डिसेंबर १५, २००८

माझ्या नाणेपुराण आणि नोटापुराणातील ज्ञानात थोडीशी भर टाकत आज मी ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलमधे दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन पाहण्यास गेलो होतो. तिथे दिसले की आपल्या तसेच दुसर्‍या देशांतील जुनी(काही सध्याचीही) नाणीही ठेवली आहेत. कधीतरी एखाद्या किल्ल्यात किंवा राजवाड्यात फिरताना त्यांच्या संग्रहालयात जुनी नाणी पहावयास मिळाली होती. पण इथे तर त्यांचा सुकाळ होता. प्रत्येक नाणे हातात घेउन पाहता येत होते. तसेच इतर नोटाही तिथे प्रदर्शनास ठेवल्या होत्या. तेवढ्यात एकाने विचारले, 'हे कितीला?' त्याला उत्तर मिळाले, '२५० रू'. म्हणजे ती नाणी आणि नोटा विकण्यासही ठेवले होते. त्यावरून मला व्हीटी/चर्चगेट येथे जुनी नाणी विकणारे लोक आठवले. वाटले त्यांत आणि ह्यात काहीतरी फरक असेल.

प्रदर्शन पाहता पाहता लक्षात आले की त्या लोकांनी भरपूर देशांची नाणी/नोटा/पोस्टाची तिकिटे/प्राचीन वस्तू प्रदर्शन व विक्रीस ठेवले होते. तिथेच आपले २५ पैशांचे स्टीलचे नाणेही दिसले. किंमत १० रू. म्हटले, ’वा. ही नाणी अजूनही चलनात असतानाही ह्यांची किंमत एवढी.’ जाउ द्या. मुद्दा तो नाही.

पुढे पाहता पाहता शिवकालीन, मुघलकालीन नाणी पहावयास मिळाली. त्यांचे हे नमुने. मोबाईलमधील कॅमेरा मधून घेतल्याने चित्रे एवढी स्पष्ट नाहीत. (चित्र ४ हे ठशाचे आहे)




तसेच खादी ग्रामोद्योगने काढलेले काही भेट कूपन ही पाहावयास मिळाले. त्यावर लिहिल्याप्रमाणे, खादी ग्रामोद्योगच्या दुकानात ते कूपन देऊन वस्तू मिळत असे. नेमके आठवत नाही पण त्यांनी बहुधा तो काळ १९५० ते ६० सांगितला (स्वातंत्र्योत्तर होता एवढे नक्की). तसेच पुढे जवाहरलाल नेहरू स्मारक कोषातील पाच व पंचवीस रूपयांची नोटही पाहण्यास मिळाली. त्याचा उपयोग विचारता तोच, भेट कूपन सारखाच पण फक्त राजस्थान मध्येच.







पुढे काही तक्ते दिसले. त्यांची टिपण्णी करत बसण्यापेक्षा मी ते तक्ते सरळ मोबाईलमध्ये छापून घेतले, घरी निवांत वाचेन असा विचार करत. तेच हे तक्ते.






एक चक्कर मारून आल्यानंतर आतील रांगेत नाण्यांची व्याख्या लिहिलेली दिसली. ती इंग्रजीत असल्याने तशीच इथे लिहित आहे.
Metal, when used to facilitate exchange of good is Currency.
Currency when used according to specific weight, standards is Money.
Money stamped with a device is a Coin.

त्याच्या बाजूला पाहिले तर आतापर्यंत चलनात आलेली भारतीय नाणी ठेवली होती. मी चौकशी केली की १० रूपयांचे नाणे आहे का? त्यावर श्री. श्रीकृष्ण पारनाईक ह्यांनी सांगितले की पुढे ठेवली आहेत. तेव्हा त्यांच्या कडून माहिती काढतच माझी शंका दूर केली की, बाहेरील रांगेत जे लोक नाणी/नोटा विकत आहेत त्यांना ती नाणी जमवून विकण्याकरीता त्यांच्याकडे परवानगी आहे. पण आतील रांगेत लावलेली नाणी/नोटा हे ’शिवराई’ गटाचे ५ सदस्य श्री.पारनाईक, श्री.शिरवाडकर, श्री. निजसुरे, श्री.वैद्य आणि श्री.सोहनी ह्यांनी आपल्या छंदाकरीता जमा केली आहेत व लोकांना त्याची माहिती मिळण्याकरीता ते जागोजागी प्रदर्शन लावत असतात. श्री.पारनाईक ह्यांनी सांगितल्याप्रमाणे गेले ६५ वर्षे ते हा छंद जोपासत आहे. खरंच, ७६ ह्या वयात अजूनही त्याच जोमाने नाणी/नोटा जमा करणे व ते लोकांपर्यंत पोहोचविणे हा छंद वेगळाच.





आज शेवटचा दिवस आणि माझ्याकडे जास्त वेळ नसल्याने पूर्ण प्रदर्शन नीट पाहता आले नाही, तसेच मोबाईल मधील बॅटरी ही संपत आल्याने कॅमेरा वापरता येत नव्हता. त्यामुळे जेवढी जमली तेवढी नाण्यांची व माहितीची छायाचित्रे काढली व इथेही लावत आहे (अर्थात त्यांच्या तोंडी परवानगीनेच). त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुधा पुढील आठवड्यातही हे प्रदर्शन पुन्हा भरविण्यात येणार आहे.

इतिहासकालीन नाण्यांची माहिती पाहिजे असेल तर हे प्रदर्शन पाहणे हे नक्कीच.

ऑक्टोबर ०६, २००८

काल पुन्हा आईच्या खोलीत पाणी पाणी झाले. वॉशिंग मशिनचा पाण्याचा पाईप सैल झाल्याने तिथून सगळे पाणी खोलीत पसरले. बरं, मशीन बाथरूमच्या दरवाज्याजवळच आहे. तर पाणी बाथरूममध्ये जाण्यापेक्षा नेमके उलट्या दिशेला खोलीभर पसरले. काय पण ते बांधकाम. स्वयंपाकघरात मोरी तुंबली की पाणी तिकडून दिवाणखान्यापर्यंत. अरे, काय चाललंय काय? असा वैताग येतो ना...
२००२ मध्ये स्वयंपाकघर आणि हॉलचे नूतनीकरणाचे काम केले, तेव्हा करणारा कंत्राटदार म्हणाला होता, 'अगदी Zero Level ठेवू. पाणी पडले की तिकडेच थांबेल.' कसले काय. काम करायच्या आधीपेक्षा आता पाणी अधिक लवकर बाहेर येते. तीच गत आतील दोन्ही खोल्यांची.
बरं, त्याचेही म्हणणे काही अंशी ठीक असेल, की बिल्डरने लेवल नीट नाही ठेवला. जर थोड्यावेळापुरते मानले बरोबर, तरी तुम्हाला आधीच एवढी फुशारकी मारायची गरज नव्हती असे वाटते.

असो, आपण आता काय करणार? नसता म्हणाला 'Zero Level' तर काय केले असते? फक्त पाणी गळणार नाही ह्याची काळजी घ्यायची.

ऑक्टोबर ०४, २००८

ही माझी स्कूटर. वेस्पा १५०.



जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो.

वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी मस्त वापर केला गाडीचा. पण त्यांच्या निधनानंतर बंदच पडून होती. नंतर एक वर्षांनी आम्ही ती चालण्याइतपत नीट करून घेतली.

१९९५ मध्ये मी ह्या स्कूटरवर पहिल्यांदा चालवण्याकरीता बसलो. त्यावेळी अंधेरीत राहताना तेथील मित्रांनी दुचाकी शिकण्यास मदत केली ती ह्याच स्कूटरवर. त्याआधी एका मित्राने त्याच्या कायनेटीक होंडा वर एक प्रात्यक्षिक दिले होते. पण ते जुजबी. फक्त एक दोन वेळा. बाकी सर्व ह्याच स्कूटरवर. तेव्हाच अभियांत्रिकीत प्रवेश घेतल्याने मग घरापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे नीट सराव नाही झाला. पण जेव्हा कधी घरी येईल तेव्हा स्कूटर बाहेर काढून शिकणे चालूच होते. १९९६ मध्ये आम्ही रहायला आलो ठाण्याला. पण तेव्हा ही सोबत आणली नव्हती. शेजारीच राहणार्‍या एका मित्राला आईने ह्या स्कूटरला रंगरंगोटी करावयास त्याच्या ओळखीच्या मेकॅनिककडे द्यायला सांगितले होते. त्यानंतर ती त्याच्याच कडे होती. शेवटी १९९७ मध्ये त्याच्याकडून आणली मस्त रंगवून डागडुजी केलेली गाडी. तोपर्यंत मी ही चालविणे शिकलो होतोच. मग शिकाऊ परवाना घेऊन तयारी चालू केली. परंतु पक्का परवाना काढायला जायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे पहिला परवाना तर तसाच वाया गेला. मग दुसरा शिकाऊ परवाना काढला तेव्हा कार चालविणेही शिकत होतोच. मग दोन्ही पक्के परवाने एकत्रच घेतले. मग तर काय काहीही काम असले की स्कूटरवरूनच बाहेर जाणे होत होते. मित्राकडे, बाजारात, नुसते फिरणे :D

कॉलेजला होतो तेव्हा विचार केला होता की शेवटच्या वर्षी स्कूटर घेउन जाईन तिकडे. घरून परवानगीही घ्यायची होती. पण स्कूटरच्या कागदांचा गोंधळ होता. आणि ही गाडी नागपूरवरून इतर ठिकाणी नेल्यानंतर त्याची नोंदणीच नव्हती केली. मग १९९९ मध्ये माझ्या आतेभावाकडून नागपूरवरून त्या कागदपत्राची पूर्तता करून गाडी माझ्या नावावर करून घेतली व ती कागदे इकडे आल्यावर ठाण्यातील RTO मध्ये काय ती फी भरून सर्व गोंधळ संपविला. नंतर ह्या स्कूटरची अद्ययावत नोंदणी वही परत घेताना मी विचारले, ’आणखी काही करायचे आहे का?’ तेव्हा मला उत्तर मिळाले, ’आता इकडे यायची गरज नाही.’ मी ऐकले होते की काही तरी One Time Tax असतो गाड्यांचा. नोंदणी वहीत पाहिले तर तो ही भरला होता. त्यामुळे मग जास्त काही विचार नाही केला आणि बिनधास्त स्कूटरवर हुंदडणे चालू झाले. एवढे करूनही कॉलेजकडे गाडी नेणे जमले नाही. :(

तेव्हा तरी ठाण्यातच गाडी चालविणे होत होते. मग हळू हळू ठाण्याच्या परिघाच्या बाहेरही नेणे चालू झाले. इकडे मुलुंड, मग पवईच्या आयआयटी कॉलेजपर्यंत, तिकडे बेलापूरपर्यंत. नंतर कार्यालयात जायला लागल्यापासून दररोज सकाळी स्टेशन पर्यंत स्कूटरवर जाणे. तिकडे गाडी लावून मग लोकलने दादरला ऑफिस. संध्याकाळी परत आल्यानंतर बस-रिक्षाची कटकट नव्हती. मग एक दोन वेळा दादरपर्यंतही ही स्कूटर नेली.
तुम्ही म्हणाल, आता स्कूटरच आहे ती. एवढ्या ठिकाणांपर्यंत नेली तर एवढे काय? अहो, ह्यात मुद्दा आहे की ह्या गाडीकडे पाहून लोकांचा पहिला प्रश्न असतो, 'केव्हाची ही गाडी?' माझे उत्तर असते, '१९७१'. माझ्यापेक्षाही वयाने भरपूर मोठी आहे ही स्कूटर. त्यामुळेच कधीही कुठे ती न्यायची म्हटले तर भरपूर लोकांना प्रश्न पडतो की ही गाडी जाईल का? बाकी गाडीमध्ये काही अडचण नाही हो. (काय ते 'टचवूड' म्हणतात ते ही करतो आता ;) ) मध्ये २/३ वेळा रस्त्यातच बंद पडली होती तेव्हा तिकडे जवळच असलेल्या मेकॅनिककडे ठेवून मग घरी आलो होतो. पण अर्थात त्यात चुकी माझीच होती. नीट काळजी नाही घेतली तर असे त्रास होणारच. माझे वडील तर दर रविवारी स्कूटर उघडून साफ करायचे. पण मला काही ते जमत नाही. तरीही मेकॅनिकला सांगून दर ३/४ महिन्यांनी डागडुजी करून घेतो. बाकी वडील वापरायचे त्यापेक्षा मी गाडीची वाटच लावली आहे.:(



तर ह्याच सर्व परिस्थितीत म्हणजे लोक गाडीच्या चालण्यावरून शंका घेत असताना, मी गेल्या वर्षी ही स्कूटर पुण्याला नेण्याचे ठरविले. कागदपत्रांची पूर्तता बरोबर आहे की नाही हे कोणाला नीट माहित असेल असा प्रश्न आल्याने मग मी थेट रस्त्यावर चौकात उभे असलेल्या वाहतूक पोलिसांनाच त्याबद्दल विचारले. ते म्हणाले, RC बुक, PUC व विमा एवढेच पाहिजे, आणि काय तो कर भरलेला असला पाहिजे. महाराष्ट्रातच गाडी असल्याने ’ना हरकत प्रमाणपत्रा’ची भानगड नाही. मित्रांसोबत ह्याबाबत बोललो की मी नेतोय गाडी पुण्याला, ते ही स्वत: चालवत. तेव्हा एक मित्र बोललाही की 'स्वत: नको नेऊस म्हणून. घाटात पहिल्या गेअर मध्ये ही त्रास होऊ शकतो.' पण मी जिद्दीला पेटलो तेव्हा त्यानेच रस्त्याची नीट माहिती दिली व सांगितले की मध्ये गाडी घाटात चढली नाही तर काही Towing वाले असतात त्यांना सांगायचे, ते गाडी उचलून आणून देतील. त्याच्या दुसर्‍या दिवशी मी सकाळी ७ ते ११ असा ४ तास प्रवास करत माझी ही स्कूटर पुण्य़ापर्यंत पोहोचविली. घाटात पहिल्याच काय दुसर्‍या गेअर मध्येही नीट चालली. तेव्हा मग लक्षात आले, ह्या गाडी अजूनही पुढे मला साथ देईल. मग एक वर्ष पुण्याचीही रपेट ह्या स्कूटरवरून केली. तिथेही मित्रांचे म्हणणे होतेच, 'किती जुनी ही गाडी' :)

आता गेले २/३ महिने आणखी एक प्रश्न समोर आला, १५ वर्षांवरील गाडीची नोंदणी दर ५ वर्षानी पुन्हा करावी लागते. ह्याबाबत मला माहित नव्हते. २ आठवड्यांपुर्वी गाडीचे सर्व कागदपत्रे पुन्हा नीट जमा केली व क्षेत्रिय वाहतूक कार्यालयात जाऊन त्यांच्यासमोर कागदपत्रे ठेवली व विचारले की साहेब, ह्यात काय काय करावे लागेल. तेव्हा त्यांनी सांगितले की 'काही नाही. गाडी अधिकार्‍याकडून तपासून घ्या व १६० रू भरून पुनर्नोंदणी करून घ्या'. दुपारी त्यांनी सांगितलेल्या दुसर्‍या कार्यालयात गेलो. तेव्हा कळले की २ वाजता अर्ज व फी भरणे बंद होते. मला शनिवार शिवाय बाकी दिवस वेळ नसल्याने पुन्हा २ आठवडे थांबणे आले. दरम्यान कळले की गाडीची स्थितीही चांगली पाहिजे. त्यामुळे मग काल मेकॅनिककडे घेउन गेलो. त्याला सांगितले की 'असे असे आहे, बघ काही करायचे बाकी आहे का?' त्याकडून दिव्यांची डागडुजी करून घेतली. तो म्हणाला की 'बहुधा १६० रूपयांमध्ये होणार नाही. ७००/७५० रू जातील'. मी म्हटले, 'जेवढे आहेत तेवढे, बघुया.' :) सकाळी अर्जात वाचले की Chassis क्रमांक ही ते तपासतात. आता वाहन नोंदणी वहीत त्याची नोंद होती त्यामुळे अर्जात लिहायला त्रास नाही झाला. पण अधिकारी ते तपासणार म्हणजे? त्या मेकॅनिककडे गेलो. तो नव्हता. त्याच्याच दुकानातील दुसर्‍या व्यक्तीने सांगितले की एवढ्या जुन्या गाडीचा पत्रा सडल्याने तो क्रमांक आतापर्यत निघूनही गेला असेल. म्हटले आता आली का पंचाईत? शेवटी काय निकाल लागायचा तो लागू दे म्हणून गाडी घेउन गेलो. तिकडे अधिकार्‍यांकडे सांगायला गेलो की ,'साहेब, गाडीच्या नोंदणीचे नूतनीकरण करायचे आहे'. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, 'chassis क्रमांक दिसतो का?' :( म्हणालो, 'नक्की माहित नाही.' ते म्हणाले, 'आधी ते पाहून ये'. गाडीकडे गेलो. शोधायचा प्रयत्न केला. त्या माझ्या ओळखीच्या मेकॅनिकला फोन केला. तो म्हणाला की, 'डीकीच्या खाली साफ करून बघ, तिथे असेल'. नाही मिळाला. तेव्हा मग तिकडच्या एका एजंटला मदत मागितली. त्याने सांगितले की 'हा इथे आहे, नीट साफ केला की दिसेल'. झाले काम. पुन्हा गेलो. अधिकारी म्हणाले फी भरून ये. फी भरली. एका अधिकार्‍याने पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ३०+१००= १३० व दंडाचे १००. कारण १९९९ नंतर २००४ मध्ये मी नूतनीकरण करायचे होते ते नाही केले. ह्या गाडी तपासणार्‍या अधिकार्‍यांकडे गेलो ते म्हणाले, १३० नाही १६० रू. पुन्हा जादा ३० रू भरून आलो. मग पाहिले तर चेसिस क्रमांकाचा पेन्सिलीने ठसा अर्जावर उमटवायचा आहे. तो उमटविला. शेवटी त्यांनी पूर्ण तपासून स्कूटरच्या नोंदणीच्या नूतनीकरणावर सही व शिक्का मारला. हुश्श्श्श्श. आता पाच वर्षे चिंता नाही. फक्त गाडी नीट ठेवणे,चालविणे व PUC दर सहा महिन्यांनी करत रहायचे.



अजूनही भरपूर लोक, मित्र म्हणत असतात, ’विकून टाक ही स्कूटर आता.’ पण मी म्हणतो, ’चालू आहे नीट, २५ ते ३० चा एवरेज देते आणि मला कुठे लांब न्यायची आहे?’ आणि आज जे गाडीचे नूतनीकरण झाले त्यावरून तर मी हाच विचार करतोय जोपर्यंत ही माझी स्कूटर नीट चालतेय तोपर्यंत तरी चालवत रहायचे.

चल मेरी वेस्पा :)

सप्टेंबर २८, २००८

प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर ह्यांचे काल निधन झाले. माझ्या आवडत्या गायकांपैकी एक.

गेले काही वर्षे त्यांच्याबद्दल जास्त काही ऐकण्यात येत नव्हते.
मध्ये कधी तरी त्यांचा एक अल्बम आला होता, पण पंजाबी गाण्यांचा.
आणि नुकताच त्यांना लता मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आला होता.

त्यांची मला जास्त आवडलेली गाणी:
हिंदी-
तुम अगर साथ देने का वादा करो..
बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी..
दिल की ये आरजू थी कोई..
तेरे प्यार का आसरा चाहता हूं..
किसी पत्थर की मूरत से
निले गगन के तले
मेरे देश की धरती
हैं प्रीत जहा की रीत सदा..
चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो..
ना मुंह छुपा के जियो..

मराठी-
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
तसे दादा कोंडकेंची भरपूर गाणी.

ह्या एका दमदार आवाजाच्या गायकाला माझी श्रद्धांजली.

सप्टेंबर २१, २००८

'बॉम्बब्लास्ट' सिनेमा पाहताना त्यातील एक दृष्य. बॉम्बस्फोटानंतर जखमी/मृत व्यक्तीच्या देहांकडे पाहताना रोनित रॉयला उलटी होते. माझा एक मित्र म्हणाला,"खरं तर पोलिसांना हे नको व्हायला." त्यावर दुसरा मित्र म्हणाला,"का? तो ही माणूसच आहे." आधीचे आठवत नाही पण तेव्हापासून असले काही प्रसंग पाहिले/ऐकले की पोलिसांबद्दल,डॉक्टरांबद्दल विचार मनात येतात, 'असं सारखं सारखं बघून त्यांच्या संवेदनावर फरक तर नसेल ना पडत?'

'अब तक छप्पन' किंवा तत्सम सिनेमे पाहताना माझ्या बहिणीचे वाक्य आठवते. ती ही म्हणाली की नेहमी आपण असे पाहले तर नंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाईल. आज काल तेच अनुभवायला मिळतंय. आधी खरे तर एखाद्याला मारताना दाखवत नव्हते. पण हळू हळू त्याची सुरूवात झाली. तेव्हा सिनेमात नुसते गोळी मारली किंवा चाकू खुपसला तरी पाहण्यार्‍या एखाद्याच्या तोंडून 'ईईईई' निघायचे, पण आता नेहमी खून, गोळ्या मारणे वगैरे पाहून त्याबाबत लोकांना बाबत जास्त काही वाटत नाही.

घरी चिकन करायचे म्हटले तर मी कोंबडी आणायला जातो तेव्हा त्यांना मारताना कधी पाहत नाही. फक्त ते तुकडे समोरच करून देतात ते दिसते. ह्यावरूनच 'बाकी शून्य' मधील जय सरदेसाईचा स्वत: कोंबडी कापण्याचा प्रकार आठवला. त्यालाही सुरूवातीला ते विचित्र वाटते, नंतर तो सराईताप्रमाणे ते करतो. त्याचप्रकारे मलाही बहुधा त्याची आता सवय झाली आहे. पण जेव्हा मी एखाद्याला
लहान मुलाला तिथे आणलेले पाहतो तेव्हा त्यांना लगेच सांगतो की लहान मुलांना तिथे आणू नका. ते आपण थोडं फार थांबवू शकतो पण टीव्हीवर जे सर्रास दाखवले जाते त्यावर अजून तरी जास्त काही थांबविणे होत नाही. दोन आठवड्यांपुर्वी एक मित्र आला होता माझ्या घरी त्याच्या बायको आणि मुलासोबत. तेव्हा एका वाहिनीवर असेच काही तरी चालू होते, माझ्या लक्षात येऊन लगेच कार्टून चॅनल लावला. खरं तर त्यातही आजकाल काय दाखवतात मला माहित नाही. तरीही 'अभय सिनेमातील वाक्य आठवते, कमल हासन(अभय) ला कोणीतरी विचारतो की तुला हे लोकांना मारण्याचे प्रकार कसे सुचतात, त्यावर तो म्हणतो की 'कार्टून चॅनल मधून'. बापरे, म्हणजे मुलांची त्यातूनही सुटका नाही का?

मी वर म्हणालो की मला ही बहुधा त्याची सवय झाली असेल. कारण ३/४ वर्षापुर्वी AXN वर Fear Factor मध्ये एका मुलीला Bowling मध्ये १० पिन पडायच्या राहतात म्हणून तेवढेच म्हणजे १० जिवंत Beetles खायला सांगितले होते. तेव्हा तो प्रसंग पाहताना का माहित नाही पण मला मजा वाटली होती. :(
एक प्रश्न पडतो, मी मांसभक्षण करतो म्हणजे त्याबाबत संवेदनशील असणे विसंगत आहे का?

असो, टीव्ही वर तर आता सिनेमेच सोडा पण एखाद्या अतिरेक्यांशी एन्काऊंटरचे ही थेट प्रक्षेपण दाखवतात. अर्थात तिकडे प्रत्यक्षात काय होते हे दिसते, पण त्याचा वाईट परिणाम नको व्हायला.
त्यातल्या त्यात परवा जेव्हा दिल्ली मधील अतिरेक्यांच्या एन्काऊंटरचे थेट प्रक्षेपण दाखवले होते त्यानंतर एका वाहिनीवर, बहुधा IBN7 वर, एक रिपोर्टर सांगत होता की तिथे एका लहान मुलाने ते सर्व पाहिल्याच्या धक्क्यात होता. तर हा रिपोर्टर त्या मुलाला विचारत होता की 'उस बारे में कुछ बताओ'.

वरील सर्व आणि जर त्या ५/६ वर्षाच्या मुलाला त्या गोळीबाराबद्दल विचारले जात असेल तर आता वाटते की खरंच आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत का?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter