मे १०, २००९

ह्या आधी:
भटकंती (ठाणे ते शेगाव)
भटकंती (शेगाव- आनंदसागर)
शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात जायचे होते दर्शनाला. साधारण ८ वाजता तयार होऊन आम्ही निघालो. विचार केला होता की दर्शन घेऊन तसेच थेट निघता येईल. म्हणून मग सर्व सामान गाडीत ठेवले व हॉटेलची खोली सोडून दिली. आम्ही असलेली जागा ही मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर होती. ते द्वार सध्या दुरूस्तीकरीता बंद होते. त्याच्याच उजव्या बाजूनेही दुसरे आणखी एक प्रवेश द्वार होते. त्यातून आम्ही आत गेलो. (रात्रीही ह्याच मार्गाने गेलो होतो, पण आता थोड्या जास्त माहितीसोबत)

दर्शन घेतल्यावर आम्ही थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसलो होतो. तिथेच स्वागत कक्ष, देणगी केंद्रे बनविली आहेत एका बाजूला पोथी वगैरेचे पारायण करण्याकरीताही एका हॉलमध्ये सोय केली आहे. तशाच आणखीही सोयी आहेत. मंदिराच्या आसपासच्या भागात म्हणजे खालील फोटोत दिसणार्‍या द्वारातून आत गेले की पूर्ण भागात कॅमेरा वापरण्यास बंदी होती, त्यामुळे बाहेरील भागात जमतील तशी चित्रे कॅमेर्‍यात बंदिस्त केली (अर्थात संस्थानाच्या कार्यकर्त्यांच्या परवानगीनेच). त्यामुळे गजानन महाराजांच्या मूर्तीचा फोटो वगैरे ह्यात नाही.

ह्या द्वारातून आम्ही आत आलो.

हे संस्थानाचे सभागृह,

आजूबाजूच्या आवारातही इतर लहान मंदिरे बांधलेली आहेत.




शेगाव संस्थानाचे भक्त निवास क्र १. इथेही अशाच प्रकारे इतर निवासस्थाने क्र २ ते ६ बनविली आहेत.

हे मुख्य प्रवेशद्वार (आतून). ह्या प्रवेशद्वारापर्यंत येण्याची गाडी, रिक्षा ह्यांना परवानगी आहे. ह्यापुढे चालतच जायचे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर फुल/प्रसाद व इतर साहित्याची दुकाने आहेत.



हे सर्व पाहताना एक जाणवले की मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत सगळीकडे चांगली स्वच्छता पाळली गेली आहे. असेच आनंदसागर येथेही अनुभवले होते.

मंदिरातून निघून मग आम्ही मुख्य मंदिरापासून ६/७ कि.मी अंतरावर असलेल्या नागझरी ह्या ठिकाणी जायला निघालो. तेथे जाण्याचा रस्ता जाणीव करून देत होता की आपण एखाद्या खेडेगावातून जात आहोत. लहान रस्ता, आजूबाजूला घरे. रस्त्यावरून ऊस वाहून नेणाया बैलगाड्या. एखादी गाडी समोर असली की त्याला सहज पार करून जाणे अशक्य. दोघांनीही एकमेकांकरीता रस्ता मोकळा करून द्यायचा. गावातून बाहेर निघालो तर एकदम निर्जन, ओसाड वाटणारा प्रदेश. पण शेतीकरीता वापरला जाणारा असेल असा अंदाज. रस्ता एकदम खडबडीत.


आम्ही नागझरीला पोहोचलो. तिथे गेल्यावर कळले की येथे गजानन महाराजांच्या गुरूंचे मंदिर आहे. तिथे बाहेरच मोठे प्रवेशद्वार बनविले आहे. आम्ही त्या प्रवेशद्वारातून न जाता उजवीकडील वेगळ्या रस्त्याने खालपर्यंत गाडी घेऊन गेलो व तिकडून दुसर्‍या पायर्‍या उतरलो.


आत एक पाण्याचे कुंड बनविले आहे जिथे गायीच्या तोंडातून पाण्याचा उगम आहे. पुढे मंदिराच्या वरच्या भागात एक मंदिर आहे (कोणाचे ते आठवत नाही) तिकडून खाली उतरल्यावर गुहेत आत गेल्याप्रमाणे पायर्‍या बनविल्या आहेत व तिथे गुरूंचे मंदिर आहे. (पुन्हा त्या मूर्तीचा फोटो घेण्यास मनाई)

खाली उतरल्यावर पाहिले की प्रसाद (जेवण) बनविण्याकरिता तेथे एक मोठे स्वयंपाकघर बनविले आहे. आणि दुसर्‍या खोलीत भांडी ठेवण्याची व्यवस्था आहे. तिकडची भांड्यांची मांडणी एकदम पद्धतशीर होती, ते मला एवढे वेगळे वाटले आणि आवडले की मी त्याचा फोटो घेणार होतो, पण तेथील मुख्य असलेल्या व्यक्तीने (काय संबोधन होते तेही विसरलो आता) नकार दिल्याने तो विचार सोडून दिला.

तेथून मग आम्ही अंदाजे ११:४५ ला निघालो. पुन्हा शेगावच्या मंदिराजवळ आलो. तिथे ११ ते १ महाप्रसाद मिळतो. मी रांगेत लागून तो प्रसाद घेतला, व पुढे मग जेवणाकरीता हॉटेल शोधत निघालो. शेगावच्या बाहेर निघताना एक चांगले हॉटेल दिसले. रात्री जेवलेल्या हॉटेलपेक्षा हे भरपूर चांगले होते, आणि त्याच्या थोडेच पुढे होते. त्यामुळे काल रात्री आणखी थोडा शोध घेतला असता तर बरे झाले असते असे वाटले.

असो, तिकडे जेवण करून मग आम्ही शेगावहून शिर्डीकरीता प्रस्थान केले.




मे ०२, २००९

गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.)



तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत. अर्थात हिंदी चित्रपट प्रदर्शित न होणे हे ही कारण असू शकेल, पण आनंद वाटला की मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्स मध्ये पाय पसरायलाही जागा मिळाली. पण प्रेक्षागृहात शिरताक्षणी तो आनंद मावळून गेला. जेमतेम १० ते १५ टक्के खुर्च्या भरल्या होत्या. असो.(बोक्याची टक्केवारीही काढायला पाहिजे असे वाटले. तो सिनेमा बहुधा अजूनही चांगला चालत आहे.)

ह्या सिनेमाची कथा तशी काही वेगळी नाही. (मला चित्रपटाची कथा ऐकायला आणि सांगायला आवडत नाही, पण ह्यात काही खास वळणं नाहीत. चित्रपटाच्या जाहिरातीतच सर्व दिसून येते.) एका गावातील एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन जण- एक आमदार, एक सरपंच. व त्या दोघांत राहून दोघांचीही कामे करत स्वतःचा फायदा करून घेणारा गावातील एक माणूस नारायण. सुरूवातीपासून आमदार टोपे (सयाजी शिंदे) आणि सरपंच डोळे (नागेश भोसले) ह्यातील एकमेकांवर वरचढ होण्याची भांडणे दाखविली आहेत. त्यात नारायण (मकरंद अनासपुरे) दोघांकडून असल्याचा आव आणत, त्यांच्यात कळ लावत, त्यात भर घालत असतो, व स्वतःचाही फायदा करून घेत असतो. पुढे एका भांडणातून नारायण ठरवितो की तो स्वतःच निवडणूकीला उभा राहणार. मग जे राजकारणी डावपेच सूरू होतात ते सर्व पुढील चित्रपटात दाखवले आहे.

संपूर्ण चित्रपटात विनोदी वातावरण कायम राहते, आणि हा विनोद हा एका पातळीवरच राहतो. ना एकदम घसरला ना एकदम उंचावला आहे. त्यामुळे ठिक आहे. बाकी नारायणाच्या नावावरून विनोद, आमदार टोपेच्या मेव्हण्याचे एकच वाक्य ३/४ म्हणणे अशा प्रकारात थोडा कंटाळा येतो. सुरूवातीला नारायण सायकलवरून उतरल्यावर पायांची जी हालचाल करतो त्यावरून असले अंगविक्षेपाचे विनोद असल्याचे खटकले होते, पण तो प्रकार २ वेळाच दाखवला आहे. एखाद्याशी बोलत असताना आमदाराचा मुलगा मध्ये मध्ये आपले बोलणे लावत असतो ते प्रसंग नेहमीचेच वाटतात पण तरीही हसवून जातात.

वेगळेपण वाटले ते नारायण जे काही करत असतो ते नेमके कशाकरीता करत असतो त्याचा अंदाज लगेच आला नाही. एखादी गोष्ट घडून जातानाच त्यामागचे कारण कळते. उदा. डोळे व टोपे दोघांनाही शेवटच्या दिवशी ४ वाजता निवडणूकीचा अर्ज का भरायला लावतो हे मला तरी लगेच कळले नाही. त्या कार्यालयात ४ वाजल्यानंतरच कळले.

चित्रपटाला तशी एक सलग कथा असल्याचे मला तरी जाणवले नाही. एकमेकांना धूळ चारणे हा मूळ हेतू समोर ठेवून त्यानुसार मग प्रसंग टाकलेले आहेत. सयाजी शिंदे व मकरंद अनासपुरे ह्यांचे काम नेहमीच्याच शैलीत आहे. नागेश भोसलेचा अभिनय मी जास्त पाहिलेला आठवत नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'हसरतें' मालिकेतील त्याचे काम आवडले होते. पण त्यातील युनियन लीडरचा आवेश ह्यात सरपंच असला तरी वाटला नाही. बाकी इतर पात्रे म्हणजे आमदार/सरपंचाची बायका,मुले ह्यांची ही कामे बरी वाटली. सरपंचाच्या बायकोचा (लग्नाआधीचा) प्रियकर जो महाराज बनून वावरतो त्याचेही काम चांगले वाटले. लावणी कलाकार म्हणून असलेल्या नायिकेचे कामही बरे वाटले. एक परदेशी युवती तेथे कला शिकण्यासाठी आलेली असते त्याची गरजही सुरूवातीला वाटत नाही परंतु नंतर गरज कळते. संपूर्ण चित्रपटात दिल्लीचे नाव नाही. आहे ते फक्त लावणी मध्ये व चित्रपटाच्या शेवटी. नावावरून वाटले होते की गल्लीत म्हणजे स्वतःच्या प्रांतात काही गोष्टी करण्यासाठी दिल्लीमध्ये काही ना काही कथानक घडत असेल. पण सिनेमात नुसता गावातील कुरघोडींचा गोंधळच आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना एवढा काही खास प्रभाव माझ्यावर पडला असे वाटले नाही. त्यातल्या त्यात नंतरच्या १ तासात मी हा सिनेमा पाहिला हे ही विसरून गेलो.

असो, मी ही अजूनही गोंधळलो असल्याने माझे लिखाणही तसेच वाटत असेल. पण ह्या सिनेमाबद्दल मत असे की सिनेमा तसा वाईटही नाही आणि आवर्जून पहावा असाही नाही.

मे ०१, २००९

गेला महिनाभर निवडणूकीबद्दलचे SMS येत होते. "Save Thane","Vote for XXXXX","Don't vote for XXXXX" वगैरे वगैरे. वैताग आला होता त्या SMS चा. तसेच बाकीचे जाहिरातींचे SMS ही होतेच, ज्याला आपण टेलिमार्केटींग म्हणतो त्या प्रकारचे. Do Not Disturb मध्ये नंबर नोंदवूनही हे SMS येत असल्याने तक्रार करण्यास माझ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहक केंद्राला संपर्क केला. ते म्हणाले, 'पहिल्यांदा तक्रार करताना तुम्हाला लेखी तक्रार द्यावी लागेल" त्यामुळे मला त्यांच्या कार्यालयात जाणे भाग होते. वेळेअभावी ते जमले नाही. आणि निवडणुकीचे SMS म्हटले, तर वाटले ह्याची तक्रार करूनही काही फायदा होणार नाही. आणि एवीतेवी ३० एप्रिल नंतर बंद होतीलच. टेलिमार्केटिंगचे आलेत तर पाहूच.

पण आज SMS आला, "You have voted & every vote will make India Strong................. Thank You"

सर्वांनाच हा SMS गेला असेल तर एक वेळ ठीक आहे. पण ह्या लोकांनी मतदारयादीतूनही मतदान केलेल्या लोकांची नावे घेउन तर नाही ना SMS पाठवले, अशी ही पुसट शंका येऊन गेली. :)

तुम्हाला कोणालाही असे संदेश आले आहेत का?

एप्रिल ३०, २००९

'जर तुम्ही मतदान केले नसेल तर तुम्हाला सरकारला काही बोलण्याचा हक्क नाही', अशा आशयाचे वाक्य सिनेमात/इतरत्र भरपूर वेळा ऐकले होते, पटतही होते. जरी गेले काही वर्षे मी मतदान करावेच ह्या मतावर होतो तरी सध्याच्या परिस्थितीत वाटत होते की मतदान करावे की नाही?

खरंतर ह्याच्या कारणाचाही उहापोह करणे गरजेचे नाही तरीही प्रश्न पडतात ते असे:
मी मोठ्या दोन पक्षांपैकी एकाला मतदान केले तर त्या दोन्हींनी एवढा काही चांगला विकास घडवून आणला नाही. नकारात्मक गोष्टीच जास्त दिसतात. मग त्यांना का मत द्यावे?
इतर काही पक्षांना मत दिले तरी बहुमताने जिंकण्याएवढी मते त्यांना मिळणार नाही ही सध्याची तरी परिस्थिती वाटते. त्यामुळे पुन्हा एक ना धड भाराभार चिंध्या असला काही तरी प्रकार. मग त्यांना का मत द्यावे?
मत नाही द्यायचे तर मतदानाची टक्केवारी घसरणार. तरी जेवढ्यांनी मते दिली त्यावरच निवड ठरविली जाणार. त्यामुळे माझे मतदान न करणे वाया गेले. त्यामुळे कोणालातरी मतदान करावेच. 'कोणीही नाही' ह्याचा वापर अजून तरी चालू झाला नाही.



आता मतदान करायचे ठरवले तर पुन्हा कोणाला मत द्यावे? पक्षाला की माझ्या भागातील उमेदवाराला? एवढे पक्ष आहेत त्यात कोणाला? दोन पक्षांत काम होऊ शकत नाही का?
पक्षाला मत दिले पण त्यांचा माझ्या भागातील उमेदवार मला वाटतो तेवढा कार्यक्षम नसेल तर?
एखाद्या कार्यक्षम उमेदवाराला मत दिले पण तो किंवा त्याचा पक्ष निवडून नाही आला तर? पुन्हा आपल्या उपयोगाचे काही नाही झाले तर?
माझा उमेदवार निवडून आला पण त्याने नंतर पक्ष बदलला तर?

अर्थात ह्याबाबतीत जेवढा विचार करावा तेवढा कमीच. त्यापेक्षा मतदान करावेच. मग तो कोणीही असो पण त्यापैकी चांगला. कारण सध्या पर्याय नाही. मागील आठवड्यात मित्राशी बोलताना असेच विचार मनात आले. वाटले अमेरीकेत बरे आहे दोनच पक्ष आहेत (नेहमी अमेरीका/इंग्लंड ह्यांच्याशी तुलना करायची सवय झाली आहे ;) ) पण तिथेही परिस्थिती एवढी चांगली नाही असे म्हणतात. दोघेही उमेदवार चांगलेच असतील असे नाही. तेव्हाच मनात विचार आला, कोणी का असेना एकाला निवडून आणा. मग त्याच्या डोक्यावर बसून कामे करवून घ्या. तसलाच प्रकार इथे केला पाहिजे. त्यातल्या त्यात चांगला निवडा. मग तो मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा असो, नवीनच बनलेल्या पक्षाचा असो, की अपक्ष असो. कारण प्रत्येक उमेदवार आपल्याला आवडेलच असे नसते. तसेच आपण ज्याला मत दिले निवडूनच येईल ह्याची खात्री नाही. पण त्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे तो पुढे आणखी चांगले काम करण्याची अपेक्षा तर बाळगू शकतो. नाही केले तर त्यांनाही पाडण्याचा अधिकार आपल्यालाच आहे. आणि तसे म्हणायला गेलो तर ही सुद्धा एक लॉटरीच आहे.

कालपर्यंत आपल्या भागातील उमेदवारांची यादी मी येथे पाहिली. त्यात जेवढे समजेल त्यावरून आणि बातम्यांमधील त्यांच्याबाबतचे ऐकून/वाचून विचार केला आणि मी ही ह्या लॉटरीत भाग घेत सकाळीच मतदान करून आलो.

एप्रिल २१, २००९

ह्या आधीचे: भटकंती (ठाणे ते शेगाव)



शेगावला पोहोचल्यानंतर पहिले गेलो ते भक्त निवास क्र. ५ कडे. भक्त निवास क्र. ३ ते ६ हे चार बाजूंना बांधून मध्ये मोकळी जागा ठेवली आहे. तिथूनच आनंद सागर करीता शेगाव संस्थानाचा बस थांबा आहे. त्या थांब्यावर खूप मोठी रांग होती. एकंदरीत अंदाज आला होता की आनंदसागरला काहीतरी चांगले आहे. मित्राने आधीच सांगून ठेवले होते की आनंद सागर नक्की पहा म्हणून. भक्त निवासाच्या कार्यालयात गेलो तर तेथेही रांग होती(त्याची अपेक्षा होतीच). एका कार्यकर्त्याने सांगितले,'रांगेत रहा. जसजसे खोल्या रिकाम्या होतील, एकेकाला आम्ही त्या उपलब्ध करून देऊ.' कागद पाहिला. ५ क्रमांकाच्या निवासस्थानात पूर्ण वातानुकूलीत खोल्या. इतर मध्ये ३/४ लोकांकरीता मिळून सोय. काहींमध्ये खोलीतच बाथरूम, काहींना बाहेरचे. नाहीतरी १ तास गेला असताच आणि बाहेरील हॉटेलमधील खोल्यांचे भावही जवळपास तेवढेच, त्यामुळे बाहेरच खोली पाहण्याचे ठरविले. अर्धा एक तासाच्या शोधानंतर (त्यात भक्त निवास १ व २ ही आलेत. पण तिथेही जागा नव्हती)एका हॉटेलमध्ये खोली पक्की केली, सामान उतरविले व आराम केला.

आईने सांगितले, 'मी आनंदसागर बघितले आहे व तसेच तिकडे भरपूर चालणे मला जमणार नाही." ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू असते व मंदीर १०:३० पर्यंत. त्यामुळे मी बायकोसोबत आनंदसागरला जायला निघालो. गाडीत बघितले तर ड्रायव्हर गाढ झोपला होता. त्याला न उठवता एक रिक्षा पकडून आम्ही निघालो तेव्हा साधारण ५ वाजत आले होते. जाताना आसपास पाहिले तर मंदिराच्या आसपास ज्याप्रकारे दुकाने/हॉटेल आहेत त्या मानाने गाव तेवढे विकसित नाही वाटले. एखाद्या लहानशा खेडेगावातच फिरत आहे असे वाटले. आनंदसागरला पोहोचता पोहोचता रस्त्यात आणखी एक भक्त निवास दिसले.



तिथून थोडेच पुढे गेल्यावर आनंद सागरचा फलक पाहिला. त्याचे आणि आसपासचे फोटो.



प्रवेश तिकिटाकरीता ३/४ खिडक्या होत्या. बहुधा मंदिरात काही दान दिल्याची पावती दिल्यास तिकीट फुकट होते. मी सध्या तरी काही दिले नसल्याने पैसे देउन तिकीट घेतले व आत गेलो. तिकिटावर पाहिले तर मी दिलेले पैसेही देणगी स्वरूपातच स्विकारले असल्याची पावती होती व प्रवेशाची तिकिटे तशीच दिली होती.



आत फिरता फिरताच पाहिले सुरूवातीलाच गोलाकार परीसरात वेगवेगळ्या संत/महापुरूषांचे पुतळे मांडून ठेवले आहेत. सर्व पाहिलेही नाहीत आणि जेवढे होते त्यातील एक हा.



एका ठिकाणी आनंदसागर मध्ये फेरफटका मारण्यासाठी एका लहानशा रेल्वेगाडीकरीता रांग पाहिली. आसपास मस्त झाडे लावली आहेत बाग बनविली आहे. त्या भव्य परिसराचे वर्णन जमत नाही आहे. ह्या काढलेल्या प्रकाशचित्रांवरून अंदाज घेता येईल. एका झाडावर हे निळे पक्षी दिसले म्हणून जवळून पाहायला गेलो (ते खोटे होते :)). त्यांचे चित्र घेत असतानाच चुक् चुक् असा आवाज आला तर पाहिले त्याच झाडाच्या दुसर्‍या फांद्यांवर ३/४ खारी फिरत होत्या.


हे मंदिर पिसाच्या मनोर्‍याप्रमाणे तिरके वाटत आहे, पण तो बहुधा माझ्या हातांचा प्रताप आहे ;)


त्याच्याच आसपास असलेले मुनीवर्य.(ह्यांचे नाव मला कळले नाही)


आसपास कुठेतरी मत्स्यालयही आहे असे फलकावर वाचले. डाव्या ठिकाणी मोठे उपहारगृह होते. त्याच फलकावर वाचले की ध्यानकेंद्रही आहे. पण त्याची बंद होण्याची वेळ ६:३० होती. कन्याकुमारीला विवेकानंदांचे स्मारक पाहिले होते. तिथल्या ध्यान केंद्राचा अनुभव होता. त्यामुळे असेल पण माझा तिकडे जाण्याकडे जास्त कल होता. पण वाटले थोडा वेळ आहे, इतर गोष्टी पाहून घेउया. एका ठिकाणी पक्षांचा मोठमोठ्याने आवाज ऐकला. काय आहे पहायला म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. तलावावरून जाणारा एक पूल बनविला होता. तिकडे जाता जाता कळले, त्यांनी ध्वनीक्षेपकावर प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाज लावून ठेवले आहेत. ते बहुधा लोकांना आकर्षित करण्याकरीता असेल पण त्याचे नेमके प्रयोजन नाही कळले. लाकडी पुलावरून पुढे गेल्यावर पाहिले तिथे लहानशे उपहार केंद्रही बनविले आहे. तसेच झाडांच्या आसपास बसण्यास व फिरण्यास जागा बनविली आहे.





तिकडुनच पाहिले ध्यानकेंद्र समोरच दिसत आहे, पण त्याकरीता तलाव पार करून जायचे आहे. वाटले बोटीने जाता येत असेल. विचारणा केली तर सांगण्यात आले की आम्ही आलो त्याच लाकडी पुलावरूनपरत जाऊन तिकडून उजवीकडे तलावाला फेरी मारून चालत जायचे आहे. तेथील चौकीदाराने सांगितले, प्रवेश ६:१५ ला बंद होतो. म्हणून मग लगेच तलावाला फेरी मारायला तयार झालो. बायकोने थोड्या वेळापूर्वी विचारले होते की ती ट्रेन नाही दिसली असून. उजवीकडे वळतानाच ती ट्रेन जाताना दिसली.


वरील फोटोतील उजवीकडे असलेल्या पूलाच्या पलिकडे आम्ही गेलो होतो. तिकडुन मागे फिरून (फोटोत घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने) डावीकडील रस्त्याने फिरत फोटोतील मध्यभागी वर असलेल्या ध्यानकेंद्रात जायचे होते. मग काय चालत निघालो दोघेही.

फिरत जाईपर्यंत १५/२० मिनिटे लागली असतील. पण आसपासचा देखावा मस्त होता. ह्या तलावाबद्दल माझ्या मित्राने सांगितले की ३०० कोटी रूपये खर्च करून हा कृत्रिम तलाव बनविला आहे. एका ठिकाणी चांगलेही वाटत होते पण त्याच वेळेला थोडेसे वाईटही वाटत होते की गावातल्या लोकांकरीता ह्याचा जास्त उपयोग होत असेल का? गावातील आणि मंदिर परिसरातील विसंगती फार खटकत होती.
तर चालत चालत आम्ही पोहोचलो ध्यानकेंद्राजवळ. तिथे पोहोचताच एका कार्यकर्त्याने आमच्या समोर फलक धरला. "ध्यानकेंद्र परिसरात शांतता राखा. मोबाईल बंद ठेवा..." येणार्‍या प्रत्येक माणसाला फलक दाखवण्याची युक्ती मला आवडली. कारण जर प्रवेशद्वाराजवळ हा फलक ठोकून ठेवला तर किती लोक तो नीट पाहतात ह्याची शंका असेल. त्यामुळे प्रत्येकाने तो पाहणे ह्यासाठी, तसेच येणार्‍याने फलक वाचून ते पाळायचा होकार दिला तरच आत प्रवेश देत असतील असे माझे मत झाले. :)


आत जाता जाता आसपासच्या परीसराचे फोटो काढले. केंद्राजवळ गेल्यावर एका कार्यकर्त्याने डावीकडे असलेल्या पायर्‍यांकडे बोट दाखविले. अर्थात आम्हाला आधी तिकडे जायचे होते. पायर्‍या चढून वर गेलो. तर मध्यभागी एक मंदिरासारखे बनवून त्यात रामकृष्ण परमहंस ह्यांचा पुतळा ठेवला होता. त्याचा फोटो काढण्यास एकाला मनाई करण्यात आली होती. मग मी प्रयत्न केला नाही ;)

खाली उतरल्यानंतर मुख्य केंद्रात जाण्याकरीता उभे राहिलो. तिथे एका कार्यकर्त्याने पुन्हा तो फलक दाखविला. मी मोबाईल फोन दाखवून खूण केली की हा बंदच आहे. आत गेल्यावर पाहिले, उजव्या बाजूला स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस ह्यांचे फोटो ठेवले होते (आणखी एक फोटो कोणाचा ते आठवत नाही) आणि त्यांवर प्रकाशझोत पाडला होता. एकदम शांत जागा. आम्ही थोडा वेळ आत बसलो. कन्याकुमारीच्या ध्यानकेंद्रात ॐ चा जप चालू होता. पण इथे पूर्ण शांतता होती. त्या शांततेत डोळे बंद करून एकाग्र होण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले की मनात किती विचार चालू आहेत. साधारण १५ मिनिटे तिकडे मन शांत करायचा प्रयत्न केला. (पण अशा गोष्टी १५ मिनिटांत साध्य होत नाहीत. असो.) बाहेर आलो तर सूर्य नुकताच मावळत होता. थोड्यावेळ तिकडेच बसलो. चपला बूट घेण्यासाठी आलेल्या माणसांपैकी २-३ जण बूट घेतल्यावर जमीनीवर आपटून टाकत होते. वाटले ह्या लोकांना शहाणपणा नाहीच आहे. शांतता पाळायला सांगूनही स्वतःच्या मजेकरीता काहीही करतात.

तिकडून परत निघालो. आता लक्ष्य होते, संगीत कारंजे. मैसूरचे वृंदावन गार्डन व औरंगाबादमधील पैठणच्या बागेतील संगीत कारंजे पाहिले असल्याने ह्याबाबत जास्त आकर्षण नव्हते. तरी आहे तर पाहून घेऊया म्हणून तिकडे गेलो. त्याची व्यवस्था मोठी होती. कारंज्यांसमोर अर्धगोलाकृती आकारात उतरत्या हिरवळीवर बसण्याची सोय केली आहे. संगीत व कारंजे ह्यांचा जास्त मेळ दिसत नव्हता. तरी न बघण्यासारखे ते वाईट वाटले नाही.

तो कार्यक्रमही १५ मिनिटांचा होता. तो आटपून परत निघायला ७:५० झाले होते. त्यामुळे आम्ही परत जायला निघालो. रस्त्यात पाहिले सुरूवातीच्या प्रवेशाद्वारातून चंद्र दिसत आहे. तसेच पुढे एक आगळावेगळा फलक पाहिला.


बाहेर पाहिले तर मस्त गर्दी दिसत होती, बस व रिक्षा दोन्हींकरीता. आम्ही मग रिक्षाने परत आलो. परत आल्यानंतर आईसोबत मंदिरात दर्शनाला गेलो. तिकडूनच मग जेवायला बाहेरच्या हॉटेलमध्ये गेलो. ड्रायव्हर म्हणाला की तो दुपारी मंदिराजवळच्या एका हॉटेलमध्ये जेवला होता. त्याने सांगितले की जेवण एवढे चांगले नाही. पण तोपर्यंत जवळपास ११ वाजले होते. त्यामुळे हॉटेल शोधावे लागणार होते. तेव्हा आठवले की परत येताना रिक्षाचालकाने शिवाजी चौकातील एका हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. म्हणाला ह्या भागात सर्वात चांगले हॉटेल आहे. त्या हॉटेलचा शोध घेऊन मग तिथे जेवण केले. पण तिकडील परिस्थिती त्याने सांगितल्याएवढी चांगली नव्हती. वाटले हे जर चांगले हॉटेल आहे तर बाकीचे कसे असतील? ;)

(क्रमशः)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter