जानेवारी १४, २००८

काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने इंडिका बाजारात आणली. ती गाडी मारूती ८००, सँट्रो प्रमाणे तुफान चालली की नाही हे आठवत नाही. परंतु इंडिकाही भरपूर लोकांच्या पसंतीस पडली. मी काही जास्त गाड्या अनुभवल्या आहेत असे नाही परंतु मलाही इंडिकाच आवडतेय. कोणती गाडी घेणार विचारले तर मी प्रथम इंडिकाच म्हणतो.
त्याच्या कामगिरीचा एक पैलू असाही आहे, की इंडीकाने जी इंडीकॅब आणली तिचा भाड्याने गाडी देणारे, आजकालच्या कंपन्यांमध्ये असलेली कॅब सर्विस, टॅक्सी सर्विस ह्यांनी जास्त वापर सुरू केला. त्यामुळे पांढरी इंडिका दिसली की लोक म्हणतात कॅब आहे.

तसेच जेव्हा मारुतीने स्विफ्ट गाडी बाजारात आणली तेव्हा तिचा आकार बघून मला एवढी खास नाही वाटली. मनात आले, आपल्याकडे गाडी आहे म्हणण्यात जी (थोडीथोडकी का असेना) शान वाटावी ती ह्या गाडीत वाटत नाही. अर्थात हे माझे मत आहे. लोकांचे म्हणणे होते की ही गाडी मस्त आहे. (हळू हळू मग त्यातील नकारात्मक गोष्टीही समोर आल्यात ही बाब ह्या लेखात नको.)

आता हे लिहिण्यामागचे प्रयोजन हे की नुकतीच टाटांनी त्यांची (एक) लाखांची गाडी आणली. त्यावरून बहुतेक लोकांचे स्वत:कडे कार असण्याचे स्वप्न पुर्ण होईल. मी ही माझ्या मित्राला म्हणालो, "चला, आता पैसे जमा करायला लागूया."

पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत. (सध्या सामनावर बातमीचा दुवा मिळत नाही आहे)

हे वाचून मनात आले, जर ती परवानगी मिळाली तर जरी एखाद्याला स्वत:कडे कार असण्याची कामना पूरी होईल, पण वरील उदाहरणांप्रमाणे त्याच्या(माझ्याही) तथाकथित कार असण्याच्या गर्वाला त्याने धक्का जरूर बसेल.

जानेवारी ०८, २००८

WorldPersonalities

वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू?

मी ओळखलेले:

महात्मा गांधी
चार्ली चॅपलीन
बीथोवन
हिटलर
सद्दाम हुसैन
बिल क्लिंटन
ब्रुसली
अल्बर्ट आईन्स्टाईन
अब्राहम लिंकन
यासर अराफात
मेरीलीन मॉन्ऱो
जॉर्ज बुश

आणखी जमल्यास लिहीन पुढे...
(चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

डिसेंबर ३१, २००७

आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे. अर्थात किशोर कुमार सोबत इतर लोकांचाही आवाज असल्याने ते लगेच लक्षात येते. (आठवले, तीन देवियां सिनेमातील हे गाणे.)
दहावीत (बहुधा ११ वीत ) असतानाची गोष्ट. मला ताप आला होता. त्यामुळे मी झोपलो होतो. मध्येच जाग आल्यावर पाहिले तर मी खोलीत एकटाच होतो. रात्री ११च्या नंतर बेला के फूल मध्ये हे गाणे सुरू होते. ते गाणे ऐकताना एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे आता कधी ही हे गाणे ऐकले की एकदम फ्रेश्श वाटते ;)
(आताही हे लिहिता लिहिता मागे गाणे ही सुरू ठेवले आहे :) )

घूंघट की आड से..
आमिर खान, जुही चावलाचे हे गाणे ऐकायला मस्तच आहे. त्यातील शब्दही छान आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या लहानपणीचा सार्वजनिक गणपती समारंभ आठवतो. ज्यात कॉलनीतील एका मुलाने व त्याच्या घरी आलेल्या एका मुलीने ह्या गाण्यावर नाच केला होता.

ह्या सोबतच तम्मा तम्मा लोगे (थानेदार) तसेच आशिकी मधील गाणी ऐकली की तेच सर्व गणपतीचे दिवस आठवतात, ज्यात दिवसभर ही गाणी सुरू असायची. तम्मा तम्मा लोगे वर तर मनात येईल तसा नाच केला होता.

फरेब मधील ओ हमसफर हे गाणे ऐकले की महाविद्यालयातील दुसरे वर्ष आठवते. आणि बाहेर पाऊस पडत आहे असेच वाटते. ह्याचे कारण हे की ही गाणी जेव्हा चालत होती तेव्हा पावसाळा होता आणि माझ्या बाजूच्या खोलीतील मुले हीच गाणी लावून ठेवत होती.

यह जो थोडे से है पैसे, मुझसे नाराज हो तो.. पापा कहते हैं मधील ही गाणी ऐकली की परीक्षेच्या आधी दिलेल्या सुट्ट्या आठवतात. अर्थात त्या सुट्ट्या अभ्यासाकरीता होत्या पण त्यात गाणी ऐकणे, सिनेमे पाहणे हे थोडेच थांबते. :)

अश्विनी ये ना..
गंमत जंमत मधील हे गाणे ऐकले की आधी किशोर कुमारची गाण्याची पद्धत, जी दूरदर्शन वर दाखविण्यात आली होती, आठवत होती तसेच त्यातील अशोक सराफ ची जी बायको दाखविली आहे (चारूशिला साबळे) तिचे झाडू घेऊन नाचणे आठवायचे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिले आमचे एक सर प्रत्येक वार्षिक समारंभाला हे गाणे गायचे, आणि त्यांच्या शाखेच्या फ्रेशर पार्टीलाही. त्यामुळे आता कधीही हे गाणे ऐकले की कॉलेजचे ते समारंभ आठवतात.

ॐकार स्वरूपा..

कॉलेज मधील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ह्याच गाण्याने व्हायची (आताही होत असेल). त्यामुळे हे गाणे ऐकले की मग ते समारंभ आठवणे आलेच.

मैं हूं झूम झूम झूमरू..
लहानपणी गणपतीतील अंताक्षरीच्या निवडफेरीत मी हे गाणे फक्त सुरुवातीच्या संगीतावरून ओळखून म्हटले होते. त्यामुळे अंताक्षरीत मी निवडला जाण्यास फायदा झाला होता. :)
तसेच कार्यालयाच्या सेमिनार वजा सहलीत औरंगाबादला असताना अजिंठा लेण्यात जाताना बसमध्ये हे गाणे गायलो होतो.
हे दोन प्रसंग ह्या गाण्याशी निगडीत राहतील असे वाटते.

ताक धिना धिन ताक धिना धिन...

रखवाला सिनेमातील हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे. मी नेहमी गुणगुणत असे. शाळेत मग आमच्या वर्गात एक दोन वेळा मला गायलाही सांगितले होते. एकदा तर काय झाले की, आमच्या वर्गात दुसऱ्या वर्गातील मुलगा येऊन आमच्या टीचरला म्हणाला की मला त्यांच्या वर्गात बोलावले आहे. माझ्या टिचर ने मला पाठवले. तिकडे गेल्यावर कळले की त्यांच्या वर्गात अभ्यास संपला होता. मग मनोरंजन करण्याकरीता मला गाणे गायला सांगितले. तेव्हाही मी हेच गाणे गायलो होतो. आता ती इयत्ता/साल आठवत नाही, पण हे गाणे ऐकले की तो प्रसंग नक्की आठवतो.

अरे हो,
प्यार हमें किस मोड पे ले आया
सत्ते पे सत्ता चे हे गाणे तर राहिलेच. बंगळूरच्या ऑफिसच्या सहलीत सकाळी एका ठिकाणाहून परत येताना हे गाणे गाऊन मी धमाल केली होती. त्याच दिवशी मग संध्याकाळी बंगळूरला परत येताना ३ बस पैकी कोणत्या बसमध्ये बसावे हे विचार चक्र चालू असताना मित्रासोबत बसलो होतो. तेव्हा सकाळी आम्ही फिरायला गेलेल्या गटातील एक मुलगा मला शोधत आला व त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला. तिथे तर मग काय हे गाणे, आणखी भरपूर धमाल गाणी गात, खेळ खेळत आम्ही परतीचा प्रवास केला होता.

छैया छैया
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास सर्व खोल्यांत हेच गाणे वाजविले जात होते. एवढा वैताग आला होता की मी माझ्या २/३ मित्रांना तर सांगितले होते की माझ्यासमोर हे गाणे लावायचे नाही. त्यांनी तर एकदा मग गंमत केली. मी एकाच्या खोलीत गेलो असताना मुद्दाम हे गाणे लावले व दुसऱ्या मित्राला जाऊन सांगितले की मी हे गाणे लावायला सांगितले. काय रागावला होता मग तो माझ्यावर. अर्थात मग नंतर ते आम्ही निकालात काढले होते.

आणखी ही गाणी आहेत, काही सध्या आठवत नाहीत.

तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?

डिसेंबर २९, २००७

ह्या आधीचा लेख इथे वाचावा.

जरी लहान मुलांना जवळपास सर्व वस्तू हव्या असतात तरी आपल्या वस्तू कोणाला द्याव्यात न द्याव्यात हेही त्यांना तितकेच चांगले कळते असे मला वाटते. समजा एखाद्या मुलाकडे एक खेळणे आहे, जर कोणी मोठा माणूस ते घ्यायचा प्रयत्न करेल तर तो त्याला घेऊ देईल. कारण त्याला माहीत आहे की हा काही हे घेऊन टाकणार नाही. पण तेच खेळणे जर त्याच्याच वयाच्या (किंवा थोडाफार लहानमोठ्या) मुलाने घेतले तर तो काही ते घेऊ देणार नाही. लगेच त्यांच्यात स्पर्धा सुरू होईल किंवा मग रडारड. अर्थात दोन्हीतही त्या मुलाला दुसऱ्याबद्दलची वाटणारी ओळख कशी आहे ह्यावर ही ते अवलंबून असेल. एखाद्या नवीन माणसाला ते काही देणार नाहीत किंवा मग सर्व काही उदार मनाने देतील. तेच दुसऱ्या लहान मुलाकरीताही.

खाणे.. ही गोष्ट तर लहान मुलांची आवडीची. समोर मग काहीही असो, ती वस्तू त्यांना खाल्ल्याशिवाय, चाखल्याशिवाय कळतच नाही की ती किती चांगली आहे. :D ही अतिशयोक्ती असेल पण प्रत्यक्षात काहीसे असे आहे. मी दहावीत होतो तेव्हा असेल, शेजारी राहणारा एक मुलगा. नुकताच रांगायला लागला होता. त्याला कसे माहीत पण डोंगळे (मुंगळे) खायची सवय लागली. रांगता रांगता समोर एखादा मुंगळा जाताना दिसला की लगेच तो त्याच्या तोंडात. एके दिवशी मुंगळा त्याला जिभेवर चावला तेव्हा त्याची ती सवय सुटली.

आता थोडया मोठ्या मुलांविषयी. जरी आपल्यापेक्षा लहान मुले,भावंडे ह्यांच्याशी ते खेळत/भांडत असतील तरी त्यांच्याबद्दलची जबाबदारीही कळते. हे जरी भरपूर ठिकाणी पाहिले असेल तरी त्यातील एक पाहिलेला अनुभव सांगावासा वाटतो. बहुधा २००४ मध्ये, आम्ही मित्र पुण्यात फिरत होतो. तेव्हा पाहीले की एका मोटार सायकलवर मागे बसलेली २ मुले (वय ४ आणि ५/६ वर्षे असेल). लहान मुलाला मोठ्याने एकदम नीट पकडून ठेवले होते. जाणवत होते की तो मोठा मुलगा आपल्या लहान भावाची जबाबदारी कशी घेतो आहे ते.

असो, एखादे सर्वेक्षण करून आणखी भरपूर गोष्टी लक्षात येतील. पण वरील सर्व गोष्टी मी अर्थातच अनुभवातूनच लिहिल्या आहेत. आणि अनुभव तर पुढे येत राहतीलच.

डार्विनच्या त्या सिद्धांताप्रमाणे आणि मानवाच्या, जगाच्या प्रगतीवरून ही क्षमता वाढतच राहील हेच खरे.

डिसेंबर २६, २००७

भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी. ती वाचून वाटले की हे लोक स्वत:च्या वृत्तपत्राला वाचक मिळावेत म्हणून एखाद्या गोष्टीला मोठ्ठी करून सांगतात.

बातमी अमिताभ बच्चन ह्यांच्या आई श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराची.
दि. २३ डिसे. २००७ ला मुंबई मिरर ह्या दैनिकाच्या पहिल्या पानावर लिहून होते, Surprize Visitor at Teji's Funeral.
ह्या बातमीत आत काय लिहिले होते?
"विवेक ओबेराय ने अचानक श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचून इतरांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिषेक/ऐश्वर्या त्यांच्याशी अंतर ठेवून होते. अमिताभ, अमर सिंग आणि निखिल नंदा ह्यांचे चेहऱ्यावरील भाव चुकवू नका. वगैरे वगैरे."

त्यांच्या संकेत स्थळावर आणखीही विचित्र प्रकारे छायाचित्रांना वाक्ये जोडलेली आहेत. अभिषेक-ऐश्वर्या एकत्र बसले असताना त्याचा मथळा लिहिला "जोडी कमाल की" आणि पुढे लिहिलेले- आम्ही दोघांना विचारांत गुंग असताना छायाचित्र घेतले.

अरे, काय चाललंय काय? एखाद्याच्या अंत्यसंस्काराला कोणी माणूस पोहोचला तर त्यात तुम्हाला एवढी मोठी बातमी बनवायची गरज काय? मी तर म्हणतो हक्कच काय? आणि त्यांना दु:खाच्या प्रसंगी तरी सोडा. जर त्यांना काही नाही आवडले तर ते बघून घेतील.

पूर्ण बातमी (वाचावीशी वाटल्यास) इथे पहा.

तसेच टाईम्स ऑफ इंडीया मध्येही पहिल्या पानावर अभिषेक-ऐश्वर्याचे छायाचित्र आणि मथळा "कुछ ना कहो". अरे, फिल्मी ढंगात लिहायला ही बातमी पाहिजे का तुम्हाला? इतर ठिकाणी वाट लावताय ते पुरे नाही का?

लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter