मे १४, २००८

२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्‍या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा कंटाळाही आलेला दिसत होता त्यांच्या बोलण्यात. तरी आता परतीच्या प्रवासात घरून आणलेल्या दिवाळीच्या फराळावर मध्ये मध्ये हात मारणे चालू होते. एकंदरीत तरूणाईची मजा चालली होती म्हणा ना.

अशा गंमतीत, थोड्याफार कंटाळ्यात संध्याकाळचे ७/७:३० वाजले असतील. आमच्या २र्‍या वर्गाच्या स्लीपर डब्यात गर्दी वाढत चाललेली. इकडून तिकडे फिरायला जागा नाही. डब्यात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे लोक बसलेले. लोकांची कुजबुज वाढू लागली. "अरे, ही लोकं जनरल डब्यातील तिकिटे काढून ह्या डब्यात का आलीत?","कोणी काही बोलत का नाही?","आपले सामान कसे सांभाळून ठेवणार आता." वगैरे वगैरे.
संध्याकाळचे खाणे खाऊन झाल्यावर ते सर्व मित्र गप्पा मारत बसले होते. पुन्हा लोकांची कुजबुज ऐकू आली. तेवढ्यात एक स्टेशन आले. आणखी लोक आत चढू लागले.

अचानक, त्याला काय वाटले कोणास ठाउक. तो तडक उठला. त्याच्या जवळ खाली बसलेल्या माणसांना म्हणाला,"तिकिट दाखवा". त्यांनी जनरल डब्याचे तिकिट दाखवल्यावर तो म्हणाला, "हा डबा रिजर्वेशन वाल्यांचा आहे. ज्यांचे कोणाचे रिजर्वेशन नाही त्यांनी इथून बाहेर जावे". कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा त्याने डब्याच्या दरवाज्याजवळ असणार्‍यांना बाहेर जाण्यास सांगितले. कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला. त्याने आपल्या मित्रांना सांगितले," ह्या लोकांना बाहेर जायला सांगा, मी आता खूप रागात आहे."

पुन्हा तो मागे गेला. त्याच्या बसण्याच्या जागेपासून दरवाज्यापर्यंत जेवढे साध्या तिकिटावरचे लोक खाली बसले होते, त्यांना एक एक करून बाहेर जाण्यास सांगू लागला. आम्ही बाकीचे लोक, त्याचे मित्र बघतच राहिले हा काय करत आहे म्हणून. आम्ही कोणी त्याला अडवायचा प्रयत्न केला नाही. पण त्याचे मित्र तयारीत होते की काही धांदल होऊ नये, पुढे त्यांनीही हातभार लावला. ते ही आरडाओरडा करत मग लोकांना बाहेर काढू लागले. एक माणूस म्हणाला, "अरे, राहू दे आम्हाला." पण तो कोणाचे ऐकत नव्हता. दरवाज्यापर्यंतची जागा हळू हळू रिकामी होऊ लागली. लोक उतरून दुसर्‍या डब्यात चढू लागले. तो संडासाच्या जवळ गेला. तिकडे दोन डब्यांना जोडण्याची जी जागा होती तिथल्या लोकांना म्हणाला, "एक तर दरवाज्याच्या ह्या बाजूला रहा किंवा त्या बाजूला." एक दोन जण ह्या डब्यात आले तर म्हणाला, "इथे यायचे तर खाली उतरावे लागेल." ते लोक लगेच डब्यांच्या जोडणीवरून दुसर्‍या डब्याकडे गेले. तिकडील सर्व जागा रिकामी झाल्यावर त्याने ते पत्र्याचे शटर खाली ओढून बंद केले. डब्याच्या त्या बाजूचे दोन्ही दरवाजे बंद केले. व डब्याच्या दुसर्‍या बाजूकडे जाऊ लागला. तिकडे आधीच सर्व रिकामे झाले होते. त्याने लोकांना विचारले, "तो दरवाजा बंद आहे का?" उत्तर मिळाले," हो, ते शटर ही बंद केले आहे."

मग डब्यातील इतर लोकांना तो म्हणाला," तुम्हाला त्या लोकांना बाहेर काढायला काय झाले होते." वास्तविक आमच्या त्या दुसर्‍या कंपार्टमेंट मध्येही लोक म्हणत होते की त्यांना रिजर्वेशनच्या डब्यात जागा नाही द्यायला पाहिजे. त्यांना बाहेर काढल्यावर सर्वांना थोडे बरे वाटले होते.
आम्हाला वाटले "चला, एक कार्यकर्ता मिळाला", आणि मग डबा शांत झाला.

पण नंतर वाटत होते, त्याने जे केले ते किती बरोबर होते?
नव्हती तेव्हा जागा म्हणून आलेत लोक रिजर्वेशनच्या डब्यात. गर्दीच्या दिवसांत करायचे सहन थोडे. आम्ही नव्हतो का सहन करत? त्याच्या सोबतीचे कोणी त्यांत असते तर त्याने हे केले असते का?
जर त्या लोकांनी मारामारी सुरू केली असती तर ? कारण आजकाल मारामारी व्हायला लहानशे कारणही पुरेशे असते.
पुन्हा तो होता रेल्वेमध्ये, स्वत:च्या घरापासून/राहत्या जागेपासून दूर. का घ्यायची ही जोखीम?

असो, ही होती मी पाहिलेली एक क्रांती. एका क्षणात झालेली. एक क्षण चाललेली.

मे ११, २००८

नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले.

नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे. त्यामुळे ५० पैसे समजून ५ रू जाण्याची शक्यता जास्त म्हणून भरपूर लोकांनी सरकारकडे ते नाणे बदलण्याची विनंती केली असे वाचले होते. असा प्रकार आधीही झाला होता जेव्हा २ रू चे स्टीलचे नवीन नाणे काढले होते. मीही १ रू समजूनच ते एकाला देणार होतो. पण तेवढ्यात लक्षात आले, आणि जमा करून ठेवले. आणखी मागे जावे तर १ रू, ५० पैसे, २५ पैसे व १० पैशाची स्टीलची नाणी चलनात आली होती. नाण्यांचे ते सर्व प्रकार दिसतात घरी आताही. स्टीलच्या नाण्यांचे एक बरे आहे ती लोहचुंबकाला चिकटतात त्यामुळे एखाद्या लोहचुंबकावर भरपूर सुट्टे पैसे साठवून ठेवता येतात.

कधी काळी जुनी नाणी जमा करायचाही छंद लागला होता. पण जास्त काळ टिकला नाही. असो, जे छंदिष्ट आहेत ते बरोबर करतात जमा. इतिहासकालीन नाणी, वेगवेगळ्या देशांची नाणी आणि काय काय?
लहानपणी माझ्या आईने ५ पैशाची भरपूर नाणी जमा केली होती. त्यांचे एक जहाज बनवायचे होते म्हणून. पण ते ही काही झाले नाही. वेळेवर ती चलनात काढून टाकली म्हणून बरे, नाहीतर नुकसान झाले असते. ते झाले जुने. २/३ वर्षांपुर्वी मला सवय लागली होती, ऑफिसमधून घरी आल्यावर खिशातील नाणी ड्रॉवर मध्ये टाकायची. मग कधी वेळेवर उपयोगी पडायची.मी माझ्या बहिणीलाही सांगितले होते, 'पाहिजे तेव्हा काढून घे, पण किती जमा झाले मोजायचे नाही.' नंतर मुंबईबाहेर असल्याने त्यात खंड पडला. पण तो घरातील ड्रॉवरमध्ये नाणी जमा होण्यात. मी जिथे रहायचो तिथे हे सुट्टे पैसे एकत्र ठेवणे सुरूच होते. आता २ महिन्यांपुर्वी जेव्हा साफसफाई करताना पूर्ण ड्रॉवर रिकामे केले तेव्हा पाहिले भरपूर नाणी जमा झाली होती, १०० ते ११० रुपये. पण त्यातही थोडे नुकसान हे की २५ पैशांची नाणीही आहेत जी आता कोणी घेत नाही. जरी रिझर्व बँकेने बंद नाही केलीत, (हो, छापणे बंद केले) तरी लोकांनी ती बाद केलीत चलनातून. मधेच ऐकले होते की, बेस्ट चे वाहक घेतात ती नाणी. बघेन प्रयत्न करून.
ह्यावरून आठवले, माझ्यासारखेच किती लोकांनी घरी नाणी जमा करून ठेवली असतील. ज्यातील काही नाण्यांचा उपयोग आता होत नसेल. त्यामुळे आपले व सोबत देशाचेही नुकसान झालेच. तरी ह्यावर मार्ग आहे की बँकेने ती नाणी परत घेतली तर हे टळू शकेल. पण जी नाणी आपण देवाच्या नावाने नदीत/विहिरीत टाकतो ते पैसे तर गेल्यातच जमा आहेत. काही वर्षांपुर्वी त्याबद्दल ही पेपरमध्ये लेख वाचला होता. आधीच नास्तिक त्यात हा लेख वाचल्याने, दुसर्‍यांना नदीत पैसे टाकायला परावृत्त करू लागलो ;)

बरे, नाण्यांचा इतर उपयोग काय?
सर्वात पहिले समोर दिसते ते नाणे उडविणे. TOSS अर्थात नाणेफेकीत कोणाचा कौल लागतो ते पाहण्यासाठी. शोलेमधील ते प्रसिद्ध नाणे सर्वांना माहित असेलच. किंवा मग अंदाज अपना अपना मधील "चित मैं जिता, पट तू हारा". ह्यातील चित म्हणजे छापा की काटा? Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा. पण नंतर ती स्टीलची नाणी आल्यानंतर ते बदलून गेले. पण नंतर कधी छाप काट करण्याकरता काय वापरले आठवत नाही.

तसेच दिव्यात वात नीट रहावी म्हणूनही सर्वात पहिले आपण खिशातील नाणेच बाहेर काढतो.

इतर नाण्यांबद्दल आता नक्की अंदाज नाही, पण १ रुपयाचे नाणे भलतेच उपयोगात आणले गेले सगळीकडे. सार्वजनिक टेलिफोन, वजन करायचे यंत्र, भेट देण्याची पाकिटे. बरं, ह्यातील भेट देण्याच्या पाकिटात १ रूपयाचे नाणे चिकटवून ठेवणे गेल्या ४/५ वर्षात चालू झाले असेल पण टेलिफोन मध्ये ह्याचा वापर फार जुना आहे. अर्थात त्या यंत्रांना हे कळत नसेल की टाकण्यात आलेले नाणे हे खरोखरीचे नाणेच आहे की लोखंडाचा तुकडा, म्हणून तर एक रुपयासारख्या एखाद्या लोखंडाच्या चकतीचा वापरही करण्यात येत होता. किंवा मग खरोखरीच एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडून त्याला दोरा बांधून ते त्या यंत्रात टाकायचे व आतील खटका पडला की ते नाणे परत वर ओढून घ्यायचे असले प्रकार ही लोकांनी केल्याचे मी ऐकले आहे.

अरे हो, आणखी आठवले. माझी फजीतीच म्हणा. लहानपणी वजन करायच्या यंत्रात मी सहज गंमत म्हणून २५ पैशाचे नाणे टाकले ते तिकिट देणार्‍या वाटीत परत आले. मग मी ५० पैशाचे नाणे टाकले. ते ही परत आले. उचापतीत मग मी खिशातील २ रुपयाचे नाणे टाकले तर त्या नालायक यंत्राने ते नाणे आत घेतले. :( तेव्हा केलेले वजन २ रुपयांना पडले. त्यामुळे माझे वजन कमी झाले होते का ते आठवत नाही. पण खिशातील पैशांचे वजन असेही कमी होऊ शकते हे कळले :D
आता तर वजन/उंची/ तसेच वजन-उंची ह्यांचा समतोल आहे की नाही ते सांगणारे (Body Mass Index) यंत्रही आले आहे, जे मागते ५ रुपयांचे नाणे. ह्यावर काही मी तसे करून पाहणार नाही ;)

गेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मित्राकडे गेलो होतो तिथे त्यांनी घरातील ठराविक नाणी पूजेत ठेवण्यास काढली होती. त्यात मी कधी न ऐकलेले १० रू चे नाणे पाहिले. बहुधा हे नाणे ही चलनात आले नव्हते.

असो, माझे नाणेपुराण एवढेच.

रिझर्व बँकेच्या ह्या संकेतस्थळावर भारतीय गणराज्यातील नाण्यांची यादी आहे. त्यात हे १० रुपयाचे नाणे नाही. तसेच १२/१५ वर्षांपुर्वी काढलेली ५ रुपयांची नाणी ही त्यात नाहीत. कोणास आठवतेय का ते नाणे? मोठ्या आकाराचे व मागे श्रीमती इंदिरा गांधीचे चित्र असलेले? तसेच आणि काही नाणी माहीत आहेत का जी रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरही नमूद नाहीत?

एप्रिल २०, २००८

मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..

शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)

स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का?

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्‍याला खरंच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्‍यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते. शेतकर्‍यांना भाव मिळत असल्याने महागाई वाढत असल्यास, इतके वर्षे महागाई वाढत असल्याचे दिसत आहे त्यात मग शेतकरी हलाखीचे जीवन का जगत आहेत?
हो, अवेळी पावसाने शेतीत नुकसान झाले त्यामुळे अन्यधान्याची कमी हे एक कारण आहेच. पण महागाई वाढण्यास इतर कारणे नाहीत का? सरकारी खात्याने ज्या धाडी टाकल्या त्यात साठेखोरांनी करोडो रुपयांचे धान्य साठवून ठेवण्यात आल्याचे दिसले त्याबाबत त्यांचे काहीच म्हणणे नाही का?

दोन वर्षांपुर्वी MRP अर्थात सामानाच्या अधिकतम मूल्याचे नियम धाब्यावर बसवून जे अवाजवी मूल्य आकारण्यात येत होते त्याबाबत श्री शरद पवार ह्यांच्याकडे विचारणा केली गेली त्यांनी त्याबाबत कारर्वाई करण्यात येईल असे सांगितले होते. थोड्याच दिवसांत ह्याबाबत काहीच केले गेले नसल्याने त्यांना विचारले असता त्यांनी "असे काही झाले असल्याची मला माहीती नाही" असे सांगितले (संदर्भ: मी आवाज वाहिनीवर त्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया बघितल्या होत्या.)

आता त्यांनी हे वाक्य म्हणणे म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती होणार असेच दिसते. म्हणजे आधी काही तरी एक सांगणे. नंतर असे काही घडलेच नाही असे सांगणे.

लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडविणारा भूकेकंगाल होता कामा नये ह्यासाठी जर महागाई वाढत असेल तर माझे महागाई विरोधात काही म्हणणे नाही. शेतकरीच काय पण कोणीही भुकेने त्रासला जाऊ नये असे मलाही वाटते. परंतु मग राज्यकर्त्यांनी ह्याबाबत खरोखरच काय घडत आहे त्याचे लोकांसमोर नीट निवेदन करावे.

खरोखर काय कारणे आहेत ते कळावे असे मलाही वाटते.

एप्रिल ११, २००८

गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला.
एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार."

खरोखरच चांगला विचार.

तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला,

एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या. आम्ही तुम्हाला वर ओढतो."
तो माणूस काही केल्या हात समोर करत नाही. लोक म्हणतात "काय झाले ह्याला?"
तेवढ्यात दुसरा एक माणूस पुढे येतो आणि म्हणतो," अरे हा माणूस एकदम कंजूस आहे. कोणाला काही देत नाही." आणि मग त्या माणसाकडे पाहून बोलतो,"अहो, माझा हात घ्या. त्याला धरून वर या".
लगेच तो (कंजूस) माणूस पुढे होऊन ह्याचा हात पकडतो.

वाटले, हात धरण्यावर थोडे लिहू. पण खूप विचार करूनही ते शब्दात बाहेर आले नाही. मग विचार केला, एकाच गोष्टीवरून दोन वेगळे विचार मनात येतात ते लिहूया. म्हणून हा प्रयत्न...
थोडे असे, थोडे तसे.

महाविद्यालयात असताना एका मित्राने पुढील सांगितले होते. आता कुत्र्या-मांजरांचे विचार त्याला कोणी सांगितले हे मी त्याला नाही विचारले, तुम्ही मला नका विचारू ;)
कुत्र्याला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा तो विचार करतो, "हा माणूस मला खायला देतोय. हा नक्कीच महान/देव आहे."
मांजरीला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा ती विचार करते, "हा माणूस मला खायला देतोय. म्हणजे मी नक्कीच कोणीतरी महान/देव आहे."

२/३ दिवसांपूर्वी ’स्टार माझा’ पाहताना हे मनात आले.
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. आपण मॉल मध्येच जाऊन घेतले पाहिजे. आपले पैसे वाचतील.(सर्वसामान्यांचा विचार)
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. त्यांनी नक्कीच साठा करून ठेवला असेल. त्यांची चौकशी करायला पाहिजे. (सरकार आणि वृत्तवाहिन्यांचा विचार)

बघूया, आणखी काही असे विचार आठवतात का?

एप्रिल ०६, २००८

ह्या आधीचे लेख इथे वाचावेत.
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २

खुशिया बांटने से बढती है, दुख बांटने से कम होता है.
हेराफेरी मधील हे वाक्य. परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ला सांगत असतो. नेहमीच्या जीवनात उपयोगी पडेल किंवा पडत आलेले असे हे.

दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गोली गोली पे लिखा है मरने वाले का नाम
जलजला (की झलझला?) ह्या सिनेमातील वाक्य डॅनीच्या तोंडी आहे. हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हापासून हे वाक्य लक्षात राहिले आहे. (खरे तर तेव्हा एकदाच पाहिला आहे हा चित्रपट. बाकी २ वर्षापूर्वी चालू होता कुठल्याशा वाहिनीवर, पण नाही पहायला मिळाला.)

मै तुम्हे भुल जाऊ यह हो नही सकता और तुम मुझे भुल जाओ यह मैं होने नही दूंगा
सुनील शेट्टी शिल्पा शेट्टीला म्हणतो, धडकन सिनेमात. ह्याच्या गाण्यांची कॅसेट ऐकताना त्यात गाण्यांच्या आधीची वाक्येही ठेवली होती. (हा प्रकार जुन्या सिनेमांच्या गाण्यांच्या कॅसेट मध्ये पहायला मिळायचा. आता मध्ये पुन्हा वापरला गेला होता.) त्यानंतर सिनेमा पहाताना कळले की ह्यात सुनील शेट्टीची ऍक्टींग एकदम तीव्र आहे.

ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?
कुछ कुछ होता है सिनेमात राणी मुखर्जी शाहरूख खानला म्हणते. सिनेमात तो प्रसंग दाखविला नाही आहे पण सुरूवातीला शाहरूख खानला हे वाक्य आठवते असे दाखविले आहे. तसे म्हणायला गेले तर ह्या सिनेमातील एकूण एक वाक्ये त्यावेळी पाठ होती. (अगदी पार्श्वसंगितासोबत, त्याबद्दल नंतर कधीतरी). हे वाक्य वेगळ्या कारणाने लक्षात आहे अजून.वसतीगृहात असताना एका मुलाला, राहूल नाव त्याचे, सहज विचारले, फिल्मी स्टाईल मध्ये. "ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?". तो बहुधा आधीच कसल्या तरी रागात होता, रागात ’नाही’ म्हणून निघून गेला. :)

"नौकरी मिली?" "नही.. आपको?"
स्टाईल सिनेमात प्रिंसिपल दाखविलेला नट, स्वत:ची नोकरी गेल्यावर चंटू बंटू कडे मदत मागायला जातो. रात्री घरी आल्यावर जेवताना तो आपल्या मुलाला विचारतो की नोकरी मिळाली का? तेव्हा त्याचा मुलगा 'नाही' म्हणतो आणि त्याला विचारतो की 'तुम्हाला मिळाली का?' पूर्ण सिनेमा विनोदी असूनही हे ह्या एका वाक्याने इथे आणखी धमाल वाटते.

गाय ने दिवार पे चढके गोबर कैसे किया?
तकदीरवाला सिनेमात असरानीने चित्रगुप्त चे काम केलेले आहे. एका घरासमोर राहून तो काहीतरी न्याहाळत असतो तेव्हा त्या घरातील मुलगी पोलिसांना बोलाविते. तेव्हा असरानी पोलिसाला (बहुधा अनुपम खेरला) हे विचारतो.

T O to, D O do तो फिर G O गू क्यू नही होता.
चुपके चुपके सिनेमात धर्मेंद्र चे ओम प्रकाशला हे विचारणे सर्वांनाच लक्षात असेल.

"काहे मारा उसको?" "आप से मिलना था." "यह कोई तरीका हुआ मिलने का?"
नाना पाटेकर च्या माणसाला मारले म्हणून तो अजय देवगणला जाब विचारतो. तेव्हा अजय देवगण सांगतो की नाना पाटेकरला भेटायचे होते. त्यावर नाना पाटेकरचा प्रश्न. ही काय पद्धत आहे का भेटण्याची? सिनेमा तसा थोडाफार गंभीर होता. त्यात हे वाक्य विनोदी मजा देउन गेले. :D सिनेमा: अपहरण

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter