मार्च २७, २००९

"एक लहान मुलगा. आई सांगते, 'आज खेळणे बंद'. तो मुलगा दु:खी होऊन खिडकीबाहेर मित्रांना खेळताना पाहतो. हळूच एक वस्तू उचलून घराच्या बाहेर जातो. सर्वांपासून दूर जाऊन वडिलांना फोन लावतो. आणि सांगतो की, 'आई मला रागावली तुम्ही तिला रागवा.' ......."
ही जाहिरात बहुतेकांनी पाहिली असेलच. नसेल त्यांनी इथे पहावी.
इतक्या वर्षांत पाहिलेल्या लहान मुलांच्या जाहिरातींपैकी ही मला सर्वात जास्त आवडली. त्या लहान मुलाचा निरागस चेहरा, मित्रांना खेळताना पाहून चेहर्‍यावरचे दु:खी भाव, हळूच लपून बाहेर जाताना घेतलेली काळजी, तसेच आईने खेळायला जायची परवानगी दिल्यानंतर आईला बाबा रागावल्याचा वाटलेला आनंद आणि आपण केलेला फोन उपयोगी पडला ह्याचे आश्चर्य. सर्व वेगवेगळे भाव मला खूप आवडले. अरे हो, त्याचे पार्श्वसंगीतही छान आहे.
आणि सर्वात शेवटी सूत्रधाराचे वाक्य, 'आज एक विश्वास आहे की आपल्या लोकांपासून आपण दूर नाही.' जाहिरातीतून दाखवलेला मुलाचा विश्वास हेच सांगतो.
(पुढील वाक्य एअरटेलच्या नेटवर्क बद्दल सांगते, तो विश्वास कितपत खरा आहे तो वेगळ्या वादाचा विषय आहे ;) )
अर्थात एअरटेलच्या इतर जाहिराती ही चांगल्या होत्या. तसेच मुलांच्या इतर चांगल्या जाहिरातीही भरपूर आहेत. पण मला ही जाहिरात त्यातील आशय आणि त्या मुलामुळेच जास्त आवडली.

मार्च २२, २००९

[आय.पी.एल चे सामने भारताबाहेर खेळावयाचे ठरविले गेले त्याच दिवशी मी हे प्रश्न माझ्या अनुदिनीवर लिहिले होते आणि ते मिसळपाव.कॉम तसेच मनोगत.कॉम वरही प्रकाशित केले होते. पण मध्येच पडलेल्या संभ्रमामुळे आणि क्रिकेट तसेच राजकारणावर लिहू नये असे वाटल्याने मी ते सर्व ठिकाणहून काढून टाकले. पुन्हा वाटले की क्रिकेट राहू द्या पण आपल्याशी निगडीत असलेल्या गोष्टींबाबत हे प्रश्न असल्याने पुन्हा माझ्या अनुदिनीवर प्रकाशित करत आहे.  हे लिखाण (निदान इतर संकेतस्थळांवर) अचानक अप्रकाशित का झाले ह्या बाबत कोणास प्रश्न पडल्यास उत्तर म्हणून हे निवेदन. ज्यांनी माझ्या प्रश्नांवर प्रतिक्रिया लिहिल्या होत्या त्यांचे आभार. :) ]
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार आय.पी.एल. अर्थात IPL चे T20 सामने भारताबाहेर खेळवण्याचे ठरविले आहे.
ह्या मागील कारण हेच की लोकसभा निवडणुकाही त्याच काळात होत असल्याने सामन्यांच्या दरम्यान सुरक्षितता देणे पोलिसांना कठीण आहे व बहुतेक राज्य सरकार तसेच पोलिसांनी त्यास नकार दिला आहे.

ह्यावरून काही प्रश्न मला पडलेत ते असे.
१. क्रिकेटला एवढे महत्त्व का? सामने पुढे ढकलणे जमू शकले नसते का? २/३ वर्षांकरिता क्रिकेटच्या सामन्यांचे वेळापत्रक ठरविलेले असेल त्यामुळे ते कठीण आहे. पण हे सामने मुख्यत्वे भारताशीच निगडीत आहे. फक्त इतर देशांचे खेळाडूही त्यात आले आहेत, त्यामुळे निवडणुका असल्यास ते पुढे ढकलणे योग्य नाही का?
२. जर सामने आधीच ठरविले होते, तरी आपल्या निवडणुका एप्रिल-मे दरम्यान होऊ शकतात ह्याचा त्यांनी विचार केला नव्हता का? केला असल्यास सुरक्षिततेबाबतचा प्रश्न तेव्हाही विचारात असायला पाहिजे. तो आत्ताच का समोर आला? आणि मग आता सरकारला दोष का द्यावा?
३. एक कारण सांगतात की सामने रद्द केल्यास आर्थिक नुकसान होउ शकते. पण आता तर एका देशातून दुसर्‍या देशात सामने ठेवणार तेव्हा त्यात खर्चाचा प्रश्न नाही येत का?
४. सामन्याच्या वेळी ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या खेळाडूंच्या मतदानाबाबत काय? उदा. निवडणूकीचे वेळापत्रक आणि सामन्यांचे वेळापत्रक पाहिल्यास कर्नाटक मध्ये २३ एप्रिल ला मतदान होणार आहे. त्याच दिवशी बँगलोर रॉयल चॅलेंजर्सचा सामना आहे. त्याबाबत काय? फक्त खेळाडू सोडा पण इतरही सदस्य त्यांच्या सोबत असतील त्यांच्या मतदानाचे काय? त्यांना बहुधा दुसर्‍या राज्यात त्या राज्याच्या मतदानाच्या दिवशी मतदानाची परवानगी देऊ शकतात का? दिली तरी हा अपवाद बरोबर आहे का? हाच अपवाद इतर खेळांकरीता मिळाला असता का?
५. आय पी एल च्या सामन्यांकरीता सुरक्षा मागणारे नेते, आताही जेथे सुरक्षिततेची नेमकी गरज आहे अशा संवेदनशील ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवून घेण्यात पुढाकार का घेत नाहीत? तसेच देशातील/राज्यातील इतर महत्वाच्या मुद्यांवर लक्ष देण्यापेक्षा क्रिकेटवर जास्त लक्ष का?

प्रश्न सध्या तरी संपले :)

मार्च २१, २००९

दोन आठवड्यांपूर्वी रेडियो मिर्ची वर किशोर कुमारचे 'पडोसन' चित्रपटातील 'मेरे सामने वाली..' हे गाणे ऐकले. पण खास गोष्ट म्हणजे ते गाणे दुख:द छटेचे आहे. सिनेमात किंवा कॅसेटमध्येही ते गाणे कधी पहायला/ऐकायला मिळाले नाही. आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार ते गाणे प्रदर्शित झाले नव्हते. पण ते गाणे ऐकण्यास जरूर मिळाले.

मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|
अफसोस ये है के वोह हमसे कुछ उखडा उखडा रहता है|
पहले तो हवा उन जुल्फों से खुशबू भी चुराकर लाती थी|
भूले से कभी उडती उडती आवाज भी आ जाती थी|
आवाज से भी महरूम हुए, इस बात का दुखडा रहता है|
मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|


हे गाणे जर सिनेमात असते तर कोणत्या प्रसंगात असते असा मी विचार करत होतो. घरातील चर्चेनुसार 'भोला' (सुनील दत्त) ला गुंडानी मारल्यावर नंतर असेल. पण मला असेही वाटले की 'बिंदू'(सायरा बानू) जेव्हा मास्टरजीसोबत (मेहमूद) लग्न करण्याचे ठरवते तेव्हा. पण गाण्याचे शब्द आणि प्रसंगांचा ताळमेळ जमला नाही.

म्हटले तुम्हाला विचारू.
तुमच्या मते हे गाणे सिनेमात कुठे असू शकले असते व ह्या गाण्याबद्दल इतर, म्हणजे ध्वनीमुद्रित झाले होते तर सिनेमात किंवा कॅसेटमध्येही का नाही आले वगैरे वगैरे, माहिती मिळू शकेल का?

फेब्रुवारी २७, २००९

आपणां सर्वांचा आंतरजालावर वावर खूप वाढला आहे. माहितीचा खजिना, विपत्रे, बँकेची कामे, खरेदी व इतरही फार कामांकरीता आपण आंतरजालाचा पूरेपूर फायदा घेत असतो. भरपूर वेळा आपल्याला सूचना मिळत असतात की आंतरजालावर वावरताना बँकेचे, खरेदी करण्याचे संकेतस्थळ वगैरे ठिकाणी सुरक्षितता का व कशी ठेवावी, इतर सुरक्षितता म्हणजे कोणत्याही संकेतस्थळावर स्वतःची खाजगी माहिती देताना नीट चौकशी करून घ्यावी इत्यादी इत्यादी. ह्यावर भाष्य करण्याचा किंवा सल्ला देण्याचा माझा बिलकुल विचार नाही.

माझा रोख आहे तो इतर गोष्टींवर, नुकत्याच वाचनात आलेल्या...

१.
http://infotech.indiatimes.com/News/Facebook_users_protest_new_terms/articleshow/4148601.cms
http://www.entrepreneur.com/localnews/1779412.html

ह्या बातमीप्रमाणे, काही दिवसांपूर्वी 'फेसबुक' ह्या संकेतस्थळाच्या चालकांनी आपल्या नियमात असा बदल केला होता की जेणेकरून कोणाही व्यक्तीने त्यात टाकलेले छायाचित्र, चलचित्र, लिखाण, संदेश ह्यावर फेसबुकचा अधिकार राहील. जरी सदस्याने त्याचे सदस्यत्व रद्द केले तरी त्या सर्व माहितीवर 'फेसबुक'चा अधिकार राहील.
सध्या तरी सदस्यांच्या जोरामुळे, तक्रारींमुळे फेसबुकने आपला तो नियम मागे घेतला आहे.
मी तरी 'फेसबुक' पाहिले नाही, वापरले नाही त्यामुळे त्यांच्या नियमांबद्दल जास्त माहिती नाही. पण ह्या बातमीमुळे एक जाणवले की सर्व संकेतस्थळांवर आपली खाजगी माहिती/छायाचित्रे ठेवताना पूर्ण सजग राहणे गरजेचे आहेच पण त्याबरोबर त्यांचे बदलते नियम जाणून घेणे ही तेवढेच आवश्यक आहे. भारतात फेसबुकसारखेच संकेतस्थळ 'ऑर्कूट' खूप लोकप्रिय आहे. आधीच गूगल विपत्रातील मजकूराप्रमाणे जाहिरात दाखविण्यात अग्रेसर आहे. त्यावरही आपण काळजी घेणे गरजेचे आहे.

२. http://timesofindia.indiatimes.com/India/Bloggers-can-be-nailed-for-views/articleshow/4178823.cms

दुसरी बातमी आहे ब्लॉग, अर्थात मराठीत आपण ज्याला आंतरजालीय अनुदिनी म्हणतो त्यासंबंधी. ह्या बातमीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने एका १९ वर्षाच्या मुलाने ऑर्कूटवरील एका समुदायात शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याबद्दलच्या खटल्यात असे म्हटले आहे की. ब्लॉग वरील लिहिलेल्या मजकूराबद्दल तक्रार आल्यास शिक्षाही होऊ शकते. आता त्या मुलावरील खटला हा जरी ऑर्कूट मध्ये लिहिल्याबद्दल होता तरी एखाद्याने स्वतःच्या ब्लॉगवरही एखाद्याबद्दल अपमानकारक, असभ्य भाषेत मजकूर लिहिला असल्यास, त्याची तक्रार आल्यास त्याच्यावरही कारर्वाई होऊ शकते.
हे एक बरे आहे... बडी मंडळी, नेते लोक कोणाबद्दलही काहीही जाहिरपणे म्हणू शकतात, एखादा मुख्यमंत्री शहीदाचा अपमान करू शकतो. पण तेच सर्वसामान्य नागरीकाने आपल्या मनातील विचार ब्लॉगवर लिहिले तर त्याला लगेच शिक्षा होणार.
ह्याचा अर्थ माझी त्या १९ वर्षाच्या मुलाला सहमती आहे असे नाही. लो़कशाही आहे म्हणून कोणीही कोणाबद्दल काहीही लिहिणे बोलणे बरोबर नाही. पण हाच नियम सर्वांकरीता सारखा लागू होईल असे मला नाही वाटत.

मी ही कोणाबद्दल आक्षेपार्ह लिहित नाही, फक्त एखाद्याचा निर्णय आवडला नाही तर त्याविरूद्ध लिहिणे होत असते . पण ह्या निकालाचा पुढे कसा वापर गेला जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे सध्या तरी एखाद्याबद्दल लिहिताना नीट विचार करून लिहावे लागेल. कोणीही उठून तक्रार केल्यास काय घ्या? :)

असले विविध प्रकार समोर येत असताना, आता पुढे आंतरजालावर वावरताना आधीच्यापेक्षाही जास्त सजग राहावे लागेल हे नक्की.

(जाता जाता: ह्या लेखात तर काही आक्षेपार्ह नाही आहे ना?)

जानेवारी ०६, २००९

आज संध्याकाळी स्कूटरवरून घरी येत होतो. समोर एक बाई लहान मुलाला हात धरून घेऊन चालली होती. लहानसा रस्ता असल्याने आधीच रहदारीत एकदम हळू जावे लागते. त्यात लहान मुलगा समोर असल्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी हळू नेत होतो. नेमका माझ्या स्कूटरच्या डाव्या बाजूला आल्यानंतर त्याने अशी हालचाल केली की मला त्या कमी वेगातही कचकन ब्रेक दाबावा लागला. अर्थात दोघांनीही एकमेकांना काही न बोलता आमची वाटचाल सुरू झाली. पण कित्येक दिवस मनात असलेला प्रश्न पुन्हा उफाळून आला.

रस्त्यावरून चालताना लोक लहान मुलांना हात पकडून रस्त्याच्या बाजूने ठेवून आपण आत राहत का चालतात?

फूटपाथ सोडून रस्त्यावरून लोक जात असतात हे काहीवेळा ग्राह्य आहे. पदपथावर लोक दुकाने मांडून ठेवतात, किंवा गर्दीही असते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर लोक येतात तेव्हा वाहन चालक व पादचारी ह्यांच्यात थोडीशी खुन्नस असतेच. तरीही त्यात थोडी समंजसताही असते हो. लोक स्वत: रस्त्यावरील वाहनांपासून सांभाळत चालत असतात (काही नसतात तो भाग वेगळा). पण लहान मुले रस्त्याच्या बाजूला असताना ते स्वत:ला किती सांभाळणार हो? ते तर स्वत:च्याच मस्तीत असतात. त्यात मग धक्का लागला तर मुलगा कसा प्रतिसाद देईल तेही माहित नाही. पण त्याचे पालक लगेच वाहनचालकावर डाफरणार.

गेल्या वर्षी कार्यालयातील एका सहकार्‍याशी ह्याच बाबतीत बोलणे चालू होते. तो म्हणाला की बहुधा लहान मुलांना आपला चळवळ्या हात धरून ठेवलेला आवडत नाही. तसे केले तर ते उगाच आणखी चळवळ करतात. म्हणून डावा हात पकडून ठेवतात. उजवा हात मोकळा असतो.
अरे हो, ह्यात डावा/उजवा हाही प्रकार येतो का? माझ्या नेमके लक्षात नाही पण बहुतेक वेळा मुलगा उजव्या बाजूला असतो व त्याला नेणारा त्याचा डावा हात पकडून असतो (आणि जाणे रस्त्याच्या डाव्या बाजूने) , असेही आहे का?

लहान मुलांना रस्त्यावरून चालत नेणे हा प्रकार मी स्वत: जास्त अनुभवला नाही आहे. त्यामुळे ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही.
आणि बहुधा त्यामुळेच लहान मुलांची आकलनशक्ती ह्यात मी हे टाकू शकलो नाही. ;)

तुमचा ह्या बाबतीत काय अनुभव आहे किंवा काय मत आहे?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter