जानेवारी २३, २०१०

blog.aarp.org/shaarpsession/traffic.jpg
http://www.newsandreviews.in/media/blogs/Home/mumbai%20traffic.jpg

शुक्रवारी दुपारी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बोलत होतो. पहिले प्रकाशचित्र दाखवून मी म्हणालो,"मला ह्या लोकांचा हेवा वाटतो. एवढी गर्दीची वाहतूक असूनही हे लोक किती नियमबद्ध पद्धतीने गाड्या उभ्या करतात. नाहीतर, आपल्याकडे कशीही गाडी दामटली जाते." नंतर मग नेहमीचीच चर्चा. हे असे वागतात, ते तसे वागतात.

संध्याकाळी आईचा फोन आला की माझा मावसभाऊ घरी आला आहे. मी म्हटले, "ठीक आहे मी सहा वाजता निघेन. ७:१५ पर्यंत पोहोचतो". पण कसले काय. दुपारी जी चर्चा केली तीचेच रूप समोर दिसत होते. नेहमी ज्या प्रवासाला २० मिनिटे लागतील त्याला ६०-६५ मिनिटे लागली. कारणही तेच, वाहतुकीची गर्दी. नेमके कारण कळले नाही. बहुधा मध्य रेल्वे वरील मोटरमननी केलेल्या संपामुळे वाहतुकीवर ताण वाढला असेल. पण त्या गर्दीत लोक कसेही(काही लोक कसेतरी) गाड्या चालवत होते. इकडून ही गाडी घुसव. तिकडून ती गाडी मध्येच आली. मग आमच्या वाहनचालकाचे नेहमीप्रमाणे दुसऱ्यांवर ओरडणे. घरी पोहोचायला ८ वाजले. तरी बरे, आठच वाजले. आमची गाडी पूर्व दृतगती मार्गावर गाडी येण्यास जेवढा वेळ लागला, त्यावरून तर वाटले होते की ९ वाजतील. काय पण योग(की योगायोग) असतात ना?

पण खरोखरच, नेहमीच्या ह्या वाहतुकीच्या त्रासामुळे वैताग येतो. अर्थात गाड्यांची संख्या भरमसाट वाढली हे खरे आहे. जागेची कमी आहे हे ही मान्य. पण तरीही काहीतरी शिस्त पाळायची? तीन गाड्यांच्या लेन आहेत पण त्यात चार-पाच गाड्या चालतात. दहा पंधरा वर्षांपूर्वी चंद्रपूर-नागपूर मधील आमचे नातेवाईक म्हणायचे की, मुंबईचा वाहनचालक नागपुरात गाडी नाही चालवू शकत. कारण तिकडे कशाही गाड्या चालवतात आणि तिकडचा चालक मुंबईत गाडी नाही चालवू शकत, कारण इकडे शिस्तीत गाडी चालवतात ज्याची त्याला सवय नाही. पण गेल्या ३-४ वर्षांपासून वाटते की इकडची शिस्तही गेली आहे. मी असे म्हणत नाही की सर्वच बेशिस्त आहेत. पण काही लोकांमुळे सर्वच वाट लागते.

आता काही गोष्टी बघा ना.

गेल्या आठवड्यात, कार्यालयातून निघालो. बसमध्ये गर्दी खूप. म्हणून रिक्षाने येत होतो. (मी सार्वजनिक वाहतूक वापरली नाही मान्य. पण त्यावर वाद नंतर घालू ;) ) सीप्झ पासून पुढे एल एंड टी च्या पुलापर्यंत यायला दहा मिनिटे लागायची तिकडे ३० मिनिटे लागली. गाड्या रेंगाळत पुढे चालल्या होत्या. पुढे पोहोचलो तर बघितले, एक ट्रक चालक ट्रक उभा करून कोणाची तरी वाट पाहत होता. त्यामुळे त्याच्या बाजून एकाच गाडी पुढे जाऊ शकत होती. अरे त्याला गाडी उभी करायला दुसरी जागा नव्हती का?
माझा रिक्षाचालक म्हणाला, "दोन दिवसांपूर्वीही तिकडेच कुठेतरी एक रिक्षाचालक लघुशंकेसाठी म्हणून थांबला तर त्याने रिक्षा डाव्या बाजूला नाही, उजव्या बाजूला उभी केली होती." :|

२००७ मध्ये वाशी वरून ठाण्याला येत असताना ऐरोलीजवळ वाहतुकीची कोंडी झाली होती. गाड्या एकदम हळू हळू जात होत्या. आम्ही कसे तरी तेथे पोहोचलो तर दिसले की, एक मोठा ट्रक वळण घेत होता पण नीट जमले नसल्याने तो हळू हळू प्रयत्न करत होता पण त्याच्या बाजूने इतर वाहने पुढे जायच्या प्रयत्नात कोंडी वाढवत होते. आम्ही ट्रकच्या पुढे गेलो तर पाहिले दोन वाहतूक पोलीस कोणातरी दुचाकीस्वारासोबत बोलत उभे होते. म्हटले वा, इकडे त्यांच्या मागे वाहतूक नीट चालत नाही आणि हे लोक गप्पा मारण्यात गुंग आहेत.

बरं
, ठीक आहे. वाहनात काही बिघाड झाला म्हणून गाडी बाजूला घेण्यात वेळ गेला किंवा नाही जमले तर हा घोळ होऊ शकतो. पण काही जण तर अशा गर्वात असतात की आपल्याकडे गाडी आहे म्हणजे माझ्या समोरचा रस्ता मोकळा पाहिजे. नाही तर जमेल तशी गाडी दोन तीन लेन मधून घुसवायचा प्रयत्न करणार. त्यात गाड्यांचा प्रेमालाप झाला तर आपणहून मग दुसऱ्या गाडीच्या वाहनचालकाशी गळाभेट करणार. ह्यात मागे वाहतुकीची वाट लागली आहे हे त्यांच्या गावी नसते. हम्म.. असेही ऐकले की काही टक्कर वगैरे झाली तर विम्याकरीता त्यांचे प्रतिनिधी येईपर्यंत त्या गाड्या तशाच ठेवाव्यात. तेव्हा वाहतुकीचे काय होईल असा विचार येतो.

काही लोक भ्रमणध्वनीवर गप्पा मारत गाडी चालवतात. त्यामुळे त्यांची गाडी मधल्या रस्त्यामध्ये हळू जातेय की नीट जात नाही ह्याकडे त्यांचे लक्ष नाही. पुन्हा त्यांना काही म्हटले की आपल्यालाच खत्रूड नजरेने पाहणार. वाहतूक खात्याने नियम बनवलेत की गाडी चालवताना भ्रमणध्वनी वापरायचा नाही. पण तेच ह्याकडे लक्ष देत नाहीत. पुण्यात माझ्या समोरील गाडीत एका माणूस भ्रमणध्वनीवर बोलता बोलता गाडी हळू नेत होता. नेऊ दे म्हणा हळू पण लोकांना त्रास का? कडे कडेने जा की. आणि ते ही सिग्नलच्या जवळच. तिकडे उभ्या असलेल्या दोन पोलिसांसमोरून तो निघून गेला. मग मी त्या पोलिसांना विचारले की, 'त्याला अडवले की नाही?' ते म्हणाले,'आमचे लक्ष नव्हते. तू त्याचा गाडीचा नंबर दे आम्हाला'. मी म्हटले, 'ठीक आहे. तुम्ही लक्ष नकाच देऊ. आता पुढे दिसला तर पाठवतो मी त्याला मागे.'

भरपूर ठिकाणी गाड्या उभ्या करण्यास बंदी असते. तरी काही लोक गाड्या उभ्या करून जातात. दुचाकी असली तर ती उचलून नेली जाते. पण चारचाकी असली तर त्याला भला मोठा 'जॅमर' लावला जातो. त्यांच्याकडे चारचाकी गाड्या ठेवायला जागा नसते हे मान्य. पण तिकडेच त्यांना जॅम करून वाहतूकीची कोंडी वाढली जाते असे मला वाटते. आणि रस्त्याच्या बाजूला हे लोक जेव्हा पार्किंग लाईट लावून एखाद्याची वाट पाहत उभे असतात, तेव्हाही त्यांना काहीच केले जात नाही.

अजूनही भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे ह्या वाहतुकीचा वैताग येतो. पण काय करणार, ह्यातून जावेच लागणार. पुण्याला असताना एक विचार मनात आला होता. थंड पाण्याने आंघोळ करायचे म्हटले तर आपली जी स्थिती असते, तीच नाही पण, तशीच ही स्थिती आहे. सुरुवातीचे एक दोन लोटे पाणी थंड वाटते, नकोसे वाटते. पण नंतर मग पूर्ण बादली आपण संपवितो. त्याप्रमाणेच ह्या वाहतुकीत शिरायचे म्हणजे वैताग वाटतो, पण एकदा त्यात घुसले की मग आपली गाडी अंतिम स्थानापर्यंत पोहोचवतो.

ता. क. : दोन्ही चित्रे आंतरजालावरून साभार. पहिले चित्र तेच ज्यावरून चर्चा सुरु झाली. दुसरे चित्र शोधताना कळले, माझ्यासारखेच बहुतेक लोकांनी लिहून ठेवले आहे. :)

[जमल्यास अशाच आणखी वैतागांबद्दल नंतरही लिहेन.]

जानेवारी १६, २०१०

लाफ्टर चॅलेंज नंतर प्रसिद्ध झालेला विनोदी कलाकार सुनील पाल ह्याने दिग्दर्शित व निर्माण केलेला 'भावनाओं को समझो' नावाचा सिनेमा काल प्रदर्शित झाला. हा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही. ह्या सिनेमाबद्दल मला माहितही नव्हते. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ह्या सब टीव्ही वरील विनोदी मालिकेत सुनील पाल पाहुणा कलाकार म्हणून आल्यानंतर कळले. त्या मालिकेत खरं तर सिनेमाची जाहिरात करावी हाच उद्देश होता.
असो, तर हे लिहिण्यामागचे कारण असे की आताच एका वृत्तवाहिनीवर पाहिल्याप्रमाणे ह्या सिनेमाचे नाव 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये घेण्यात आले आहे. ५१ स्टँड-अप कॉमेडियन ह्यांनी एकाच सिनेमात भूमिका केल्याने ह्या सिनेमाच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. त्या सिनेमामागील सर्व कलाकार व सहकार्‍यांचे अभिनंदन. पण एरवी कुठल्याही लहान गोष्टीला उचलून धरणार्‍या वृत्तवाहिन्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केले असे दिसतेय. फक्त एक-दोन वृत्तवाहिन्यांनीच ह्याची दखल घेतली म्हणून खंत वाटली. पण बहुधा सिनेमाच्या चमूने सिनेमाची किती जाहिरात केली असेल ह्यावरही हे थोडेफार अवलंबून आहेच.

आता हा सिनेमा कधी पहावा ह्याचा विचार चालू आहे। सुनील पाल, राजू श्रीवास्तव, जॉनी लीवर ह्यांनी सादर केलेले विनोद आधी आवडायचे। त्यामुळे त्यांचा एक विनोदी सिनेमा, तसेच आता ह्या विक्रमामुळे पहावा असे वाटते। पण लाफ्टर चॅलेंज नंतर ह्या लोकांनी सादर केलेले तेच तेच, किंवा त्याच प्रकारचे विनोद, तसेच २००७ मध्ये आलेल्या ह्या कलाकारांची भूमिका असलेला 'जर्नी -बॉम्बे टू गोवा' सिनेमा (थोडासा) पाहिल्यानंतर आता हा सिनेमा आवर्जून पहायला जावे असे सध्या तरी वाटत नाही.

जानेवारी १५, २०१०

संकेतस्थळावर एखादी बातमी व त्यातील शब्दांवरून जाहिराती दाखवण्यात काही काही वेळा विरोधाभास असतो. (गूगल वर Misplaced ads शोधून पहावे. - स्वतःच्या जबाबदारीवर ;) )

पण
एकाच संकेतस्थळावर बातम्यांतील शब्द विरोधाभासात असल्याचा हा नमुना :) (कसल्याही चुका काढायचा प्रयत्न नाही)
पहिल्या बातमीत संक्रांतीचा अर्थ संकट असा वापरला आहे. आणि खालीच तिसर्‍या चौकटीत संक्रात म्हणजे संकट नाही असे म्हणणारी बातमी.
खालील उदाहरणात विरोधाभास नाही आणि गंभीरता आहे. पण एकामागोमाग दोन विरुद्ध आशयाच्या बातम्या आहेत.

जानेवारी १०, २०१०

अपेक्षेप्रमाणे 'शिक्षणाच्या आयचा घो' सिनेमाच्या नावावर वाद उठला. मराठा महासंघाने त्या नावावर आक्षेप घेतला आहे. गेल्या आठवड्यात उठलेला "झेंडा" सिनेमाचा वाद आणि आता हा. जमेल ते पक्ष , संघटना आता समोर येऊन आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहेत. ( मराठा महासंघाची पत्रकार परिषद सध्या चालू आहे त्यात तर त्यांचेच वाक्य आहे की सिनेमा प्रदर्शित झाला तर आम्ही आमची ताकद दाखवू.)
साध्या विचारांत तरी मला हे कळत नाही की नेमका सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच हे वाद का उठतात? (सिनेमाच्या पथ्यावर पाडण्यासाठीही असू शकतात हे तर भरपूर वेळा दिसतेच. पण इथे ती शक्यता आहे का?)

आता 'झेंडा' सिनेमाचे एक वेळ मानू शकतो की त्यातील दृश्यांवर किंवा त्या व्यक्तिरेखेवर त्यांचा आक्षेप आहे, ते सर्व सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळू शकतात, काही वेळा सिनेमाच्या प्रोमो मधूनही. पण सध्या तरी हा सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही आणि प्रोमोमध्ये तरी काही आक्षेपार्ह संवाद वगैरे दाखविले नाहीत. मग 'स्वाभिमान' ने सिनेमा न पाहताच त्यावर आक्षेप कसा नोंदवला?

आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्या सिनेमाबद्दल म्हणायचे, तर ह्या नावाचा सिनेमा येणार आहे हे ३ महिने आधीपासूनच आपल्याला माहीत होते. ते नाव वाचून मी तेव्हाच मित्रांना म्हणालो होतो की ह्यावर ही वाद उठणार. मग त्या मराठी महासंघाला ३ महिने काहीच माहीत नव्हते का? आधीच का नाही तक्रार आली?

आणि सरकारचे तर काय म्हणावे? नेहमीप्रमाणे बघ्याचीच भूमिका घेणार. कोणी कायदा हातात घेतला तर आम्ही पाहून घेऊ म्हणतात. त्याआधीच का नाही काही करत?

असो, आपण तर काय सिनेमा पहायला मिळेल त्यानंतरच ठरवू काय चांगले आणि काय वाईट ते.

जानेवारी ०९, २०१०

गेल्या आठवड्यात मी पाहिलेल्या 'संभवामि युगे युगे' नाटकाबद्दल लिहिणार होतो. मस्तपैकी लिहायला सुरुवातही केली होती. जवळपास ७० /७५ टक्के लिहून ठेवले होते. पण कार्यालयातील कामात वेळ लागल्याने घरी येण्यास उशीर होत गेला आणि नंतर सुट्टीत फक्त आराम करावासा वाटला. तसेच काही लिहिणेही जमले नाही. आज संध्याकाळी पुढे लिहावयास सुरुवात केली. पण संगणकात थोडी अडचण निर्माण झाली, त्यामुळे कित्येक दिवसांपासून लांबविलेले संगणकाचे काम करण्यास घेतलं तर त्याने माझा जुना विदा(डेटा) उडवून टाकला. आणि आता सध्यातरी मला ते पुन्हा लिहायची एवढी इच्छा वाटत नाही :(
चालढकल करत २ आठवडे अनुदिनीवर काहीच लिहिले गेले नाही. असो, पुन्हा नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न करेन.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter