज्या प्रकारे सिनेमात वापरले गेले आणि एवढे लोकप्रिय झाले, की ते पुन्हा वापरायचा मोह आवरता आला नसेल. पण एक आहे, ते वाक्य खरोखरीच अर्थपूर्ण आहे. :)

आता आणखी थोडी सर्वांना आवडलेली वाक्ये..
तुम्हारा प्लान ही गलत है.. लगता है कच्चा खिलाडी है.पहिले वाक्य आमिर खान परेश रावल ला म्हणतो, दुसरे वाक्य सलमान खानला. सिनेमा: अंदाज अपना अपना.. ह्या सिनेमातील तर एक एक वाक्ये लक्षात राहण्याजोगी आहे,

इसको क्या घडी करके डालू क्या?
अपना प्यारा सर्कीट, ह्याबद्दल जास्त लिहिणे नको. सर्वांनाच माहित आहे.

केक के लिये हम कहीं भी जा सकते है...
सैफ अली खान, डिंपल ला म्हणतो. सिनेमा दिल चाहता है.
अशी इतर प्रसिद्ध वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न नाही. तो तर सगळीकडेच चालू असेल.
इथे आहेत मला लक्षात राहिलेली काही वाक्ये... आता ती तुमच्याही लक्षात नसतील, अर्थपूर्ण नसतील, खास कोणाच्या लक्षात रहावीत म्हणून लिहिली नसतील. पण काही कारणाने माझ्या लक्षात राहिलीत.

शैतान जहाँ जहाँ राम वहाँ वहाँ
राम लखन मधील हे वाक्य. सिनेमात शेवटच्या मारामारीच्या आधी आहे. मी आणि माझ्या बहिणीने ऐकल्याबरोबर प्रतिक्रिया दिली.. क्या डायलॉग है.

खुशकिस्मती सिर्फ़ एक ही बार दरवाजा खटखटाती है, पर बदकिस्मती तब तक दरवाजा खटखटाती है जब तक तुम दरवाजा ना खोल दो.

हमारा दिल आपके पास है. तनाझ कूरीम ऐश्वर्या ला सांगत असते. त्यातील शब्दांमुळे लक्षात राहिलेय अजून.

मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया.
चायना गेट.. मुकेश तिवारीच्या तोंडी हे वाक्य आहे. मी सिनेमा अजून पूर्ण पाहिला नाही पण हे वाक्य जरूर पाहिले आहे. एक वेगळे वाक्य म्हणून लक्षात राहिले.

अंकुश दिखने में भले ही छोटा हो, पर वह हाथी को काबू कर लेता है.
सिनेमा: मि. बेचारा. अनिल कपूर च्या छापखान्यात काम करणारा मुलगा कर्जाचे पैसे मागणाऱ्या लोकांना सांगतो.

धनाजी रामचंद्र वाकडे... ध.रा.वा. आता कोणाला धरावा?
धूमधडाका: अशोक सराफ जेव्हा शरद तळवळकरांच्या घरासमोर येतो तेव्हा हे वाक्य आहे. लहानपणी बहुधा पहिल्यांदा अशा प्रकारचे वाक्य ऐकले (किंवा समजले) असेल म्हणून अजुनही लक्षात आहे.

अरे मारने से पहले यह तो जान लिया होता के जिसे मार रहे वह कोई लुच्चा हैं या अपने मालिक का बच्चा है.
बोल राधा बोल... कादर खान ऋषी कपूरला मारल्याबद्दल गावकऱ्यांना जाब विचारत असतो. नक्की माहित नाही कोणी लिहिले ते. पण मला वाटतं हे वाक्य नक्की कादर खाननेच लिहिले असणार. अशाच प्रकारची बरीच वाक्ये कादर खानने भरपूर सिनेमांत म्हटली आहेत. कादरखानच्या तोंडी तशाच प्रकारचे संवाद असलेला सिनेमा म्हणजे स्वर्ग से सूंदर.
ह्यावरून आठवले. कादर खान हा हिंदीचा प्रोफेसर आहे असे ऐकले होते. त्याच्याच तोंडी हे असले संवाद/वाक्ये मग खटकतात.

घर का दूध खत्म हो गया है.
परिणीता मध्ये विद्या बालन संजय दत्त ला सांगते. पूर्ण सिनेमात एकदम अर्थपूर्ण, मस्त आणि छान वाक्ये असताना हे वाक्य ऐकून मला, माझ्या मित्रांना हसू आले. हे वाक्य नको होते असे वाटते.

मुझे दो दस चाहिये. एक दस.. दो दस.
जान से प्यारा मध्ये मतिमंद(?) गोविंदा आपल्या आईला (की इंस्पेक्टर भावाला) २० रू मागताना म्हणतो. एक वेगळे वाक्य आणि गोविंदाच्या संवाद शैलीने ते वाक्य लक्षात आहे.

याल्लोग को तडीपार नही बोलने का.
तडीपार सिनेमात मिथून बहुतेक वेळा स्वत:ला याल्लोग (की असेच काहीतरी) म्हणत असतो.

अठासी... नवासी... अस्सी
पनाह सिनेमात नसिरुद्दीन शहा ने इतरांना शिक्षा दिलेली असते, तेव्हा तो त्या नेणार असलेल्या मुलाला आकडे मोजावयास सांगतो. त्या मुलाची अठासी.. नवासी नंतर गफलत होऊन तो पुन्हा अस्सी वर सूरू करतो.

be patient be patient.. ok doctor.. ok doctor
ऐसी भी क्या जल्दी है सिनेमात विवेक मुशरान ची वाट पाहत सर्व बसले असताना सचिन म्हणतो की विवेक ला उशीर झालाय. अशोक सराफ त्याला म्हणतो be patient be patient.. तेव्हा सचिन म्हणतो ok doctor..ok doctor... (ह्यात अशोक सराफ डॉक्टर दाखविला आहे.)

समीर.. मुझे अपनी बाहों में भर लो..
मोहोब्बतें मध्ये किम शर्मा जुगल हंसराजला म्हणते. किम शर्माच्या त्या संवाद फेकीवर आम्हाला भरपूर हसू आले होते.

एक टीव्ही है फ्रीज है.. एक भगवान भी हैं देख...
सत्या सिनेमात स्नेहल (असेच काहीतरी त्याचे नाव आहे) जेव्हा चक्रवर्ती (सत्या) ला दिलेल्या खोलीत घेऊन येतो तेव्हा म्हणतो.

चाय से ज्यादा साला केटली गरम है.
पुन्हा स्नेहल.. हेराफेरी सिनेमात बस स्टॉप वर असरानीला दलाल समजून जेव्हा एक मुलगी देण्याकरता सांगतो, त्यात शेवटचे वाक्य. एक वेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणून लक्षात राहिले.
पुढील दोन वाक्ये तेरे मेरे सपने सिनेमातील.

दोस्ती में पुछने का नही.. कर डालने का.

यार पहले तो तू सिर्फ करोडपती था.. अब तो अनमोल हो गया है.अर्शद वारसी म्हणत असतो चंद्रचूड सिंग ला, आपल्या घरी नेण्याआधी.

अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा..
ह्या सिनेमाचे नाव ओळखा पाहू.... नाना पाटेकर, परेश रावल बद्दल अतुल अग्निहोत्रीला सांगत असतो.

अधर्मी... पापी.. दुराचारी.. बोल सॉरी..
एका धमाल चित्रपटात शेवटी असलेल्या धमाल नाटकातील वाक्य. जाने भी दो यारो सिनेमातील शेवटच्या महाभारत नाटकात नसिरुद्दीन शहाचे वाक्य.
ह्या सारखी खूप वाक्ये असतील, जी आपल्याला ह्या ना त्या कारणाने लक्षात राहिली असतील. सारखी सर्व सिनेमात वापरतात म्हणून नाही.

बाकीची वाक्ये पुन्हा कधीतरी.

सप्टेंबर २७, २००६



मराठी समुदाय संगणक/तंत्रज्ञान व्यक्तीविषयक




बातम्या / वृत्तपत्रे शासन संबंधी





इतर


इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter